राज्यभर अमृतमहोत्सवी व्याख्याने – वैचारिक घुसळण (Ideological-awakening-on-august-15-across-maharashtra

0
517

महाराष्ट्रातील पाच संस्था एकत्र येऊन 15 ऑगस्टचा स्वातंत्र्यदिन ते पुढील वर्षी 30 जानेवारी रोजी येणारा महात्मा गांधी यांचा स्मृतिदिन या काळात राज्यभर वैचारिक जागरण करणार आहेत. या काळात राज्यभर विविध विषयांवर अभ्यासक, तज्ज्ञांची किमान पंच्याहत्तर व्याख्याने होतील. या आगळ्या उपक्रमाचा ‘महाराष्ट्र टाइम्स’ मीडिया पार्टनर आहे. या उपक्रमाची ही ओळख…

आज समाजात जे काही चालले आहे, त्यातून एक प्रकारचे भावनिक अस्वास्थ्य निर्माण होते. त्यातूनच थिंक महाराष्ट्र डॉट कॉम- सद्‍भावनेचे व्यासपीठ (मुंबई), स्वप्नभूमी (केरवाडी-परभणी), ग्रंथालय मित्र मंडळ (ठाणे), आरोग्य भान (पुणे) आणि विचारवेध (पुणे) एकत्र आलो आहोत. एकमेकांशी बोलून, समाजातील नवतरुण-विचारी लोक यांना सद्यकाळातील आव्हानात्मक विषयांमध्ये सामावून घेऊन त्यांतून समाज विचाराला रास्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याला आम्ही म्हणत आहोत, ‘वैचारिक घुसळण’.

हा प्रयोग महाविद्यालये व ग्रंथालये यांतून दोन पातळ्यांवर व्हावा असा प्रयत्न आहे. हे राज्यव्यापी व्याख्यानसत्रच आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स’ यात माध्यम प्रायोजक म्हणून आमच्या पाठीशी उभा आहे. ही व्याख्यानमाला केवळ एक उपक्रम न ठरता त्यातून वैचारिक आंदोलन निर्माण व्हावे आणि समाजामध्ये वैचारिक घुसळण व्हावी अशी इच्छा आहे. हे स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष; 15 ऑगस्ट जवळच आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या वैचारिक मूल्यांचा मागोवा घेण्याचा हा दिवस. जॉर्ज ऑरवेल यांच्या ‘1984’ या कादंबरीत पछाडणारे वाक्य, The big brother is watching you हे पुन:पुन्हा मनात येते. हा big brother म्हणजे कोणी व्यक्ती नाही, तर भवतालच्या शिक्षण, जात, धर्म, भाषा, वसाहत, पक्ष, विचारसरणी वगैरे कल्पनांचे मूर्तरूप ! बदलत गेलेला समाज जवळून समजावा यासाठी मी माझ्यापुरते एक सर्वेक्षण केले. त्यामधून मला मिळालेली ही प्रातिनिधिक उत्तरे आहेत : मी प्राथमिक शाळेतल्या मुलीला विचारले, ‘आवडते का शाळा तुला?’ ती म्हटली, ‘हो!’ मी म्हटले, ‘काय काय करतेस?’ तर ती म्हणाली, ‘भात (पौष्टिक खिचडी) खाते.’ शाळेबद्दल तिचे हे समीकरण. सहावीतील मुलाला एक वाक्य लिहिण्यास सांगितले, ‘उद्या आम्हाला सुट्टी आहे.’ त्याने ‘उदीया आमाला सुठे.’ असे लिहिले. मनात प्रश्न आला, सहावीपर्यंत त्यांना मिळालेले शिक्षण कसे आहे? वास्तविक ही दोन्ही मुले चुणचुणीत. पण त्यांचे शैक्षणिक भवितव्य कसे असेल? शहरातील काही तरुण मैत्रिणींशी मी बोलले. त्यांतील एका शिक्षिकेचा हा किस्सा. त्यांच्या शाळेची सहल परदेशी जाणार होती. त्यात दोन लाख रुपये भरून विमानाने जाणारे विद्यार्थी होते. ज्यांना ते परवडत नव्हते त्यांच्यासाठी चाळीस हजारांची भारतातली सहल. सहलीचे असे नियोजन सुरू होते. शाळेत समभाव असावा म्हणून गणवेश असतो. मग या दोन गटांत समभाव कसा निर्माण होणार? या फरकाचे उत्तर छोट्या मुलांना कळत नसले तरी शाळा त्यांना त्यांच्या नकळत कनिष्ठत्वाची शिकवण देते. मग एका शिक्षकाशी बोलताना समजले, त्यांना तंबी ‘श्रीमंत पालकांना दुखवायचे नाही’ अशी असते! श्रीमंतीचा स्तर जसजसा वाढतो तसतसे समाजात ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ असे दोन गट शालेय पातळीपासून तयार होतात.

