महाराष्ट्राचे व्हेनिस… नगर, सोळाव्या शतकातील

-heading

अहमदनगर शहराला आणि निजामशाहीला मोठे महत्त्व महाराष्ट्राच्या मध्ययुगीन इतिहासात, विशेषत: शिवपूर्वकाळात होते. काही इतिहासकारांनी शिवपूर्वकाळ काळा रंगवला, तर काहींनी त्याकडे लक्षच दिले नाही. तथापि, सोळावे शतक हे निजामशाहीचे मानले जाते. मैलाचे दगड ठरलेल्या अनेक महत्त्वाच्या घटना त्या शतकात अहमदनगरमध्ये घडल्या. नगरच्या खापरी नळ असलेल्या पाणी योजना वैशिष्ट्यपूर्ण होत्या. त्यांचे अवशेष अभ्यासकांना आकर्षित करत असतात…  

शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले, पण त्यासाठीची पार्श्वभूमी त्यांचे पिता शहाजीराजे यांनी निजामशाहीत असताना तयार केली. इतिहासकारांनी शहाजीराजे यांचा गौरव ‘स्वराज्य संकल्पक’ म्हणून केला आहे. मराठेशाहीची मुहूर्तमेढ जेथे रोवली गेली आणि मोगलांच्या पतनालाही जेथून सुरूवात झाली, ती आहे अहमदनगरची भूमी!

दक्षिण भारतातील बलाढ्य बहामनी साम्राज्याची पाच शकले उडाली आणि त्यांपैकी एक निजामशाही पंधराव्या शतकाच्या अखेरीस अस्तित्वात आली. अहमदनगर ही निजामशाहीची राजधानी बनली. जवळजवळ सगळा महाराष्ट्र तेव्हा निजामशाहीकडे, म्हणजे अहमदनगरच्या अखत्यारीत होता. सोळाव्या शतकात अहमदनगर हीच जणू काही महाराष्ट्राची निजामशाही राजधानी होती. 

अहमदनगरचा डंका केवळ भारतात नाही, तर जगभरात वाजत होता. तेथे जलमहाल होते, कारंजी आणि हमामखाने असलेली मोठी उद्याने होती. किल्ल्याबरोबर सगळ्या शहराला पाणी पुरवण्याची उत्तम व्यवस्था निजामशाहीत होती. म्हणूनच कैरो आणि बगदाद या तेव्हाच्या सुंदर शहरांबरोबर अहमदनगरची तुलना केली जात असे. नगरचा लौकिक राजकीय व लष्करी सामर्थ्याबरोबर स्थापत्य, उद्योग, व्यवसाय, शिक्षण, साहित्य, कला, जलव्यवस्थापन अशा सर्व क्षेत्रांत होता.

पाणी वाहून नेणाऱ्या भूमिगत पाणी योजना तेव्हा अहमदनगर परिसरात अस्तित्वात होत्या. तशा त्या जगातील मोजक्या देशांत होत्या. त्या ‘कनात’ किंवा ‘करेझ’ या नावाने ओळखल्या जात. खापरी नळ योजना, जलमहाल आणि कारंजी हे एकेकाळी नगरचे वैभव होते. ते जलवैभव काळाच्या ओघात लोप पावले. मात्र त्याच्या खाणाखुणा कोठेतरी दिसतात, अजूनही कोठेतरी फुटलेल्या खापरी नळातून पाण्याचा झरा वाहत असतो!

अहमदनगर सीना नदीकाठी वसले आहे. सीनेने नगरचे भरण-पोषण केले, तरी ती त्या शहरासाठी प्रमुख जलस्रोत बनू शकली नाही. सीनेचा उगम नगरच्या उत्तरेला सुमारे अठरा किलोमीटर अंतरावर बायजाबाई जेऊरच्या परिसरात असलेल्या ससेवाडीजवळ आहे. सीना सीनाशंकराच्या गोमुखातून निघते आणि अवखळ वळणे घेत नगरमध्ये येते. तेथे तिचे पात्र फारसे रुंद नाही. पारनेर तालुक्यातील जामगावहून येणारा एक प्रवाह सीनेला येऊन मिळतो, पण तो टापूही दुष्काळी आहे. त्यामुळे सीनेचे नगरमधील रूप लहानखुरेच राहिले. सीना नगर सोडल्यानंतर तिला उपनद्या मिळत जाऊन इतकी मोठी बनते, की तिचे पात्र ओलांडण्यासाठी होड्यांतून जावे लागते! सीना पुढे भीमेला मिळते आणि भीमा कृष्णेला… 

