स्वतःमधील क्षमतांचा परिचय करून घेणे, त्या दिशेने पुढे चालणे व जीवन खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण करणे म्हणजे शिक्षण ! ते शिक्षण नर्मदाघाटीत मेधा पाटकरांच्या जीवनशाळा देतात. त्यांच्या या उपक्रमामुळे मुले हातात शस्त्र न घेता जीवनशाळांमध्ये जाऊन शिक्षण घेत आहेत. योग्य शिक्षण, योग्य मार्गदर्शन कशा प्रकारे समाजाची उन्नती साधू शकते हे जीवनशाळेला भेट दिल्यावर जाणवते…
विविध गोष्टींची माहिती व त्यामधून जगाच्या व्यवहारातील क्रियाप्रक्रियांचे ज्ञान संपादन करणे म्हणजे शिक्षण या दृष्टीने शिक्षण या संकल्पनेकडे पाहिले जात असे. तसेच, शिक्षण हे मानवी जीवन अधिक समर्थ, उत्तुंग व समाधानी करण्यासाठी असे. मात्र गेल्या तीनशे-चारशे वर्षांपासून शिक्षणव्यवहार व शिक्षणक्रम यांमध्ये बदल घडला. तो ब्रिटिशांच्या सत्ता काळापासून मोठ्या प्रमाणावर दिसून आला. त्यांनी त्यांच्याकडे काम करण्यासाठी मनुष्यबळ तयार व्हावे यासाठी भारतात शिक्षण देणे सुरू केले. त्यामुळे शिक्षणाचा संबंध आर्थिक व्यवहाराशी व सुबत्तेशी जोडला गेला. ती आधुनिक काळाची, भौतिक समृद्धीची दृष्टी होय. मुलगा जर शिकला नाही, तर त्याला गाड्या पुसाव्या लागतील-भांडी घासावी लागतील अशी भीती तयार झाली. त्यामुळे शिक्षण घेण्यामागील लोकांचा उद्देश बदलला आणि नकळत, शारीरिक श्रम करणे म्हणजे कमीपणाचे आणि टेबल-खुर्चीवर बसून काम करणे म्हणजे बौद्धिक हुशारी असा विचार समाजात पसरला.
![-adivasi-song-](https://thinkmaharashtra.com/wp-content/uploads/adivasi-song-1-2.jpg)
भारतीय संस्कृतीमध्ये शिक्षणाचा अर्थ हा आत्मज्ञानाच्या मार्गावर चालणे असा होता. राजापासून ते गरिबांपर्यंत सर्वांना एकत्र शिक्षण मिळणे अभिप्रेत असे. शारीरिक श्रम, गुरुंची सेवा या गोष्टी सर्व विद्यार्थ्यांना कराव्या लागत. त्यामुळे मनोवृत्ती घडत असे; मनात अहंगंड किंवा न्यूनगंड निर्माण होत नसे. अर्थात त्यातूनच व्यक्तिगत हितसंबंध जागे होऊन ग्रंथांमधील ज्ञान केवळ एका वर्गापुरते सीमित राहून ते गोरगरिबांपर्यंत जाऊ नये अशी विकृत विचारसरणी विकसित झाली.
या सर्व इतिहासात फार न जाता, शिक्षण म्हणजे स्वत:च्या आवडी-निवडी-क्षमता-त्रुटी यांना जाणणे, दुसऱ्याला आनंद देण्यातील समाधान जाणणे आणि स्वतःची व समाजाची मानसिक उन्नती करणे होय. शिक्षण केवळ बंद वर्गांमध्ये, मोठमोठ्या पुस्तकांमध्ये सामावलेले नाही, तर ते जीवनव्यवहारात आहे – विविध पुस्तकांमधील माहितीचा योग्य उपयोग करून त्याचे ज्ञानात रूपांतर करणे यात आहे.
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्या जीवनशाळांना भेट देण्याचा योग आला तेव्हा शिक्षणाचे असे वेगळे स्वरूप डोळ्यांसमोर आले. गेल्या जवळजवळ चार दशकांचे मेधा पाटकर यांचे कार्य सर्वांना ठाऊक आहे. मेधा यांचे जीवन आंदोलनांशी इतके एकरूप झालेले आहे, की त्यांचे जीवन हेच एक आंदोलन झालेले आहे.
