कथा ग्लासफर्डपेठा गावाची (Story of Glasfurdhapeta)

2
79

‘खेड्यांचा देश’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारत देशात अशी काही गावे आहेत जी ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या नावावरून ओळखली जातात. त्या गावांशी निगडित कथा तितक्याच सुरस व रंजक आहेत. अशी दोन गावे महाराष्ट्रात आहेत. ती गडचिरोली जिल्ह्यात मोडतात. त्यांतील एक आहे ‘जॉर्जपेठा’ तर दुसऱ्याचे नाव आहे ‘ग्लासफर्डपेठा’.

‘ग्लासफर्ड’ हा मूळ स्कॉटिश शब्द आहे. त्याचा अर्थ ‘ग्रीन फॉरेस्ट’ (हरित जंगल) असा होतो. गाव प्राणहिता नदीच्या तीरावरील घनदाट जंगलात आहे. त्या गावास ‘ग्लासफर्ड’ हे नाव असणे त्याच्या अस्तित्वाला अगदी साजेसे असे आहे. इंग्रजी सत्तेच्या काळात ज्या ब्रिटिश अधिकाऱ्याने हे गाव वसवले त्याच्या नावावरून त्या गावास नवे नाव मिळाले. त्या अधिकाऱ्याचे पूर्ण नाव होते – चार्ल्स लॅमन्ट रॉबर्टसन (सी.एल.आर) ग्लासफर्ड.

सी.एल. आर ग्लासफर्डचा जन्म कुमाऊ प्रदेशात अल्मोडा येथे 17 मार्च 1831 रोजी झाला. तो ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या बंगाल प्रांतातील इंजिनीयर जॉन ग्लासफर्ड व ऑलिव्ह ब्रिटन यांचे प्रथम अपत्य होता. जॉन ग्लासफर्ड यांच्या एकूण अकरा अपत्यांपैकी केवळ चार अपत्ये बचावली, त्या काळी भारतात अर्भक मृत्यू दर किती जास्त होता याचा त्यावरून अंदाज येतो. स्वछतेची जाण व आरोग्याच्या पुरेशा सुविधा उपलब्ध असलेल्या युरोपीयनांनासुद्धा अशा दुर्धर परिस्थितीला सामोरे जावे लागत होते. तेथे दारिद्र्यात व अज्ञानाच्या अंधकारात खितपत पडलेल्या बहुसंख्य भारतीय समाजाची काय अवस्था असेल याची कल्पना करवत नाही.

आपला कथानायक चार्ल्स, त्याचे शिक्षण युरोपमध्ये पूर्ण करून, तो ईस्ट इंडिया कंपनीच्या लष्करी सेवेत भरती होण्यासाठी मुंबईकडे 1848 मध्ये रवाना झाला. त्याला सातारा येथे अठराव्या नेटिव्ह इन्फंट्रीमध्ये दाखल करून घेण्यात आले. त्याची रवानगी पुढे, 1850 साली पुणे येथील पहिल्या बाँम्बे युरोपीयन फ्युसिलिअर्समध्ये झाली. तेथे पुढील काही वर्षे त्याने चोख काम केल्यावर, त्याच्यातील चुणूक लक्षात घेऊन त्याच्यावर सातारा व धारवार प्रांतात महसूल सर्वेक्षणाचे काम 1855 मध्ये सोपवण्यात आले. त्या सर्वेक्षणाद्वारे दक्षिण महाराष्ट्र व उत्तर कर्नाटक या प्रांतांचे भौगोलिक नकाशे तयार करण्याचे काम अगदी पहिल्यांदाच हाती घेतले जात होते. त्यापूर्वी या विशाल भूभागाचे शास्त्रशुद्ध भौगोलिक नकाशे व मोजमापे जगाला माहीत नव्हती.

हे काम सुरू झाले आणि लगेचच 1857चा उठाव झाला. त्यावेळी संभाव्य धोका लक्षात घेऊन ब्रिटिश सैन्यातील अधिकाऱ्यांना संवेदनशील ठिकाणी उठावाला थोपवण्यासाठी पाठवण्यात आले. पंजाबमधील मुलतान येथेही त्यांतील काही अधिकारी व सैन्य पाठवले गेले. त्या अधिकाऱ्यांमध्ये ग्लासफर्डसुद्धा होता. परिस्थिती मुलतानमध्ये सप्टेंबर 1858 पर्यंत पूर्णतः शांत होती. पण जेव्हा तेथील बंगाल नेटिव्ह इन्फंट्रीच्या ब्याऐंशीव्या आणि एकोणनव्वदाव्या रेजिमेंटला बरखास्त करण्याचे आदेश देण्यात आले त्या वेळेस त्या रेजिमेंटच्या सैन्याने बंड केले आणि तोफखाना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. ग्लासफर्ड आणि इतर अधिकारी यांनी मिळून त्यांचा तो डाव उधळून लावला आणि ते बंड शमवले.