सीना ही काही बारमाही नदी नाही. शिवाय, तो पर्जन्यछायेचा प्रदेश आहे. पण अहमद निजामशहाने तेथे राजधानी वसवण्याचा निर्णय घेतल्यावर मोठ्या कल्पकतेने पाणी योजना तयार केल्या. नगर शहराच्या पूर्वेला आणि उत्तरेला पसरलेल्या गर्भगिरीच्या डोंगरमाथ्यावर पाऊस फार पडत नाही. तरी ते पाणी अडवून त्याच्या राजधानीसाठी वापरता येईल, हे शहर वसवणाऱ्या मलिक अहमद निजामशहाच्या लक्षात आले. पाणी योजनांचा आराखडा जमिनीचा उतार आणि गुरुत्वाकर्षण यांचा विचार करून तयार करण्यात आला. सभोवताली डोंगर आणि मध्ये बशीसारखा भाग. नगर शहर त्यात वसले आहे. डोंगरावर पडणाऱ्या पावसाचा थेंब अन् थेंब अडवून, त्याचे झिरपे एकत्र करून ते पाणी तलावात साठवले जाई. जगात ती पद्धत ‘कनात’ किंवा ‘करेझ’ या नावाने ओळखली जाते. जमिनीखालून पाणी नेताना ठरावीक अंतरावर उसासे असतात. या शाफ्टमुळे हवा कोंडली न जाता पाण्याचा प्रवाह पुढे जाण्यास मदत होते, शिवाय त्यातून खाली उतरुन झाडाची मुळे, कचरा काढता येत असे. ते बोगदे जमिनीची पातळी विचारात घेऊन पाण्यासाठीचे खणण्यात आले होते. काही ठिकाणी ते वीस फूट खोल, तर काही भागात जमिनीच्या वरुन गेलेले दिसतात. नगर शहराजवळील कापूरवाडी, शेंडी परिसरात तसे उसासे व भुयारी मार्ग पहायला मिळतात.

-vihir-panipurvathaविहिरी तलावांच्या खालच्या बाजूस खोदण्यात आल्या. विहिरींतील पाणी बैल आणि हत्ती यांच्या मोटा लावून उपसले जाई. नंतर ते खापरी नळांतून (खापरी नळ म्हणजे भाजलेल्या मातीच्या नळ्या जोडून तयार केलेली जलवाहिनी) नगरमधील वेगवेगळ्या मोहल्ल्यांना, महालांना आणि मशिदींना पुरवले जाई. पाणवठे चौकाचौकांत होते. त्या हौदांना ‘कारंजी’ म्हणत. नळाचे पाणी मोठ्या वाड्यांमध्ये येई, तर सर्वसामान्य लोक सार्वजनिक कारंज्यावर पाणी भरत. तशी कारंजी माळीवाडा, हातमपुरा, ख्रिस्तगल्ली आदी भागांत अस्तित्वात आहेत. चौपाटी कारंजा, लक्ष्मी कारंजा, आनंदीबाई कारंजा, बारातोटी कारंजा ही केवळ नावे उरली आहेत.

नगरचा संस्थापक अहमद निजामशहा याने सलाबतखान, इख्तियार खान, कासीम खान, सिद्दी समशेरखान या सरदारांकडून आरंभीच्या काळात खापरी नळ योजना तयार करून घेतल्या. वडगाव आणि कापूरवाडी नळ हे ‘बादशाही नहर’ म्हणून ओळखले जात. वडगाव नळाचे पाणी नगर शहराच्या पश्चिमेकडील भागाला आणि राजवाड्याला पुरवले जाई. हश्त-बेहश्त महालाला शेंडी नळाने पाणीपुरवठा केला जाई. 

