चुकते कई बातल आयो!

2
43

माडिया मुलांसाठी इंग्रजी शाळा

प्रकाश आमटे यांच्या ‘लोक बिरादरी प्रकल्पा’ची आगळीवेगळी एक शाळा नेलगुंडाला आहे. नेलगुंडा हे छोटेसे आदिवासी खेडे गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसाच्या पुढे सत्तावीस किलोमीटरवर आहे. त्या शाळेच्या प्रथमदर्शनी भिंतीवर लिहिले आहे, “चुकते कई बातल आयो”. त्याचा अर्थ- चुकले तर चुकले, काळजी नको!

हेमलकसा ते नेलगुंडा हे अंतर फार नसले तरी रस्ता फार खडतर आहे. मी समीक्षा आमटे यांच्याबरोबर तेथे जात होतो. समीक्षा ही बाबा-साधना आमटे यांची नातसून, प्रकाश- मंदाकिनी आमटे यांची सून, तर अनिकेत आमटे यांची पत्नी. माहेरचे आडनाव गोडसे. समीक्षा यांनी गाडी अचानक एका ठिकाणी थांबवली आणि एक दृश्य दाखवले. एका झाडाला वानर टांगलेले दिसले. ते पेंढा भरलेले होते. माडिया, गोंड लोक अशुभनिवारण म्हणून ते अशा प्रकारे झाडावर टांगतात. त्या अनुषंगाने, माझे व समीक्षा यांचे बोलणे आदिवासींच्या प्रथा-परंपरा, लोककला, लोकगीते-लोककथा यांविषयी होत होते. त्या मला मुंग्यांची वारूळे, झाडाझाडांतून सूर मारणारे विविध पक्षी यांची ओळख करून देत होत्या.

बाबा आमटे यांनी वरोरा येथील महारोगी सेवा संस्था कुष्ठरोग्यांच्या उपचारासाठी व पुनर्वसनासाठी स्थापन केली. हेमलकसाचा लोकबिरादरी प्रकल्प हा त्याच ट्रस्टचा एक भाग. प्रकाश आणि मंदा आमटे यांनी हेमलकसाच्या प्रकल्पाची पन्नास वर्षांपूर्वी जबाबदारी स्वीकारली. त्यांच्या आरोग्यसेवेतून तेथील लहान मुलांच्या मृत्यूंचे प्रमाण कमी झाले. त्या भागात मुलांच्या शिक्षणाच्या सोयी फार नव्हत्या, म्हणून त्यांनी लोकबिरादरी शाळा सुरू  केली. त्या शाळेतून बाहेर पडलेले काही माडिया विद्यार्थी खूप पुढे गेले आहेत. अहेरी येथे आरोग्यसेवा देत असलेले डॉ. कन्ना मडावी हे त्यांतील एक उदाहरण.

प्रकाश आमटे यांच्या दोन्ही मुलांनी – डॉ. दिगंत आणि अनिकेत आमटे यांनी हेमलकसापासून दूरवर असलेले खेडे म्हणून नेलगुंडा या गावी आगळीवेगळी एक शाळा 3 ऑगस्ट 2015 रोजी सुरू केली. आदिवासी भागात खोलवर शिक्षण न्यावे ही मुख्य भावना. त्या शाळेची जबाबदारी समीक्षा आमटे यांनी त्यांच्या खांद्यावर घेतली आहे. आजुबाजूच्या दहा-बारा गावांतील मुले त्या शाळेत येतात. सगळ्या वाटा जंगलातून आहेत, त्यामुळे जंगली प्राण्यांची भीती असते. एकदा मुलांच्या मागे अस्वल लागले होते! आता त्यांच्यासाठी सायकली घेतल्या आहेत.