बंडाचा बीमोड झाल्यानंतर, ग्लासफर्डने पुन्हा सर्वेक्षणात सामील होण्याची परवानगी मिळवली आणि त्याने सर्वेक्षणाचे काम रायचूर दोआब जिल्ह्यात ऑक्टोबर 1858 ते 1860 पर्यंत पार पाडले. पुढे, त्याने नागपूर कमिशनमध्ये सहाय्यक आयुक्त होण्यासाठी अर्ज केला; आणि तो मे 1860 मध्ये मध्य प्रांताचा (‘सीपी व बेरार’च्या) चीफ कमिशनर कर्नल एलियटचा सहायक सचिव म्हणून नागपूर येथे रुजू झाला.

हैदराबाद राज्याचा गोदावरीच्या डाव्या तीरावरील आदिवासीबहुल प्रदेश कायमस्वरूपी ब्रिटिश सरकारला देण्यात आला. तो नवीन प्रदेश मध्य प्रांतात सामाविष्ट केला गेला. निजामाच्या अधिकाऱ्यांकडून त्या नव्या प्रांताचा कार्यभार घेण्याच्या कामी कर्नल एलियटने निजामाशी केलेल्या ताज्या करारानुसार सप्टेंबर 1860 मध्ये ग्लासफर्डला नेमले आणि त्यानुसार, ग्लासफर्डने नागपूर 20 ऑक्टोबर 1860 रोजी सोडले.

गोदावरीच्या तीरावरील ‘दंडकारण्य’ म्हणून ओळखला जाणारा दोनशे मैलांचा तो टापू जंगली श्वापदांचा व अज्ञात आदिवासी जमातींचा प्रदेश म्हणून प्रसिद्ध होता. ग्लासफर्ड हा त्या भागाचा डेप्युटी कमिशनर (जिल्हाधिकारी) म्हणून काम पाहू लागला. त्याच भागास पुढे ‘बस्तर डिपेण्डन्सी’ असे नाव देण्यात आले. ग्लासफर्डने त्याचे मुख्यालय सिरोंचा येथे स्थापन केले. त्याने तेथे किल्ल्याचे मजबुतीकरण करून पुढील आठ वर्षे त्या प्रांताचे प्रशासन सांभाळले. त्या प्रदीर्घ काळात तेथील भौगोलिक तपशिलांचे दस्तऐवजीकरण, जमीनदारी व्यवस्थेवर नियंत्रण, आदिवासी समाजाच्या नोंदी, सर्वेक्षण व चित्रणे करण्याचे बहुमोल कार्य केले. त्याने बस्तरच्या दुर्गम जंगलाचे दस्तऐवजीकरणसुद्धा केले, त्या किर्र घनदाट जंगलातील दुर्गम अबुजमाड प्रांतात शिरणारा ग्लासफर्ड हा पहिला युरोपीयन होता. आदिवासी माडियांचे देव ते तेथील भूगर्भशास्त्र, पिके ते पुरातन वास्तू, रेशीम किडे, बोलीभाषा, आदिम वाद्ये, नरभक्षक वाघ, अजस्त्र मगर, हिंस्र श्वापदे, स्वर्गीय नर्तक पक्षी आणि सारस क्रेन अशा बहुसंख्य चित्रविचित्र नोंदी त्याच्या डायरीत आढळून येतात. द ग्लासफर्ड फॅमिली 1550-1972’ ‘सेंटर फॉर साऊथ एशियन स्टडीज, युनिव्हर्सिटी ऑफ केंब्रिजमध्ये आहे. अलेक ग्लासफर्डने ती 1972 मध्ये कुटुंबाशी संबंधित सर्व कागदपत्रे तिथे सुरक्षित राखण्यासाठी दिली आहेत. मात्र ती डिजिटल स्वरूपात नसून प्रत्यक्ष पाहण्यासाठी तिथे उपलब्ध आहेत.

