पवई सरोवर धोक्यात

0
29
_PavaiSarovar_Dhokyat_1.jpg

पवई सरोवर हे कृत्रिम रीत्या निर्माण करण्यात आलेले आहे. सरोवराखालील जागा इंग्रज सरकारने फ्रामजी कावसजी पवई यांना लीजवर दिली होती. ते पश्चिम भारतातील अॅग्रीकल्चरल व हॉर्टिककल्चरल सोसायटीचे उपाध्यक्ष होते. सरोवराची निर्मिती त्यांच्या जागेवर 1891 साली झाल्यामुळे पवर्इ यांचे नाव सरोवराला देण्यात आले. सरोवराच्या काठावर आयआयटी व निटी यांसारख्या प्रसिद्ध संस्था वसल्या आहेत. सरोवराचा आकार, ते बांधण्यात आले त्यावेळी 2.1 चौरस किलोमीटर(म्हणजे पाचशेवीस हेक्टर) एवढा होता. सरोवर जास्त खोल नाही. त्याची खोली वेगवेगळ्या ठिकाणी तीन ते बारा मीटर एवढी आहे. आरंभी, सरोवरातील पाण्याचा वापर मुंबईकर पिण्यासाठी करत असत. पण आता, ते पाणी पिण्यासाठी अयोग्य म्हणून घोषित करण्यात आले आहे. सध्या पवई सरोवर हे पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते.

पवई सरोवर ज्या ओढ्यावर बंधारा बांधून तयार झाले तो ओढा पूर्वी मिठी नदीला जाऊन मिळत होता. त्या ओढ्यावर दोन बंधारे बांधून सरोवराची निर्मिती झाली आहे. ते बांधकाम एका वर्षात पूर्ण झाले. त्या साठी साडेसहा लाख रुपये खर्च आला. तयार झालेले सरोवर वेस्टर्न इंडिया फिशिंग असोसिएशनला भाडेपट्टीवर देण्यात आले. महाराष्ट्र स्टेट अँग्लिंग असोसिएशन नावाची नियमित संस्था 1955 साली सुरू करण्यात आली व सरोवर त्या संस्थेकडे सोपवण्यात आले. सरोवराची काळजी घेणे, ते स्वच्छ ठेवणे, त्याची डागडुजी करणे आणि त्याचे सौंदर्यीकरण इत्यादी उद्देश त्यांच्या स्थापनापत्रात दाखवण्यात आले आहेत.

संस्था सध्या पुढील कामांत गुंतली आहे : सरोवरातील जलपर्णी काढणे, फिशरीज खात्याबरोबर संशोधनाला मदत करणे, सरोवराच्या पाण्याच्या गुणवत्तेचे विश्लेषण करणे, सरोवराचे संरक्षण करणे व अतिक्रमणे रोखणे.

सरोवराच्या परिसरात अडीच हजार मिमिच्या जवळपास पाऊस पडतो. सरोवरातील पाणी मोठ्या प्रमाणात सांडव्यावरून दरवर्षी साधारणपणे सहादा वाहते. पाणी मिठी नदीला जाऊन मिळते. सरोवराचा वापर सध्या करमणुकीसाठी, जनावरे धुण्यासाठी, मासेमारी करण्यासाठी व बगीचाला सिंचनासाठी करण्यात येतो. शिवाय, शेजारील आरे कॉलनीला व लार्सन टुब्रो कंपनीला स्वच्छतेच्या कामासाठी पाणी पुरवठा करण्यात येतो.

काही सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन, त्यांनी त्या ठिकाणी नौशाद अली सरोवर संवर्धिनी नावाची संस्था स्थापन करून सरोवराच्या जलस्रोताची काळजी घेण्याचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत. इंडियन असोसिएशन ऑफ अॅक्वॉटिक बायोलॉजिस्ट्स या संस्थेतर्फे त्यांना प्रेरणा मिळाली आहे. मात्र शतकापेक्षा अधिक वर्षांचा इतिहास असलेले सरोवर वेगाने होणाऱ्या शहरीकरणाचे भक्ष्य ठरले आहे. सरोवरावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. त्यामुळे सुधारणा होणे दूरच, पण त्यांच्या संरक्षण कामातही अडथळे येत आहेत. त्यामुळे सरोवराचा आकार घटत चालला आहे. अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे यांमुळे सरोवराचे सौंदर्य नष्ट झाले आहे. नागरी वस्ती आजूबाजूच्या टेकड्यांवर वाढत आहे. तेथून पाण्याचे जे ओहळ पूर्वी येत असत तेथून आता सांडपाण्याचे नाले वाहत असतात. परिसरात जंगलतोडही वाढत आहे. सरोवरात येणाऱ्या सांडपाण्यामुळे सरोवरातील जैवविविधता नष्ट होत आहे. बांधकामे अनधिकृतपणे वाढत आहेत.

सरकारी संस्था, अशासकीय संस्था, मच्छिमार व कोळी संघटना आणि समाजसेवी संघटना यांची मोट बांधून सरोवराच्या संरक्षणाची व संवर्धनाची जबाबदारी त्या संस्थांवर सोपवण्यासाठी नौशाद अली सरोवर संवर्धिनी नावाची संस्था स्थापन करण्यात आली आहे. नौशाद अली हे अँग्लिंग असोसिएशनचे अध्यक्ष होते. संस्था त्यांचेच नाव घेऊन काम करत आहे. संस्थेची स्थापना 2008 साली झाली.

– (जलसंवाद नोव्हेंबर 2017 वरून उद्धृत)

About Post Author