वैराग-मंदिरांचे गाव (Vairag Temples Village)

carasole new

वैराग हे त्या गावाचे नाव, गावाची सांस्कृतिक-सामाजिक वैशिष्ट्ये जपणारे आहे. ते सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यात येते. फार पूर्वीपासून तेथे वैरागी लोकांची गर्दी होती, म्हणून ते वैराग. श्रीसंतनाथ महाराज ही वैरागची ग्रामदेवता मानली जाते. त्याचबरोबर, ती नगरी श्री व्यंकोबाबा, श्री दयानंदबाबा वगैरे काही सिद्धपुरुषांच्या वास्तव्याने पावन झालेली मानली जाते.

वैराग हे मोगलशाही हद्दीतील, निजामशाहीच्या सीमेलगतचे पहिले गाव. निजामाच्या राज्यातून मोगल सीमेत येण्यासाठी भरावा लागणारा जकात गोळा करण्यासाठीचा दगडी रांजण खुंटेवाडीनजीक शिवारात आढळतो.

वैरागमध्ये अडतबाजार, तेलगिरण्या, कापड व्यवसाय तेजीत चालत. त्यामुळे व्यापारी थेट उत्तरेतून वैरागग्रामी कस्तुरी, केशर यांसारख्या किंमती वस्तू विकण्यासाठी येत असत. तेथील अडत बाजार मोठा आहे व खुले सौदे प्रसिद्ध आहेत. ते शेतक-यांना लाभदायी ठरतात असा पूर्वापार समज.

श्रीसंतनाथ महाराजांचे मंदिर दगडी बांधकामात आहे. त्यासमोर लाकडी मंडप आहे. तेथे अखंड धुनी चालते. मंदिर समोर श्रीटेकनाथबाबा मंदिर, बाजूस श्रीकल्लोळ अशा परिसरात विसावले आहे. गुरव, पारंपरिक मानकरी व ग्रामस्थ ही मंडळी मार्गशीर्ष महिन्यात अखंड हरिनाम सप्ताह, श्रावण शुद्ध एकादशीपासून नारळी पौर्णिमेपर्यंत ग्रामदेवतांची यात्रा असे वार्षिक कार्यक्रम व रोजची नित्यकर्मे आणि सोमवारी श्रीसंतनाथांची आरती आनंदाने पार पाडतात.

गावाच्या लोडोळे वेशीजवळ श्री मल्लिकार्जुन मंदिर हेमाडपंथी पद्धतीत, संपूर्ण दगडी बांधकाम -तटबंदीसह बांधलेले आहे. ते सुस्थितीत आहे. काशीहून आणलेली भव्य पिंड तेथील गर्भगृहात स्थापित केलेली आहे. जंगमाकडून दैनंदिन नित्योपचार होतात. ‘विश्वाराध्याय महिला रुद्र मंडळाकडून’ रुद्रपठण दर सोमवारी होते. ते मंदिर साधारण तीनशे वर्षांपूर्वी बाजिबा घोंगडे नावाच्या सद् गृहस्थांनी बांधले असा संदर्भ सापडतो.

लाडोळे वेशीनजीक दत्तमंदिर, शेजारील गावतळे ही वैरागवासीयांसाठी थोडी निवांत जागा. मल्लिकार्जुन मंदिरानजीक नाथबाबा मंदिर, हनुमान मंदिर, धानम्मा – वीरभद्र मंदिर अशी मांदियाळी आहे.

कसब्यात व्यंकोबाबा मंदिर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर; तसेच, खंडोबा वेशीकडे लक्ष्मी मंदिर, खंडोबा मंदिर आहेत. त्या व्यतिरिक्त गावामध्ये ठिकठिकाणी बैरागी बाबांची समाधिस्थळे आढळतात. गावाच्या साधारण मध्यभागी नागनाथ मंदिर, श्रीव्यंकटेश मंदिर, पुढे श्री सिद्धिविनायक मंदिर आहे.

