शंकर पळशीकर: एक चिंतनशील कलावंत

0
135

शंकर बळवंत पळशीकर हे चित्रकार तर होतेचत्याबरोबर ते उत्तम शिक्षक आणि प्रतिभावान कलासमीक्षकही होते. त्यांनी उत्तमोत्तम चित्रे निर्माण केली आणि कलेद्वारे कलाप्रेमींसमोर आत्मपरीक्षणात्मक विचार मांडले. त्यांच्या कलासाधनेतून आणि विचारांतून अंतर्मुख, चिंतनशील असा कलाविचार रसिकांसमोर येतो. पळशीकर यांची चित्रे ही दृश्य सौंदर्याच्या पलीकडे जातात. त्यांच्या चित्रांतून वैचारिक संवाद निर्माण होतो. त्यामध्ये  पारंपरिक भारतीय रंगछटामध्यकालीन भित्तिचित्रांचे प्रभाव आणि आधुनिक कला यांचा संगम दिसतो. त्यांनी अमूर्त चित्रकला स्वीकारलीपण ती केवळ तांत्रिक नव्हती- त्यात जीवनमन आणि अस्तित्व यांचा खोल शोध होता. त्यांच्या चित्रांमध्ये रंग हे भावना व्यक्त करण्याचे साधन होते. त्यांची चित्रे तपकिरीकरडे, केशरी आणि गडद निळे रंग वापरून एक शांतविचारमग्न आणि आध्यात्मिक वातावरण तयार करतात. पळशीकर यांच्या चित्रांमध्ये मौन आणि शांतता जाणवते. त्यांची चित्रे गूढ शांतता प्रस्थापित करतात आणि कलाप्रेमींना विचार करण्यास लावतात.

पळशीकर यांनी आदर्श शिक्षक म्हणून महत्त्वाची कामगिरी बजावली, त्यांनी विद्यार्थ्यांना केवळ रंग, रेषा आणि माध्यमाचे तंत्र शिकवले नाही, तर त्यांना विचार करण्यास प्रवृत्त केले.

पळशीकर यांनी आदर्श शिक्षक म्हणून महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. त्यांच्या अध्यापनशैलीत शिस्तविचारशीलता आणि नवीन दृष्टिकोन विकसित करण्याचा आग्रह असे. त्यांनी विद्यार्थ्यांना केवळ रंग, रेषा आणि माध्यमाचे तंत्र शिकवले नाहीतर त्यांना विचार करण्यास प्रवृत्त केले. त्यांच्या अध्यापनाचे वैशिष्ट्य म्हणजे पारंपरिक भारतीय कला आणि आधुनिकता यांमधील संतुलन. त्यांनी भारतीय चित्रकलेची सौंदर्यपरंपरा, प्रतीकात्मकता आणि आध्यात्मिकतेचा गाभा विद्यार्थ्यांच्या मनात खोलवर रुजवला. त्यांनी अनेक उत्कृष्ट कलाकार निर्माण केले.

पळशीकर यांनी निर्माण केलेल्या काही महत्त्वपूर्ण चित्रांमध्ये ग्रीन लोटस, स्वातंत्र्य यज्ञ क्रुसेड फॉर फ्रीडम, सिनर्स डिव्हाइन, वन विदाऊट सेकंड, माया, थ्री ग्रेसेस, गोवा जीवन, क्लिम, र्हीम या चित्रांचा समावेश होतो

पळशीकर यांचा जन्म 17 मे 1916 रोजी विदर्भातील भंडारा जिल्ह्याच्या साकोली या छोट्या गावात झाला. ते दहा भावंडांमध्ये सर्वात धाकटे होते. वयाच्या आठव्या वर्षीच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. मुलांची जबाबदारी त्यांच्या आईच्या अंगावर आली. मृत्यूच्या आदल्या दिवशीवडिलांनी तरुण शंकरच्या खांद्यावर हात ठेवत आत्मविश्वासाने म्हटले होते, हा मुलगा मला अभिमान वाटावा असा ठरेल. त्यांचा तो विश्वास खरा ठरला पळशीकर यांनी सावनेर येथील नवयुग हायस्कूलमधून मॅट्रिक पूर्ण केले. ते मुंबईत 1938 साली आले. त्यांनी एन.एस. बेंद्रेदीनानाथ दलाल यांच्यासोबत व्यावसायिक कामे सुर केली. तेथेच त्यांना त्यांच्या सुप्त कलागुणांची जाणीव झाली. मात्र औपचारिक कलाशिक्षण त्यांनी वयाच्या सव्वीसाव्या वर्षी सुरू केले. सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये विद्यार्थिदशेपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास- फेलोसहाय्यक प्राध्यापकप्राध्यापक ते अखेरीस प्राचार्य (Dean) या पदापर्यंत पोचला. ते सेवानिवृत्त 1975 मध्ये झाले. पळशीकर केवळ सौंदर्यनिर्मितीच्या हेतूने चित्र काढत नसत. त्यांच्या चित्रांमागे स्पष्ट तात्त्विक विचार होते. त्यांनी भारतीय तत्त्वज्ञान- विशेषतः वेदांतउपनिषदबौद्ध तत्त्वज्ञान आणि योगदर्शन यांचा सखोल अभ्यास केला होता. ते तत्त्वज्ञान त्यांच्या कलेतून सहज दिसून येते. पळशीकर यांच्या चित्रकलेचा उद्देश फक्त सुंदर चित्र काढणे हा नव्हतातर त्यांतून अर्थ निर्माण करणे हा होता. ते चित्रांमधून मनाच्या अनुभवांशी संवाद साधायचे. त्यामुळे त्यांची चित्रे पाहणे म्हणजे केवळ सौंदर्य पाहणे नसतेतर अनुभव घेणे असते. त्यांच्या चित्रांमधून रंगरचना आणि चिन्हे यांच्या माध्यमातून शांतविचार करण्यास लावणारी भाषा तयार होते. ती भाषा समजून घ्यायची असेलतर प्रेक्षकाने थोडा वेळ थांबून ती चित्रे जाणून घ्यावी लागतात. 