वडगाव नळ तयार करणारे होते निंबळकचे रेवजी राजापुरे. निजामशहाने त्यांना ती नळयोजना तयार केल्याबद्दल अहमदनगर शहराजवळील निंबळकची जहागिरी देऊ केली. पेशव्यांनी सनद देताना त्या गोष्टीचा उल्लेख केला आहे. व्यवसाय गवंड्याचा म्हणून राजापुरे हे नंतर ‘गवंडे’ म्हणून ओळखले जाऊ लागले. त्याच गवंडे यांच्या वंशजांनी पुढे पुण्यात शनिवारवाडा बांधला, असा उल्लेख नगरचे इतिहासकार सरदार मिरीकर यांच्या ग्रंथात आहे.

कापुरवाडी तलाव त्या शहराचा संस्थापक अहमदशहा निजामशहाच्या काळात तयार झाला. त्या तलावाचे आणि नागरदेवळे येथील नागाबाई नळाचे पाणी किल्ल्याला पुरवले जाई. मोगलांनी किल्ला घेतल्यानंतर सर्जेखान नावाच्या सरदाराने त्या नळांची दुरुस्ती केली. काही खापरी नळ खंदक आणि तटबंदी यांतून किल्ल्यात नेऊन महालांसाठी पाणी पुरवले गेले होते. ते पाणी किल्ल्यातील उद्याने आणि कारंजी यांसाठी वापरले जाई. नळांमधून येणारे पाणी नियंत्रित करण्यासाठी चाव्या किंवा व्हॉल्व्ह बसवण्यात आले होते. ते लोखंडी नव्हते, तर दगडी होते. दगड विशिष्ट पद्धतीने फिरवला, की पाण्याचा प्रवाह सुरू होई. तशा प्रकारचा व्हॉल्व्ह नगर येथील किल्ल्याच्या खंदकात पाहण्यास मिळतो. किल्ल्यात पाणी कमी पडू नये म्हणून गंगा, जमना, शक्करबाई आणि मछलीबाई अशा चार विहिरी खोदण्यात आल्या होत्या. खंदकातही एक छोटी विहीर आहे. 

युरोपातील व्हेनिसमध्ये जशा होड्या चालतात, तसे दृश्य हश्त-बेहश्त आणि फराहबक्ष महालांभोवतीच्या तलावांत पाहण्यास मिळत असे. नगरला हिंदुस्थानातील व्हेनिस असेही म्हटले जाई. फराहबक्ष महालासाठी भिंगार नळ तयार करण्यात आला होता. ती पाणी योजना सलाबतखान गुर्जी आणि न्यामतखान दख्खनी या सरदारांनी तयार केली. शहापूर हे गाव भिंगारच्या पुढे डोंगराच्या पायथ्याशी आहे. ओढ्याचे पाणी त्या गावाजवळ अडवून त्याचा वापर त्या नळासाठी करण्यात आला होता. पाथर्डी रस्त्याने जाताना शहापूरच्या मशिदीजवळ त्या नळांचे अवशेष दिसतात. 

नैसर्गिक उतार, गुरूत्वाकर्षण आणि सायफन यांचा वापर करून पाणी कित्येक किलोमीटर अंतरापर्यंत वाहून नेण्याचे तंत्र निजामशाहीत साधले जाई. रयतेबरोबर जनावरांच्या, झाडांच्या पिण्याच्या पाण्याची सोय केली गेली; एवढेच नव्हे, तर उन्हाळ्यात काहिली शमवण्यासाठी उद्याने व जलमहाल तयार करून त्यांतील कारंज्यांसाठी पाणी आणले गेले. चांदबिबी महालावरील (सलाबतखान मकबरा) डोंगरावर असलेले गोलतलाव म्हणजे आजचे जलसंधारण. जलशिवार. त्या तलावांतील पाणी सलाबतखानाची कबर असलेल्या तळघरात जाताना पाय धुण्यासाठी कसे आणले असेल, त्याचे कोडे उलगडत नाही. नगर शहरापासून वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या मांजरसुंभा गडाच्या पोटात पाण्याच्या टाक्यांची साखळी तयार करण्यात आली असून तेथील पाणी हत्तीची मोट लावून डोंगरावर असलेल्या महालाजवळील कारंजी, पोहण्याचा तलाव, उद्यान व हमामखाना यांसाठी वापरण्यात आले होते. स्विमिंग टँकसारखा जलविहार डोंगरावर करण्याची कल्पना त्या काळात निजामशाहीत वापरली गेल्याचे दिसते.