सन्मती श्राविका भजनी मंडळ : अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह व ब्रह्मचर्य या भगवान महावीरांच्या संदेशाचे सर्व समाजाला मनोरंजनातून प्रबोधन व्हावे, महिलांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळावे, त्या निमित्ताने महिलांनी सुसंघटित व्हावे – प्रभूचे नामस्मरण करावे हा हेतू मनात धरून सुवर्णा भुमकर, कुसुम कासार, जयश्री गांधी यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाने ‘सन्मति श्राविका भजनी मंडळा’ची स्थापना श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिर येथे केली गेली. स्थापना 7 जून 1991 रोजी झाली. प्रेरणा भुमकर यांच्या संगीत व संघटन कौशल्यामुळे भजनी मंडळ साकारले गेले आहे. तसेच, जैन श्राविका सुसंघटित होऊन त्यांनी ‘सम्यक ज्ञान महिला बचत गट’ स्थापला आहे, ही गोष्ट अपूर्वच म्हणायची.

श्रीसंतनाथ मंदिर – सुमारे चारशे वर्षांपूर्वी वैरागस्थित श्री घोंगडे यांच्याकडे संतू नावाचा एक गुराखी मुलगा काम करत असे. घोंगडे धार्मिक आणि परोपकारी होते. त्याकाळी पंचक्रोशीत श्रीमंत म्हणून त्यांचे प्रस्थ होते. ते काशीला देवदर्शनासाठी गेले असताना तेथे त्यांना गुराखी संतू दिसला. त्या चमत्काराविषयी त्यांनी संतूला विचारले व त्याचे खरे रूप दाखवण्याची प्रार्थना केली, तेव्हा श्री संतनाथांनी त्यांचे दिव्यदर्शन त्यांना दिले आणि वैरागग्रामी कायम वास्तव्याचे आश्वासन दिले.

पुढे त्या गावात त्यांचा शिष्यवर्ग निर्माण झाला. नाथपंथीय भक्तीत संतनाथ महाराजांचे स्थान अनन्य मानतात. ते स्वाभाविकच वैरागचे ग्रामदैवत झाले. संपूर्ण दगडी बांधकाम, दर्शन मंडप कोरीव अष्टकोनी खांबांवर पेलले आहे. मंदिराच्या महिरपी देखण्या आहेत. पुढे, लाकडी सभामंडप व समोरच्या ओवरीत अखंड धुनी चालू असते. मंदिराचे भव्य प्रवेशद्वार, नगारखाना, दोन्ही बाजूंला दगडी मनोरे या ठिकाणी आणि मंदिर परिसरात ओवऱ्यांमधून जुन्या मजबूत बांधकामाची प्रचीती येते.

श्री संतनाथांचा मुख्य उत्सव श्रावण महिन्यात नारळीपौर्णिमेला असतो. एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत महाराजांचा छबिना उत्सव दिमाखात पार पडतो. श्रींची पालखी छत्र, चामरे, मानकरी व भक्तगण यांच्या मेळ्यात ग्रामप्रदक्षिणा पूर्ण करते. श्रींची पालखी पौर्णिमेच्या दिवशी स्थानिक लेझीम पथक व लवाजमा यांसह तळ्याकाठी दहीहंडीसाठी रवाना होते. काल्यानंतर आतषबाजी संपन्न होते. यात्रा काळात वैराग जणू आळस झटकून नवचैतन्याने सळसळत असते.

त्याखेरीज आषाढ महिन्यात गोवर्धनविधी पार पडतो. असे म्हणतात, की पूर्वी मंदिर परिसरात गोशाळा होती. गोसंरक्षणासाठी पुरेसा पाऊसकाळ असावा, याच्या याचनेप्रीत्यर्थ गोवर्धनविधी.

