मराठी साहित्यशारदेचे महावस्त्र
पासोडी सध्या मात्र कुणीही हात लावला तरी तुकडे पडतील अशा जीर्णावस्थेत आहे. भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांनी दिलेल्या काचेच्या कपाटात अंबाजोगाई येथे पासोडी ठेवलेली असली तरी पुरातत्त्व विभागाने वेळीच लक्ष घालून, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, इतिहासाचा तो दुवा वाचवण्याची गरज आहे.
दासोपंत हे पंधराव्या शतकातील संत! मध्ययुगातील नाथपंचक म्हणजे एकनाथ, जनीजनार्दन, रामा जनार्दन, विठा रेणुकानंदन आणि संतसर्वज्ञ दासोपंत हे होय. त्या पंचकातीलच नव्हे तर एकूण संतकाव्यात सर्वाधिक व प्रचंड काव्यनिर्मिती करणारे संत म्हणजे दासोपंत. त्यांच्या साहित्याची संतकाव्यातील विशिष्टता त्यांतील वैविध्य, वैचित्र्य व विलक्षणता यामुळे सिद्ध होते. दासोपंतांनी अंबाजोगाईतील मंदिर परंपरेत धर्मसंप्रदायी उपासनेला कलात्मक अधिष्ठान दिले.
दासोपंतांची पासोडी अंबाजोगाईत आलेल्या अनेक सामान्य पर्यटकांना माहीत नसते. अभ्यासक मात्र ती पाहण्यासाठी शोध घेत येतात. त्यांचे समाधान पन्नास वर्षांपूर्वीच्या बंद कपाटातील एका दृष्टिक्षेपातील पासोडीच्या दर्शनाने होत नाही. त्यांची निराशा होते. आलेल्या प्रत्येकाला पासोडी पाहता यावी अशी सोय होणे गरजेचे आहे. त्यासाठी ती ज्या ठिकाणी आहे तेथेच ठेवून, तिची सुरक्षितता लक्षात घेऊन ती पूर्ण लांबीरुंदीत पर्यटकांना पाहता यावी अशी सुविधा करणे गरजेचे आहे. कापड सुस्थितीत राहण्यासाठी, त्यावरील अक्षरे टिकण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने विशिष्ट रसायने, प्रक्रिया यांचा वापर करून पासोडीचे आयुष्य ज्यायोगे वाढवता येईल, अशा प्रकारची उपाययोजना करणे अगत्याचे आहे. तेणेकरून मराठी साहित्यशारदेला दासोपंतांनी अर्पण केलेले ते महावस्त्र सर्वाना डोळे भरून पाहता येईल.
दासोपंतांचे चरित्र
राज्यात दुष्काळ पडला. लोकांची अन्नान्नदशा झाली आणि दिगंबरपंतांच्या ठायी असलेली भूतदया जागी झाली. त्यांनी कोठारातील धान्य गोरगरीब लोकांना वाटून टाकले. त्या वर्षी, दिगंबरपंतांनी साराही जमा करून भरला नाही. ती गोष्ट बादशहाला कळताच, त्याने दिगंबरपंतांना दरबारात हजर राहण्याचे आदेश दिले. दिगंबरपंत त्यांच्या लवाजम्यासह दरबारात हजर झाले. सोबत दासो होता. बादशहाने दिगंबरपंतांना कोठारे खुली करण्याबद्दल जाब विचारला. बादशहा दिगंबरपंतांचे ‘मला गरिबांची दया आली’ हे उत्तर ऐकून संतापला. त्याने फर्मान सोडले, की दिगंबरपंतांनी एक महिन्याच्या आत दोन लक्ष सुवर्णमुद्रा सरकारी खजिन्यात जमा कराव्या. तोवर दासोला तेथे ओलीस म्हणून नरजकैदेत राहवे लागेल! मुद्रा एक महिन्याच्या आत भरल्या नाहीत तर दासोला मुसलमान केले जाईल अशी धमकीही दिली.
