सुभेदार होनाजी बलकवडे यांचा वाडा

11
90
carasole

मराठेशाहीतील सुभेदार होनाजी बलकवडे यांच्या पराक्रमाची स्मृती त्यांच्या वाड्याचे अवशेष जागृत ठेवत आहेत. त्‍यांचा वाडा पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील पौडच्या दोन किलोमीटर अलिकडे दारवली या गावी आहे.

वाड्याचे अवशेष गावाच्या मध्यभागी, तीस-चाळीस फूट उंचीवर, सुमारे सहा एकर जागेत दिसून येतात. वाड्याचे पश्चिमेकडील भव्य प्रवेशद्वार त्याच्या वैभवाचा दिमाख दाखवते. प्रवेशद्वाराची उंची बावीस फूट असून त्याचे काळ्या पाषाणातील बांधकाम आहे. ते दोन-अडीचशे वर्षांनंतरही सुस्थितीत आहे. प्रवेशद्वाराच्या कमानीवरील कमळाचे सुंदर शिल्प आणि दरवाज्यावरील गणेशपट्टी स्पष्ट दिसते. दरवाजा ग्राममुख आहे. वाड्यामधून मुळा नदीच्या काठावर वसलेले दारवली गाव दृष्‍टीस पडते. दरवाजाच्या दोहो बाजूंस दगडी तटबंदीचे अवशेष आहेत. वाड्याच्या भोवतालची घोटीव पाषाणातील तटबंदी आश्चर्यचकित करते. दोहो अंगांस घडीव जोत्यांच्या देवड्या आहेत. दरवाजांचा अडसर मोठा होता. त्याची कल्पना त्याच्या खुणांवरून येते.

दरवाजाच्या आत दोन्ही अंगांस पहारेकऱ्यांच्या ओवऱ्या आहेत. पुढे वाड्याचे मुख्य प्रांगण. लगेच पडिक अवस्थेतील भव्य चौसोपी वाड्याचे चित्र नजरेसमोर उभे राहते. वाड्याचा मुख्य दरवाजा पूर्व दिशेस असल्याचे त्याच्या रचनेवरून जाणवते. त्याचे तोंड पुण्याच्या दिशेने असल्याने त्यास ‘पुणे दरवाजा’ असे म्हणत असत.

वाडा पंधराखणी, चौसोपी, तिघई, दुपाखी म्हणजे एकशेऐंशी खणांचा व दोन्ही बाजूंस ओवरीयुक्त असा भव्य होता. वाड्याची लांबी व रुंदी दीडशे बाय दीडशे फुटांची असून त्याच्या भिंती काही प्रमाणात दिसतात. भक्कम चौथऱ्यावर वाडा दिमाखाने उभा असावा. वाड्याच्या चौकात कारंजे असल्याच्या खुणा दिसून येतात. तो प्रदेश प्रचंड पावसाचा असल्याने चौकातील पाणी बाहेर काढण्यासाठी बंदिस्त गटारे बांधली होती. वाड्याला दक्षिणेकडेही दरवाजा होता. पश्चिम दिशेस, वाड्याच्या जवळ पाणीपुरवठ्यासाठी घोटीव दगडात बांधलेली विहीर आहे. मुख्य चौथऱ्याजवळ वाड्याचे निर्माते सुभेदार होनाजी बलकवडे यांची समाधी आहे. होनाजीने निर्माण केलेली काळभैरवनाथमंदिर व विठ्ठलमंदिर सुस्थितीत आहेत. मंदिरासमोर अनेक वीरगळ बलकवडे घराण्यातील वीरांच्या पराक्रमाचे साक्षीदार म्हणून उभे आहेत.

सुभेदार होनाजी बलकवडे, सुभेदार येसाजी, किल्लेदार पिलाजी हे तिघे बंधू त्या वाड्यात वास्तव्य करून होते. संभाजीराजांच्या कारकिर्दीत उदयास आलेले नागोजी बलकवडे यांनी औरंगजेबाशी संघर्ष करून लोहगड, सिंहगड, कोरीगड, सुधागड हे किल्ले परत जिंकून घेतले; जंजिरेकर सिद्दी आणि जुन्नरकर बेग यांचा पराभव केला. त्या पराक्रमाबद्दल छत्रपती राजाराममहाराजांनी त्यांना दारवली, मुलखेड व सावरगाव ही गावे इनाम म्हणून दिली. त्यांची तिन्ही मुले सुभेदार येसाजी, होनाजी व पिलाजी यांनीही पराक्रम गाजवला. त्यांनी चिमाजीअप्पांच्या गुजरात मोहिमेत त्यांनी सुरत परगण्यातील घनदेवी हा प्रांत जिंकला. त्यांनी बाजीराव पेशव्यांच्या जंजिरा मोहिमेत पराक्रम करून अवचितगड, सूरगड, चण्हेर-बिरवाडी, तळा, घोसाळा व मानगड हे किल्ले जिंकले. त्या तीन बंधूंनी चिमाजीअप्पांच्या वसईच्या मोहिमेत पोर्तुगीजांविरूद्ध लढा दिला. वेसावा, तांदुळवाडी, कालदुर्ग, ठाणे कोट, मनोर, घोटावडा, गोरक्षगड, सिद्धगड, डहाणू ही ठाणी जिंकून पोर्तुजांची कोकणातील सत्ता खिळखिळी करून टाकली व वसईच्या किल्ल्याच्या विजयात मोलाची भर घातली.

