वसई मोहिमेचा दिग्विजय

1
19
carasole

मराठ्यांच्या इतिहासातील वसईचा दिग्विजय ही महत्त्वाची विजयश्री मानली जाते. त्या काळी पोर्तुगीजांचा अंमल कोकणपट्टीतील साष्टी प्रांतावर होता. तेथील प्रजा पोर्तुगीजांच्या छळाला कंटाळली होती. शिवाजी महाराजसंभाजी महाराज यांनी पोर्तुगीजांचा बंदोबस्त करण्याचे प्रयत्न केले होते. त्यामुळे पोर्तुगीज बरेच नमले होते. छत्रपतींच्या महानिर्वाणानंतर शाहू महाराजांच्या कारकिर्दीत मराठ्यांना पुन्हा एकदा पोर्तुगीजांना धडा शिकवणे गरजेचे ठरले. मराठ्यांचे प्रशासन कल्याण प्रांतात इसवी सन १७१९ मध्ये सुरू झाले. तेव्हापासून मराठ्यांचा पोर्तुगीजांशी पुन्हा संघर्ष सुरू झाला. उत्तर फिरंगाण १७३७ व १७३९ या दोन वर्षांत जवळ जवळ पूर्णपणे मराठ्यांच्या ताब्यात आले. उत्तर फिरंगणात साष्टी बेट, वांद्रे, वसई, ठाणे, अंधेरीपासून वसईपर्यंतची अनेक बेटे कार्लाई, रेवदांडा, चौल, माहीम, तारापूर, चिंचणी इत्यादी परिसरांचा समावेश होतो.

स्थायी असलेले पोर्तुगीज अनिर्बंध सत्ता गाजवत होते. वसई हे त्यांचे प्रमुख ठिकाण होते. मराठ्यांनी वसई ताब्यात घेण्याचा चंग बांधला. वसईच्या उत्तरेला आगासी, शेजारी अर्नाळा हा जलदुर्ग, त्यापुढे माहीम व केळवे ह परिसर, पूर्वेस तांदुळवाडी, इशान्येस मनोहर व अशेरीगड आहेत. शिवाय, आसपास डहाणू, उंबरगा, नारगोल, खतलगड, दमण, कावणदुर्ग इत्यादी ठिकाणे आहेत. वसईजवळ खाडीवर घोडबंदर हे ठिकाण आहे.

चिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली इसवी सन १७३७ च्या गुढीपाडव्यानंतर वसईच्या मोहिमेस प्रारंभ झाला. मराठे कल्‍याणमार्गे उत्‍तर कोकणात दाखल झाले. पोर्तुगीज ठाण्याच्या कोटाचे बांधकाम त्यापूर्वी काही वर्षे करत होते. बाजीरावांनी तो कोट बांधून पुरा होण्यापूर्वीच साष्टी बेट जिंकण्याचे ठरवले. शंकराजी फडके, गंगाजी नाईक अंजूरकर यांनी चिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली ते काम करण्याचे योजले. गडाचा खाडीच्या तोंडावर असलेला बुरुज प्रथम उडवला गेला. त्यावेळी पोर्तुगीज गव्हर्नर पळून गेला. मराठ्यांनी साष्टी बेट ताब्यात घेतले. नारायण जोशींनी पारसिकचे ठाणे जिंकले. बेलापूर, धारावी, कल्याणजवळील सांताक्रुझ ही ठिकाणे मराठ्यांच्या ताब्यात आली. मराठ्यांनी ठाण्यावरील हल्ला चपळाईने केला आणि वसईकडे मोर्चा वळवला.

शंकराजीपंतांच्या नेतृत्वाखालील तुकडीने माणिकपुऱ्यावरून वसईचा कोट गाठला. त्यांनी अनेक लहान ठाणी जिंकली. त्यानंतर झाडाझटका व न्याहऱ्या करून महादजी केशव, खंडो चिमणाजी, मोराजी शिंदे, बाळाजीराव, राजबाराव बुगुडकर राणे बहादूरपुऱ्यास रवाना झाले. त्यांचा वसईचा कप्तान ग्रेनेडियर याच्याशी सामना झाला. त्यात मराठ्यांनी पोर्तुगीजांच्या घोडदळास तुडवून बहादूपुऱ्याजवळ पहिला मोर्चा लावला. सोपारा मराठ्यांच्या ताब्यात आला. त्यामध्ये मराठ्यांना तेरा तोफा मिळाल्या. पाठोपाठ त्यांनी अर्नाळा जलदुर्ग जिंकला. मराठे त्याचा बंदोबस्त करून १ जुलै १७३७ ला पुण्यास परत आले. पुढे, ती मोहीम तशीच सुरू राहिली.