दिगंबरपंतांनी बादशहाचे निर्वाणीचे शब्द ऐकले आणि त्यांच्यावर आभाळच कोसळले! त्यांना त्यांची चूक मान्य होती, पण त्यांनी त्याची एवढी मोठी शिक्षा भोगावी लागेल अशी कल्पनाही केली नव्हती! त्यांना त्यांचा नुकतेच लग्न झालेला कोवळा पोरगा कसायाच्या ताब्यात दिला असे वाटू लागले. पण इलाज नव्हता. दिगंबरपंत खालमानेने घरी आले. पार्वतीबाईंना ती गोष्ट कळली. त्यांनी धीरच सोडला! लग्न होऊन आलेली जानकी तर अजाणच होती! ती भांबावून गेली. दिगंबरपंतांना तेवढी मोठी रक्कम भरणे कदापीही शक्य नव्हते!
दासो बादशहाच्या नजरकैदेत होता. तो रोज झरणीनृसिंहाला जाई, तिथे स्नान-संध्या आदी आन्हिके करी; बादशहाने भोजनखर्चासाठी म्हणून दिलेले पैसे ब्राह्मणांना दान करी आणि परत येई. त्याच्या कोवळ्या वयातील गंभीर मुद्रेकडे पाहून लोक हळहळत. त्यांना तो तेजस्वी ब्राह्मण मुलगा मुसलमान होणार याचेही दु:ख होत असे, पण कोणाचे बादशहाच्या आज्ञेपुढे काहीच चालत नव्हते!
बादशहाने दासोची पाठवणी पालखीतून केली. लोकांत आनंदीआनंद झाला. दिगंबरपंत व पार्वतीबाई आनंदाने हरखून गेले. पण त्या आनंदोत्सवात वरवर आनंदी दिसणारा दासो मात्र अस्वस्थ होता. दत्ताजी पाडेवार म्हणजे प्रत्यक्ष श्री दत्तात्रेय! त्याला श्री दत्तात्रेयाच्या दर्शनाचा ध्यास लागला; आणि दासो घरी आल्यानंतर काही दिवसांतच घरसंसाराचा त्याग करून घराबाहेर पडला. त्याने काही काळ भ्रमणानंतर माहुर गडी बारा वर्षे तपश्चर्या करून ज्ञानयोग सिद्ध आणि साध्य केला.
दासोपंत श्रीदत्तात्रेयाच्या आदेशावरून राक्षसभुवनी गेले. तेथे गंगातीरी, त्यांना वाळूमध्ये दत्तात्रेयांच्या पादुकांचा प्रसाद प्राप्त झाला. त्याभ पादुका धाकटे देवघरी पाहावयास मिळतात. दासोपंतांनी त्यांच्या शिष्यांना कर्नाटकात डाकुळगी, औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर जवळील हिलालपूर येथे अनुग्रह दिला.
सून जानकीचा पती घरातून निघून जाऊन बारा वर्षे होऊन गेली, तेव्हा दिगंबरपंत-पार्वतीबाई जानकीला घेऊन, वैधव्य पत्करण्यासाठीच्या विधीसाठी वाणीसंगमावर गेले. दासोपंत तेथे व्याघ्रेश्वराच्या मंदिरात बसलेले होते! त्यांनी त्या मंडळींना ओळखले आणि ‘कृत्य तूर्तास थांबवावे’ असा निरोप दिला. निरोप कोणी दिला-त्यांची भेट घ्यावी-दर्शन घ्यावे म्हणून सर्व मंडळी व्याघ्रेश्वराच्या मंदिरात गेली. जानकीने तिच्या पतीस तेथे तात्काळ ओळखले. सर्वांची पुनश्च भेट झाली. दिगंबरपंतांनी नारायणपेठी असलेली जहागिर त्यांच्या कारभाऱ्याच्या नावे करून दिली; पुन्हा नारायणपेठी न जाण्यासाठी! दासोपंत सर्वांसह अंबाजोगाईस आले. त्यांनी गावाच्या मध्यवस्तीत असलेल्या (भटगल्ली) गणपती मंदिरात मुक्काम ठोकला.
सीतोपंत हे त्या गावातले बडे प्रस्थ! त्यांची स्वारी पालखीतून देवीच्या दर्शनासाठी निघाली. त्यांचा एक पण होता, की जो त्यांना नजरेने समाधी लावेल, त्यालाच ते गुरू करतील. दासोपंतांची आणि सीतोपंतांची नजरानजर झाली मात्र, सीतोपंतांची शुद्ध हरपली. सीतोपंत शुद्धीवर आले तेव्हा त्यांचे मस्तक दासोपंतांच्या चरणावर होते! सीतोपंतांनी दासोपंतांची राहण्याची व्यवस्था लावली. धाकटे देवघर म्हणजे दासोपंतांचे वास्तव्य असलेले घर होय. दासोपंत नित्यकर्मे, आन्हिके आटोपत आणि अव्याहत लेखन करत. ते अंबाजोगाईस वयाच्या पस्तीसाव्या-चाळीसाव्या वर्षी स्थिरावले. त्यांनी त्या वेळी लेखनास सुरुवात केली असे गृहीत धरल्यास, त्यांनी वयाच्या चौसष्टाव्या वर्षांपर्यंत, म्हणजे वीस ते पंचवीस वर्षे अखंड लेखन केले. त्यांना दररोज एक ढबुभर पैशांची शाई लागे असे सांगतात.