एका संगीत संस्थेने त्यांच्या विद्यार्थ्यांना लंडनच्या ‘अल्बर्ट हॉल’मध्ये कार्यक्रमात पंधरा मिनिटे वाजवण्यास नेले. त्याचे फोटो समाज माध्यमांवर झळकले. ‘आमच्याकडे आलात तर अशी संधी मिळेल’ अशी ही सुप्त जाहिरात. त्यातही स्तर होते. संपूर्ण कुटुंब या निमित्ताने, लंडनला ट्रिप म्हणून जाणारे होते. उलट, काही पालक पैशांची जमवाजमव करून मुलांना पाठवणार होते. विद्यार्थी जे वाजवणार होते ती एक प्रसिद्ध सिम्फनी होती. ती त्यांची निर्मितीही नव्हती. मुलांना शाळेत सर्व प्रकारचे ‘exposure’ देतो असे सांगणाऱ्या शाळा आणि चांगल्या शाळेत पैशाअभावी प्रवेश घेऊ न शकणारी मुले ही तफावत अस्वस्थ करणारी आहे.

शैक्षणिक मूल्ये तपासणाऱ्या नॅकची स्थापना 1994 मध्ये झाली. महाविद्यालयीन पातळीवर विद्यार्थ्यांना मिळणारे शिक्षण, शिक्षणेतर संधी यांची पातळी वाढावी यासाठी. त्यांचा ‘मोटो’ आहे, ‘एक्सलन्स, क्रेडिबिलिटी अँड रिलेव्हन्स’. मूळ कल्पना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला मदत होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे. महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना समोर ठेवून तसे प्रयत्न सुरुवातीला केलेही. नंतर विद्यार्थ्यांच्या माध्यमातून नॅकचे प्रशस्तिपत्रक मिळवणे हा एकमेव हेतू दिसतो. कोठल्यातरी शाखेचे विद्यार्थी गोळा करून कोठल्यातरी त्यांना परिचित नसलेल्या व्याख्यानांना आणून बसवायचे, कार्यक्रमाचे फोटो- त्यांचा अहवाल-त्यांच्या नोंदी हे सगळे अवडंबर होते. विद्यार्थी बिचारा त्यातून निसटून जातो; त्याच्या भवितव्यासकट आणि त्याच्या स्वप्नासकट! ‘निशाणी-डावा अंगठा’ सिनेमा आठवतो. स्पर्धा परीक्षा, एमपीएससी, युपीएससी हे शब्द आयुष्यात आल्यावर विद्यार्थ्यांना वाटते, की त्यासाठी तयारी केली म्हणजे संपले. पण अत्यंत अल्प टक्के लागणाऱ्या निकालानंतर त्यांचा स्वतःवरील, आयुष्यावरील विश्वास जाऊ लागतो, तरीही अजून एक प्रयत्न करू म्हणून ते पुन:पुन्हा प्रयत्न करत राहतात. या सगळ्या गोष्टी संभ्रमित करतात. विद्यार्थी काहीतरी आकांक्षा बाळगून महाविद्यालयात येतात. शिकल्यानंतर त्यांच्या लक्षात येते, की अरे, या शैक्षणिक पात्रतेने त्यांना नोकरी मिळणार नाही. मग पैसे मिळवण्यासाठी स्वतः मुळातून प्रयत्न करतात. तेथून त्यांचे खरे शिक्षण सुरू होते! ते पैसे मिळवून, पैशांनी विकत मिळणाऱ्या सगळ्या गोष्टी घेतातही. ते पैशांच्या बळावर खर्चिक जीवनशैली मिळवूही शकतात, पण माणूस म्हणून जगताना जीवनाच्या दर्ज्याचाही विचार करण्यास पाहिजे याचे भान सुटते आणि खर्चिक जीवनशैली हाच जीवनाचा दर्जा वाटतो.

