लोकसखा नाग

नागपंचमी हे श्रावण महिन्यातील व्रत. नागपंचमी हा कृषिवलांचा सण मानला जातो. शेतीची कामे चालू असल्याने नांगराच्या फाळाने शेतात वावरणारे साप किंवा नाग यांना इजा पोचू शकते आणि त्यामुळे माणसाला सापाचा दंशही होण्याचा संभव असतो. या कारणास्तव त्याचे संरक्षण पावसाळयात नाग किंवा साप यांच्यापासून व्हावे, यासाठी नागांची पूजा करण्याची प्रथा सुरू झाली असावी. साप हा उंदरांचा शेतातील उपद्रव कमी करणारा, पर्यावरणदृष्ट्या शेतकरी गटाचा मित्रच असतो. त्याच्या प्रती आदर व्यक्त करण्याचा तो दिवस.

नागाला क्षेत्रपाल म्हणून मान दिला जातो. तो भूमीचा रक्षणकर्ता आहे अशी भावना त्यामागे आहे. शेतात वारूळ असणे हे शुभ लक्षण मानले जाते. तसेच, वारुळाची माती ही सर्वात सुपीक असाही समज दिसून येतो. वारुळाच्या मातीला मूळमृत्तिका असे संबोधले जाते. डॉ. शैला लोहिया यांनी नोंदले आहे, की वारूळ हे भूमीच्या सर्जन इंद्रियांचे प्रतीक मानले जाते आणि नाग हा पुरुषतत्त्वाचे प्रतीक मानला जातो. त्याच्या अस्तित्वामुळे भूमी सुफळित होते अशी श्रद्धा आहे. (भूमी आणि स्त्री)

अनंत (म्हणजेच शेष), वासुकी, पद्मनाभ, कम्बल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया या आठ नागांची त्या दिवशी पूजा केली जाते. ‘वासुकि: तक्षकश्चैव कालियो मणिभद्रक:। ऐरावतो धृतराष्ट्र: कार्कोटकधनञ्जयौ॥’ (भविष्योत्तरपुराण – 32-2-7) हा श्लोक म्हटला जातो.

गं.बा. मुजुमदार यांनी नोंदले आहे, की ती नागपंचमी नसून नागरपंचमी आहे. नाथपंथी संप्रदायांनी आदिमायेच्या उपासनेसाठी नागकुलदर्शक नावे दिलेली होती. ती नावे योग परिभाषेतील आहेत. नाथपंथात वारुळाची पूजा करण्याची प्रथा होती, तीच प्रथा पुढे नागपंचमीच्या निमित्ताने सुरू राहिलेली असावी.

ज्ञानेश्वर महाराज यांनी कुंडलिनी शक्ती ही नागीण स्वरूपात असल्याचे म्हटले आहे. ती धारणा आहे नाथसंप्रदायाची. त्यांनी कुंडलिनी नुकत्याच कात टाकलेल्या, साडेतीन वेटोळे असलेल्या, कुंकवाने जणू न्हालेल्या अशा नागिणीप्रमाणे असून ती तेजाचे प्रतीक मानली आहे!

नागपूजा जैन आणि बौद्ध धर्मांतही प्रचलित आहे. गौतम बुद्धाच्या जन्मानंतर त्याला नंद आणि उपनंद या नागांनी स्नान घातले अशी कथा आहे.

घरातील स्त्रिया, मुली नागोबाला भाऊ मानून नागपंचमीच्या आधीच्या दिवशी भावाचा म्हणजे नागोबाचा उपवास करतात व त्या दिवशी त्याची आळवणी करणारी लोकगीते गातात. शेतातील वारुळात जाऊन पूजा करतात. त्या दिवशी हातावर मेंदी काढली जाते. नागपंचमीच्या सणादिवशी घरामध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला असतो. स्त्रिया, मुली त्या दिवशी नवीन साड्या, ड्रेस, हातांमध्ये बांगड्या असा शृंगार करून, नागोबाची पूजा करण्यासाठी त्याला दूध, लाह्या यांचा नैवेद्य घेऊन जातात. नागोबाची  चिखलाची मूर्ती  काही गावांत तयार केली  जाते. त्या मूर्तीची गावात एका ठिकाणी स्थापना केली जाते. त्याच्याच जवळच्या झाडाला मोठा झोका बांधलेला असतो. त्यावर मुख्यत: मुली आवडीने खेळतात. नाग हा सर्जनाचे प्रतीक मानला जातो अशी धारणा लोकसंस्कृतीत आहे. त्यामुळे स्त्रिया आणि महिला यांचा संबंधही सणाशी जोडला गेला असावा. नागभाऊरायाला नैवेद्य –