मेधा त्यांच्या जीवनातील आधीची वर्षे शहरामध्ये, सर्व आधुनिक सोयिसुविधांमध्ये वाढल्या. त्यांनी रुईया कॉलेजमधून उच्च शिक्षण घेतले आहे. मेधा पाटकर यांचे राहणीमान साधे आहे. त्या आदिवासी गावात झोपडीत झोपायचे, मिळेल ते अन्न खायचे-तेथीलच पाणी प्यायचे अशा जगल्या आहेत. तेथे व्यवस्थित अशी दुकाने नाहीत-कोठल्या सोयी नाहीत, पाणी-वीज-रस्ते अशा मूलभूत सुविधादेखील उपलब्ध नाहीत; तशा भागात त्या गेली अडतीस वर्षे राहत आहेत. मेधा पाटकर यांच्यासारखी सुसंस्कृत, उच्चशिक्षित स्त्री, आदिवासींचा उत्कर्ष, त्यांना समाजाच्या प्रवाहात आणणे, त्यांना त्यांच्या हक्कांप्रती जागृत करणे असे ध्येय मनात ठेवून राहत आहे. त्यांना कामाला दिवसाचे चोवीस तास अपुरे पडतात. खूप कामे पडली आहेत असे त्यांच्या बोलण्यातून जाणवते. परंतु त्यांच्या चेहऱ्यावर कर्तव्यपूर्तीचे अनोखे समाधान असते. त्या शंभर टक्के झोकून देऊन काम करतात, पण कामाच्या यशापयशामध्ये गुंतून राहत नाहीत.
![-medha-patkar-with-students-](https://thinkmaharashtra.com/wp-content/uploads/medha-patkar-with-students-.jpg)
आंदोलनकर्त्या म्हणून कणखर, धाडसी, क्वचित आक्रमक वाटणाऱ्या मेधा पाटकर तेथील अनेक गावांतील आदिवासींच्या आई किंवा आजी यांच्याप्रमाणे ममताळू आहेत. त्या अनेक आदिवासींचा आधार आहेत. त्यांच्या घरातील एक सदस्य आहेत. तेथील लहान मुलांपासून ते म्हाताऱ्यांपर्यंत सर्वजण मेधा पाटकर यांच्यावर प्रेम करतात.
त्यांच्या आंदोलन प्रभागात – नर्मदाघाटीत एक गोष्ट प्रकर्षाने दिसून येते, ती म्हणजे त्या भागातील सर्व लोकांना शिक्षणाचे महत्त्व चांगल्या रीतीने समजले आहे. त्याचे कारण प्राथमिक शिक्षण देणाऱ्या तेथील जीवनशाळा हे आहे. आधुनिक शाळाशिक्षण संकल्पनेत शिक्षक व विद्यार्थी, दोघेही नववीपर्यंत सर्वांना पास करण्याच्या धोरणामुळे अभ्यासाकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे जीवनशाळाअशी मुले पुढे अभ्यासाचे महत्त्व न समजल्यामुळे बऱ्याचदा शिक्षणापासून वंचित राहतात. समाजाचे लक्ष शिक्षणाची आवड मुलांमध्ये प्राथमिक शाळांतच निर्माण होणे या महत्त्वाच्या गोष्टीकडे नाही. परंतु मुलांमध्ये तशी आवड निर्माण करण्यात, शिक्षणाचे महत्त्व त्यांच्या मनांवर ठसवण्यात यशस्वी ठरल्या आहेत हे तेथे शिकलेल्या माजी विद्यार्थ्यांना भेटल्यावर जाणवले. त्या भागातील मुले शिक्षक, डॉक्टर, इंजिनीयर अशा प्रकारचे उच्च शिक्षण घेतलेली आहेत. काही मुले पोलिस दलात गेलेली आहेत. सरकारी नोकरीला आहेत, पण त्याहून मुख्य म्हणजे शिक्षण कशासाठी घ्यावे हे त्यांना समजलेले आहे.
आम्ही मेधा पाटकर यांचे कार्यक्षेत्र असलेल्या भागाचा दौरा केला. जंगलात असणाऱ्या थुवानी येथील शाळेला भेट दिली. मुले लांबून-लांबून पायवाटेने चालत शाळेमध्ये येतात. त्या शाळेपर्यंत जाण्यासाठी व्यवस्थित रस्ता नाही. तेथील शाळेला धड पक्क्या खोल्यादेखील नाहीत. पण तेथे ‘शिक्षण’ मात्र आहे. उलट, शहरांतील शाळांमध्ये सर्व अद्ययावत सोयी असूनदेखील तेथे ‘शिक्षणा’चा अभाव जाणवतो.