ते माघ वद्य षष्ठी शके १५३७ ला समाधिस्थ झाले. त्यांच्या जाण्यास ‘श्री दत्तस्वरूपात विलीन झाले’ असे म्हणतात.
दासोपंतांची पासोडी
पांघरण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या जाड्याभरड्या कापडास पासोडी असे म्हणतात. कापडावर खळीचा लेप देऊन ते सुकवले जाते. कपडा ग्रॅफाईटची पावडर, कवड्या यांच्या साहाय्याने घासून गुळगुळीत केला जातो. त्यामुळे पासोडी टिकाऊ व मजबूत होते. तशा पासोडीवर वेदांताचे आकृतीसह स्पष्टीकरण देताना, कपाटाकृती विवरणात्मक मांडणी करताना कागदाला कागद जोडून लिहिणे गैरसोयीचे झाले असते व त्याची काळजीपूर्वक हाताळणी करणे व ते दीर्घकाळ टिकणे या गोष्टी अशक्य व अवघड होत्या. म्हणूनच दासोपंतांनी तो अमूल्य विषय पिढ्यान् पिढ्या अमीट राहवा या उद्देशाने ‘कापड’ हे वैशिष्ट्यपूर्ण माध्यम वापरून, चित्राकृतीतून अध्यात्मासारखा विषय प्रतिपादन केला. त्यांची ती कल्पनाच मुळात अभिनव आहे. त्यातूनच दासोपंतांतील कलावंताच्या सर्जनाचे व सृजनशक्तीचे दर्शन घडते. त्यांच्यामधील अभिजात शिक्षकही मनात ठसतो. विषयाची मांडणी करताना त्या अनुषंगाने त्यांनी अश्वत्थवृक्ष, सर्प, भावचक्र, पंचकोशचक्र, स्थुलादिदेहचक्र, श्रीदत्तमूर्ती, माला, त्रिशूल, शंख, डमरू, कमंडलू, चक्र व हंस या चित्रांचे रेखाटन केले आहे.
दासोपंत उत्तम चित्रकार होते याची साक्ष पासोडीतील चित्रांवरून मिळते. पासोडीच्या भोवती सुरेख आणि सुबक अशी वेलबुट्टी काढलेली आहे. चित्रांतील रेषा भावसूचक भासतात. त्यांतील वळणे (स्ट्रोक्स) कुशल चित्रकाराचे दर्शन घडवतात. विशेष गोष्ट अशी, की प्रत्येक चित्रात त्यात मावेल असा त्या चित्राचा कार्यकारणभाव व्यक्त करणारा मजकूर योजनाबद्ध रीतीने लिहिला गेलेला दिसतो. कुठेही अक्षरांची दाटी नाही किंवा बळेच मजकूर कोंबून बसवलेला नाही; खाडाखोडही नाही. नियोजनपूर्वक संतुलित असे ते नेटके चित्रमय वाङमय विलक्षण म्हणावे लागते.
शास्त्राच्या अनुषंगाने विचार केल्यास, वेदांतशास्त्रातील पंचकोशचक्र दर्शवण्यासाठी त्यांनी ह्रदयाच्या आकाराप्रमाणे चित्राकार घेतला आहे. अश्वत्थ वृक्षाची अप्रतिम मांडणी, सर्प व हंस यांच्यातील सजीवपणा किंवा स्थूलादिदेहचक्रांत तांबड्या-निळ्या रंगांचा केलेला वापर, तसेच कपाटाकृतीच्या आधारे केलेली शिक्षकी शैलीतील मांडणी… यावरून परिश्रमपूर्वक व अभ्यासपूर्ण केलेली ती वाङमयनिर्मिती आहे हे लक्षात येते.
