दिवाळी सणाची सुरुवात ‘वसुबारस’ या दिवसापासून होते. परंतु आदिवासी भागात दिवाळी सणाचा पहिला दिवस म्हणजे ‘वाघबारस’. आदिवासींच्या जीवनात त्या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. तो त्यांनी वर्षभरात केलेले नवस फेडण्याचा मोठा दिवस असतो. अकोले तालुक्याच्या अतिदुर्गम भागात तर ‘वाघबारस’ साजरी करण्याची परंपरा अनोखी आहे. आदिवासी बांधवांनी ती जपलीही नेकीने आहे.
अकोले तालुक्यातील अनेक गावांत, वाड्या-वस्त्यांवर वाघोबाची मंदिरे आहेत. आदिवासी बांधव वाघाला देव मानतात. गावच्या वेशीवर वाघ्याच्या मंदिरात जाऊन पूजा केली जाते. तेथे सर्वजण एकत्र येऊन नवसपूर्ती करतात. जंगलातील हिंस्र प्राण्यापासून पाळीव प्राण्यांचे गाईगुरांचे रक्षण व्हावे, यासाठी कोंबडा, बोकड यांचा नैवैद्य दाखवला जातो. काही भागात डांगर, तांदळाची खीर यांचाही नैवद्य दाखवला जातो.
अन्य आदिवासी भागांतही काही ठिकाणी वाघदेवाची मंदिरेही आहेत. सह्याद्रीतील घाटरस्त्यांना वाघोबाच्या मूर्ती व ओट्यांवर असलेली मंदिरे पाहण्यास मिळतात. वाघोबाची मंदिरे जुन्नरला तळमाची येथे, ठाणे-इगतपुरी-आंबेगाव तालुक्यात पोखरीजवळ वैदवाडी येथे आहेत. काही ठिकाणी लाकडावर वाघाच्या चित्राचे कोरीव काम करून, त्यावर शेंदूर लावून ती चित्रे ठेवलेली आढळतात.
‘वाघबारस’ अकोले तालुक्यात पिंपरकणे, बिताका, शेणीत, खिरविरे, रतनवाडी, घाटघर, हरिचंद्रगड पायथा, पेठ्याचीवाडी, देवगाव, म्हैसवळण घाटात, झुल्याची सोंड भागात साजरी होत असते. पेठेच्या वाडीजवळील भैरवनाथाच्या कलाड गडावर गावकरी जातात. तेथे प्रत्येकाचा अथवा कुटुंबाचा एक कोंबडा कापून नैवेद्य दाखवला जातो. पाचनईजवळ कोड्याच्या कुंडातील झऱ्याजवळही तशाच पद्धतीने ‘वाघबारस’ साजरी होते.
वाघबारसला गुराखी प्रत्येक घरातून तांदूळ, गूळ व थोडे पैसे गोळा करून संध्याकाळी गावातील सर्व गुरे वाघोबाच्या मंदिराजवळ एकत्र आणतात. त्या ठिकाणी गावातील प्रमुख जाणकार मंडळी, मुले, मुली एकत्र येतात. वाघोबाच्या मंदिराच्या संपूर्ण परिसरात गाईच्या शेणाचा सडा व गोमूत्र शिंपडून जागा पवित्र केली जाते. रांगोळी घातली जाते. फुलांच्या माळा लावल्या जातात. देवांना शेंदूर फासला जातो. गावातील मारुतीच्या व गावदेवाच्या देवळासमोर शेकोटी पेटवली जाते. गुराखी मुले, काहीजण अस्वल तर काहीजण कोल्हा अशी रूपे घेऊन खेळ खेळतात. त्यात एखाद्याला वाघ बनवले जाते. त्या वाघाला पळण्यास लावून ‘आमच्या शिवारी येशील का?’ असे विचारले जाते. वाघ झालेला गुराखी ‘नाही नाही’ म्हणत पुढे पळतो. असा खेळ खेळला जातो.
आदिवासी वाघोबा बसवलेल्या ठिकाणी जाऊन त्याच्या समोर कोड्या लावतात. नारळ फोडून पूजा करत देवाच्या पाया पडून आराधना करतात. ‘आमचे, गव्हाऱ्यांचे, गोरा – ढोरानचे खाडया, जनावरांपासून रक्षण कर, आम्हाला चांगले पीक दे, आजारांना दूर ठेव’ असे मागणे मागितले जाते.
रात्री व पहाटे एकाच्या हातात दिवा व त्याच्या बाजूने मोराची पिसे व झेंडूच्या फुलांची सजावट केलेली असते. रात्रीच्या व पहाटेच्या मंगलमयी वातावरणात ते सर्व बांधव तालासुरात “दिन दिन दिवाळी, गाय म्हशी ओवाळी, गायी-म्हशी कोणाच्या लक्ष्मणाच्या”! अशी गीते वेगवेगळ्या तालात म्हणून प्रत्येकाच्या घरी जाऊन सण मागतात.
कालौघात ‘वाघबारस’ ही प्रथा नैवेद्यापुरती मर्यादित राहण्यासारखी परिस्थिती आहे. कारण आता, निसर्गातच वाघ संपले आहेत; आणि त्यासोबतच त्यांची… भीतीही संपली.
– रवि ठोबांडे 8390607203 thombade.ravi@gmail.com