थुवानी येथील डोंगराळ भागात शेती व जंगलातील संसाधने यांवर तेथील लोकांची उपजीविका चालते. त्या भागात वर्षाला एक तरी व्यक्ती विषारी साप चावल्यामुळे प्राण गमावते. कारण तेथील लोकांकडे पक्की घरे नाहीत. तसेच, शहरात असलेल्या डॉक्टरकडे जाण्यासाठी चांगले रस्ते नाहीत.
मेधा पाटकर म्हणतात, ‘शालेय पुस्तकांमधील शिक्षण हे आदिवासींना अपरिचित असे आहे. त्यांची बोलीभाषा आणि मराठी भाषा यांत अंतर आहे. तसेच, त्यांनी पुस्तकातील कित्येक गोष्टी कधी पाहिलेल्या नाहीत. मग त्यांना त्या कशा कळणार? त्यासाठी त्यांच्याकरता खास पुस्तके जीवनशाळेत बनवली गेली आहेत. त्यांमध्ये आदिवासी बोलीभाषेचा उपयोग केला गेला आहे. त्यांतील शब्द आदिवासी जीवनाशी निगडित आहेत. शासनप्रणित मराठी पुस्तकामध्ये ‘क’ म्हणजे ‘कमळ’ असे दिलेले असते. आदिवासींनी कमळ कधीही पाहिलेले नाही. मग ते अक्षर त्यांच्या कसे लक्षात येईल?’ त्यांनी तयार केलेल्या पुस्तकामध्ये ‘क’ म्हणजे ‘कुकडो’ (आदिवासी भाषेत कोंबड्याला कुकडो बोलतात) असे दिले आहे. त्यामुळे मुलांना ते चटकन समजते. मुलांना त्यांच्या संस्कृतीशी, वातावरणाशी, आजूबाजूच्या परिसराशी संबंधित अशा गोष्टी शिकवल्या, तर ती ते चटकन शिकतात असा अनुभव जीवनशाळांचा आहे. त्यांच्या भाषेतून त्यांच्या लोककथा, पारंपरिक गोष्टी त्यांना शिकवल्या जातात. जीवनाला आवश्यक असे धडे त्यांतून मुलांना मिळतात. सुरुवातीचे शिक्षण मातृभाषेतून असल्यामुळे मुलांची अभ्यासातील रुची आपोआप वाढू लागते.
शाळेमध्ये त्यांना अभ्यासाबरोबर इतर अनेक गोष्टी लहान लहान उपक्रमांमधून शिकवल्या जातात. जसे, की शाळेची साफसफाई, सजावट, बागकाम, शेतीकाम, खाण्याचे विविध पदार्थ बनवणे. त्या बरोबरीने मुलांना कोठलाही विषय समजण्याकरता शिक्षक त्या विषयावरील छोट्या नाटिका बसवतात. मुले त्यांचे सादरीकरण करतात. त्यामुळे विविध विषयांचे ज्ञान मुलांना होते. आदिवासी हे मुळातच काटक आहेत. त्यांची शारीरिक क्षमता उत्तम असते. ती लक्षात घेऊन त्या मुलांना विविध खेळांचे शिक्षणदेखील दिले जाते. तेथील काही मुलांनी राज्य व राष्ट्रीय पातळीवर खेळांमध्ये बक्षिसे मिळवली आहेत.
जीवनशाळांचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे मुले व शिक्षक यांचे दृढ संबंध हे आहे. तेथे विद्यार्थी व शिक्षक मिळून शाळा व शाळेचा परिसर स्वच्छ करतात. त्या शाळांमध्ये लोकमान्य टिळक, जवाहरलाल नेहरु, महात्मा गांधी, भगतसिंग, शिरीषकुमार, छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, बिरसा मुंडा (आदिवासी नेते) अशा अनेक व्यक्तींची छायाचित्रे भिंतीवर लावलेली आहेत. त्या सर्व व्यक्तिमत्त्वांची माहिती विद्यार्थ्यांना गोष्टीरूपाने बालवर्गापासून दिली जाते. त्याकरता, शिक्षक स्वतः विविध विषयांचे वाचन करतात.