प्राचीन काळापासून विश्वाचे मूळ शोधणे, सृष्टिप्रक्रिया सांख्ययोगाधाराने पंचीकरणाद्वारे मांडू पाहणे हा मानवी प्रज्ञेचा आविष्कार होय. त्यात प्राचीन ऋषी-मुनींपासून मुकुंदराज, त्र्यंबक, ज्ञानेश्वर, सोपानदेव, जनार्दन स्वामी, मृत्युंजय स्वामी, रंगनाथबुवा निगडीकर, दीन कवी, हरिबुवा, मौनी स्वामी इत्यादींनी पंचीकरणावर स्वतंत्र रचना केल्या. परंतु त्या पारमार्थिक वेदांती वाङमयात दासोपंतांची पासोडी ही वेदांतातील पंचीकरण इतक्या सूक्ष्मपणे, विस्ताराने विवरण करणारी, आकृत्या असलेली व चित्रमय एकमेव वाङमयीन रचना असावी.
दासोपंतांची पंचीकरण कल्पना
सकळ विश्वाचे कारण
निमित्य आणि उपादान
परब्रह्मनिर्गुण निराभास जे
जेथे कार्य ना कारण माया अविद्य भान
जीऊ ईश्वरू ना आन वस्तुजात
ज्ञाता ज्ञेय ना जेथ
ज्ञान कर्ता कार्य ना कारण
ऐसे सच्चिदानंदमय संपूर्ण परब्रह्म
दासोपंतांनी पंचीकरण विषयाची स्वानुमते चिकित्सात्मक मांडणी केली आहे. शेवटी, दासोपंतांनी त्यांचे मत, पंचीकरणातील तत्त्वासंबंधी असलेली मत-मतांतरे देऊन स्पष्टपणे मांडले आहे. पासोडीतील चित्रांचा भाग वगळता एकूण ओव्या एक हजार चारशेसत्याऐंशी इतक्या आहेत. पासोडीचे तेरा विभाग करण्यात आलेले असून प्रत्येक भागाच्या समाप्तीनंतर जाड लाल रेषा आखलेली दिसते. अक्षरांसाठी काळी शाई आणि रेषांसाठी लाल शाई असा वापर केलेला दिसतो. बोरूच्या लेखणीने ठसठशीत अर्धा इंच उंचीचे अक्षर वळणदार व घोटीव बनले आहे. काही ठिकाणी, पासोडी जीर्ण झाल्याने फाटून झड झाली आहे. अक्षरे पुसट झाली आहेत. जगातील वाङमयाच्या वस्तुसंग्रहात दासोपंतांची पासोडी एकमेवाद्वितीय!
वाङमयीन व्यक्तिमत्त्व
दासोपंत एकाध्यायी गीता असणाऱ्या अठराव्या अध्यायात अठरा हजार ओव्या लिहितात. पण दासोपंत विस्तारशरण नाहीत हे ‘गीतार्थबोधचंद्रिके’वरून स्पष्ट होते. ते भगवद्गीतेवरील त्यांचे आठ हजार आठशेएकोणनव्वद ओव्यांचे संक्षिप्त भाष्य होय. ती लघुटीका लिहिण्याचे प्रयोजनही ते सांगतात.
‘मागा गीतार्णव रचिले
ते समुद्रचि होऊनि गेले
न वचेचि कवणा उल्लंघिले
शब्दार्णव
गीतार्थबोधचंद्रिका आरंभिली
दासोपंतांनी ग्रंथरचना सामान्य लोकांच्या संतोषाची बूज ठेवून, त्यांना डोळ्यांसमोर ठेवूनच हे ‘लघुटीका संतोषी करू लोकां श्रोतयांते’ या त्यांच्या ओवीवरून केली. दासोपंतांनी ‘गीतार्थबोधचंद्रिके’त गीतेच्या श्लोकांवर थोडके संस्कृत भाष्य करून, पुढे प्राकृत निरूपण केले आहे.
दासोपंतांचे पदार्णव
कविमनाची भावावस्था, उत्कटता-तिची सूक्ष्मातिसूक्ष्म व तरल स्पंदने-संवेदना यांवर कलाकृतीचे, रचनेचे बाह्यस्वरूप निश्चित होते. आशयाच्या दृष्टीने, विचार-कल्पना-तत्त्व-भावविभाव-अर्थ या घटकांचा तर आविष्काराच्या दृष्टीने, प्रतिमा-संकेत-प्रतीके-अलंकार-शब्दकळा-शैली-वृत्त-लय-रचना यांची मांडणी, योजना या घटकांचा विचार करावा लागतो. दासोपंतांच्या पदरचनेतील विविध आकृतिबंध आणि आशय-आविष्काराच्या अनुषंगाने येणारे विविध भावविभाव, विषय संतकवितेच्या क्षेत्रांत अभ्यसनीय ठरतात.
