ठाण्याच्या ‘चांद्रसेनीय कायस्थ प्रभू सभे’तर्फे गेली छत्तीस वर्षे सर्वजातीय सामुदायिक व्रतबंध हा उपक्रम आयोजित केला जातो. ते आयोजन एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मे महिन्यात केले जाते. शाळांना त्यावेळी सुट्टी लागल्यावर बटूंची उपलब्धता होते. गुरुजींशी चर्चा करून मुहूर्त ठरवला जातो. त्याची माहिती समाजमाध्यमातून आणि फलक वगैरे लावून प्रसृत केली जाते. मुंजीत सहभाग आठ वर्षांच्या मुलापासून ज्यांचे उद्या-परवा लग्न आहे असे तीस/बत्तीस वर्षे वयाचे तरुणसुद्धा घेत असतात.
सभेची नियमावली ठरलेली आहे. दरवर्षी प्रत्येक बटूमागे नोंदणी फी म्हणून पाच हजार रुपये घेतले जातात. त्यामध्ये बटू, बटूंचे आईवडील ह्यांचा सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, मातृभोजन, हॉल, छायाचित्रीकरण, गुरुजी, ध्वनिक्षेपक व व्रतबंधासाठी लागणाऱ्या अन्य गोष्टी ह्यांचा समावेश असतो. बटूने घरून फक्त ताम्हण, पळी, पंचपात्रे, कलश या गोष्टी आणायच्या असतात. प्रत्येक बटूकडील पंधरा नातेवाईक त्या समारंभात भाग घेऊ शकतात. त्यासाठी प्रती व्यक्ती पाचशे रुपये वेगळे आकारले जातात. त्यात नाश्ता व जेवण समाविष्ट असते. अठरा/वीस बटूंची नोंदणी दरवर्षी होते. ‘चांद्रसेनीय कायस्थ प्रभू सभे’च्या कार्यकर्त्यांपैकी एका जोडप्यास त्या दिवशी यजमानपदाचा मान दिला जातो. ते बटूंच्या आईवडिलांची भूमिका करतात. गुरुजी त्यांच्याकडून सर्व विधी करवून घेतात. तेच विधी दुसरे गुरुजी बटूच्या पालकांकडून करवून घेतात. त्या उपक्रमाचे आयोजन ना नफा ना तोटा ह्याद्वारे केले जाते.
संस्थेत चोवीस कार्यकर्ते आहेत. संस्थेद्वारे वधुवर केंद्र चालवले जाते. सर्व कार्यकर्ते मंडळी ही ज्येष्ठ नागरिक आहेत. सभेच्या वतीने माघी गणेशोत्सव, अथर्वशीर्ष आवर्तने, कुंकुमार्चन वगैरे उपक्रम राबवले जातात.
– दीपक फणसे 8892269346 deepakphanse3053@gmail.com
(कार्याध्यक्ष, चांद्रसेनीय कायस्थ प्रभू सभा ठाणे)