वसईच्‍या किल्‍ल्याच्‍या तिन्‍ही बाजूंना समुद्र आणि दलदल असल्‍याने तो किल्‍ला काबिज करणे अवघड होते. वसईच्‍या वेढ्यासाठी मराठ्यांनी दोन वर्षे कसून लढा दिला. मोहिमेत रामचंद्रपंत, अमरसिंह, शिर्के अशा दहा-पंधरा लोकांनी मोठा पराक्रम केला. पोर्तुगीजांकडे मराठ्यांच्‍या तुलनेत तंत्रज्ञान, अस्त्रे व शस्‍त्रे अद्यावत होती. त्‍यांनी त्‍या साधनांच्‍या सहाय्याने मराठ्यांचे मोठे नुकसानही केले. मात्र मराठ्यांनी वेढा सैल पडू दिला नाही. कान्‍होजी आंग्रे यांच्‍या आरमाराने समुद्री मार्ग बंद केले असल्‍यामुळे पोर्तुगीजांची रसद बंद पडून त्‍यांची कोंडी झाली. वसईच्‍या मोर्चामध्‍ये महादजी केशव, जनार्दन हरि, गणेश हरि असे लोक सामिल होते. त्यांनी माहीमच्या कोटावर प्रचंड हल्ला चढवला आणि पोर्तुगीज दोन-तीन हजार सैन्यानिशी मराठ्यांच्या हल्ल्यास प्रत्युत्तर देण्यासाठी कोटातून बाहेर पडले. मराठ्यांच्या फौजेस बाहेर पडणे किंवा आत राहून शत्रूचा सामना करणे या दोन्ही गोष्टी अवघड होऊन बसल्या. रामचंद्रपंतांच्या हाताला पोर्तुगीजांची गोळी लागली. अनेक मराठे त्या धुमश्चक्रीत कोंडले गेले. त्यांची पार दाणादाण उडाली. त्यामध्ये राजबाराव बुगुडकर, वाघोनी खानविलकर, चिंतो शिवदेव, जनर्दन हरि, गणेश हरि हे सर्व लढवय्ये वीरगतीस प्राप्त झाले. तत्‍कालिन नोंदीनुसार त्‍या लढाईत मराठ्यांचे बारा हजार तर पोर्तुगीजांचे आठशे सैनिक कामी आले.

चिमाजी अप्‍पांनी २२ मार्च १७३९ रोजी वसईची मोहिम फत्‍ते करून मराठ्यांच्‍या इतिहासात मानाचा तुरा रोवला. विजयानंतर मराठी सैन्‍याने किल्‍ल्‍यातील चर्चमधील मोठ्या घंटा उतरवून त्‍यांची हत्‍तीवरून मिरवणूक काढली. त्‍यापैकी एक घंटा नाशिक येथील नारोशंकराच्‍या मंदिरात पाहण्‍यास मिळते. ती ‘नारोशंकराची घंटा’ म्‍हणून प्रसिद्ध आहे. दुसरी घंटा पालीच्‍या बल्‍लाळेश्‍वर मंदिरात आहे. वसईचा किल्‍ला स्‍वराज्यात यावा यासाठी चिमाजी अप्‍पा यांनी वज्रेश्‍वरी देवीस नवस केला होता. मोहिम फत्‍ते झाल्‍यानंतर चिमाजी अप्‍पांनी वसईला वज्रेश्‍वरी देवीचे मंदिर बांधले.

– सदाशिव शिवदे

Last Updated On – 15th May 2016

About Post Author

Previous articleवडांगळीची सतीदेवीची यात्रा
Next articleडोणे गावचा राणे-इनामदार वाडा
डॉ. सदाशिव सखाराम शिवदे हे 'अखिल महाराष्‍ट्र इतिहास परिषदे'चे अध्‍यक्ष होते. त्‍यांनी पशुवैद्यक पदविका (D.Vet) मिळवली होती. त्यांनी मराठी आणि इतिहास या विषयांत एम.ए.ची पदवी तर. इतिहास-संस्‍कृत या विषयांत पी.एच.डी. मिळवली होती. त्‍यांनी संभाजीराजे, महाराणी येसूबाई, कान्‍होजी आंग्रे, हंबीरराव मोहिते, शिवाजी महाराजांच्‍या पत्‍नी सईबाई, अशा अनेक ऐतिहासिक व्‍यक्तिमत्त्वांवर संशोधन ग्रंथ लिहिले. त्‍यांची आतापर्यंत संशोधन ग्रंथ, शोधनिबंध, अनुवादित, ऐतिहासिक कादंबरी, कथासंग्रह या प्रकारांत एकूण अठरा पुस्‍तके प्रकाशित आहेत. त्‍यांच्‍या 'माझी गुरं-माझी माणसं' या ग्रामीण कथासंग्रहातील कथांचे आकाशवाणीवर वाचन झाले. शिवदे यांना त्‍यांच्‍या लेखनाकरता अनेक पुरस्‍कारांनी सन्‍मानित करण्‍यात आले होते. शिवदे यांचे ७ एप्रिल २०१८ रोजी निधन झाले. लेखकाचा दूरध्वनी 9890834410

1 COMMENT

  1. पोर्तुगिजांच्या राजवटीत
    पोर्तुगिजांच्या राजवटीत असलेल्या कालपरवापर्यंतच्या “गोवा” राज्यासंबंधी काहीच उल्लेख झाला नाही, काही माहिती असल्यास अवश्य द्यावी विनंती.

Comments are closed.