शहा गाव (Shaha Village)

0
138

शहा हे गाव नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात वसलेले आहे. ते सिन्नर-शिर्डी रस्त्यावरील वावी गावापासून उत्तरेला आठ किलोमीटर अंतरावर आहे. गावाची लोकसंख्या अडीच ते तीन हजारांच्या आसपास आहे. गावात काळभैरवनाथाचे प्राचीन मंदिर आहे. ते ग्रामदैवत होय. त्याचप्रमाणे, राममंदिर, खंडोबा, बिरोबा, हनुमान, महादेव अशी मंदिरे गावात आहेत. गावातील लोकांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. तसेच, तेथील लोक शेतमजुरी करतात. गावात लहान गावात किराणा मालाचे दुकान, लघुउद्योग आहेत.

गावाची यात्रा चैत्र-पौर्णिमेच्या आदल्या दिवशी असते. यात्रेत काळभैरवनाथाची पालखी निघते. गंगेवरून आणलेल्या पाण्याची कावड हिचीही मिरवणूक असते. यात्रेत काही मनोरंजक गोष्टी असतात. काही खेळांचे आयोजन दुसर्‍या दिवशी केले जाते. गावात श्रावण महिन्यात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. गावात सर्व उत्सव आणि सणसमारंभ साजरे केले जातात.
गावात येण्यासाठी एसटीची व्यवस्था आहे. गावात सिन्नर तालुक्याच्या गावाहून एसटी येते. गावात गुरूवारी आठवडा बाजार भरतो. बाजारात आजुबाजूच्या गावातील व्यक्तीही येतात.

गावात प्राथमिक, माध्यमिक शाळा आहेत. गावात इंग्लिश मिडियमची शाळाही आहे. बारावीपर्यंत शाळा गावात आहे. पुढील शिक्षणासाठी तेथील विद्यार्थी कोळपेवाडी या आठ किलोमीटरवर असणार्‍या गावी; तसेच कोपरगाव, सिन्नर आणि संगमनेर या तीस किलोमीटर अंतरावरील गावांत जातात. शहा परिसरातील गावांमध्ये उन्हाळ्यात पिण्यासाठी पाणी मिळणे कठीण आहे. अशा भागात बाळासाहेब मराळे या शेतकऱ्याने शेवग्याची शेती करून रोहित-एक नावाचे वाण शोधून काढले आहे. त्याच प्रकारे, त्यांनी वैविध्यपूर्ण सुधारणा केल्या आहेत.

गावाचा परिसर अवर्षणग्रस्त आहे. तेथे कोरडे हवामान असते. त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी आहे. गावात काही गावतळी आहेत.

गावाच्या जवळपास पुतळेवाडी, विधनवाडी, झापेगाव, विरगाव, पंचाळे ही गावे आहेत.

माहिती स्रोत : बाळासाहेब मराळे – 9822315641.

– नितेश शिंदे

About Post Author

Previous articleभूमातेच्या आरोग्यासाठी कर्बप्रयोग
Next articleज्ञानरचनावादी साहित्यातून फुलले मुलांचे अध्ययनविश्व!
नितेश शिंदे हे ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या वेबपोर्टलचे सहाय्यक संपादक आहेत. त्यांनी इंजिनीयरिंग आणि एम ए (मराठी) असे शिक्षण घेतले आहे. ते क. जे. सोमैया कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या मराठी अभ्यासमंडळाचे सदस्य आहेत. त्यांनी ज्येष्ठ संपादक दिनकर गांगल यांच्या साथीने 'महाराष्ट्राचे संस्कृतिसंचित' खंड चौथा या पुस्तकाचे संपादन केले आहे. ते विविध वर्तमानपत्रांत लेखन करतात. त्यांनी एनसीसी आणि एनएसएससाठी विविध सामाजिक विषयांवर ‘स्ट्रीट प्ले’ आणि ‘लघुनाटके’ लिहिली. ते सूत्रसंचालनही करतात. त्यांनी ‘आशय’ या नियतकालिकाच्या ‘मुंबई’, ‘पु.ल.देशपांडे’ आणि ‘त्रिवेणी’ या विषयांवरील विशेषांकांचे संपादन केले आहे. नितेश यांना ‘के. जे सोमय्या गोल्ड मेडलिस्ट बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर’ (2017) हा पुरस्कारही मिळाला आहे. त्यांनी विविध महाविद्यालयीन कार्यक्रमांत, वक्तृत्व स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळवली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here