-chitra-vhenis-nagarनगर-सोलापूर रस्त्यावरील फराहबख्क्ष महालातही तशीच करामत करण्यात आली आहे. तलावाच्या पातळीपेक्षा महालातील कारंज्यांची उंची जास्त आहे. पाण्यावर दाब कोणत्या तंत्राने निर्माण केला गेला, ते कळत नाही. सावेडीतील हश्त-बेहश्त महाल, तसेच मुकुंदनगर परिसरातील दर्गादायरा येथेही तशीच, जमिनीच्या व खापरी नळाच्या पातळीपेक्षा वरच्या बाजूस कारंजी होती. खापरी नळ लक्कड महालात तर छतावर काही ठिकाणी दिसतात. छतावर पाणी कशासाठी नेले असावे, हेही कोडेच आहे.

न्यामतखान, सलाबतखान यांच्यासारखी स्थापत्यशास्त्र आणि जलव्यवस्थापन यांची उत्तम जाण असलेली मंडळी निजामशाहीत होती. त्यांनी नगरमध्ये चारशे-पाचशे वर्षांपूर्वी तयार केलेल्या खापरी पाणी योजना नामशेष झाल्या असल्या, तरी मलिक अंबरच्या काळातील पाणचक्की औरंगाबादमध्ये पाहण्यास मिळते. नगर शहरात दृश्य स्वरूपात काही नसले, तरी काही विहिरींची पाणी पातळी रात्रीतून जेव्हा अचानक वाढते, तेव्हा तो खापरी नळाचाच चमत्कार असतो…

नगरला पाणी पुरवण्यासाठी तब्बल पंधरा खापरी नळ योजना निजामशाही, मोगल, पेशवे व इंग्रज यांच्या काळात होत्या. नगरकरांना वडगाव, कापूरवाडी, भिंगार, शहापूर, आनंदी, नागाबाई, शेंडी, वारूळवाडी आणि भवानीपंत या नळांचे पाणी अनेक दशके मिळाले. त्या तुलनेत नेप्ती, निमगाव, इमामपूर, पिंपळगाव, भंडारा, नागापूर हे नळ कमी आयुष्य असलेले ठरले. भवानीपंतांचा वाडा नालेगावातील हिरवेगल्लीत आहे. तेथील चौकात खापरी नळाचे अवशेष आहेत. 

नगरच्या संग्रहालयात खापरी नळ योजनांचा नकाशा पाहण्यास मिळतो. आठ ते दहा मैलांवरून ते पाणी कसे आणले गेले होते, त्याची कल्पना त्यावरून येते. नगर शहरात अनेक ठिकाणी जुन्या पाणी योजनांचे अवशेष दिसतात. सिद्धिबागेच्या थोडे, पुढे न्यू आर्टस् कॉलेजसमोर असलेल्या जॉगिंग पार्कमध्ये गोलाकार मनोरा दिसतो. तो मनोरा म्हणजे खापरी नळ योजनेचा उसासा आहे. तारकपूर भागात मिस्किन मळा रस्त्यावर ओढ्याच्या पात्रात मोठा खापरी नळ आहे. तो तुटला असला, तरी पावसाळ्यात त्यातून पाणी वाहताना दिसते. श्रद्धाळू नगरकरांनी या नळाला शेंदूर फासून त्याचा देव बनवून टाकला आहे.

नगरचे जिल्हाधिकारी जेथे राहतात, त्या निजामशाहीतील कासीमखानी महालाला; तसेच, त्याच्या अलीकडे असलेल्या पारशी समाजाच्या अग्यारीलाही खापरी नळाने पाणीपुरवठा केला जात असे. अग्यारीच्या आवारात असलेल्या विहिरीला पाणी नेहमी भरपूर असते. निजामशाहीत बंधारे आणि कालवेही बांधण्यात आले होते. नगरपासून सतरा-अठरा किलोमीटर अंतरावर भातोडी तलाव आहे. ब्रिटिशांनी त्याची दुरुस्ती नंतर केली. गालिबखानी नावाचा तलाव मीरावली पहाडाकडे जाणाऱ्या रस्त्यावर होता.

