एका नटसम्राटाला भेटण्याचा योग आला. खराखुरा जिवंत, हाडामांसाचा, नाटकातले पात्र नसलेला नटसम्राट! तमाशाचा राजा! शब्बीरभाई मणियार. शब्बीर यांचा जन्म सिन्नर तालुक्याच्या शहा गावात गरीब कुटुंबात झाला. शिक्षण इयत्ता चौथीपर्यंत झाले. घरची परिस्थिती बेताची. शब्बीर यांचा स्वभाव हरहुन्नरी, पडेल ते काम करण्याची जिज्ञासू वृत्ती. त्यांचे वडील मुंबईला हमाली करायचे. घरचा व्यवसाय पारंपरिक, बांगड्या भरण्याचा-मणियारकीचा. मात्र सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे नेहमी हातातोंडाशी गाठ.
![]() |
इंद्रदरबार गाढवाचे लग्नमधील वेशभूषा (1987) |
‘दत्तोबा तांबे’ यांना माणसांतील गुणांची पारख होती. त्यांनी ‘चितोडगडचा रणसंग्राम’ हे वगनाट्य एकदा जाहीर केले. ऐनवेळी मुख्य नायक असलेल्या राणाप्रतापची भूमिका करणारा नट आजारी पडला. दत्तोबा तांबे यांनी हुकूम सोडला, “ह्या वायरमन पोराला, शब्बीरला मेकअप करून उभा करा! करील तो बरोबर.”
शब्बीरला सगळे वग, अगदी वाक्यन वाक्य रोज ऐकून-पाहून पाठ होते. इतर कलाकारांच्या प्रॅक्टिसला मदत करताना तलवारीचे हात, काठीचे हातही अवगत झाले होते. शब्बीर यांच्या मनी प्रथम धास्ती आली, पण सर्वानी आग्रह केल्यानंतर त्यांनी महाराणा प्रतापचा मेकअप अंगावर चढवला. सहा फुटांच्या आसपास उंची, भारदस्त जरब बसवणारा खर्जातला आवाज, भरभक्कम शरीरयष्टी, गव्हाळ वर्ण, रुबाबदार चेहरेपट्टी अशी जन्मजात शरीरसंपदा होतीच!
![]() |
हुंड्याला कायदा आहे वगनाट्यातील एक दृश्य |
दत्तोबा तांबे यांच्या फडापासून सुरू झालेला प्रवास पुढे गुलाबराव बोरकर, गणपतराव माने, तुकाराम खेडकर, मंगला बनसोडे, आनंद लोकनाट्य तमाशा इत्यादी तमाशा फडांतून चालत राहिला. त्यांना महिना एकशेपंच्याहत्तर रुपये बिदागी 1972 साली मिळायची. ती वाढत वाढत 2008 साली सात हजार रुपये महिना इतकी झाली. त्यांनी वगात काम करत असतानाच वग नाट्येही लिहिली, दिग्दर्शित केली. ‘लग्नाआधी भंगला चुडा’, ‘पुढारी पाहिजे बाईला’, ‘हुंड्याला कायदा आहे का?’, ‘साधू मठाचे गुपित’, ‘पाषाणहृदयी आनंदी’, ‘महाराष्ट्र झुकत नाही’, ‘रायगडची राणी’, ‘धन्य पावनखिंड झाली’ अशी अकराहून अधिक वगनाट्ये त्यांच्याकडून लिहिली गेली.
