Home वैभव इतिहास गाडगेबाबांची मंतरलेली पत्रे – सार्वजनिक त्यागाची गीता (Gadgebaba’s letters are treasure of...

गाडगेबाबांची मंतरलेली पत्रे – सार्वजनिक त्यागाची गीता (Gadgebaba’s letters are treasure of India’s value system)

2
228

मी गाडगेबाबांचे निधन 20 डिसेंबर 1956 रोजी झाले त्यावेळी एक वर्षाचा असेन. त्यांचे अस्तित्व हे आमच्या तिडके कुटुंबाच्या जगण्याचा भाग होते. आमचे कुटुंब तिडके सावकाराचे. गाडगेबाबा आणि तिडके सावकार यांच्यातील संघर्ष हे बाबांच्या जीवनचरित्रातील महत्त्वाचे वळण होय. तिडके यांनी सावकारीतून पूर्णा-पेढी, उमा नदीच्या खोऱ्यातील हजारो एकराची मालकी मिळवली होती. तरुण डेबुजीने (गाडगेबाबांनी) मामाची कष्टाने फुललेली शेतीसावकार गिळंकृत करतोय हे पाहून, हाती काठी घेऊन सावकाराचा प्रतिकार केला. सावकार लवाजम्यासह, भाडोत्री गुंडांसह पळून गेला. सावकारशाहीला सुरुंग लागला. ही किमया तरुण डेबुजी (गाडगेबाबा) यांची. गहाणखते मागण्याची हिंमत बाबांच्या अभयामुळे शोषितांमध्ये निर्माण झाली.

गंमत अशी, की पुढे, तिडके सावकारांनी (बनाजी, प्रीतमजी) गाडगेबाबांच्या सामाजिक उपक्रमाला आर्थिक मदत दिली. तिडके यांना घाट, पाणपोया, सदावर्ते स्थापण्याची उपरती झाली. माझे वडील भगवंतराव हे त्याच तिडके कुटुंबातील. ते हिस्लॉप कॉलेजमधून पदवीधर होऊन, वकिली करण्याचा बेत करून त्यांच्या गावी परतले. भगवंतराव यांनी 1942 च्या स्वातंत्र्यलढ्यात सहभाग दिला; पण त्याच वेळी, स्वातंत्र्यलढ्यात कार्यरत शिक्षित तरुणीशी घरच्यांच्या विरूद्ध जाऊन आर्यसमाज मंदिरात लग्न केले. त्यांनी ग्रामीण मुलामुलींच्या शिक्षणासाठी शाळा काढण्याचे 1950-52 च्या दरम्यान ठरवले.

गाडगेबाबांची भ्रमंती महाराष्ट्रात, देशात चालू असे. पण त्यांची पत्नी, मुलगा हे मूर्तिजापूरला, गोरक्षण शाळेच्या परिसरातील खोपटात राहत असत. गोरक्षण शाळा हे गाडगेबाबांचे काम फक्त ‘गोरक्षण’ या नावाने ओळखले जाते. त्यामुळे बाबा तेथे अधुनमधून येत. भगवंतरावांचे शाळा काढण्याचे प्रयत्न त्यांच्या कानावर गेले. बाबांनी त्यांना (भगवंतरावांना) निरोप धाडला, की ‘तुम्ही येता की, मी येऊ भेटीले’? दोघांची दीर्घ चर्चा झाली. शाळा काढण्याचे ठरले. बाबांनी ‘शाळेला माझे नाव देऊ नका’ असे निक्षून सांगितले. अच्युतराव देशमुख (बाबा त्यांना दादा म्हणत) व भगवंतराव तिडके (बाबा, नानासाहेब) यांनी त्यांना तुमच्या नावामुळे शाळेला वर्गणी मिळेल असे परोपरीने समजावून सांगितले. तेव्हा बाबा तयार झाले. बाबा हाती कंदील घेऊन घरापर्यंत सोडायला आले. बाबा शाळा स्थापण्याच्या व बाबांच्या विधायक कामाच्या निमित्ताने 1950 ते 1956 म्हणजे, गाडगेबाबांच्या निधनापर्यंत सहा वर्षे त्यांच्याबरोबर होते. त्या सहा वर्षांतील दोघांची पत्रे बरीच आहेत. निरक्षर गाडगेबाबा पाच-सहा अनुयायांना एकाच वेळी वेगवेगळा मजकूर सांगून विविध संस्थाचालकांशी संवाद साधत. एका निरक्षर फकिराने अशी शेकडो पत्रे लिहवून घेतली ! त्यांतील काही माझ्या संग्रही आहेत. शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रातून त्यांच्या प्रशासकीय कौशल्याचे जसे दर्शन घडते, तसे गाडगेबाबा त्यांच्या पत्रांतून करुणा, तळमळ व वैराग्याच्या विविध रंगांनी भेटतात. गो.नी. दांडेकर, द.ता. भोसले यांनी या पत्रांचे वेगळेपण त्यांनी लिहिलेल्या बाबांच्या चरित्रांत अधोरेखित केले आहे. उषा वेरूळकर यांनी त्या पत्रांचे विषयनिहाय वर्गीकरण गाडगेबाबांच्या व्यक्तित्वावर केलेल्या पीएचडी संशोधनात केले आहे.