नागपंचमीच्या गं दिवशी मी गं नेसले हिरवी साडी
नाग भाऊराया मला पाठवितो गं गाडी ||
नागपंचमीच्या दिवशी मी गं भरीला चुडा
नागा रे भाऊराय, तुला नैवेद्य ताजा पेढा ||
तूच रे रक्षण करी माझा आईच्या गोताचा
नागा रे भाऊराय, तुला नैवेद्य कढीचा ||
नागा रे भाऊराय, तुला वाहिल्या मी लाह्या
तुझ्या दर्शनाला आल्या शेजारच्या आयाबाया ||
नागा रे भाऊराया तुला नैवेद्य गुळाचा
आता रक्षण करी माझ्या बंधूच्या कुळाचा ||

माहेरवाशिणीला पंचमीला बांगड्या भरण्याची पद्धत अनेक ठिकाणी प्रचलित आहे. स्त्रिया भावांच्या आणि शेताच्या कल्याणासाठी उपवास करतात.

नागचौथीला नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी भुलाबाई स्थापन करून तिची पूजा करतात. ते शिवाचे रूप मानले जाते. काही ठिकाणी शिराळशेठ मांडून त्याच्या दातृत्वाची पूजा केली जाते, आदर केला जातो.

महाराष्ट्रात बत्तीस शिराळा या गावी नागपंचमीच्या दिवशी विशेष उत्सवाचे आयोजन केले जाते. ते सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील गाव आहे. त्या गावात नागाची पूजा करण्याची प्रथा बाराव्या शतकापासून अस्तित्वात आहे. त्या दिवशी मिरवणूकही असते. स्त्रिया त्यांच्या भावाचे सर्पदंशापासून रक्षण व्हावे यासाठी नागाची प्रतिमा तयार करून तिची पूजा करतात.

विविध प्रांतांतील नागपंचमी : 1. उत्तर भारतात नागपंचमीला शारीरिक शक्तीच्या प्रदर्शनाच्या आणि शारीरिक सामर्थ्य वाढवण्याच्या दृष्टीने महत्त्व आहे. मल्ल कुस्तीचे सादरीकरण त्या दिवशी कुस्तीच्या आखाड्यात करतात. कुस्तीची लढत पारंपरिक लढतीसारखी नसून; त्या माध्यमातून शिव, श्रीराम, तसेच हनुमान आणि कुस्तीच्या आखाड्याची भूमी यांना अभिवादन केले जाते. नागपंचमीचा दिवस पुरुषांसाठी ब्रह्मचारी व्रताचे महत्त्व सांगणारा मानला जातो. त्या धारणेतून कुस्तीगीर पुरुषाचे शरीर हे सामर्थ्य व सदसद्विवेक यांचे प्रतीक मानले जाते! शेतकरी त्याने लावलेल्या पिकाची उत्तम काळजी घेतो. त्याचे रोगराईपासून किंवा अन्य आपत्तीपासून रक्षण करतो, त्याला पुरेसे पाणी देतो आणि शेतीची मशागत करतो. त्यातूनच उत्तम पीक आणि समृद्धी हाती येते. शरीर पोसलेला कुस्तीगीर आणि सुपीक जमिनीतील शेती यांचे रूपक त्या ठिकाणी स्वीकारलेले दिसते. सर्जनाची प्रक्रिया आणि ब्रह्मचर्य यांचा संगम नागपंचमीच्या निमित्ताने साधलेला दिसतो!

2. कच्छ प्रदेशाची प्राचीन राजधानी भूज हिचे नाव भुजंग या सर्पाच्या संस्कृत नावावरून पडले आहे, म्हणे. तेथील भुजिया नावाच्या टेकडीवर 1723  साली मंदिर बांधले गेले आहे आणि त्यात सरीसृप देवतेला स्थान देण्यात आले आहे. अठराव्या शतकात तेथील राजे त्या मंदिरात जाऊन नागपूजा करत असत आणि भक्तांच्या रक्षणासाठी नागाची प्रार्थना करत असत. बुलंदखान यांच्या आक्रमणापासून साम्राज्याचे रक्षण केल्याबद्दल नागांची पूजा करण्याची प्रथा तेथे सुरू झालेली आहे. त्या युद्धात नागा बावस या जमातींच्या सैनिकांनी मंदिरातील देवतांचे दर्शन घेतले व त्यामुळे त्यानंतर युद्धात भाग घेऊन युद्ध जिंकण्यास सुलभ झाले असे इतिहास सांगतो. त्यामुळे नागपंचमीच्या मिरवणुकीत नागा जमातीतील सदस्यांना मान देऊन त्यांना अग्रभागी ठेवले जाते. हत्ती, घोडे यांना शृंगारून मिरवणुकीत आणले जाते. स्त्री-पुरुष त्यांच्या पारंपरिक रंगीबेरंगी पोषाखात त्या शोभायात्रेत उत्साहाने सामील होतात. नगारखान्यापासून निघालेली मिरवणूक टेकडीवरील मंदिरात वाजतगाजत नागपूजेसाठी जाते. यात्रेसाठी नागांच्या मूळ जमातीचे सदस्य नेपाळमधून आवर्जून आमंत्रित केले जातात. तो सोहळा प्रेक्षणीय असा असतो.