पदरचनेतील भावकल्लोळ
संतांची भावकविता ही सहजोद्गार असते. ती नेणिवेची कविता असते. दासोपंतांची भावकविता नेणिवेची, आत्मनिवेदनात्मक; तसेच, संवादी सहजोद्गार असूनही जाणिवेने लिहिलेली आहे असे वाटते. मनाची भाववृत्ती, उत्कटता जो उपजत, आंतरिक स्फुरण असलेला प्रातिभ आविष्कार करते ते म्हणजे ‘भावकाव्य’
आठविता तुझे गुण,
दोन्ही सजळ जाले नयन
दत्ता कई येसील भेटी?
प्राणपंचक धरिले कंठी
दासोपंत नि:सीम दत्तभक्त होते. ते देवाला अनेक भूमिकांतून पाहतात; विविध नातेसंबंधांनी, विविध भूमिकांतून त्याची कल्पना करतात. त्या-त्या भूमिकेच्या अनुषंगाने त्यांच्या मनात अनेकविध भावतरंग निर्माण होतात. त्या विविध भूमिकांतील अनुभूती, तन्मयता, देवाच्या रूप-गुणांचे वर्णन, त्याच्याविषयी वाटणारी आत्यंतिक ओढ, पराकोटीचे प्रेम, कृतकृत्यता, अनन्यशरणता, आर्तता इत्यादी भाव विविध अनुबंधांतून व्यक्त होतात. दासोपंतांमधला भक्त कधी बालक होतो तर कधी पाडस होतो; चातक, पतंग होऊन श्रीदत्ताचा धावा करतो; पाण्याबाहेर तळमळणारी मासोळी होतो; सासुरवाशीण लेक होतो; श्रीदत्ताची विरही प्रेयसी होतो; कधी श्रीदत्ताची पतिव्रता होतो तर कधी व्यभिचारिणी होतो. श्रीदत्ताविषयीचे प्रेम विविध भावच्छटांतून व्यक्त करणाऱ्या पदरचनांतून भक्तिप्रेमाचा पूर लोटलेला दिसतो.
प्रेम दे, मज प्रेम दे-सर्व सुख-मज प्रेम दे
‘अवधूता रे! जळधरा;
कई वोळसी अमृतधारा
तुझे चातकु मी पाखरू;
कवणाची आशा करू?
‘कवळीन दोही बाही
ऐसी आवडी होतसे देही
दत्ता! नीरास करिसी काह्य?
परमात्म्या योगीराया’
त्यांच्या पदरचनांतून शुद्ध भक्तिभाव, वत्सलभाव, प्रीतिभाव, क्षमापराधी भाव आढळतो. दासोपंतांची ‘विरहिणी’ दत्तसंप्रदायात लक्षणीय म्हणावी लागेल. अभिलाषा, चिंता, स्मरण, गुणकथन, उद्वेग, प्रलाप, उन्माद, व्याधी, जडता, मूर्छा, मरण अशा दशांगांतून व लास्यांगातून विरहिण्यांची भावस्पंदने अभिव्यक्त होतात.
‘चांदु चंदन न साहे गायन
श्री दत्तेवीण सखीये वेचती प्राण’
‘चांदु चंदने माये चंपक
चेतने मूळी लागती बाण
‘बाइये! चंदन अंगी न साहे
परिमळ तो वाया जाय
चंद्रु चांदिणे करी काये?
प्राणनाथु वो कैसे नि ये?
पाखंड खंडन करणारी, दंभस्फोट करणारी पदे, हरि-हर ऐक्य प्रतिपादन करणारी पदे, गुरूमहिमा व्यक्त करणारी पदे, सगुण-निर्गुण द्वैतभावाचा विलक्षण अद्वैतभाव व्यक्त करणारी पदे, जन नाम-गुणसंकीर्तनाचा पुरस्कार करणारी पदे ही समाज प्रबोधनाच्या कळवळ्यापोटी निर्माण झालेली पदरचना आहे.
