सुवर्णा साधू-बॅनर्जी या चिनी भाषेच्या अभ्यासक. त्या अरूण साधू यांच्या कन्या. अरूण साधू यांनी प्रथम महाराष्ट्राला ‘आणि ड्रॅगन जागा झाल्यावर’ नावाचे पुस्तक लिहून चीनची ओळख करून दिली. सुवर्णा दिल्लीला चिनी भाषा शिकण्यासाठी गेल्या. त्यांनी दिल्लीच्या जेएनयूमधून चिनी भाषेत मास्टर केले. त्या चिनी अर्थव्यवस्था, चिनी भाषा आणि चिनी जनतेच्या भावभावना यांसारख्या विविध विषयांवर लेखन करतात. त्यांचे विचार आणि विश्लेषण चिनी आणि जागतिक राजकारणावर प्रभाव टाकणाऱ्या घटनांवर केंद्रित असते. त्यांनी ‘दिव्य मराठी’ या वृत्तपत्रात ‘चीनचे अंतरंग’ या विषयावर दोन वर्षे सदर लेखनही केले. एरवीही सुवर्णा साधू महाराष्ट्रातील वर्तमानपत्रांत लिहित असतात. त्या काही काळ दिल्लीच्या ‘हिंदू’ वृत्तपत्रात नियमित पत्रकारही होत्या.
त्या शिक्षणानंतर लग्न होऊन दिल्लीत गुडगाव येथे स्थायिक झाल्या. त्यांचे पती सुतानू बॅनर्जी व त्या, दोघांनी मिळून स्वतःचा ‘प्रकृती इनबाउंड’ नावाने पर्यटन व्यवसाय 1999 मध्ये सुरू केला. ती दोघे चिनी भाषेचे पदवीधर असल्याने, त्यांनी चीन, थायवान, सिंगापूर अशा चिनी भाषिक देशांतील लोकांना भारताच्या सहली घडवल्या. त्यांचा व्यवसाय कोविडचा तडाखा बसेस्तोवर उत्तम सुरू होता. त्यानंतर मात्र भारत सरकारचे चीनशी संबंध बिघडले आणि चिनी प्रवाशांना व्हिसा मिळणे बंद झाले. त्यामुळे त्यांचा व्यवसाय थंडावला आहे. सुवर्णा यांचा स्वतःचा ब्लॉग आणि T2india.com नावाची वेबसाइट आहे. त्यांच्या घरी मराठी आणि बंगाली अशा दोन्ही भाषा बोलल्या जातात. त्यांना मुलगी तन्वी आहे. बाहेर दिल्लीमध्ये हिंदी भाषा बोलली जाते. तन्वीला विचारले, तुझी मातृभाषा कोणती? तर ती दुग्ध्यात पडते.
सुवर्णा साधू त्यांचे चीन संदर्भातील निरीक्षण सांगतात, की भारताला आणि चीनला साधारण एकाच काळात स्वातंत्र्य मिळाले. तरीही चीन भारतापेक्षा पन्नास वर्षे पुढे आहे. चीन नव्वदनंतर राजकीय, सामाजिक, शैक्षणिक स्तरावर मोठ्या प्रमाणात पुढे गेला. त्यांच्या मते चिनी लोक फार मेहनती आहेत. भारत चीनकडून सर्व माल घेत असतो परंतु भारताने एकदाच चीनला बौद्ध धर्म देऊन ठेवला आहे. त्यातून त्यांची आध्यात्मिक उन्नती झाली. सर्वसामान्य चिनी लोक भारताला देवभूमी म्हणतात.
चिनी भाषिकांत भाषाभिमान ठासून भरलेला आहे. ते चिनी शब्दांचाच सर्वत्र वापर करतात. सुवर्णा यांना ‘राजहंस’च्या दिलीप माजगावकर यांनी चीनविषयक पुस्तक लिहिण्यास सुचवले आहे. ते यावर्षाच्या अखेरीस पूर्ण करण्याची सुवर्णा यांची उमेद आहे.
– नितेश शिंदे info@thinkmaharashtra.com