मध्यमवर्गीय बौद्धांची जबाबदारी

0
146

दलित पँथरच्या बहराच्या काळात आणि त्यानंतरही बराच काळपर्यंत, बौद्ध वस्तीत होळी, गणपती, नवरात्र असे सण सार्वजनिक रीत्या साजरे करण्याची कोणाची टाप नव्हती. हिंदू देवतांचे आणि चालीरीतींचे आम्हा बौद्धांच्या घरांतील अस्तित्व समूळ नष्ट करणे हे आमचे परमकार्य होते. त्याची एक झिंग होती. बावीस प्रतिज्ञा अमलात आणणे हे आमचे जीवनसाफल्य होते. आता, त्याच बौद्ध वस्त्यांत तरुणाई आंबेडकर जयंतीच्या बेफाम मिरवणुका डीजे लावून संघटित करते. सगळे रस्ते, गल्ल्या निळ्या होतात. नेत्रदीपक रोषणाई आणि भीमगीते यांनी माहोल उत्साहाने ओसंडत असतो… पण ती फक्त सुरुवात असते. मग, काही काळातच त्याच आमच्या विहारांसमोर साई भंडारा होतो, शेजारी नवरात्र चालते, जवळपास गणपती बसतात. गंमत म्हणजे हे सारे समारंभ सारख्याच उत्साहाने साजरे करणारे तरुण एकजात बौद्ध असतात !

अशा वेळी दलित पँथरमधून आलेले आमचे नगरसेवक, नेते काय करतात ? ते त्यांचे स्वत:चे फ्लेक्स त्या सभा-समारंभांना, मिरवणुकांना शुभेच्छा देण्यासाठी लावतात. गणपतीच्या मिरवणुकांचे स्वागत करतात. विसंगती अशी, की ते खाजगीत बोलताना या सगळ्या श्रमिश्रतेबद्दल, धेडगुजरीपणाबद्दल नाराजी व्यक्त करतात. पण त्यांना ते नाईलाजाने करावे लागते ! ते कबुली देतात, की त्यांना निवडून यायचे तर लोक त्यांच्या बाजूने राहण्यास हवेत !

त्या तरुणांना ते बौद्ध असतानाही हे सारे सण एकदिलाने साजरे करतात याचे वैषम्य वाटत नाही. काही बौद्ध झालेले दलित आधीच्या पिढीत चोरुनलपून हिंदू आचरण करत असत. त्यांना ते वैषम्य वाटे. पण आता आम तरुणांच्या- लोकांच्या मनात ते बौद्ध का झाले, त्यांनी हिंदू धर्म का सोडला याची नीटशी समज दिसत नाही. त्यांच्या बाबतीत बौद्ध आणि हिंदू या दोन धर्मांतील तशा आचरणातील सीमारेषा धूसर झालेली आहे. त्यांची मानसिकता बौद्ध ही हिंदूंमधीलच एक जात आहे अशी काही तरी होऊन गेली असावी. मात्र त्यांच्या मनी मुसलमानांविषयीचा विद्वेष पुरेपूर आहे. महिलांच्या बैठकांतही सलोख्याचा मुद्दा समजावताना ‘सर तुम्हाला माहीत नाही ती मुसलमानं कशी असतात ती..!’ असे वाक्य त्यातील एखादी आदर राखून उच्चारून जाते.

ही प्रक्रिया विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांचा थेट शिरकाव होण्याआधीपासून सुरू झालेली आहे. त्या कट्टरपंथी हिंदुत्ववादी संघटनांना या सुप्त प्रक्रियेची मदत झाली. मुसलमान द्वेष हा तिचा पाया असतो. त्यांना बौद्ध-हिंदू-जैन-शीख हे सगळे आपण एक आहोत, येथील मूळ भारतीय आहोत. मुसलमान परकीय, आक्रमक आहेत. त्यांना त्यांचा पाकिस्तान दिला आहे. तरीही ते येथे वाटेकरी आहेत… वगैरे वगैरे पढवले जाते. शहरातील बौद्धांना अस्पृश्यता, जातीय अत्याचार यांचा सामना ग्रामीण भागातील अस्तित्वाएवढा करावा लागत नाही. त्यामुळे ती वेदना तीव्र नसते. तरुणाईला राष्ट्रवादी आवाहने, जोश शमवणाऱ्या मिरवणुका, त्यांतील घोषणा, त्यांच्यातील पुढारीपण करणाऱ्यांना दरमहा विशिष्ट रकमेची पाकिटे, व्यसने, पार्ट्या आणि हत्यारे हा या कट्टरपंथी हिंदुत्ववादी टोळ्यांचा नित्याचा कार्यक्रम असतो. याबद्दल खटकत असणारे काही तरुणही भेटतात, पण त्यांची ताकद मर्यादित असते. त्यांची मनोवस्था कधी एकदा शिकून, नोकरी मिळवून या वस्तीच्या बाहेर पडतो अशी असते.