सर्व जीवनशाळांचा बालमेळावा फेब्रुवारीमध्ये भरतो. मुलांच्या क्रीडास्पर्धा होतात. प्रत्येक विद्यार्थ्याचे खेळातील प्रावीण्य पाहून पुढे त्याला त्याप्रमाणे प्रशिक्षण दिले जाते. आदिवासी मुलांमध्ये मुळातच काटकपणा व उत्तम आरोग्य असल्यामुळे ती मुले पुढे राज्य व राष्ट्रीय स्तरावर बक्षिसे मिळवतात. बालमेळाव्यामध्ये शिक्षक स्वतः लिहून मुलांकरता विविध सामाजिक विषयांवरील नाटिका बसवतात व मुले त्या सादर करतात. नृत्य व सामूहिक गायनाचे कार्यक्रम होतात. त्यामुळे मुलांमध्ये सभाधीटपणा वाढतो. तसेच, त्यांना विविध सामाजिक विषयांचे ज्ञान होऊन त्यांच्या विचारांचा पाया पक्का होतो.
मेधा पाटकर यांच्याबरोबर एकवीस वर्षे विविध आंदोलनांमध्ये सक्रिय सहभागी असलेले चेतनभाई हे त्यांचे कार्यकर्ते. ते आंदोलनांविषयी भरभरून सांगतात. अगदी पहिल्यांदा साडेतीनशे-चारशे लोक जेव्हा मेधा पाटकर यांच्याबरोबर जेलमध्ये बंदी बनून गेले, तेव्हाचा अनुभव चेतनभाई सांगतात,
![-students-playing-](https://thinkmaharashtra.com/wp-content/uploads/students-playing-.jpg)
“पहिल्यांदाच आम्ही जेल पाहिले. आतमध्ये खूप अस्वच्छता होती. कैद्यांना खाण्यास पोटभर अन्नदेखील मिळत नसे. आम्हाला संघटित असण्याची ताकद कळली होती. आम्ही साडेतीनशे जणांनी एके दिवशी उपोषण केले. जेलरने आम्हाला कारण विचारले, तेव्हा आम्ही सांगितले, ‘आम्हाला जेलमध्ये जे अन्न दिले जाते ते निकृष्ट दर्जाचे असते. अर्धवट कच्चे असते. पुरेसे नसते.’ आम्ही एकजुटीने ती मागणी केली. त्यामुळे त्यांना ती मान्य करावी लागली व आमच्या जेवणात सुधारणा झाली. त्यामुळे आम्हाला पोटभर अन्न मिळू लागले. आमच्यामुळे इतर कैद्यांनादेखील अन्न व्यवस्थित मिळू लागले. तसेच, जेलमध्ये साबण, तेल, वगैरे गोष्टी कैद्यांना देण्याची व्यवस्था असते. पण तेथील कर्मचारी त्या गोष्टी कोणालाही देत नसत. इतर कैद्यांना त्याविषयी माहिती नव्हती आणि कोणाला माहिती असली तरी ते मागण्याची हिंमत कोणाची नव्हती. एका जेलमध्ये तर संडासमध्ये टमरेलच ठेवलेले नव्हते ! पाणी पिण्याचे जे तुमचे भांडे असेल तेच टमरेल म्हणून वापरायचे ! आम्ही त्या गोष्टीविषयी देखील त्या जेलरकडे तक्रार केली. त्यांना ते खरेच वाटत नव्हते. पण प्रत्यक्ष आतमध्ये येऊन खात्री केल्यावर ते त्यांना पटले.
“मेधा पाटकर यांनी आम्हाला दाखवून दिले, की एकजुटीमध्ये मोठी ताकद असते. आम्ही संघटित होतो म्हणून आम्ही आमचे हक्क मिळवू शकलो. जर मेधा पाटकर आमच्यामध्ये येऊन राहिल्या नसत्या, आमच्या हक्कांसाठी लढल्या नसत्या, तर सरकारकडून आमच्यावर जो अन्याय केला गेला, आमच्या जमिनी घेतल्या गेल्या त्याची चीड येऊन येथील तरुणांनीदेखील हातात शस्त्र घेतले असते आणि हा भाग नक्षलवादी भाग म्हणून ओळखला गेला असता. पण मेधा पाटकर यांच्यामुळे येथील मुले हातात शस्त्र न घेता जीवनशाळांमध्ये जाऊन शिक्षण घेत आहेत.” खरोखरीच, चेतनभाई म्हणाले त्याप्रमाणे योग्य शिक्षण, योग्य मार्गदर्शन कशा प्रकारे समाजाची उन्नती साधू शकते हे त्या भागात गेल्यावर समजते !