मी बाबांची पत्रे आणि त्यांतील आठवणींचे संदर्भ बालवयापासून ऐकत होतो, सहानुभवत होतो. भगवंतराव नानासाहेब जनपदसभेचे अध्यक्ष होते. ते राजकारण, सार्वजनिक जीवन यांत अग्रेसर होते. पण, त्यांनी शाळा आणि बाबांचे प्रबोधनकाम यांत ओढले गेल्यानंतर राजकारणातून माघार घेतली; पूर्णतः ! गाडगेबाबा म्हणाले, राजकारण सोडा. बाबांनी पत्रातही तसे लिहिले. भगवंतरावांनी राजकारणाकडे कायमची पाठ फिरवली. त्यांनी बाबांच्या पहिल्या आग्रहाला मान दिला. अच्युतराव देशमुख यांची कहाणी वेगळीच. त्यांच्या आईने बाबांना माधुकरी देताना विचारले होते, ‘बाबा, काय देऊ आणखी?’ बाबा म्हणाले, ‘हा पोरगा दे मले !’ आणि उमलत्या वयातील अच्युतराव (दादा) बाबांजवळ गेले. त्यांनी हयातभर गृहस्थजीवन आणि बाबांचे काम निष्ठेने केले. नानासाहेबांनी बाबांचा पहिला शब्द पाळला. पण दुसरा? गाडगेबाबा म्हणाले, “तुम्ही संसार सोडा. तुमच्या शिक्षणाचा, राजस रूपाचा लाभ समाजाला मिळू द्या, सावकारबुवा ! मी वठ्ठी (परीट) मानूस, कपडे धुनारा, साधू झालो, नवल काय? तुमी जमीनदार, सावकार, तुमी साधू झाले, तर राजपदाचा त्याग करणाऱ्या बुद्धासारखी कीर्ती होईन तुमची ! घरदार, पोर… काई सांगू नका ! कावळा-चिमण्या पिलं उडायला लागली, की बाजूला होतात. तुमची बायको हुशार आहे, ते सांभाळीन लेकरायले. तुम्ही समाजाच्या संसारासाठी साधू झाले तर!” त्यांची पुढील वाक्ये अशी, “जमीनदार, सावकार घरात जन्मूनही तुमाले गरिबाची कीव येते. भांगेतही तुळस उगवते कधी-कधी!” त्यांचे बाबांशी नाते असे भावरम्य होते. मी गाडगेबाबा बालमंदिरात शिकत होतो. ते बालमंदिर माझी आई चालवायची. भावंडे मोठी होती. ती गाडगेबाबा विद्यालयात शिकायची. ‘गोरक्षण’मधील कडब्याच्या खोल्यांजवळील टिनाच्या शेडमध्ये शाळा भरायची. परम संगणकाचे जनक विजय भटकर हे बाबांच्या शाळेच्या मॅट्रिकच्या बॅचचे (पहिल्या) विद्यार्थी. आमचे शिक्षण एका वेगळ्या भावविश्वात झाले. त्यात गाडगेबाबा सतत दृश्यादृश्य रूपात भेटायचे. गाडगेबाबांच्या व्यक्तित्वाची ती पहिली प्रिंट माझ्या मनोभूमीत पारंब्यांसारखी रुतली आहे.