जीवन बदलण्याची आंबेडकरी प्रेरणा असलेले आणि त्यास लाभलेल्या आरक्षण, शिष्यवृत्त्या यांच्या साथीने वस्त्यांतून बाहेर पडलेले, शिक्षित होऊन- चांगल्या नोकऱ्यांत जाऊन मध्यमवर्गीय झालेले आम्ही लोक वस्तीशी नियमित संबंध ठेवत नाही. कधीमधी तेथे कार्यक्रमाला जातो, पण ते विहारात किंवा तत्सम जागेत, तेवढ्यापुरते. ती जयंती असते, वर्षावास असतो किंवा दलित पँथरचा सुवर्णमहोत्सव किंवा विद्रोही वा आंबेडकरी साहित्य-संस्कृती संमेलन… वक्ते व श्रोते बहुतेक आम्ही बाहेरचेच असतो. अजूनही तशी जाणीव असलेले, वस्तीत राहणारे काही लोक येतात, पण ते सुटे सुटे. वस्तीतून समुदाय म्हणून लोक या कार्यक्रमांना मोठ्या संख्येने सहभागी नसतात. आम्ही ज्या विहारात किंवा सभागृहात कार्यक्रम घेतो, त्याच्या आसपासच्या गल्ल्यांत जाऊन दलित पँथर काय होते- राजा ढाले-नामदेव ढसाळ कोण होते- दलित किंवा आंबेडकरी प्रेरणेचे साहित्य म्हणजे काय- मुळात साहित्य म्हणजे काय हे नव्या पिढीला विचारण्याचे प्रयोग आम्ही केले तर खजिल करणारी उत्तरे मिळतात.

आम्ही मध्यमवर्गीय बौद्ध आणि आमचे प्रगतीशील चळवळीतील सवर्ण मित्र दलित अत्याचारांच्या विरूद्ध निदर्शने करतो, त्यावेळीही आम्ही सुटे सुटे असतो. आम्ही जेथून आलो, त्या वस्तीतील कोणी आमच्या सोबत नसतात. आम्ही त्यांना आणू शकत नाही. कारण आमचा त्यांच्याशी अजिबात किंवा फारसा संबंध नसतो. बौद्ध मध्यमवर्गाचे हे ‘त्यांच्या वस्त्यांतील समुदाया’पासून तुटणे, त्याला त्याच्या प्रबोधित जाणिवांपासून अलग ठेवणे, त्याचा तेथील मुला-महिलांच्या विकासाशी संबंध नसणे- त्यांना तेथील भार्इंच्या आणि जातीच्या मतपेटीआधारे सत्तेशी सौदा करणाऱ्या बौद्ध राजकारण्यांच्या स्वाधीन करणे याचे काय करायचे?

विश्व हिंदू परिषद ट्युशन्सच्या व अन्य निमित्ताने वस्ती वस्तीत हिंदुत्वाचा प्रचार करत आहेत. त्यातून काही अनाचार घडतात. सच्च्या जाणिवेच्या दलितांना एकाकी वाटते. त्यास आम्ही त्याच वस्तीतून वर आलेले बौद्ध मध्यमवर्गीय जबाबदार नाही का? आमच्यातील काही जण केवळ फेसबुक-व्हॉट्स ॲपवर आवाज उठवत असतात. काही जण प्रासंगिक आंदोलनांत सहभागी होतात. काही जण अजूनही वस्तीतील विहारांचे, संस्थांचे ट्रस्टी आहेत- ते कार्यक्रमांपुरते तेथे जातात. काहींची वस्तीतील पूर्वीची घरे भाड्याने दिलेली आहेत किंवा पुनर्विकासात तेथे इमारती होऊन मोठी प्रॉपर्टी होणार आहे म्हणून अपरिहार्यपणे संबंध ठेवतात. काहींचे जवळचे नातेवाईक तेथेच असतात- नात्यांतील काही कार्यक्रमांवेळी, अडचणींवेळी त्यांना नाईलाजाने भेटावे लागते. मर्तिकावेळी तर टाळणे कठीण जाते. काही जण एनजीओंचे पगारी कार्यकर्ते असतात, म्हणून तेथे ‘प्रोजेक्ट’ राबवत असतात.

