भूकंपीय समुद्राच्या लाटांना त्सुनामी म्हटले जाते. त्सुनामी हा शब्द जपानी आहे. त्याचा अर्थ ‘बंदर लाट’ असा होतो. जपानी भाषेत ‘त्सु’ म्हणजे बंदर आणि ‘नामी’ म्हणजे लाट. तो शब्द तेथील कोळ्यांत प्रचलित होता. मासेमारी करून परत आलेल्या कोळ्यांना संपूर्ण बंदर नाश पावलेले दिसे, पण समुद्रात लाटा मात्र दिसत नसत; त्यामुळे ‘त्सुनामी’ असे नाव त्यांच्याकडून त्या घटनेस उच्चारले जाऊ लागले व तेच प्रचलित झाले.
समुद्रावर त्सुनामी लाटा प्राचीन काळापासून जगभरात आल्या आहेत. त्या लाटांनी काही बेटांवरील मानवाचे अस्तित्व पुसून टाकले आहे. निसर्गाच्या त्या रौद्र प्रकोपाचे निरीक्षण, अभ्यास करण्याची, संकटाची आगाऊ सूचना मिळण्याचे संदेश देणारे शास्त्र विकसित करण्याची गरज प्रगत मानवी समाजाला भासू लागली. भूकंपप्रवण क्षेत्रावर असलेल्या जपान देशात आणि भूमध्य समुद्रात त्यांचे मोठ्या प्रमाणात दस्तऐवजीकरण करण्यात आले आहे. त्सुनामीचा कालावधी, त्सुनामीची तीव्रता याची नोंद केली गेली आहे. किनाऱ्यापासून दूर समुद्रात या लाटांची उंची जास्त नसते, पण तरंगलांबी जास्त असते. त्यामुळे त्या दिसून येत नाहीत. परंतु जेव्हा या लाटा किनाऱ्याला धडकतात त्यावेळी त्यांची उंची वाढते व तरंगलांबी कमी होते, त्यामुळे पाण्यातील शक्ती किनाऱ्यावर आदळून नुकसान होते. त्सुनामीची तरंगलांबी खोल समुद्रामध्ये दोनशे किलोमीटर व तरंगउंची एक मीटर असते. त्या वेळी वेग साधारण ताशी आठशे किलोमीटर असतो. त्सुनामी किनाऱ्याला धडकताना त्यांचा वेग व ताकद यांमुळे अपरिमित नुकसान घडते. कांदळवन व प्रवाळ बेटे ही नैसर्गिक रीत्या त्सुनामीच्या तडाख्यांपासून भूपृष्ठाचे संरक्षण करतात. खारफुटीची वने (Mangrove Forests) आणि कांदळवन (Mangroves) हे एकच आहे. ती किनारपट्टीवर वाढणारी एक विशेष प्रकारची वनस्पती आहे, ती खारट पाण्याला आणि भरती-ओहोटीला सामोरे राहू/जावू शकते. त्या वनस्पतींमुळे तयार होणाऱ्या परिसंस्थेला ‘कांदळवन’ म्हणतात.
इतिहासात पहिली नोंदलेली त्सुनामी इसवी सनपूर्व 2000 मध्ये सीरियाच्या किनाऱ्यावर आली होती. समुद्रकिनाऱ्यावर त्सुनामी लाट येताना, ती पूर म्हणून दिसू शकते किंवा नदीवर अथवा ओढ्यावर जाताना ‘बोर’ (अचानक समोरून येणारा पाण्याचा मोठा प्रवाह) या स्वरूपात येऊ शकते. लाटेचा प्रवाह प्रथम येतो तेव्हा समुद्राच्या पाण्याची पातळी वेगाने कमी होते आणि बंदर किंवा किनारपट्टीचा भाग ओहोटी लागल्यासारखा ओसरू शकतो, समुद्राचा तळ उघडा पडतो. पाण्याच्या पातळीत अकस्मात झालेला हा बदल समुद्रातून मोठी त्सुनामी जवळ येत असल्याचा एकमेव इशारा असतो.

कोकणात केळशीच्या किनाऱ्यावर सप्टेंबर 1524 मध्ये त्सुनामी आली होती. वास्को द गामाच्या तिसऱ्या भारत सफरीवेळी ते थरार नाट्य घडले होते. आग्नेय आशियात हिंदी महासागरात सुमात्रा बेटाजवळ त्सुनामी 26 डिसेंबर 2004 रोजी आली होती. भूकंपीय घडामोडीने आलेली ती त्सुनामी जगाला हादरवणारी अशी प्रलयंकारी होती. त्या त्सुनामीमुळे भारताचा पूर्व किनारा, इंडोनेशिया, सोमालिया, श्रीलंका, म्यानमार, मालदीव, थायलंड, मादागास्कर येथील अडीच लाखांहून अधिक माणसांचा बळी व मोठ्या प्रमाणावर वित्तहानी घडली. मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या त्सुनामीची भूकंप तीव्रता 9.1 रिश्टर स्केल होती. ती नैसर्गिक आपत्तीच्या इतिहासात सर्वांत भयानक अशी नुकसानकारक त्सुनामी ठरली आहे.
जपानच्या किनारपट्ट्यांना त्सुनामीचा तडाखा 11 मार्च 2011 रोजी बसला होता. जपानी प्रमाणवेळेनुसार दुपारी 2.46 वाजता जपानच्या किनाऱ्यापासून सव्वाशे किलोमीटर अंतरावर सुमारे दहा किलोमीटर खोलीवर 8.9 रिश्टर स्केल क्षमतेचा भूकंप झाला. त्यातून उद्भवलेल्या त्सुनामीने काही मिनिटांतच किनारपट्टी गाठली. केवळ किनारपट्टीशीच न थांबता ती त्सुनामी किनाऱ्यापासून आत अनेक किलोमीटर अंतरापर्यंत पसरत गेली. जमिनीवर पसरताना त्या लाटेने किनाऱ्याजवळच्या मोठ्या जहाजांना तर तिच्या कवेत घेतलेच; सोबत रस्त्यांवरील मोटारी, घरे आदींसह जे काही वाटेत आले ते सगळेच गिळंकृत केले होते.
–रजनी देवधर 7045992655 deodharrajani@gmail.com