‘बाह्य़ मौनी जडु अंतरी बोले
मन चंचळ लावितो डोळे
वेष देखोनिया वेधले जन
अंतरिचे ज्ञान कवणु जाणे?
‘ह्रदयी कामना, क्रोधु असंवरू
संन्यासु तो वरि काई
वाक्य विचारणा, प्रणवाचा जपु,
निष्ठेसि ठावोचि नाही
दंड कमंडलु पादुका
काशाय वस्त्र पवित्रसे देही
अंतरीची खूण न कळे
प्राणीया न सुधी बोडिकी डोई
पदांतील नाट्य़-नृत्य
दासोपंतांच्या ‘पदार्णवा’तील काही पदांतून विशिष्ट प्रसंगांचे वर्णन, कथन तसेच वैशिष्ट्यपूर्ण नाट्यात्मक निवेदन असलेली पदे लक्षणीय आहेत. काही पदांवर शीर्षकांची नोंद आढळते तर काही पदांचा समूह (सलग पाच, दहा इत्यादी) अभ्यासताना, त्यातील अनुस्यूत सूत्र, अंत:संबंध यावरून ती पदे म्हणजे ‘पद्यनाट्य’ असावे असे वाटते. त्यात ‘जन्मकाळची पदे’, ‘हळदुली’, ‘प्रीतीकळहो’, ‘नामनिर्देशु’ आणि ‘गूज’ अशी शीर्षके असलेली नाट्यपदे आहेत तर काही पदसमूह विविध विषयांवर गुंफलेली पदनाट्ये आहेत. त्यात श्रीदत्त आणि ऋषिपुत्र यांतील वनक्रीडा, त्यांच्यातील चर्चा, जन्मकाळचे प्रसंगवर्णन-संवाद आढळतात.
लळित
‘अविद्य सुविद्य दोन्ही हात मिळविती
भक्ति ते सांडूनि बाई, अभक्त फेऱ्या घेती
फू गडी फू गं दत्तु माय तू गं’ (फुगडी)
सर्वज्ञ बाळा आली गोंधळा,
योगीया तारण हेतू गे माये
परिस योगी वाजवी शिगी,
चेवविला अवधूतू गे माये (गोंधळ)
दासोपंतांच्या पद्यनाट्यावरून, लळित पदांवरून ते उत्तम ‘नाटककार’, ‘रंगकर्मी’, ‘दिग्दर्शक’ होते हे कळते. अध्यात्मज्ञानी तरीही सगुणाचा प्रेमवेडा उपासक असा तो दत्तभक्त. मध्ययुगातील अंबाजोगाईच्या देवघराच्या रंगपीठावरचा अधिकारी कलावंत!
भाषावैविध्य
दासोपंतांच्या सव्वा लक्ष पदांच्या अर्णवात विविध भाषांची पदे आढळतात. त्यात संस्कृत, प्राकृत, मराठी (नागर, ग्रामीण, वैदर्भीय बोली), हिंदी (हिंदुस्थानी विविध छटा), ब्रज, फार्सी-उर्दूमिश्रीत हिंदी, कन्नड, तेलुगु इत्यादी भाषावैविध्य आहे. तसेच, हिंदी-मराठी या दोन भाषामिश्रित मणिप्रवाळ रचनाही आढळते. दासोपंतांचे तीर्थाटन, विविध प्रांतांतून भ्रमण आणि तेलंगण व कर्नाटक यांच्या सीमेवर असलेली त्यांची जन्मभूमी, महाराष्ट्रातील दीर्घकालीन वास्तव्य यामुळे त्यांची पदरचना बहुभाषिक बनली.
संगीत
दक्षिण हिंदुस्थानी संगीतपद्धती पंधराव्या शतकानंतर उदयास आल्या. दक्षिणेकडील संगीत-मत अधिक ‘सोवळे’ आहे. दासोपंतांची पदनिर्मिती संगीताच्या संक्रमण काळात झाली. दक्षिण व उत्तर या दोन्ही संगीतपद्धतींचे प्रतिबिंब त्यांच्या पद गायनपद्धतीत दिसते. दोन्ही संगीतपद्धतींचा पाया एकच असल्याने त्यात फार मोठी तफावत नाही. परंतु उत्तर हिंदुस्थानी संगीत हे दक्षिणी संगीतापेक्षा अधिक परिवर्तनशील आहे. दासोपंतांनी त्या लवचीकपणाचा प्रयोग दक्षिण संगीतपद्धतीबरोबर केला असावा.
