म्हाईंभट यांचे लीळाचरित्र

4
260
-heading

म्हाईंभट उर्फ महेंद्रभट नगर जिल्ह्यातील सराळे गावचा ब्राह्मण होता. तो खूप श्रीमंत व विद्वान होता. त्याला त्याच्या श्रीमंतीचा व विद्वत्तेचा गर्व होता. गणपती आपयो हे त्याचे गुरू. तो स्वतःला प्रतिसूर्य किंवा ज्ञानसूर्य म्हणून घेत असे. दिवसा दिवटी पाजळत असे. पायात गवताची वाकी घालत असे. त्यातून इतर विद्वानांची हेटाळणी करणे व स्वतः विद्वान आहोत हे सिद्ध करण्याची त्याची वृत्ती होती. चक्रधरांची भेट झाल्यानंतर त्यांच्यात अविद्यायुक्त जीवाला मोक्ष कसा मिळतो या विषयावर चर्चा झाली. तेव्हापासून म्हाईंभट बदलले. चक्रधरांनी त्यांना उपदेश केला – ‘लोकीचा श्रेष्ठ तो एथीची नष्टू : एथीचा श्रेष्ठू तो लोकीचा नष्टू’. त्याने मात्र चक्रधर स्वामींचे शिष्यत्व स्वीकारले. म्हाईंभट महानुभाव पंथात आल्यानंतर त्याची पत्नीही संप्रदायात आली. 

म्हाईंभट मराठीतील आद्य चरित्रकार मानले जातात. त्याने लिहिलेले ‘लीळाचरित्र’ व ‘गोविंदचरित्र’ ही महानुभाव संप्रदायातील महत्त्वपूर्ण अशी निर्मिती आहे. चक्रधरस्वामींच्या प्रयाणानंतर त्यांच्या लीळा (म्हणजे आठवणी) एकत्र करण्याची कल्पना म्हाईंभटास सुचली. त्या संकल्पास नागदेवाचार्य यांनी मान्यता दिल्यानंतर त्यांनी लीळा गोळा केल्या. त्यांची विश्वसनीयता पारखली. त्यासाठी त्याला हिंडा-फिरावे लागले. त्या सर्वातून त्याची चिकाटी व चक्रधरस्वामींविषयी असणारा आदर स्पष्ट होतो. लीळाचरित्र हा ग्रंथ पंधराशेनऊ लीळांचा आहे. त्याचे एकांक, पूर्वार्ध व उत्तरार्ध असे भाग आहेत. चक्रधरांचा राजधर्माचा काळ, शक्ती स्वीकाराचा काळ, सर्वांना प्रेमदान, नागदेवाचार्याचे अनुसरण आणि अखेरीस उत्तरापंथे गमन अशा घटना त्यात येतात. 

चक्रधरांच्या लीळा गोळा करण्याची व त्यांचा ग्रंथ तयार करण्याची म्हाईंभट यांची कल्पना त्या काळात रम्य होती. स्वामींच्या लीळा गोळा करण्यात त्यांचा भक्तिभाव, निष्ठा, अलिप्तपणा, वस्तुनिष्ठपणा, सत्यनिष्ठा दिसते. म्हाईंभट यांनी चक्रधरांच्या हजार इतक्या आठवणी लिहिल्या व चक्रधरांचे व्यक्तिमत्त्व प्रकट केले आहे. म्हाईंभट हा आजच्या काळातील विचारानुसार आद्य संपादक होय.

-नितेश शिंदे

info@thinkmaharashtra.com

About Post Author

Previous article१८५७ चा उठाव – ब्रिटिश रोजनिशीतील झलक
Next articleमहदंबा हिचे ढवळे (Mahadamba Dhavale)
नितेश शिंदे हे ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या वेबपोर्टलचे सहाय्यक संपादक आहेत. त्यांनी इंजिनीयरिंग आणि एम ए (मराठी) असे शिक्षण घेतले आहे. ते क. जे. सोमैया कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या मराठी अभ्यासमंडळाचे सदस्य आहेत. त्यांनी ज्येष्ठ संपादक दिनकर गांगल यांच्या साथीने 'महाराष्ट्राचे संस्कृतिसंचित' खंड चौथा या पुस्तकाचे संपादन केले आहे. ते विविध वर्तमानपत्रांत लेखन करतात. त्यांनी एनसीसी आणि एनएसएससाठी विविध सामाजिक विषयांवर ‘स्ट्रीट प्ले’ आणि ‘लघुनाटके’ लिहिली. ते सूत्रसंचालनही करतात. त्यांनी ‘आशय’ या नियतकालिकाच्या ‘मुंबई’, ‘पु.ल.देशपांडे’ आणि ‘त्रिवेणी’ या विषयांवरील विशेषांकांचे संपादन केले आहे. नितेश यांना ‘के. जे सोमय्या गोल्ड मेडलिस्ट बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर’ (2017) हा पुरस्कारही मिळाला आहे. त्यांनी विविध महाविद्यालयीन कार्यक्रमांत, वक्तृत्व स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळवली आहेत.

4 COMMENTS

  1. लिळा तत्त्वज्ञान जिवाच्या…
    लिळा तत्त्वज्ञान जिवाच्या मुक्तिचे साधन आहे

  2. जीवनविषयक तत्वज्ञान सांगितले…
    जीवनविषयक तत्वज्ञान सांगितले आहे

  3. समाधानकारक व स्तुत्य प्रयत्न…
    समाधानकारक व स्तुत्य प्रयत्न आहे.
    शुभेच्छा !

Comments are closed.