![shikshanatun-jivandrushti](https://thinkmaharashtra.com/wp-content/uploads/shikshanatun-jivandrushti-1.jpg)
लतिका, ही त्या संस्थेची कार्यकर्ती गेली अकरा वर्षे त्या भागात राहून मेधा पाटकर यांच्याबरोबर काम करत आहे. ती तिचे एलएल बी चे शिक्षण पूर्ण करून एलएल एम करत आहे. लतिका सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये पत्रकारितेचा कोर्स करत असताना, त्यांचा ग्रूप ‘आझाद मैदान’ या विषयावर प्रोजेक्ट करत होता. ते सर्वजण आझाद मैदानावर जी आंदोलने व मोर्चे होतात, त्या विषयीची माहिती जमा करताना, त्या सर्वांशी संबंधित असणाऱ्या अनेक नेत्यांना भेटत होते, त्यांच्या मुलाखती घेत होते, माहिती गोळा करत होते. ते सर्वजण मृणाल गोरे यांच्यासारख्या अनेक नेत्यांना भेटले. तो प्रोजेक्ट सुरू असताना तिच्या एका मित्राने सहज तिला त्यासंबंधी विचारले. त्याने सांगितले, की तुम्ही आझाद मैदानावर प्रोजेक्ट करत आहात तो मेधा पाटकर यांच्या मुलाखतीशिवाय अपूर्ण आहे. त्या मित्राने मेधा पाटकर यांचा नंबर तिला दिला. लतिकाने त्यांना फोन लावला आणि चक्क मेधा पाटकर तिच्याशी फोनवर बोलल्या ! त्यांनी तिचे फोन करण्याचे कारण ऐकून त्यांच्या दुसऱ्या दिवशी असलेल्या मीटिंगच्या ठिकाणी लतिका व तिच्या ग्रूपला बोलावले. अनेक पत्रकार तेथे होते. मेधा पाटकर यांनी प्रथम लतिकाला व तिच्या ग्रूपला त्यांच्याबरोबर आलेल्या आदिवासी कार्यकर्त्यांबरोबर बोलण्यास सांगितले. लतिका मेधा पाटकर यांच्या वागण्यातील साधेपणा, त्यांची अन्यायग्रस्तांकरता असलेली तळमळ पाहून नर्मदा परिसरातील त्यांचे काम बघण्याकरता गेली. उद्देश होता, की पुढे पत्रकार म्हणून काम करताना त्या अनुभवाचा तिला उपयोग होईल. परंतु तेथील काम बघण्यास गेलेली लतिका त्या कामाच्या प्रेमातच पडली आणि तीही त्या कामात सहभाग घेऊ लागली. ती ती त्या कार्याशी इतकी एकरूप झाली, की २०१० पासून ती तेथेच राहत आहे. मेधा पाटकर यांच्या कार्याचा ती भाग झालेली आहे.
संपन्न आयुष्य म्हणजे फक्त आर्थिक दृष्ट्या संपन्न असणे नव्हे, तर आनंदी आयुष्य म्हणजे जीवनातील प्रगतीचा, परिपूर्णतेचा ध्यास. स्वतःमधील क्षमतांचा परिचय करून घेत त्या दिशेने पुढे चालणे व जीवन अर्थपूर्ण करणे म्हणजे शिक्षण ! ते शिक्षण जीवनशाळा देतात.
– शिल्पा खेर 9819752524 khersj@gmail.com
———————————————————————————————-
शिल्पा खेर यांनी नर्मदा जीवनशाळेला भेट देऊन सर्व माहिती दिल्याने समाधान झाले . त्या ठिकाणांना भेट द्यावीशी वाटते
नर्मदा जीवनशाळांची चांगली माहिती मिळाली. या शाळांसोबत मला नुकताच नाशिकचा अरुण ठाकूर स्मृती पुरस्कार मिळाला. जीवनशिक्षण देण्याचे मोठे कार्य या शाळांतून होते आहे.