सांगीतिक पार्श्वभूमीवर दासोपंतांच्या पदांचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे मांडता येईल.
अभिजात संगीतावर आधारित पदे, उपशास्त्रीय संगीतावर आधारित पदे, सुगम संगीतावर आधारित पदे, लोकसंगीतावर आधारित पदे. पदार्णवांतील पदरचनांवर विविध रागनामांचा, विविध तालांचा उल्लेख असलेल्या विपुल रचना आहेत. सरगम, जती, मेळाप, परण यांचा अंतर्भाव असलेली; तसेच, सांगीतिक परिभाषेतील रागवेळा, मेळरागमाळा अशा काही रचना आहेत. दासोपंतांच्या अभिजात संगीताची साक्ष देणाऱ्या षटभार्या भैरव, प्रबंध, खंड प्रबंध, चतुरंग प्रबंध, त्रिवट, स्वरसामगायन, ताल स्वरालंकार, झपतालालंकार, तीवडा वीणालंकार या रचना आढळतात. दासोपंतांनी उपलब्ध पदरचनांमध्ये एकूण ऐंशी ते पंचाऐंशी रागांचा व दहा ते बारा तालांचा उपयोग केलेला आढळतो. विविध पदांच्या बंदिशी या राग-तालात बद्ध केल्या. अनेक भावपूर्ण पदे सुगम संगीतातून आविष्कृत झालेली दिसतात, तर लळित पदांतून लोकसंगीताचे पडसाद उमटताना दिसतात. अभिजात संगीताची साक्ष देणारी काही पदे-
‘मधुमाधवीच देशाक्षा भुपाळीच भैरवीस्तथा
बिलावलीच मुखारी बंगाली सामगुर्जरी
धनाश्री मालवीस्त्रीश्व मेघ रागस्येपंचमा
देशाकारे भैरवस्य ललितस्य वसंतिका
एते रागा: प्राकांगी उवे प्रारंभ्य नित्यश: ’ (रागवेळा)
‘भैरवी, गुर्जरी चैव रेवा गुणकारी तथा
बंगाली बाहुलीश्वैव भैरवस्थ व रांगणा ’ (षट्भार्या भैरव)
‘आजि मेरो मन आनंद भयो
कानन कुंडल मुगुट सिरमो
ध्यान मो देखो षडभुज धारी
ताल मृदुंग धिमि धिमि धिमिता,
धिमि धिमि धिमिता
तधिन्न थै, तधिन्न थै कहत पुकारे सुत दिगंबर ( गौडीमिश्रित कल्याणमधील पद )
भारतीय परंपरेत नृत्यकलेस धार्मिक प्रतिष्ठा आहे. खास नृत्यानुकुल तालबोलांचा वापर दासोपंतांच्या पदांतून स्पष्ट दिसतो. मंदिरनृत्य परंपरा दर्शवणारी अनेक पदे नृत्याविष्काराचे प्रकटीकरण करणारी आहेत. दासोपंत पदरचनाकार, मृदुंगवादक व गायक होते. शास्त्राने त्यास ‘वाग्गेयकार’ असे संबोधले आहे. मध्ययुगातील थोर ‘वाग्गेयकार’ म्हणून संगीत इतिहासात दासोपंतांचा (एकूणच मराठी संत संगीत प्रवाहाचा) उल्लेख दुर्लक्षला गेला आहे. दासोपंतांच्या मंदिरसंगीताचा प्रवाह चारशे वर्षांपासून अखंडपणे वाहत आहे. त्याचे श्रेय दासोपंताच्या दत्त संप्रदायी संगीत उपासनापद्धतीला द्यावे लागते.
सकलकलागुणनिधी
भारतीय चौसष्ट ललित कलांमध्ये संगीत, चित्र आणि काव्य यांचे महत्त्व विशेष आहे. त्यातही संगीत कला अधिक प्रभावी म्हणून श्रेष्ठ. गीत-वाद्य-नृत्य ही त्रिपुटी म्हणजे संगीत. त्या तिन्ही ललित कला सौंदर्य, माधुर्य, सहजता, सरलता, प्रसाद, सृजनशीलता, ओज, लय या गुणांनी युक्त असतात. दासोपंतांच्या ठायी त्या तिन्ही कलांच्या सृजनशक्ती एकवटल्या होत्या. त्यांनी तिन्ही कलांत अनुस्यूत असणारे, अंत:सूत्रातील असे एकच लयतत्त्व जाणून आत्माभिव्यक्ती, आनंदानुभूती, लोकरंजन, लोकोपदेश यासाठी त्या तिन्ही कलांचा सूज्ञपणे व मनोज्ञ उपयोग केला. नित्यनैमित्तिक उपासनेतील पदगायनातून मार्गशीर्ष उत्सवाच्या सांगतेस देवघराच्या रंगपीठावर सादर होणारे लळित हा लोकनाट्याचा रंगपीठावरील आविष्कारच होय.