त्या तिघांनी दारवली या गावी भव्य वाडा बांधला. मराठेशाहीच्या इतिहासात दारवली गावाचे नाव अजरामर झाले. इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे त्या गावचे सुपुत्र.

– डॉ. सदाशिव शिवदे

(छायाचित्रे – सदा‍शिव शिवदे)

About Post Author

Previous articleपक्षीमित्र दत्ता उगावकर
Next articleउद्योगसौदामिनी अरुणा भट (Aruna Bhat)
डॉ. सदाशिव सखाराम शिवदे हे 'अखिल महाराष्‍ट्र इतिहास परिषदे'चे अध्‍यक्ष होते. त्‍यांनी पशुवैद्यक पदविका (D.Vet) मिळवली होती. त्यांनी मराठी आणि इतिहास या विषयांत एम.ए.ची पदवी तर. इतिहास-संस्‍कृत या विषयांत पी.एच.डी. मिळवली होती. त्‍यांनी संभाजीराजे, महाराणी येसूबाई, कान्‍होजी आंग्रे, हंबीरराव मोहिते, शिवाजी महाराजांच्‍या पत्‍नी सईबाई, अशा अनेक ऐतिहासिक व्‍यक्तिमत्त्वांवर संशोधन ग्रंथ लिहिले. त्‍यांची आतापर्यंत संशोधन ग्रंथ, शोधनिबंध, अनुवादित, ऐतिहासिक कादंबरी, कथासंग्रह या प्रकारांत एकूण अठरा पुस्‍तके प्रकाशित आहेत. त्‍यांच्‍या 'माझी गुरं-माझी माणसं' या ग्रामीण कथासंग्रहातील कथांचे आकाशवाणीवर वाचन झाले. शिवदे यांना त्‍यांच्‍या लेखनाकरता अनेक पुरस्‍कारांनी सन्‍मानित करण्‍यात आले होते. शिवदे यांचे ७ एप्रिल २०१८ रोजी निधन झाले. लेखकाचा दूरध्वनी 9890834410

11 COMMENTS

  1. Shri.Balkavade yanche
    Shri.Balkavade yanche kartutwa moulyvan, prasanshniy ahe. Amala aplya lekhatun khup uttam ritya adhava milala.
    UTTAM.
    Dhanyawad.

  2. Very inspiring post n
    Very inspiring post n information. We are thankful to the historians for their hard work n delivering this motivating information to the young generation. It will surely be a lighthouse to the present generation. Special thank you to Dr..Sadashiv Shivde n Mr.Pandurang Balkavade for their dedicated efforts.

  3. Itihasatil anek nondi keval
    Itihasatil anek nondi keval tumchya mule aamhas samajat aahet.p ParakramiVeer n tyancha itihas amuchya pryant pohochavanarya Think Maharashtra la aamucha salam.

  4. Asach itihas satarchya
    Asach itihas satarchya rajwady magil dagdi imarticha sangu shakal ka ?

  5. मला फार आभिमान वाटतो की आपन
    मला फार आभिमान वाटतो की आपन आशा सरदार घराण्यात जन्म घेतल्याचा .
    माझे घर याच वाड्यात आहे पण आम्ही सध्या पुण्यात राहतो . पुण्यामध्ये १९ फेब्रुवारिच्या शिवजयंती दिवशी मिरवणुक निघते त्या मधे खुप सरदार घराणी एकञ येऊन आपआपल्या सरदाराची प्रतिमा असलेले रथ सामिल करतात .
    गेल्या वर्षी पासुन सर्व बलकवडे परिवाराला एकञ आणुन ही मिरवणुकीची प्रथा माझ्या पुढाकाराने सुरु झाली तीचे हे २ वर्ष आहे.
    कारण मला असे वाटते की असे काही करत राहील्याणे आमच्या पुढच्या पिढीस काही गोष्टी ची सारखी आठवण करुन द्यायला लागणार नाही .

  6. मला अभिमान आहे मी सुद्धा या…
    मला अभिमान आहे मी सुद्धा या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या कुटुंबाचा सदस्य आहे.
    आपल्या पराक्रमाचा भव्य दिव्य असा दैदिप्यमान इतिहास नव्या पिढी पर्यंत पोहोचवला गेला पाहिजे. खूप साऱ्या गोष्टी या काळाच्या ओघात लुप्त होत आहेत त्याची जपणूक करण्याची आपली जबाबदारी आहे.
    थिंक महाराष्ट्र कडून चालू केलेला हा खूप छान उपक्रम आहे. या उपक्रमाला बलकवडे परिवाराकडून खूप खूप शुभेच्या …!!

Comments are closed.