मला माझ्या बालपणी गाडगेबाबा त्यांच्या मुलीच्या रूपाने भेटायचे. आलोकाबाई हे त्यांचे नाव. त्या शाळा- ‘गोरक्षणा’च्या प्रांगणातल्या खोलीत त्यांच्या कुटुंबासमवेत राहायच्या. बाबांची ती कन्या दर शुक्रवारी आमच्या घरी माधुकरी मागायला यायची. परसदारी वाढलेले अन्न जवळच्या कापडावर घेऊन झाडाखाली बसून खायची. नळाचे पाणी पिऊन निघून जायची. माझ्या बालसुलभ मनाला प्रश्न पडायचा- आपण गाडगेबाबांच्या शाळेत शिकतो आणि त्यांच्या मुलीला भीक वाढतो? आई म्हणायची, मोठा झाला, की कळेल तुला ! मला बाबांनी आलोकाबार्इंना पाठवलेली पत्रे वाचताना रडायला येते. बाबांच्या व आलोकाबार्इंच्या संबंधातील ताण व्यक्त करणारा ‘संन्याशाचा संसार’ हा माझा लेख अभ्यास मंडळाने दहावीच्या दुय्यम मराठी अभ्यासक्रमासाठी निवडला. बाबांचे वैराग्य व मुलीला लिहिलेल्या पत्रातील ‘आपला काही हक्क नाही. या लोकायच्या संस्था आहेत, इथं राहू नका’ हे बाबांचे विश्वस्त अंत:करण समजण्यासाठी ती मूल्ये पहिल्यांदा शिक्षकाला कळायला पाहिजेत. तो धडा कठीण आहे, असा आक्षेप येऊन तो दोन वर्षांनी वगळण्यात आला. धडा कठीण होता की त्यातला जीवनादर्श कठीण? तो चंगळवादी समाजाला समजणेच कठीण होते. गाडगेबाबांचे धगधगीत वैराग्य न समजणाऱ्या समाजाला इतक्या फकिरी वृत्तीचा माणूस असू शकतो काय? असेच उद्या वाटेल.

पंडित जवाहरलाल नेहरू यांचे ‘इंदिरेस पत्रे’ वाचून एका संपन्न अशा वारशाने दिपून जाण्यास होते. गाडगेबाबांची आलोकाबाईला लिहिलेली पत्रे म्हणजे पराकोटीच्या वैराग्याचे प्रतिध्वनी वाटतात. मूल्यशिक्षणासाठी यापेक्षा अधिक सुंदर वस्तुपाठ कोणता असू शकतो? बाबांची आलोका ही एकच मुलगी जगली. गोविंदा नावाचा मुलगा कुत्रा चावून मेला. बातमी आली तेव्हा बाबा कीर्तन करत होते. ते म्हणाले, ‘ऐसे गेले कोट्यानुकोटी काय रडू मी एकासाठी !’ आलोकाबाई मूर्तिजापूरच्या ‘गोरक्षणा’तल्या एका खोलीत राहायला आली. बाबांना हे कळले. त्यांनी मरणाच्या एक वर्ष आधी यासंदर्भात अच्युतराव देशमुख यांना पत्र पाठवून सार्वजनिक संस्थेच्या कारभारात माझ्या कुटुंबीयांना प्रवेश देऊ नका असे निक्षून सांगितले व तशी ताकीद आलोकाबार्इंना वारंवार पत्रे पाठवून दिली. त्या पत्रातली काही वाक्ये वानगीदाखल-

सौ. आलोकाबाई, श्री. गाडगेबाबांचा अनंत कोटी नमस्कार.