दुसरीकडे, भवतालचे वातावरण खोट्या राजकीय विचारांनी असे भारले आहे, की चार लोक एकत्र आले तर नकळत हा उजवा की डावा, अशी चाचपणी आडवळणाने होते. व्याख्यानाला बोलावले तर, मी अमुक तमुक विचारांचा कट्टर समर्थक आहे. तुम्हाला चालेल ना? असा प्रश्न येतो. दहा वर्षे मित्र असणारे राजकीय मतभेदामुळे एकमेकांचे शत्रू होतात. राजकारण हे रक्ताच्या नात्यातही फूट पाडते आहे. चिनूआशबे या नायजेरियाच्या लेखकाने बदलाच्या उंबरठ्यावरची आफ्रिकेची संस्कृती या विषयावर Things fall apart ही कादंबरी लिहिली आहे. त्यात एक प्रसंग आहे. इंग्लिश लोकांनी त्यांच्या आफ्रिकन जमातीत कशी फूट पाडली.. हे सांगताना त्याने लिहिले आहे, की ‘The white man is very clever. He came quietly with his religion. We were amused and allowed him to stay. Now he has won our brothers and our clan can no longer act like one. He has put a knife on the things that held us together and now we have fallen apart. तुम्हाला पाहिजे असो वा नसो, तुम्ही आम्हाला जागा दिली नाही तर आम्ही आमची खुर्ची घेऊन येऊ आणि तुमच्यामध्ये बसू (पण तुमच्यात फूट पाडू).’ आपल्याला नातेवाईक, मित्र गमावायचे नाहीत, पण भवताली वाढलेला जाती-धर्माचा द्वेष, तिरस्कार आणि भीती या भावनांनी सगळ्यांना निगरगट्ट आणि असुरक्षित केले आहे. हे बदलता येईल?

एक प्रसंग नमूद करते. माझी मैत्रीण जया मेहता हिने सांगितलेला. ती लहान असताना वडिलांबरोबर बाहेर गेली होती. त्यांना घराच्या जवळच मोठी आग लागल्याचे दिसले. तातडीने आगीचा बंब बोलावला गेला होता, पण तिचे वडील पळत पळत घरी गेले आणि पाण्याने भरलेल्या बादल्या आणून ते त्या आगीवर टाकू लागले. तोपर्यंत बंब आला.. पुढचे काम चालू झाले. जयाने वडिलांना विचारले, ‘ तुमच्या बादलीभर पाण्याने काय फरक पडणार होता?’ ते म्हणाले, ‘माझ्या सदसद्विवेक बुद्धीने मला तसेच पुढे जाण्यास परवानगी दिली नाही.’

अशीच संवेदनाशील, विचारी माणसे या व्याख्यानसत्राच्या निमित्ताने एकत्र येत आहेत. आगीचा बंब कधी येणार आहे, याची कल्पना नाही, पण आसपासच्या गढूळ वातावरणात चांगला बदल व्हावा, एकमेकांबद्दलचा द्वेष-तिरस्कार आणि एकमेकांची भीती कमी व्हावी, काहीतरी चांगले घडेल असा विश्वास मनाशी बाळगून राज्यभर 15 ऑगस्ट ते 30 जानेवारी (गांधी स्मृतिदिन) या काळात विविध विषयांवर स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने 75 व्याख्याने आयोजित होत आहेत. सगळ्यांनी या उपक्रमात व्याख्याने देण्यात आणि संयोजन करण्यात अवश्य सहभागी व्हावे. वेळ, ज्ञान आणि पैसे या क्रमाने मदत हवी आहे. सगळे मिळून एक वैचारिक आंदोलन घडवू या… ‘एंड ऑफ आयडियॉलॉजी’च्या सद्यस्थितीत त्यातून निकोप समाजधारणेचा मार्ग गवसेल, असा विश्वास आहे.

– अपर्णा महाजन 9822059678 aparnavm@gmail.com

( ‘महाराष्ट्र टाइम्स’ 6 ऑगस्ट वरून उद्धृत)

———————————————————————————————-

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here