3. राजस्थानातील महिलांमध्ये त्या दिवसाचे महत्त्व सांगणारी आख्यायिका प्रसिद्ध आहे. त्या कथेचा विषय नागिणीने दिलेल्या मण्यामुळे एका सुनेचा घरात झालेला सन्मान असा आहे.

4. पंजाबात घराघरांतील भिंतीवर नागाची काळ्या रंगाची आकृती काढली जाते. तसे केल्याने वर्षभर सापाचे दर्शन होत नाही अशी लोकांची धारणा आहे.

5. दक्षिण भारतात शेणाची नागप्रतिमा तयार केली जाते आणि तिची पूजा केली जाते. चंदन, हळद यांपासून पाच फण्यांचा नाग तयार करून त्याचे पूजन करण्याची प्रथाही आहे.

6. मध्यप्रदेश, काश्मीर, गुजरात, बंगाल, उत्तरप्रदेश या प्रांतांत नागांची पूजा केली जाते. काश्मीर परिसरात शेषनाग, इंद्रनाग, संतनाग अशी देवळे असून, वासुकीचे मंदिर चिनाब नदीच्या काठी आहे.

प्राचीन साहित्यात इतिहासात नागवंश : नाग जमातीचा आदर महाभारतकाळापासून करण्यात येतो. बलराम हा शेषाचा अवतार मानला गेला आहे. नागकन्या उलूपी आणि अर्जुन यांचा विवाह ही महाभारतातील घटना आहे. नागवंशाचा उल्लेख वायुपुराणात आणि ब्रह्मांड पुराणात सापडतो. महाराष्ट्रातही पैठण, नागपूर, नाशिक, कोल्हापूर या ठिकाणी नाग जमातीच्या वस्तीचे पुरावे मिळाले आहेत.

नवनाग या राजाने नवनाग वंशाची स्थापना केली असे डॉ. के.पी. जयस्वाल यांनी नोंदले आहे. त्या वंशाचे मूळ नाव भारशिव असे असून त्या राजाने कुशाण राजा वासुदेव यांच्या समकालीन राज्य केले. त्याचे राज्य इसवी सन 140 ते 170 या काळात अस्तित्वात होते. त्याची नाणी कौशम्बी येथून पाडली जात असत. त्या वंशाचे स्थान छत्तीसगडच्या इतिहासात महत्त्वाचे मानले जाते. नाग किंवा सर्प ही त्या वंशाची देवता पूजनीय मानली जात असे. त्या वंशातील लोक नाग पाळून युद्धात त्यांचा वापर करत असावेत असेही एक मत आहे.

नागपूजेचा उल्लेख तैत्तिरीय संहितेत सापडतो. शिवासह नागाचे नाते जोडलेले पुराण साहित्यात दिसून येते. गणेशानेही सापाचा कंबरपट्टा बांधलेला आहे असे पुराणात उल्लेख सापडतात. शेषनागाने पृथ्वी त्याच्या मस्तकावर तोलली आहे ही आख्यायिका प्रसिद्ध आहेच.

पर्यावरणविषयक जागृतीमुळे शहरी भागात नागपंचमी सणाचा विशेष प्रसार दिसून येत नाही. सापाला सांभाळणे, त्यांची काळजी घेणे याविषयी जाणीवजागृती केली जात आहे.

डॉ. आर्या जोशी 94220597950  ,jaaryaa@gmail.com

 

About Post Author

Previous articleराजतरंगिणी – काश्मीरच्या इतिहासाचा लेखाजोखा
Next articleदुष्काळाचे बदललेले स्वरूप!
डॉ. आर्या आशुतोष जोशी यांनी 'श्राद्धविधीची दान संकल्पना' या विषयावर संशोधन केले आहे. त्यांनी पुणे विद्यापीठातून संस्कृत विषयात एम ए केले आहे. आर्या यांनी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमधे हिंदू धर्म, तत्वज्ञान, संस्कृती, धर्मशास्र अशा विषयांवर सतरा शोधनिबंधांचे सादरीकरण केले आहे. त्यांना धर्मशास्त्र या विषयातील अभ्यासासाठी आणि ज्ञान प्रबोधिनीतील संशोधनासाठी 2010 मध्ये पूर्णकन्या प्रतिष्ठानचा 'कन्यारत्न पुरस्कार' आणि 2011 मध्ये सुलोचना नातू ट्रस्टचा 'स्री शक्ती पुरस्कार' प्राप्त झाला. त्या मराठी विकिपीडियावर दीड वर्षे संपादक म्हणून कार्यरत आहेत. लेखकाचा दूरध्वनी - 9422059795