पत्रास कारण की, गोरक्षणातून लवकर बाहेर पडाल, तर फार बरे होईल. तुला पैशाचे पक्के भूत लागले. कमी नाही. तू मेल्याशिवाय ते भूत निघणार नाही… ज्या माणसाला पैशांचे भूत लागले, तो पोटाला कमी खात असतो. तो स्वतःही काही खात नाही, तर दुसऱ्याला काय घालणार? मी नसतो तर ट्रस्टीने तुमच्यावर खटला भरून पोलिसांच्या ताब्यात दिले असते… बाबाची मुलगी म्हणून यापुढे कोणाला काही मागू नये व देणाऱ्याने देऊ नये. असा सर्व जनतेला निरोप आहे.

गाडगेबाबांच्या मृत्युपत्रात त्यांनी स्पष्ट म्हटले आहे. मी कोणाचा गुरू नाही. माझा कोणी शिष्य नाही… हा जनतेचा ट्रस्ट आहे. माझ्या, माझ्या कुटुंबीयाच्या त्यावरील मालकीचा प्रश्नच नाही…गाडगेबाबांनी स्वतःच्या आचरणाने ‘ट्रस्टीशिप’चा आदर्श निर्माण केला. त्यांना आयुष्यातला शेवटचा श्वास नागरवाडीत घ्यावा असे वाटत होते. त्यानुसार त्यांची गाडी तिकडे जाण्यासाठी निघाली. बाबा पत्नी, सखुबाईला म्हणाले, ‘तुम्ही उतरा… आम्ही जिथं चाललो तिथं एकट्यालेच जा लागते…’ वैराग्य आणि अपरिग्रह यांचे असे अनोखे रूप बाबांच्या रूपाने प्रगटले. त्यांनी गुरू, गुरुदक्षिणा, शिष्यसंप्रदाय यांबाबत केवळ पत्राद्वारे, कीर्तनाद्वारे विरोध केला असे नाही. तर, त्यांनी त्यांच्याबाबत स्तुती करणाऱ्या वृत्तपत्रीय मजकुरालाही विरोध केला. अनंतराव गद्रे यांनी बाबांच्या त्यागाबाबत दैनिक ‘लोकशक्ती’त लिहिले. त्यासंबंधी गाडगेबाबा त्यांना बजावतात, आपण जेवढ्या वर्तमानपत्रात लिहिले तेवढ्याच वर्तमानपत्रात आम्ही दिलेला सोबतचा खुलासा प्रसिद्ध करावा. आपली महान चूक दुरुस्त करावी. मी ‘मला कुणी शिष्य नाही व मी कुणाचा गुरू नाही’ असे सांगत असतो. ‘गेल्या वर्षांपासून आजपर्यंत कोणाला अंगारा दिला नाही. कोणाला पाया पडू देत नाही.’ बाबांना शिष्य करणे, त्याला आशीर्वाद देणे, हातात खराटा देणे, आपला वेगळा संप्रदाय निर्माण करणे हे काही मान्य नव्हते. त्यांच्या खुलाशातले एक वाक्‍य खूपच मार्मिक आहे. जनतेसमोर लोभी व त्यागी लपत नाही. जाहिरातीची गरज नाही. बाबांचे कौटुंबिक जीवन, त्याबाबतची त्यांची निरासक्त वृत्ती यांचे दर्शन घडवणारी पत्रे पुराव्यादाखल उपलब्ध आहेत. त्यासंदर्भातील त्यांची पत्रे वैराग्यावरील हजार पानांचे सार वस्तुनिष्ठपणे प्रतिपादित करतात, इतकी ती मनोहारी आहेत.

शिवा इंगोले या कवीने वैराग्याचे मूर्तिमंत प्रतीक असलेल्या गाडगेबाबांसंबंधी अतिशय सुंदर कविता लिहिली आहे. बोधाचा चिन्मय मेघ, दुरिताला उन्मय माया  चिंध्यांनी विभूषित केली, त्यागाची त्रिभुवन काया… वृत्ती, प्रवृत्ती, वैखरी, वाणी आणि लेखणी यांतून प्रगटलेली त्यांची निरासक्त जीवनशैली चित्रवत् डोळ्यांसमोर उभी राहते.  उपभोग आणि आसक्ती यासंबंधी निरीच्छ असणारे गाडगेबाबा सार्वजनिक संस्थेचे प्रशासक म्हणून अतिशय दक्ष होते. त्यासंबंधीही त्यांची पत्रे अतिशय उद्बोधक आहेत. रामदासस्वामींच्या दासबोधाचे स्मरण व्हावे इतकी, अवधान जागृत करणारी आहेत.