नगरच्या बहुतेक वाड्यांमध्ये आड होते. अनेक आड बुजवले गेले. त्यावर फ्लॅटचे इमले उभे राहिले आहेत. ‘मैदान आड’सारखी नावेच उरली आहेत. जामखेड रस्त्यांवरील ‘हत्ती बारव’ ही नगर शहरातील सर्वात मोठी बारव. नालेगाव भागात नेप्ती रस्त्यावर बाळाजी बुवा या साधूपुरुषांच्या नावाने ओळखली जाणारी बारव आहे. त्या बारवेतून बरीच वर्षें पाणीपुरवठा केला जात होता. कापूरवाडी तलावाच्या वरच्या बाजूला वैशिष्ट्यपूर्ण विहीर आहे. तिच्या आतमध्ये पाण्याच्या ‘इनलेट’ आणि ‘आउटलेट’ची व्यवस्था आहे. डोंगरात गॅलरीज तयार करून ते पाणी चॅनेलाईज करून त्या विहिरींत एकत्र केले जाई. ते नगर शहराला तेथून पुरवले जाई. त्यातील काही ‘अॅक्वाडक्ट’ आणि उसासे परिसरातील शेतांत पाहण्यास मिळतात.

निजामशाही 1490 मध्ये स्थापन झाली व 1636 मध्ये लयाला गेली. पुढे मोगल, पेशवे, शिंदे तेथे राज्य करून गेले. ब्रिटिश 1803 मध्ये आले. त्यांना दुष्काळाचा मोठा सामना करावा लागला. नगरला पाणी पुरवण्याची जबाबदारी नगरपालिकेवर 1854 मध्ये आली. नगरपालिका जुन्या काळातील खापरी नळ योजना आणि अॅक्वाडक्ट दुरुस्त करून जमेल तितका पाणीपुरवठा करू लागली. जुन्या पंधरा नळांपैकी सात नळ पडिक अवस्थेत होते. शेवटी, वडगाव, नागाबाई आणि कापूरवाडी एवढेच नळ चालू राहिले. जवळपासच्या खासगी विहिरींवर मोटा सुरू करून ते पाणी लोकांना पुरवले जाई, पण दरदिवशी दरमाणशी आठ गॅलनपेक्षा कमी पाणी मिळे. शिवाय मोटेसाठी करावा लागणारा खर्च तुलनेने जास्त होता. तेव्हा नगरची लोकवस्ती अठ्ठावीस हजार होती. तेवढ्या लोकांना पाणी देण्यासाठी कायमस्वरूपी योजनेची गरज भासू लागली. नगरपालिकेचे एक्झिक्युटिव्ह इंजिनीयर पॉटिंजर यांच्या अध्यक्षतेखाली वॉटर कमिटी नेमण्यात आली. त्या कमिटीने 1875 मध्ये अभ्यास करून वडगाव, कापूरवाडी, नागाबाई, आनंदी आणि नेप्ती या नळांची दुरुस्ती कशी करता येईल, त्यासाठी किती खर्च येईल याचा तपशीलवार अहवाल सादर केला. परंतु सर्वजण पर्यायी पाणी योजना तयार करण्याच्या निष्कर्षाप्रत आले.

नगर शहरापासून अठरा किलोमीटर अंतरावरील ऐतिहासिक भातोडी तलावातून नगर शहराला पाणी पुरवण्याचा प्रस्ताव 1888 मध्ये पुढे आला. त्या योजनेसाठी दोन लाख रुपये खर्च येईल, असे सरकारने कळवले. तथापी, तेवढे पैसे नसल्याने तो बारगळला. नगरच्या पश्चिमेस असलेल्या करपरा नदीवर धरण बांधून ते पाणी शहराला देण्याचाही प्रस्ताव नगरपालिकेने सरकारकडे पाठवला होता. 1891-92 हे वर्ष दुष्काळाचे होते. वडगाव नळाचे पाणी एका विहिरीत घेऊन, पंपिंग करून ते उंच टाकीत चढवण्याची योजना तेव्हा तयार केली गेली. ती योजना 1899-1900 मध्ये पूर्ण झाली. त्यावर एक लाख सोळा हजार रुपये खर्च झाला. अप्पू हत्ती पुतळ्याजवळ असलेली लाल टाकी तेव्हा बांधण्यात आली. तेथे पंडित नेहरूंचा पुतळा आहे.

