संपादकीय

0
30

संपादकीय

आषाढी एकादशीबरोबर चातुर्मास सुरू होतो. चार महिने व्रतस्थ, नेमस्त जीवन. हा पावसाळ्याचा काळ. त्यामुळे अनारोग्य फार. त्यावर उपाय आला उपवासाचा, अल्प सेवनाचा, काही कर्तव्यकर्म पाळण्याचा, त्याचाच धर्म बनून गेला. ही भारतीय जीवनरीत आहे. सा-या आवश्यक कर्मांचे भारतीय लोक कर्मकांड बनवून टाकतात. ते निर्बुद्धपणे अवलंबत राहतात.

नव्या जमान्यात त्याला ‘सेलिब्रेशन’ची डूब आली. त्यामुळे चातुर्मासातील कर्तव्यकर्माचा अर्थ लावणे सोडून दिले गेले रूढी-परंपरा जपण्याचा ठेका असलेल्या देवळादी संस्थांवर आणि कांदेनवमी  साजरी होऊ लागली हॉल घेऊन. मुंबईतील विलेपार्ल्याला घैसास हॉलमध्ये कांदेनवमीची पार्टी झाली. तेथे विलेपार्ल्यातले अवघे (ब्राह्मण) elite जमले होते. उद्योगजगतापासून सुगमसंगीत विश्वापर्यंत विविध क्षेत्रांतले अनेक लोक. नाना पाटेकर-विनय आपटे वगैरेंनी सुरू केलेली फाल्गुन अमावस्येची (वर्षअखेरीची) भारतीय पार्टी रूजू शकली नाही, परंतु घैसासांची ‘कांदेनवमी’ नक्की लोकप्रिय होईल. हे असे का घडतं आहे?

ब्राह्मण गेल्या काही वर्षांत संघटित व परंपरानिष्ठ होऊ पाहात आहेत. परंपरेचे पुनरूज्जीवन करत असताना आधुनिकतेचे मूल्य महत्त्वाचे मानले पाहिजे. ते जसे कलाव्यवहारात संदर्भाचे आहे तसे रोजच्या जीवनातही. नाहीतर ती रूढीनिष्ठता होते. रूढी-परंपरा हे शब्द एकत्र उच्चारले गेले तरी, रूढी त्याज्य असते, परंपरा श्रेष्ठ ठरू शकते-नवा अर्थ लावत गेले तर! तीन वर्षांपूर्वी एक लक्ष ब्राह्मण पुण्यात जमले, त्यानंतर बहुभाषिक ब्राह्मण संमेलने नित्य होऊ लागली. त्यांमधून जीवनार्थाचा शोध घेण्याची व्यवस्था लागणार नसेल तर संमेलने हा वृथा खर्च ठरेल.

शिक्षण-संस्कृतीची दीर्घ परंपरा असलेल्या ब्राह्मण समुदायावर या समाजात ज्ञानप्रसाराची, प्रबोधनाची विशेष जबाबदारी आहे. त्यासाठी आषाढापासून सुरू होणारा चातुर्मास (त्यानंतर येणारे दिवाळी ते शिमगा हे सण) हा उत्तम मुहूर्त समजायला हरकत नाही, ब्राह्मण समाज असे आत्मपरीक्षण करू इच्छितो का?

आषाढी एकादशी आणि विठ्ठलभेट ही मराठी संस्कृतीची खूण झाली आहे. या निमित्ताने, या शुक्रवारच्या नव्या प्रसारणात ज्ञानदा देशपांडेने जसा विठ्ठल दर्शनाचा नवा आत्मसाक्षात्कार मांडला आहे, तसे सुरेंद्र चौधरी याने अवनत होत चाललेल्या परंपरांचे वर्णन केले आहे, तर राजेंद्र शिंदे याने कीर्तन परंपरेची माहिती दिली आहे.

विश्वास काकडे यांच्या ‘मूल्यविवेक’ या स्तंभात नियमित होत असलेले त्यांचे लेखन हा आधुनिक व्यवहारामधील मूल्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न आहे. अरूण निगुडकर इतिहासाचे हौशी अभ्यासक आहेत. त्यांचे नद्यांचे पाणीवाटप व भारत-पाकिस्तान संबंध याविषयातील लेखन विचारप्रवृत्त करील असे आहे.

भालचंद्र नेमाडे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वातावरणात, हवेतील मान्सून पावसाच्या ढगांइतके भरून राहिले आहेत. यंदा मान्सून जसा प्रेमाने बरसत आहे, तसे नेमाडेही त्यांच्या पद्धतीने पागोळ्या पाडत आहेत. त्यांची ‘चाळेगत’ला दिल्या गेलेल्या अनुष्टुभ पुरस्कार समारंभातील वक्तव्येही अशीच आहेत.

दिनकर गांगल

About Post Author

Previous articleशिक्षण, निर्णयक्षमता आणि मूल्ये
Next article‘चाळेगत’ – नेमाडेपंथातील नवी पिढी
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.