संस्थेचा ट्रस्टी कसा असावा? धर्मशाळेचे बांधकाम कसे करावे? लोकांहाती सार्वजनिक वास्तू कशी उभी करावी? विनयाने दात्यांची मने जिंकून त्यांचा पैसा गरजू माणसाकडे कसा वळवावा? – त्यांनी असे कितीतरी ‘प्रशासन-मंत्र’सांगितले आहेत ! त्या निरक्षर माणसाचा 1926 ते 1956 असा साधारणपणे तीस वर्षांचा पत्रप्रपंच, म्हणजे ‘सार्वजनिक त्यागाची गीता’ आहे असेच म्हणावे लागेल. बाबांच्या पत्रांतून त्यांच्या कार्याबरोबर व्यक्तिमत्त्वाचे दर्शन होते. त्यांच्या पत्रसंग्रहात त्यांचा संपूर्ण आयुष्यक्रम गोवलेला आहे. ते जितके त्यागी-तितकेच संसारी, जितके ममताळू- तितकेच कठोर, जितके विरक्त-तितकेच संग्राहक, व्यावहारिक व प्रापंचिक वृत्तीने जितके सरळ- तितकेच कोणाबरोबर कोठे नि काय नि किती बोलावे याचे तारतम्य त्यांच्याजवळ होते. त्यांनी जागोजागी लोकोपयोगी संस्था, घाट, धर्मशाळा ट्रस्टींच्या हवाली करूनही तेथील व्यवहार वाऱ्यावर सोडला नाही. त्याचा प्रत्यय कोणत्याही धर्मशाळेत गेल्यावर येतो. त्यांच्या निधनानंतर स्थापन झालेल्या दादर-के.ई.एम. परिसरातील धर्मशाळांतही त्यांच्या पत्रांतून वाचकासमोर येतो. स्वच्छता, व्यवहारकुशलता, गुणग्राहकता, धार्मिक वृत्ती, कृतज्ञता, निराग्रही स्वभाव, तळमळ असा विविधांगी ‘इंद्रधनू’ उभा होतो.

भगवंतराव, नानासाहेब यांनी गाडगेबाबा विद्यालयासाठी मूर्तिजापुरातील एका जागेचा आग्रह धरला. ती जागा केंद्र शासनाच्या ‘मिलिटरी विभागा’ची होती. पंजाबराव देशमुख यांनी प्रतिष्ठा पणास लावून ती जागा बाबांसाठी मिळवून दिली. त्यासंदर्भात पंजाबरावांनी व नंतर गाडगेबाबांनी त्यांना लिहिलेली पत्रे माझ्या संग्रही आहेत. पंजाबरावांनी जागेसंबंधीचा प्रस्ताव स्वतः गाडगेबाबांनी दिल्याचे लिहिले आहे. स्वतःच्या हस्ताक्षरात ! गाडगेबाबा त्याच संदर्भात 1 सप्टेंबर 1955 च्या पत्रात म्हणतात, आपण लिहिले, की मिलिटरी व राजकीय खात्याकडून कागद आले नाहीत. सात-आठ दिवसांत येतील. मी श्री. बियाणी अर्थमंत्री व श्री. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांना भेटलो. सात-आठ दिवसात काम झाले नाही, तर मला पुन्हा तिकडे यावे लागेल…आपण लिहिले ते सर्व योग्य आहे. मात्र, संस्थेचे पत्र आजपासून मला घालू नका. सर्व देखरेख गोरक्षण धर्मशाळा वगैरे लक्षात घ्या. पाच किंवा सातजण ट्रस्टी व्हा.’