दासोपंतांचे पदवाङमय लोकाभिमुख झाल्यास महाराष्ट्रातील काव्यसंगीताचे ते भव्य दालन लोकांसमोर खुले होईल व त्याचा आनंद रसिक घेतील.
पूर्वसुरींचा प्रभाव
‘घालीन गोंधळ होईन वारकरी’ असे म्हणणारे दासोपंत ‘जिकीर कर फिकीर कु मुकर के न कर तू नजर कर नजर फिर न हो दर बदर तू’ असे म्हणत सुफी संप्रदायाच्या तत्त्वानेही आपला विचार मांडतात. दासोपंतांनी नाथ पंथाचा गानयोग, दास संप्रदायाची दास्यभक्ती, वैष्णव व तत्सम पंथाची मधुराभक्ती, शैव पंथाची उपासना, दक्षिणी-पंथ परंपरेतील पूजापद्धत हे सर्वगुणसंग्राहक वृत्तीने आपलेसे केले. त्यांच्या वाङमयातील विविध विषय, पैलू अभ्यासणे हे केवळ मराठी साहित्याच्या, संगीताच्या प्रादेशिक क्षेत्रातील काम नव्हे तर त्यांचा अभ्यास भारतीय परिप्रेक्ष्यातून झाला पाहिजे.
डॉ.वैशाली गोस्वामी –कुलकर्णी
अर्णव, एस.टी. डेपोसमोर,
नवीन चौसाळकर कॉलनी,
अंबेजोगाई, बीड – ४३१५१७
९४२३१७१०७०
vaishgoskul@gmail.com
Last Updated On – 14th FEB 2017
दासोपंतां विषयी अप्रतिम
दासोपंतांविषयी अप्रतिम माहिती दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.
आपण लिहिलेला लेख खरच लाख
आपण लिहिलेला लेख खरच लाख मोलाच आहे. तथापि वरील वेगवेगळ्या आकृतीतील शब्द वाचता येत नाहीत. तेव्हा ते वाचता येइल असे पुस्तक,लेख असल्यास कृपया कळवावे. ते विकत मिळत असल्यास अथवा वाचावयास मिळेल काय? मी मोबदला देण्यास तयार आहे.धन्यवाद!
अरुण नातू,८ बालगोविंद सोसीद्त्य, साने गुरुजी नगर.मुलुंड पूर्व,मुंबई ४०००८१.
भ्रमणध्वनी: ९८६९०२३२९४, दुर्ध्वनी : ०२२-21635095, ए मेल : avnatu@hotmail.com
अप्रतिम माहिती,महाराष्ट्राला…
अप्रतिम माहिती,महाराष्ट्राला मोठी संतपरंपरा आहे पण दासोपंतांचे नाव फारसे प्रसिध्द नाही.या लेखाच्या माध्यमातून एका विलक्षण प्रतिभावान संताची माहिती आणि त्याचा पासोडीवर लिहिण्याचा जगातील एकमेव प्रयोग माहित झाला लेखिकेचे अभिनंदन आणि आमच्या पर्यंत हे षोहचवणार्या थिंकिंग चे आभार
अपूर्व लेखन. दासोपंताबददल…
अपूर्व लेखन. दासोपंताबददल एवढा विस्तृत अन्य वाचण्यात आला नाही.
मला दासोपंतांच्या चित्र,चित्रशैली,अक्षरचित्रे या बद्दल अगदी मनापासून कुतूहल आहे. या बाबत आणखी माहिती मिळाल्यास, एखादा स्त्रोत असल्यास कृपया कळवावा. आपले अभिनंदन अन शुभेच्छा.
नवनाथ नारायणराव गोरे, 31,ऋणानुबंध, विशाल नगर, गजानन मंदिराजवळ, औरंगाबाद. 431009.
( 9423181957 )
Comments are closed.