पळशीकर यांचा विचार ‘कला म्हणजे सौंदर्य’, ‘कला म्हणजे धर्म’, ‘कला म्हणजे साधना’ इथेच न थांबता कला म्हणजे ‘स्वत:शी प्रामाणिक संवाद’ असे सांगणारा आहे

पळशीकर यांचा कलाविषयक विचार त्यांच्या भाषणांतून व लेखनांतूनही समोर आला. त्यांनी विविध व्याख्यानमालांमधून भारतीय कलाविचारसौंदर्यशास्त्र, आधुनिकता, अध्यात्म आणि भारतीयता या विषयांवर सखोल चिंतन मांडले. त्यांच्या मते, कलाकाराला स्वतःच्या कलेतून जगाकडे पाहायचे असतेपण त्याच वेळी जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनातूनही कलेकडे पाहण्याची गरज असते. पळशीकर यांचा विचार कला म्हणजे सौंदर्य’, ‘कला म्हणजे धर्म’, ‘कला म्हणजे साधना’ इथेच न थांबता कला म्हणजे स्वत:शी प्रामाणिक संवाद’ असे सांगणारा आहे. पळशीकर यांनी निर्माण केलेल्या काही महत्त्वपूर्ण चित्रांमध्ये पुढील चित्रांचा समावेश होतो: ग्रीन लोटसस्वातंत्र्य यज्ञ क्रुसेड फॉर फ्रीडमसिनर्स डिव्हाइनवन विदाऊट सेकंडमायाथ्री ग्रेसेसगोवा जीवनक्लिमर्हीमश्रीं. त्यांनी अनेक व्यक्तींची पोर्ट्रेट्सही काढली. त्यात बाळ गंगाधर टिळकलाल बहादूर शास्त्री आणि इंदिरा गांधीविष्णुपंत भागवतविष्णुदास भावे अशांचा समावेश आहे. ती पोर्ट्रेट्स व्यक्तींचे केवळ बाह्य रूप न रंगवता भाव व्यक्त करणारी आहेत. प्रकाशाचा उपयोग त्यांच्या पोर्ट्रेट्समध्ये महत्त्वाचा होता. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना काही राष्ट्रीय पुरस्कार आणि सन्मान प्राप्त झाले. उदाहरणार्थमुंबई आर्ट सोसायटी आणि कोलकात्याच्या फाईन आर्ट सोसायटीचे सुवर्णपदक (1950); ललित कलेतील शासनाची सांस्कृतिक शिष्यवृत्ती (1950); इंग्लंडमध्ये आंतरराष्ट्रीय प्लास्टिक कला परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व (1965). त्याच काळात त्यांनी फ्रान्स आणि युरोपमधील अनेक ठिकाणांना भेटी दिल्या. त्यांना श्रीलंका सरकारने कला शिक्षणतज्ज्ञ म्हणून आमंत्रित केले (1973); कला क्षेत्रातील त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल इटलीच्या अकादमीने त्यांना सुवर्णपदक बहाल केले (1982). त्यांचा सर्वोच्च सन्मान म्हणजे ललित कला अकादमीनेत्यांना भारतातील नऊ प्रमुख कलाकारांपैकी एक म्हणून नामांकित केले आहे !

पळशीकर यांनी बाळ गंगाधर टिळक, लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, विष्णुपंत भागवत आणि विष्णुदास भावे अशांची पोर्ट्रेट्स काढली, ती व्यक्तींचे केवळ बाह्य रूप न रंगवता भाव व्यक्त करणारी आहेत

पळशीकर यांचे निधन 1984 मध्ये झाले. त्यांच्या निधनानंतर, 1984 मध्येच जहांगीर आर्ट गॅलरी (मुंबई) येथे त्यांच्या कार्याचा आढावा घेणारे प्रदर्शन मांडण्यात आले होते. महाराष्ट्र शासनाने शंकर पळशीकर’ नावाचे पुस्तक 1987 मध्ये प्रकाशित केले. त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मुंबईच्या नॅशनल गॅलरी ऑफ मॉर्डन आर्ट (NGMA) मध्ये 2017 साली प्रदर्शन भरवण्यात आले होते. भारतीय आधुनिक चित्रकलेच्या इतिहासात शंकर पळशीकर यांचे कार्य एक महत्त्वाचा टप्पा म्हणून ओळखले जाते. त्यांनी भारतीय परंपरेला घट्ट धरून ठेवत आधुनिक विचारांशी जोडलेली एक वेगळी दृष्टी तयार केली. ती दृष्टी लोकांना प्रभावी वाटते. भारतीय कलाकारांनी त्यांची ओळख न विसरता जगभरातील नव्या कलाप्रवाहांशी संवाद साधण्याचा जो प्रयत्न केलात्यात पळशीकर यांचे योगदान महत्त्वाचे आहे.

– गिरीश घाटे 9820146432 ghategp@gmail.com

(दीपक घारे आणि सुहास बहुलकर संपादित, ‘Encyclopedia of Visual Art of Maharashtra’ ग्रंथातील लेखावर आधारित. )

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here