कर्मवीर भाऊ पाटील, पंजाबराव देशमुख, तुकडोजी महाराज, गाडगेबाबा हे सारे महनीय लोक परस्परांच्या कामांना मदत करून प्रबोधनाचे काम पुढे नेत होते, याचे पुरावे मिळतात. बाबासाहेब आंबेडकर हेही त्या श्रृंखलेची सशक्त कडी होते हे पत्रांतून व बाबांच्या कीर्तनांतून लक्षात येते. महाराष्ट्र निर्मितीमागील तो ‘प्रबोधन काळ’ म्हणजे सुवर्णदशक होते. त्यांनी धनिकांच्या धनाचा ओघ गरीब व कष्टकरी समाजाच्या उत्थानासाठी कौशल्यपूर्वक वापरला. गाडगेबाबा अच्युतराव देशमुख यांना 2 डिसेंबर 1935 च्या पत्रात लिहितात, ‘घाटात ज्याचे त्याचे संगमरवरी दगड लावा. ज्यांनी जमीन दिली त्याला ट्रस्टमध्ये घ्या.’ त्यांच्या वाणीत करुणा आणि दातृत्व यांना आवाहन करण्याचे भावनिक सामर्थ्य होते. ते त्यांनी लिहून घेतलेल्या पत्रांतून प्रगटते. तहानलेल्याला पाणी मिळाले पाहिजे, यासाठी ग्रीष्म ऋतूत ‘पाणेरी’ काढण्यावर त्यांचा भर असे. ते पत्रात म्हणतात, “पाणेरीला सावलीची अडचण असेल तर चार-दोन तट्टे टाकून वाढवा. स्वच्छ एवढी ठेवा, की एकही खडा न सापडला पाहिजे. खेड्या भागात खाली जागेवर चौरस्त्यावर सडा टाकीत असावे, चौरस तुकडा त्याला सारवून घेत असावे. बंगलोरी कौलाच्या फुटक्या तुकड्यांच्या लाईन मारा. दर शुक्रवारी आंब्याच्या डाखळ्या लावा. चार-दोन पताका लावा. वर्गणी सुरू ठेवा.” बाबा स्वच्छतेचे फार भोक्ते होते. ते वेळोवेळी त्यांच्या सहकाऱ्यांना स्वच्छतेचे मार्गदर्शन करत.

निसर्ग हाच माणसाचा गुरू आहे. पंचमहाभूतांच्या सान्निध्यात वाईट विचारांचे विरेचन होते, या जाणिवेतून मूर्तिपूजेला विरोध करणाऱ्या गाडगेबाबांनी धर्मशाळेत व सर्व संस्थांमध्ये वृक्षारोपण व जतनयांवर भर दिलेला दिसतो. एका पत्रात ते लिहितात, ‘वड, पिंपळ, चिंच, निंब अशा सुंदर कलमा जगवण्यास सांगा. सहा किंवा आठ फूट लांब व पाच ते सहा इंच जाड अशा फांद्या पैदा करून लावा. झाडांची चांगली सेवा केली, तर तिसरे वर्षी सुंदर झाड तयार होते… वडाच्या डांगा सहा फूट वेगळ्या, तर सात फूट वेगळ्या, अशा वेगवेगळ्या लावा. काही पिंपळाची, तर काही लिंबाची झाडे लावा…’ बाबांचे हे वृक्षज्ञान आहे !

गाडगेबाबांनी देवाच्या नावाने पशुमात्राची होणारी हिंसा रोखण्यासाठी प्रखर विरोध केला. कीर्तने केली. गाडगेबाबा स्वतः तर बळीच्या वेदीवर माढाळ (सातारा) येथे गेले. हिंसा करणारे विचलित झाले, पण हत्या थांबली नाही. गाडगेबाबांनी तशा प्रथांना त्या काळी सतत विरोध केला. ‘समाजमन’ बदलले पाहिजे म्हणून सतत तशा ठिकाणी बारीक लक्ष ठेवले. गाडगेबाबा 8 एप्रिल 1953 ला उपराईच्या श्री. कुर्मी यांना लिहिलेल्या पत्रात म्हणतात, “उपराईला पूर्वी यात्रेला भर होता तेव्हा किती हिंसा होत होती व ती हिंसा कधी बंद झाली? आता कमीत कमी किती हिंसा होते, ही माहिती सविस्तर खालील पत्त्यावर कळविणे.” कुप्रथेला केवळ विरोध नाही, तर समूळ नष्ट करण्यासाठी सजग नागरिकांनी सतत लक्ष घातले पाहिजे. त्यासाठी ‘समाजहितैषी दबावगट’ असावा असा त्यांचा दृष्टिकोन पत्रातून स्पष्ट होतो.