श्री मल्लिकार्जुन मंदिर – प्रशस्त प्रवेशद्वार, दगडी मनोरे यांच्या मधोमध हेमाडपंथी शैलीतील श्री मल्लिनाथाचे मंदिर सुस्थितीत आहे. सुमारे तीनशे वर्षांपूर्वी बाबाजी घोंगडे यांनीच तेही मंदिर बांधले. मंदिरात प्रशस्त शिवपिंड आहे.

मंदिराची रचना गर्भगृह, दर्शनमंडप व सभामंडप अशी आहे. खांबावर नक्षीकाम नागलेण्यांचे आहे. घडीव दगडांनी मंदिराच्या सौंदर्यात भर टाकली आहे.

मंदिराच्या मागच्या ओवरीत भौरम्माचे मंदिर आहे. मंदिराचा परिसर शांत व पवित्र आहे. कार्तिक पौर्णिमेस मंदिर तेलाच्या दिव्यांनी उजळवले जाते. मंदिराच्या अंगणात सुंदर रांगोळ्या रेखाटल्या जातात.

श्री नागनाथ मंदिर – हे दगडी मंदिर साधारण साडेतीनशे वर्षांपूर्वीपासून वैरागच्या मध्यभागी आहे. नागोबाच्या साडेचार फूटांच्या पाच शिळा मंदिरामध्ये आहेत. शिळांपुढे महादेवाचे द्वय शिवलिंग आहे. शिव-शक्ती रूपाची पूजा तेथे केली जाते. मंदिराचे रचना वैशिष्ट्य असे, की पूर्वेचे सूर्यकिरण शिवपिंडीवर येतात. मंदिरासमोरील दगडी मंडपाचा जीर्णोद्धार 2014-15 मध्ये झाला आहे.

वडवळस्थित नागोबाचे ठाणे असून वार्षिक उत्सव चैत्र महिन्यातील अष्टमीला ‘गण’ म्हणून साजरा होतो.

श्री व्यंकोबाबा मंदिर –  व्यंकाजी विश्वनाथ पोतदार नावाचे गृहस्थ वारकरी संप्रदायाचे एकनिष्ठ अनुयायी होते. ते नोकरी व्यवसायाव्यतिरिक्त पूर्ण वेळ विठ्ठलाच्या भक्तीत रममाण होत. त्यांची भक्ती संतपदापर्यंत पोचली. त्यांना गावाच्या कसब्यात धनिकांनी एक वाडा दान दिला.

पुढे, त्यांनी तेथे विठ्ठल रुक्मिणीची स्थापना केली. त्यांचा शिष्यवर्ग तयार झाला. पुढे, यथाकाल ते पंचत्वात विलीन झाले. त्यांचा वाडा हाच त्यांचे मंदिर म्हणून ओळखला जाऊ लागला.

त्या स्थानावर व्यंकोबाबा मंदिर तयार होत आहे. तेथे श्रावण महिन्यात पंधरा दिवस उत्सव होतो. ब्राह्मण भोजन, वारकरी भोजन पार पडते. प्रसादात ठेचा-भाकरी प्रामुख्याने असते. त्या व्यतिरिक्त श्रीकृष्ण जन्मोत्सव व राम जन्मकाळ साजरा केला जातो.

श्री दत्त मंदिर – लाडोळे वेस, येथेच तळ्याशेजारी प्राचीन दत्त मंदिर आहे. दगडी मंदिरासमोर पाण्याचा आड आहे. मंदिरात स्थापन केलेल्या पादुका त्या आडात सापडल्या अशी आख्यायिका आहे. फार पूर्वी, भडोळे यांच्याकडे अक्कलकोटचे श्री समर्थ स्वामी अदृश्यरूपात प्रत्यक्ष येऊन गेले. त्यांनी निर्देश केलेल्या स्थळी दत्तमंदिर उभे झाले! दत्त जन्मोत्सवाच्या निमित्ताने तेथे दरवर्षी दत्तयाग, भजन, कीर्तन व दत्तजन्मकाळ साजरा केला जातो.