बौद्धांतील मध्यमवर्गीयांनी ठरवले तर ते स्वतःच्या संसाधनांनी ते जेथून आले त्या वस्त्यांत विकासाचे, जागृतीचे, लोकांना संघटित करण्याचे विविध उपक्रम करू शकतात. ते दर आठवड्याला वस्तीत जाऊन मुलांचे वर्ग घेऊ शकतात. त्यातून शैक्षणिक आणि सामाजिक-राजकीय विचारांचे प्रबोधन, नोकरी-व्यवसायाचे मार्गदर्शन करू शकतात. पुढे जाऊन, ते त्यांच्या आर्थिक-भौतिक-सामाजिक प्रश्नांवर लढले तर उत्तमच !

विश्व हिंदू परिषदेच्या ‘ट्युशन्स’ नावाच्या उपक्रमाचा गूगल करून शोध घेतला. त्याचे नाव आहे – संस्कार शाळा. मला आमच्या गल्लीतील महिलेने तिला मुलांना शिकवण्यासाठी विश्व हिंदू परिषदेकडून मिळालेले जे हिंदू प्रार्थना-मंत्र-घोष शिकवण्याचे कागद दिले, त्यातही शीर्षकस्थानी ‘संस्कारशाला : आचार पद्धति एवं प्रमुख विषय’ असे लिहिलेले आहे. परिषदेने त्या देशभर सुरू केल्या आहेत. स्थानिक प्रेरित, गरजू महिला-पुरुषांना तीन हजार रुपये किंवा तशीच काही रक्कम दरमहा देऊन ते मिशन म्हणून तो उपक्रम चालवतात. साधने, पैसे नंतर येतात, त्याआधी विशिष्ट ध्येयाची बांधिलकी मानलेले लोक लागतात. ते त्यांच्याकडे उदंड आहेत.

बौद्ध मध्यमवर्गाला त्यांच्या उद्देशाला आकार देणारे असे ‘संस्कार वर्ग’ संघटित करणे, त्यासाठी पैसे उभे करणे कठीण आहे का? बौद्ध धम्माच्या प्रचार-प्रसाराचे उद्दिष्ट असणाऱ्या संघटनांनी त्यांच्या कामात हा ध्येयवाद आणणे आणि त्यानुसार उपक्रम व विषय ठरवून त्यांचे काम अधिक अर्थपूर्ण करणे कठीण नाही. बाबासाहेबांच्या काळात ‘समता सैनिक दला’ने केवळ त्यांच्या नव्हे, तर अन्य प्रगतीशील शक्तींसहितच्या व्यापक आंदोलनात सुव्यवस्था आणि व्यत्यय आणणाऱ्यांचा योग्य तो बंदोबस्त करण्याची मोठी कामगिरी केली आहे. समता सैनिक दल चैत्यभूमी, चवदार तळे, दीक्षाभूमी, भीमा-कोरेगाव वा तत्सम ठिकाणी वा प्रसंगी मानवंदना देणे, काही व्यवस्था ठेवणे ही कामे करत असते. ते महत्त्वाचे आहे. ते करावेच. पण त्यांना त्या पलीकडे जाऊन ‘बजरंग दली’ संघटनांना प्रत्युत्तर देणारे तरुणांचे गट संघटित करण्यात पुढाकार घेणे अशक्य नाही. काही ठिकाणी करून पाहण्यास हवे.

बौद्ध मध्यमवर्ग अशा रीतीने सक्रिय झाला तर वस्त्यांतून त्यांना ‘त्यांचे लोक’ म्हणून जी मान्यता मिळते, ती आणखी वाढेल. वस्तीतील तरुण मंडळी जोडली जातील. त्यांना अपेक्षित उपक्रम संघटित करू लागतील. मध्यमवर्गीय बौद्धांनी नव्या भानाने, नियमित सक्रिय होण्याने विश्व हिंदू परिषदेच्या संस्कार शाळेच्या विरूद्ध बोलणाऱ्या मंडळींना ताकद मिळेल.

– सुरेश सावंत 9892865937 sawant.suresh@gmail.com
(जीवनमार्ग, 9 ते 15 जुलै 2023 वरून पुन:प्रसिद्ध-सुधारित-संस्कारित)
———————————————————————————————-

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here