ग्लासफर्डला महापाषाणयुगीन संस्कृतीच्या शिलापेटिका सिरोंचामधील अल्बाका तालुक्यात आढळून आल्या. त्याने त्यांचे उत्खनन उत्सुकतेपोटी केले. त्याने उत्खननात सापडलेले अवशेष नागपूरला स्टिफन हिस्लॉपला परीक्षणाकरता पाठवले. मात्र या अवशेषांचे पुढे काय झाले हे माहीत नाही. हिस्लॉपकडच्या इतर अवशेषांप्रमाणेच त्याच्या मृत्यूनंतर ते गहाळ झाले असावेत. तो चांदा (विभाजनपूर्व चंद्रपूर) जिल्ह्याचा जिल्हाधिकारी असताना पुढे, 1872 ते 1875 दरम्यान त्याने नागपूरजवळ काही शिलावर्तुळे शोधून काढल्याचा उल्लेख आढळतो. त्यामुळे ग्लासफर्डचे नाव विदर्भातील बृहदश्म किंवा महापाषाणयुगीन संस्कृती यांच्या आद्य अभ्यासकांमध्ये घेतले जाते.

ग्लासफर्डचा विवाह जेन कॉर्नवॉल हिच्याशी फेब्रुवारी 1870 मध्ये झाला. त्याला ‘अलेक्झांडर इंग्लिस रॉबर्टसन’ व ‘डंकन जॉन’ ही दोन मुले आणि ‘युफेमिया’ ही मुलगी होती. अलेक्झांडर बेतूल येथे 1870 मध्ये जन्मला. त्याने त्याच्या पित्याच्या पावलांवर पाऊल ठेवून, तो ब्रिटिश सैन्यदलाच्या बॉम्बे स्टाफ कॉर्प्समध्ये भरती झाला. अलेक्झांडर उत्त्तम शिकारी व चित्तथरारक शिकार-कथांचा लेखक होता. तो नामवंत झाला. त्याने त्याच्या अनुभवांवर आधारित ‘लिव्हज् फ्रॉम ॲन इंडियन जंगल, ‘रायफल अँड रोमान्स इन दि इंडियन जंगल’, ‘स्केचेस ऑफ मंच्युरिअन बॅटलफिल्ड’ व ‘म्युझिंग ऑफ ॲन ओल्ड शिकारी’ ही चार पुस्तके लिहिली. त्याचे नाव विख्यात शिकारकथा लेखक जिम कॉर्बेट याच्या पूर्वसूरींमध्ये घेतले जाते.

डंकन जॉन हा दुसरा मुलगा माथेरान येथे 1873 मध्ये जन्मला. तो ब्रिटनमध्येच सैन्यदलात सामील झाला. तो तेथे ब्रिगेडिअर जनरल पदापर्यंत पोचला. तो दुर्दैवाने, पहिल्या महायुद्धादरम्यान फ्रान्सच्या भूमीवरील फिअर्स येथे जर्मनीविरुद्ध लढताना, जर्मन शेलिंग अंगावर पडून 12 नोव्हेंबर 1916 रोजी गंभीर रीत्या जखमी झाला. त्याचा मृत्यू त्याला युद्धभूमीवरून हलवून उपचारासाठी नेत असताना, दहा तासांच्या स्ट्रेचरच्या प्रवासादरम्यान झाला.

युफेमिया 1876 मध्ये जन्मली, तिच्या पोटी इयान स्टिफन्सचा जन्म 1903 मध्ये झाला. स्टिफन्स पत्रकारितेमध्ये शिरला. तो कोलकाता येथून निघणाऱ्या ‘दि स्टेट्समन’ या इंग्रजी वृत्तपत्राचा मुख्य संपादक म्हणून नावारूपाला आला. स्टिफन्स त्याच्या भारतातील ब्रिटिश राजवटीतील स्वतंत्र वार्तांकनासाठी आणि विशेषतः 1943 मध्ये उद्भवलेल्या बंगालच्या भयंकर दुष्काळासंबंधीच्या निर्भय लेखनासाठी ओळखला जातो. बंगालच्या त्या अमानुष दुष्काळाने जवळपास तीस लाख लोकांचे प्राण घेतले. भारतीय इतिहासातील तो सर्वात भयंकर दुष्काळ. वृत्तपत्रांवर बंदी आणून, त्यांची सरकारकडून मुस्कटदाबी होत असताना, स्टिफन्स याने त्या विषयाचा पाठपुरावा करून ब्रिटिश सरकारवर टीकेची झोड सातत्याने उठवली. त्याने त्याच्या उपरोधिक संपादकीय लेखांसकट, गावोगावी हिंडून टिपलेल्या भयावह छायाचित्रांद्वारे त्या दुष्काळाचे गांभीर्य सरकारच्या लक्षात आणून दिले. ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये चर्चिलवर त्याबद्दल टीका झाली आणि शेवटी त्याची परिणीती बचावकार्याद्वारे तो भीषण दुष्काळ संपवण्यात झाली.