श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज मंदिर – मंदिर वैरागच्या पूर्वेकडे तुळजापूर रोडनजीक केसकर मळ्यात आहे. श्री. कालिदास सीताराम केसकर यांच्या भक्तीला साद देत प.पू. नृसिंह सरस्वती महाराज यांचा तेथे सतत वास आहे आणि ते भक्ताच्या संकटात त्याची मदत करतात असा समज आहे. महाराजांच्या देखण्या मूर्तीसह तेथे त्यांच्या पादुका व गायत्रीदेवींची सुंदर मूर्ती आहे.

मंदिर परिसरात ‘अश्वत्थ’ (औदुंबर + पिंपळ + कडुनिंब) वृक्ष आहेत. केसकरकाका मंदिरात काकड आरतीपासून शेजारतीपर्यंत दैनंदिन पूजा करतात. वार्षिक उत्सवामध्ये दत्तजयंती, नृसिंह सरस्वती महाराज जयंती व मंदिरस्थापनेचा वर्धापन दिन साजरा केला जातो.

श्री नाथ मंदिर – गावाच्या उत्तरेकडे मल्लिकार्जुन मंदिराशेजारी नाथ मंदिर आहे. मुख्य मंदिर दगडी असून पुढे लाकडी सभामंडप आहे. मंदिराचे वैशिष्ट्य असे, की मंदिराला कळस अथवा शिखर नाही त्याऐवजी तुळशी वृंदावन आहे. मंदिरात दोन समाधी आहेत. त्या समाधी औसा संस्थानाच्या मुलींच्या आहेत. मात्र त्याबद्दल अधिकची माहिती उपल्ब्ध नाही. तसेच त्या परिसरातील आडावर मोटेची रचना विशिष्ट स्थापत्याचा नमुना असावा अशी आहे.

वार्षिक उत्सवात नाथषष्ठी, तुकारामबीज व रामनवमी साजरी केली जाते.

– डॉ. मधुरा बाजारे

Last Updated On – 14th July 2017

About Post Author

13 COMMENTS

  1. Vairag is a big villege in
    Vairag is a big villege in Barshi taluka,ln our villege all the festivels are celebrates.
    Social working is always done by shivshakti talim sangh vairag under the leadership of Arun Savant.

  2. वैरागचा इतिहास सगळयांना समजतो
    वैरागचा इतिहास सगळयांना समजतो

  3. आपण खूपच अभ्यासपूर्ण माहिती
    आपण खूपच अभ्यासपूर्ण माहिती दिली आहे.या उपक्रमाने सर्वाना लाभ होईल.आमच्या शुभेच्छा.

  4. About vairag: Vairag is one
    About vairag: Vairag is one of the best village in Barshi taluka,there are no word to explain about our vairag but we are try…in our village there is peace,development and friendly peoples. The temple of Shree Santanath Maharaja is one of the greatest in Maharashtra and all parties,every peoples are arranging the celebrations of the Santanath Maharaj Yatra.there is also the temple of God Shiva which is created in Haddappa culture.In vairag there is a god gift place which is echo friendly nature,yes there is a big forest and this is saves environment our village.In our village all over the festivals and Sports event’s we are celebrates and in those activities main contribute Jay Panjab Talim sangh under the instruction of Nandkumar Pandermise which is our Young youth leader in vairag.

  5. Vairag is very beautiful
    Vairag is very beautiful village,forest is not mentioned in this article

  6. Very nice article writen by
    Very nice article writen by Bajare Madam. Really Our Vairag have Rich religious flow since from an ancient day.

  7. आपला लेख वाचून आनंद वाटला आपण
    आपला लेख वाचून आनंद वाटला आपण असेच काम चालू ठेवावे तुमच्या पुढील कामास माझ्या व परिवाराकडुन शुभेच्छा !

Comments are closed.