निरक्षर गाडगेबाबांनी शिक्षणप्रसाराचे, प्रबोधनाचे रान त्यांच्या कीर्तनातून पेटवले. ते भाऊराव पाटील, बाबासाहेब आंबेडकर यांचे ‘कार्यचित्र’ त्यांच्या रांगड्या वैखरीने उभे करायचे. त्यांनी त्यांच्या चिंध्यांच्या पोषाखाबरोबर असलेली झोळी पुढे करून गरजू माणसासाठी समाजाच्या दातृत्वाला वारंवार आवाहन केले. समाजाच्या दानातून विधायक संस्था निर्मिती केली. सुखदेव ढाणके या प्राध्यापक-कवीने बाबांच्या या वृत्तीचे समर्पक वर्णन केले आहे, की –

अन्‌ खापर झोळीमधले वाटले दान
अविनाशी कारुण समर्पित केले
पुण्याच्या पडल्या राशी…

श्रीकांत तिडके यांचे वडील भगवंतराव व आई प्रतिभाताई तिडके

माझे वडील वयाच्या ब्याण्णव्या वर्षी (2010) निधन पावले. ते गाडगेबाबांबरोबर बराच काळ कार्यरत होते. त्यांनी बाबांच्या निधनानंतर बाबांना दिलेला शब्द पाळला. त्यांच्या संस्था सांभाळल्या, वेळोवेळी आर्थिक साह्य केले. त्यांनी स्वतःला राजकारणापासून सर्व अनुकूलता असूनही दूर ठेवले. आई, प्रतिभा तिडके राजकारणात होती. आमदार झाली, तिला राजकीय पदे मिळाली. पण, भगवंतराव बाबांना दिलेल्या वचनामुळे कधी राजकारणात शिरले नाहीत. कोणत्या व्यासपीठावर अधिकारी म्हणून विराजमान झाले नाहीत. त्यांनी आईच्या निधनानंतर जवळपास पस्तीसवर्षे बाबांच्या संस्था सांभाळण्याशिवाय काही केले नाही. त्यांना शेवटल्या काही वर्षांत स्मृतिभ्रंश झाला होता. त्यात ते म्हणायचे, ‘मी साधू झालो नाही… बाबा, तुमचे नाही ऐकले !’ भगवंतराव सावकार- जमीनदार घरात जन्मले. पण त्यांनी निधनापूर्वी आग्रहाने नागरवाडीला मुक्‍काम केला. ते म्हणायचे, ‘गाडगेबाबा इथेच विश्रांती घेत आहेत.’ ते तिडक्यांना काठीने बदडून काढणाऱ्या गाडगेबाबांच्या व्यक्तित्वाच्या संमोहनातून कधी बाहेरच आले नाहीत… ‘मंत्रावेगळे’ झाले नाहीत. बाबांचा सहवास, आठवणी, पत्रे त्यांच्या बिछान्याजवळच्या आलमारीत होती… त्यांनी तेथेच शेवटचा श्वास घेतला. त्यांची ती ‘पत्रपोथी’ वाचताना माझे डोळे पाणावतात.

– श्रीकांत तिडके 8669359252 shrikanttidke00@gmail.com
——————————————————————————————–

About Post Author

2 COMMENTS

  1. गाडगे बाबा आणि त्यांचे महत्कार्य यथोचित लिहिले आहे, त्यातून गाडगे बाबा आणि भगवंतराव तिडके यांच्या कार्याबाबत अधिक माहिती घेण्याची प्रेरणा मिळते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here