संत एकनाथ यांनी ज्ञानेश्वरी ग्रंथाचे आणि ज्ञानदेवांच्या समाधीचे संशोधन प्रथम केले ! नाथांनी त्यांच्या वाङ्मयातून भागवत धर्माच्या परपंरेचे सातत्य आणि विकास साधला. त्यांचे नाथ भागवत, रुक्मिणी स्वयंवर, भावार्थ रामायण हे तात्त्विक चिंतनपर ग्रंथ. नाथांच्या आत्माविष्काराला वाट मिळते ती प्रामुख्याने त्यांच्या स्फूट रचनेतून. तशा स्फूट रचनांत अभंग, भारुडे, गवळणी, विरहिणी, कृष्णकथा, पदरच
संत एकनाथ यांच्या गवळणी विशेष प्रसिद्ध आहेत. त्यात अनन्य शरणागती आहे. भक्ती, विरहासक्ती, सख्यमैत्रीचा भाव आहे, आर्तता आहे. वरून शृंगार पण अंतरी अद्वैत असे त्यांचे स्वरूप आहे. गवळणी म्हणा – गायला गोड आहेत, त्यामुळे त्या सामान्य जनांच्या तोंडी सहज बसून गेल्या आहेत. नाथांच्या गवळणी जवळजवळ शहाण्णव असून त्यांत एकोणीस विरहिणी आहे. त्यांचे स्वतंत्र अभंग ‘रासक्रीडा’ या विषयावर आहेत. कृष्णाने रासक्रीडा गोपिकांच्या मनात जो भाव होता, तो पुरवण्यासाठी केली असा नाथांच्या सांगण्याचा भावार्थ आहे.
ईश्वरभेटीची आर्तता, उत्कटता आणि त्यासाठी विलक्षण आतुर झालेले एकनाथांचे कविमन त्यांच्या अनेक अभंगांतून दिसून येते. एकनाथांच्या अनेक गवळणी महाराष्ट्रात लोकप्रिय आहेत: उदाहरणार्थ ‘असा कसा देवाचा देव बाई ठकडा’ किंवा ‘नंदनंदन मुरलीवाला’, ‘भुलविले वेणूनादे’, ‘गोकुळी लाघव दावितो चक्रपाणी । कृष्णरुपी भाळल्या गोपिका नारी’ ।। ‘चला बाई वृंदावनी रासक्रिडा पाहू’, ‘देखिला अवचिता सुखाचा सागरु’ ।
एकनाथांच्या सगळ्या गवळणी-विरहिणींचा गाभा आहे तो अद्वैताचा. श्रीकृष्ण खोड्या करतो म्हणून तक्रार करणाऱ्या गोपी एखाद्या दिवशी मात्र तो आला नाही तर ‘तो का आला नाही?’ म्हणून तक्रार करत राहतात. त्यांनी कृष्ण-गोपींची कितीतरी रुपे रंगवली आहेत ! मुरकत-मुरकत चालणारा कृष्ण, कुंडले हलवत आणि डोळे मोडीत चालणारी राधा, पाच रंगांचे शृंगार करून नटलेल्या पाच गवळणी, दुडीवर दुडी घेऊन बाजाराला निघालेल्या गोपी, गवळण ‘गोरस’ विसरली म्हणत असताना त्यांची झालेली फजिती… नाथांनी बाळकृष्णाची अशी अनंत रुपे तन्मयतेने रंगवली आहेत. भिंगाचे भिंगुले, खांद्यावर अंगुले टाकून नाचत येणारे तान्हुले बघून देहभान विसरणाऱ्या तरुणी, कृष्णविरहामुळे वेडावलेल्या गवळणी, कान्हाबाई, कृष्णाबाई म्हणून मुरलीवाल्याला साद घालणाऱ्या आणि हुलकावणी देणाऱ्या गवळणी… अशी. त्यांनी कृष्णाला विठ्ठलरुपात पाहिले आहे.
‘आल्या पाच गवळणी’ ही रंगांची किमया असलेली वेगळीच गवळण किंवा दुडीवर दुडी अशा प्रकारे घड्यावर घडे ठेवून एकचित्ताने पाणी भरणाऱ्या गोपस्त्रियांचे वर्णन यांतून साधकाला एकात्मतेचे रूपक जाणवते. नाथांची खास शैली अशा विविध रचनांतून जाणवते. नाथांच्या सांगण्याचा भावार्थ गोपिकांच्या मनात जो भाव होता तो पुरवण्यासाठी कृष्णाने रासक्रीडा केल्या असा दिसतो. नाथांनी ‘गौळणी सांगती गाऱ्हाणी । रात्री आले चक्रपाणी’ ।। किंवा ‘कशी जाऊ मी वृंदावना । मुरली वाजवितो कान्हा’ ।। यांसारख्या गवळणींमधून मुरलीधराचे सारे लाघव मूर्तिमंत उभे केले आहे.
एकनाथांनी गवळणी, विरहिणी, कृष्णकथा वस्तुनिष्ठ भूमिकेमधून सांगितल्या असल्या तरी त्यांचे खरे महात्म्य त्यांच्या आत्मानुभूतीच्या उद्गारात आहे. शंकर अभ्यंकर यांनी त्यांच्या गवळणींचा भावार्थ सुंदर रीतीने उलगडून दाखवला आहे (भारतीय संस्कृतिकोश). ‘श्रीकृष्णाने एकदा एका गोपीची वेणी आणि तिच्या पतीची शेंडी यांची गाठ मारली. त्या दोघांनी गयावया केल्यावर त्याने ती गाठ सोडली. अर्थात त्या दोघांना चितस्वरूप केले. गवळणी म्हणजे केवळ मनोरंजन नव्हे. त्यांतील उत्कट भक्तीमुळे आत्मबोध होतो. आत्मबोधामुळे कृष्ण आणि गोपी यांचे अद्वैत समजते असा उलगडा ते करतात.
– शोभा घोलप, पुणे २५४६१०८२
(‘आदिमाता’ वरून उद्धृत)