![](https://1.bp.blogspot.com/-HRRGyKz5EzI/XrFPOU3krgI/AAAAAAAAAio/1YnYnn0BRdEEqYBvjO9Mqxv_Kdg9aQx5QCPcBGAYYCw/s320/_vaga_natye_2.jpg)
शब्बीर यांचे गुलाबराव बोरगावकर, जगन्नाथ शिंगवेकर, माधवराव गायकवाड इत्यादी कलावंतांशी विशेष सूत जुळले होतेच. शब्बीर म्हणाले, “मी अधूनमधून दारू प्यायचो, पण व्यसनात अडकलो नाही. दारू पिऊन कधीही रंगभूमीवर पाय ठेवला नाही. कलेशी प्रतारणा कधीच केली नाही. सहकलाकारांनाही माझा धाक असे. कोणी पिऊन आला तर त्याला त्या दिवशी काम मिळत नसे.” त्यांनी तमाशात राजाच्या भूमिका केल्या अन् ते राजासारखेच जगले. शब्बीर पावसाळ्यातील दोन महिने कुटुंबात असत व तेथे त्यांचे लेखन होत असे. ते म्हणतात, की “तमाशातला राजा सकाळी चहाला महाग असतो. पण माझ्या वाट्याला असे काही अनुभव आले नाही. प्रेक्षकांचे भरभरून प्रेम लाभले.”
![](https://1.bp.blogspot.com/-YKxlDFi9oac/XrFOs13QSII/AAAAAAAAAic/lakak_DNaEoB8Jz7yjhXB6iGe2pufwwfwCPcBGAYYCw/s320/_shabbir_bhai.jpg)
ते निळू फुले, दादा कोंडके, दादू इंदुरीकर यांच्यासोबत काही प्रयोगांतून काम केल्याचेही सांगतात. मात्र एक प्रकारची वेठबिगारीची पद्धत तमाशात असते. त्यामुळे त्यांना ‘ते’ चक्रव्यूह भेदून बाहेर पडणे शक्य झाले नाही. त्यांच्या मनावर 1999 साली वडील वारले तो प्रसंग कोरला गेला आहे. वगातला मुख्य नट सुट्टीवर गेला तर धंदा बुडेल म्हणून वडिलांच्या निधनाची बातमी त्यांच्यापासून लपवून ठेवली गेली होती. शब्बीर हे एकुलता एक मुलगा असल्याने वडिलांच्या अंत्यविधीसाठी कुटुंबीयांनी शोध घेत अखेर तमाशा मालकाला शब्बीर यांना घरी सोडण्यास भाग पाडले.
– किरण भावसार 7757031933 kiran@advancedenzymes.com
आदरांजली
———————————————————————————————————————————-
![](https://1.bp.blogspot.com/-Vaeojypaheo/XrFfBJo_YHI/AAAAAAAAAjI/tYJCLgv6DM4LozsAwpQshaBZp-hmZYIewCPcBGAYYCw/s320/_vividh_bhumikant_1.jpg)
![](https://1.bp.blogspot.com/-MGappW-yaBc/XrFfgCcYgyI/AAAAAAAAAjQ/h_nygUI78Ocyq-FIxVh6v9Rf1GTwqkqWgCPcBGAYYCw/s320/_vividh_Bhumiket_1999.jpg)
शब्बीर भाईंची जीवन कहाणी, त्यांची झालेली ससेहोलपट, त्यांच्या अंगी असलेले गुण, साहस, कमावलेली शरीरयष्टी, प्रेमळ स्वभाव पण तरी असलेली जिद्द,अन्यायाविरुद्ध लढण्याचा बाणा यामुळे प्रतिकूल परिस्थितीवर केलेली मात हे सर्व किरण भावसार यांनी उत्कृष्ट शब्दांकन केलेलं आहे.धन्यवाद किरण.मी नायगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असताना माझा भाईंचा 2008 पासून संपर्क आला, त्यांच्या शांत व मनमिळावू स्वभावामुळे आमची मैत्री झाली होती.आजच मला त्यांच्या कन्येकडून त्यांच्या निधनाची दुःखद वार्ता कळली, खूप वाईट वाटले.एक वगसम्राट रंगमचवरून एक्झिट घेऊन काळाच्या पडद्याआड गेला जो पडदा आता कधीच उघडणार नाही.भाईंना पहिल्या वर्गाचं मानधन मिळणे हा त्यांचा हक्क मिळवायचा राहूनच गेला.भावपुर्ण श्रद्धांजली
खरच एक महान कलावंत हरपला त्याना भावपूर्ण श्रंधदाजली बबन सागंळे नायगांव सिनर
भावपूर्ण श्रद्धांजली.