स्टीफन्सच्या मृत्युप्रसंगी लिहिलेल्या मृत्युलेखात भारताचे नोबेल पारितोषिक विजेते ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन म्हणाले होते, की “इयान स्टीफन्सने त्याच्या आयुष्याचा बराचसा भाग ज्या उपखंडात व्यतीत केला, त्या उपखंडात त्याचे स्मरण केवळ एक महान संपादक म्हणून केले जाऊ नये तर अशी व्यक्ती म्हणूनही केले जावे, की जिने तिच्या कठोर प्रयत्नांद्वारे बंगालमधील किमान लाखभर लोकांचे प्राण वाचवले.” अशा तऱ्हेने, ग्लासफर्ड कुटुंबीयांचे भारतीयांवर अनन्वित उपकार आहेत.
ग्लासफर्डची शेवटची कारकीर्द हैदराबादमध्ये होती. तो तेथून 1884 मध्ये मेजर-जनरल पदावरून निवृत्त झाला. त्याचे निधन त्यानंतर तीन वर्षांनी, 14 मे 1887 रोजी अल्जियर्स येथे झाले. ग्लासफर्ड कुटुंबीयांचे स्कॉटलंड हे मूळ. त्यांनी त्यांचे आयुष्य भारताच्या घनदाट जंगलात काढल्याने ते स्कॉटलंड वा इंग्लंड येथील शहरी भागात स्थायिक होणे शक्य नव्हते. त्यामुळे ते कुटुंब व्यापक वनक्षेत्र असलेल्या ऑस्ट्रेलियात स्थायिक झाले. त्या कुटुंबीयांनी भारताच्या मध्य प्रांताशी (सेंट्रल प्रोव्हिन्सेस) जुळलेली नाळ सदैव स्मरणात ठेवली. आणि त्यामुळेच त्यांच्या पंजोबांच्या नावाने वसलेल्या गावाचा मागोवा घेत पीटर ग्लासफर्ड (87), त्याची पत्नी जेनिफर हॅमंड (83) आणि त्याची बहीण सुसेन ग्लासफर्ड (77) हजारो मैलांचा प्रवास करत ग्लासफर्डपेठा गावी नोव्हेंबर 2018 मध्ये आले होते. ग्लासफर्डने प्राणहिता नदीच्या पुराचा धोका ओळखून त्या गावाचे विस्थापन त्या वेळेस केले होते ही आठवण गावातील वयोवृद्धांच्या स्मरणात मौखिक परंपरेमुळे आहे. ग्लासफर्डचे सिरोंचा येथे एकशेसाठ वर्षांपूर्वीचे निवासस्थान तेथील पोलिस स्टेशनमध्ये रुपांतरित झाले आहे. ते पाहून पीटर, जेनिफर व सुसेन यांना भरून आले. ग्लासफर्डने तेथील एका उंच जागेवर पूर्वीच्या, पडझड झालेल्या दगडी चिऱ्यांचा वापर करून निवासस्थान बांधलेले होते. ते सरकारी गेस्ट हाऊस झाले आहे.

(प्रस्तुत लेखक संबंधित विषयावर संशोधन करत असून, सुसेन ग्लासफर्ड हिच्या सोबतीने ग्लासफर्ड परिवाराच्या नोंदींचे दस्तऐवजीकरण करत आहे. तिला ‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’ हा ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला आहे. ती ग्लासफर्डची पणती.)

अमित भगत 7722071687 amit_264@yahoo.co.in
————————————————————————————————————-

 

About Post Author

2 COMMENTS

  1. खूप interesting आहे हे. ब्रिटिशांच्या खाणाखुणा अनेक क्षेत्रात अजूनही रुजून राहिल्या आहेत. काही प्रदेशांना ही त्यांची नावं गुंफण करुन नावं तयार झाली त्याचा मागोवा मस्तच.

  2. अप्रतिम माहिती. त्याकाळातील अधिकारी व्यक्तींचे आयुष्य जणू हाती घेतलेल्या कार्याला वाहिलेले होते. किती आव्हाने, प्रचंड धोके ! ज्ञान, शौर्य, करुणा यांचे दर्शन झाले !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here