-jalmahalकापूरवाडी तलावाचे काम 1901-02च्या दुष्काळात करण्यात आले. त्या तलावाची भिंत वाढवून उंच करण्यात आली. अठ्ठावीस फूट खोल पाणी साचू लागले. शहराचा बराचसा प्रश्न सुटला. त्या योजनेवर त्याकाळी पाच लाख रुपये खर्च झाला. लोकवस्ती जशी वाढू लागली, तसे कापूरवाडीचे पाणी पुरेना. मग सीनापात्रात विहिरी खोदून ते पाणी पुरवले जाऊ लागले. सरकारने सीनानदीवर असलेल्या पिंपळगाव माळवी गावाजवळचा तलाव 1913 नंतर मोठा करून त्यातून पाणीपुरवठा करण्याची योजना मांडली. ते काम 1920 मध्ये पूर्ण झाले. आधी पावणेआठ लाख रुपये खर्च अपेक्षित होता, पण युद्धजन्य परिस्थिती आणि महागाई यांमुळे तो आकडा सतरा लाख पंच्याऐंशी हजारांवर गेला. नगरकरांना रोज सकाळी व दुपारी पाणी 20 जानेवारी 1922 पासून मिळू लागले. नगरचे पुत्र संसदपटू मधू दंडवते यांचे वडील बाबासाहेब हिवरगावकर हे नगरपालिकेत चीफ ऑफिसर व इंजिनीयर म्हणून आल्यानंतर त्यांनी त्या योजनेत विशेष लक्ष घातले. पिंपळगाव पाणी योजना नगरपालिकेच्या ताब्यात 1931 पासून आली. पन्नास हजार लोकवस्तीला दररोज दरडोई वीस गॅलन पाणी मिळू लागले. तेव्हा ओव्हरहेड टाक्या फारशा नव्हत्या. त्यामुळे घरांपुढे खड्ड्यात नळ घेऊन त्यात उतरून पाणी भरावे लागे. महिलांना त्याचा खूप त्रास होई. त्यामुळे नगरमध्ये मुलगी देताना वधुपिता शंभरदा विचार करत असे.

वीस हजार सैनिकांचा तळ नगरच्या दिल्ली दरवाज्याबाहेर दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पडला होता. त्या कॅम्पसाठी पाण्याची व्यवस्था करणे गरजेचे होते. त्यांच्यासाठी म्हणून सीनानदी, सुतारनाला आणि जामगाव नाला यांच्या संगमावर एक मोठी विहीर खोदण्याचे ठरले. भुतकरवाडीजवळ ती विहीर तयार झाली. अर्थात ती योजना पूर्ण होण्यास 1954 हे वर्ष उजाडले. पिंपळगाव तलावातील पाणी दुष्काळात कमी पडे. डोंगरगण परिसरातील नाला वळवून त्याचे पाणी त्या तलावात आणण्याची योजना 1946 मध्ये आखण्यात आली. दुष्काळी निधीतून ते काम करण्याचे ठरले. नंतर पैसा कमी पडला. पुढे 1954 मध्ये श्रमदान करून तो नाला तयार करण्यात आला.

नगरच्या पाण्याची समस्या दूर झाली ती मुळा धरणाच्या उभारणीनंतर. त्या धरणाची योजना 1864-66 पासून विचाराधीन होती. मुळा धरणाचा प्रस्ताव स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 1954 मध्ये सादर केला गेला. तेव्हा धरण वंजारवाडी येथे बांधण्याचे प्रस्तावित होते. पुढे, त्यात बदल होऊन 1970 मध्ये मुळा धरण (ज्ञानेश्वर सागर) पूर्णत्वाला गेले. धरणाच्या उभारणीत माधव चितळे यांचा वाटा मोठा आहे. हरिश्चंद्रगडाच्या माथ्यावर पडणारे पावसाचे पाणी मुळेच्या माध्यमातून नगरकरांना नळातून मिळते.

भूषण गोपाळ देशमुख 9881337775

bhushandeshmukh07@gmail.com

 

 

About Post Author