महेश म्हात्रे हा तरुण, अभ्यासू पत्रकार आहे; स्वाभाविकच त्याने दैनंदिन बातम्यांवर आधारित पत्रकारिता सोडून संशोधनाकडे मोर्चा वळवला आहे. त्याने पत्रकारितेचा बाज सोडला नाही. त्यामुळे महाराष्ट्र रिसर्च सेंटर या, त्यानेच सुरू केलेल्या संस्थेमार्फत महाराष्ट्राबाबतची सामाजिक-राजकीय सत्याधिष्ठित माहिती संकलित केली जाते. त्यांवर आधारित अहवाल सादर केले जातात.
महेशने त्यापूर्वी प्रिंट, टीव्ही व इलेक्ट्रॉनिक अशा तिन्ही मीडियांत महत्त्वाच्या जागांवर काम केले आहे. त्याने मराठी, इंग्रजी व हिंदी अशा तिन्ही भाषांतील वृत्तपत्रांत व अन्य मीडीयांत संपादकपदच भूषवले आहे. महेशने वेगवेगळ्या शिष्टमंडळांच्या माध्यमांतून अनेक देशांचे दौरे केले आहेत. तो ‘टेड टॉक्स’ या इंग्रजीतील गाजलेल्या भाषण मालिकेत अवतरलेला एकमेव मराठी भाषक संपादक आहे.

अभिजात मराठी ‘कोसळते’ तेव्हा…
आज सकाळी, नेहमीप्रमाणे सगळी वृत्तपत्रे घेऊन बसलो होतो. आधी मराठी वर्तमानपत्रांचा गठ्ठा काढला आणि मला धक्काच बसला. जवळपास सगळ्याच वर्तमानपत्रांनी ‘कोसळले’ याच शब्दाला प्राधान्य दिलेले दिसले. ‘एअर क्रॅश’ या शब्दाचे भाषांतर करताना केलेले ‘विमान कोसळले’ हे भाषांतर चुकीचे नाही. पण जेव्हा ‘क्रॅश’ हा शब्द अचानक आणि जोरदार अपघात किंवा धडक होणे, ज्यामुळे वस्तू किंवा वाहन नुकसान पावते किंवा तुटते यासाठी वापरतो. याशिवाय हा शब्द तांत्रिक संदर्भात संगणक प्रणालीच्या अचानक बंद पडण्याच्या क्रॅश स्थितीसाठीही वापरला जातो. तो शब्द मराठीत वापरताना किंवा ती घटना मराठीत सांगताना, आमच्या मातृभाषेतील वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रे कोणतेच भाषिक वैविध्य वापरणार नसतील तर, ते भाषिक भविष्यासाठी चांगले लक्षण नाही. मुख्य म्हणजे, सर्रास सगळीच वृत्तपत्रे हे भाषिक दारिद्रय लपवण्यासाठी, बटबटीत ले-आऊट, सादरीकरण करत असतील, तर सामान्य वाचकाने काय समजावे ? तुम्ही आजचे कोणतेही इंग्रजी वृत्तपत्र काढून पहा. तेथे संपूर्ण घटना सांगणारी हेडलाईन, सौम्य छायाचित्रे पाहायला-वाचायला मिळतील.
त्याउलट, मराठी वृत्तपत्रे म्हणजे एक सारखी धडकी भरवणारी शीर्षके, अंगावर येणारी छायाचित्रे आणि भडक-गडद रंगांचा वापर. याचा अर्थ काय काढावा? मराठी भाषेतील शब्दसंख्या कमी होत चालली आहे किंवा मराठी भाषिक पत्रकारांची विचार आणि लेखनक्षमता कमी झाली की काय? असा प्रश्न माझ्यासारख्या पत्रकारितेच्या विद्यार्थ्याला सतावतो. कारण जर आम्हाला मराठीच्या अभिजात असण्याचा अभिमान असेल, तर हे भाषिक दारिद्रय काय कामाचे?
भारतात संविधानिक मान्यता लाभलेल्या बावीस प्रमुख भाषांमध्ये मराठी भाषेचा तिसरा क्रमांक आहे ही गोष्ट महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे. मराठी भाषा देशातील सुमारे दहा टक्के लोक बोलतात आणि ती इतक्या मोठ्या प्रमाणावर वापरली जाणारी भाषा आहे हे तिच्या व्यापक प्रसाराचे प्रमाण आहे. मात्र, ही सांस्कृतिक समृद्धी आणि भाषिक महत्त्व केवळ आकडेवारीपुरते मर्यादित राहिल्यास, त्यामागे असलेली खरी चिंतेची बाब लक्षात येत नाही.
कालांतराने एक गोष्ट स्पष्टपणे जाणवू लागली आहे, की मराठीची गुणवत्ता आणि शुद्धता यामध्ये सातत्याने घसरण होत आहे. विशेषतः प्रसारमाध्यमांमध्ये- वृत्तपत्रे, नियतकालिके, ऑनलाईन पोर्टल्स यामध्ये पूर्वी ज्या प्रकारे दर्जेदार मराठी भाषा वापरली जात होती, ती आता दुर्मीळ होत चालली आहे. चपखल म्हणी, नीटस वाक्यरचना, व्याकरणसंपन्न शैली आणि समर्पक शब्दसंपदा – हे सारे गुण पूर्वी लेखनात सहजपणे दिसून येत होते. तेच आजकालच्या मराठी पत्रकारितेमध्ये आणि लेखनप्रकारांमध्ये कमी होताना दिसतात.
तांत्रिक भाषेचा अतीव वापर, इंग्रजीतून थेट भाषांतरित केलेले वाक्यरचनेचे ढाचे, तसेच व्याकरणाच्या नियमांकडे होणारे दुर्लक्ष यांमुळे मराठी भाषेचा मूळ गाभा डळमळीत होतो आहे. फक्त मराठी शब्द वापरणे म्हणजे शुद्ध मराठी नव्हे; तर त्या शब्दांची नेमकी मांडणी, योग्य शब्दांची निवड आणि वाक्याची सांस्कृतिक बैठक यांचे भान आवश्यक आहे.
भविष्यात याचा परिणाम असा होऊ शकतो, की जर अशीच अधोगती सुरू राहिली तर मराठी तिचा तिसरा क्रमांकदेखील गमावण्याची शक्यता आहे. कोणतीही भाषा क्रमांकांनी नव्हे, तर तिच्या वापराच्या दर्ज्याने आणि सातत्याने टिकून राहते. जर नवीन पिढ्यांना शुद्ध, समृद्ध आणि अभिव्यक्तिपूर्ण मराठीचा अनुभवच मिळणार नसेल, तर त्यांची भाषेवरील पकड सैलावतच जाईल.
ही स्थिती केवळ भाषेचे सांस्कृतिक अवमूल्यन करणारी नाही, तर ती आपल्या अस्मितेवर आणि ओळखीवरही गदा आणणारी आहे. त्यामुळे केवळ सरकारी उपक्रम नव्हे, तर लेखक, संपादक, पत्रकार, शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनीही मिळून मराठी भाषेच्या संवर्धनासाठी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे असे वाटते.
– महेश म्हात्रे 9870303430 maheshbmhatre@gmail.com
मराठी कम्युनिटीमध्ये सहभागी होण्यासाठी सोबतच्या लिंकवर क्लिक करा.