मी तेथे गेलो तो 6 जून, म्हणजे नेलगुंडा शाळेचा शेवटचा दिवस होता. शाळा भामरागड परिसरात बरसणाऱ्या मुसळधार पावसामुळे पुढे दोन महिने बंद असणार होती. नेलगुंडाची शाळा ही पहिली ते पाचवीपर्यंत आहे. शासनाची मान्यता तिला असली तरी ती विनाअनुदान आहे, शाळा पूर्णपणे इंग्रजी माध्यमाची आहे. पण त्यामुळे ‘आम्हाला पठडीतील शाळेपेक्षा ती आमच्या पद्धतीने चालवता येते याचा आनंद आहे’ असे समीक्षा म्हणाल्या. उदाहरणार्थ, शाळा जून-जुलै मध्ये पाऊस असल्याने बंद ठेवता येते. शाळाखात्याचे धोरण एकसूत्री असते. त्यात स्थानिक गरजांचा आणि लोकांच्या समस्यांचा विचार केला जात नाही. आदिवासींच्या लोकजीवनात काही विशिष्ट सण-समारंभांना फार महत्त्व असते. त्या उलट, ज्या दिवशी सरकारी सुट्ट्या असतात, त्यांचे त्यांना तसे महत्त्व नसते. शाळा तेथील आदिवासींचे जीवन, त्यांच्या गरजा आणि भौगोलिक परिस्थिती यांच्याशी जुळवून त्यांच्या सोयीची कशी होईल, ते पाहिले जाते.

नेलगुंडाची शाळा चालवताना, आमटे कुटुंबीयांनी घेतलेल्या भूमिकेला दोन पदर आहेत. ‘शिक्षण’ ही स्वतंत्र गोष्ट नाही. राज्यशासनाने स्वत:ची प्रणाली अध्यापन आणि मूल्यांकन यासाठी निर्माण केली आहे. नेलगुंडाची शाळा स्वायत्त नाही, पण स्वतंत्र आहे. ते एक प्रकारे राज्याच्या सार्वभौमत्वाला आव्हानच आहे! दुसरीकडे, आदिवासींपर्यंत त्यांच्या सामाजिक व भौगोलिक परिस्थितीशी जुळवून घेऊन शिक्षण नेणे, ही गोष्ट आहे. मला दुसरी गोष्ट महत्त्वाची वाटते. त्यात उदारमतवाद आणि बहुसांस्कृतिकता आहे. त्या त्या समूहाचे भाषिक आणि सांस्कृतिक अस्तित्व मान्य करणे हे आहे. तो प्रवास लोकशाहीच्या शुद्ध रूपाकडे जाणारा आहे. सर्वाना शिक्षणाच्या एकाच मध्यवर्ती साच्यात कोंबण्यापेक्षा, शेवटच्या स्तरावरील समूहाला शिक्षणाच्या प्रवाहात आणताना त्याचे सत्त्व जपण्याची ती मौलिक भूमिका रवीन्द्रनाथ टागोर यांच्या भूमिकेशी सुसंगत आहे.

शाळेच्या भाषामाध्यमाबद्दल समीक्षा आमटे यांची भूमिका पटणारी आहे. तेथील मुलांची बोली मराठी नाही, ती माडिया आहे. त्यांच्यासाठी मराठी असो की इंग्रजी, दोन्ही भाषा परकीयच आहेत! त्या मुलांना शिक्षणक्रमात पुढे इंग्रजीला सामोरे जावे लागणार आहे. लोकबिरादरीच्या हेमलकसा येथील शाळेचा अनुभव पाठीशी आहेच. म्हणून शाळेच्या दैनंदिन व्यवहारात माडिया आणि इंग्रजी यांचा वापर सर्व विद्यार्थी व शिक्षक जाणीवपूर्वक करतात. जैवविविधतेप्रमाणे भाषिक विविधताही मानवी अस्तित्वासाठी महत्त्वाची आहे. किंबहुना, कला आणि जीवनमूल्ये यांचा विचार केला, तर भाषिक विविधता अधिक महत्त्वाची ठरते. एखाद्या भाषिक समूहाचे शेकडो पिढ्यांचे ज्ञान त्यांच्या भाषेतच दडलेले असते. ते त्यांच्या जैविक आणि सामाजिक पर्यावरणाचा अविभाज्य भाग असते. त्यामुळे माडिया मुलांना प्राथमिक स्तरावर त्यांच्या मायबोलीच्या कोषाचा आधार कायम असणे गरजेचे असते.

नेलगुंडा शाळेच्या परिसरात प्रवेश करताच ती शाळा आहे असे वाटतच नाही. ते जपानी पॅगोडासारखे सर्व बाजूंनी मोकळे असलेले सुंदर डोम आहेत. भोवतालच्या झाडीमुळे हवेशीर छपराखाली बसताना मुलांना बंदिस्त वर्गात बसल्यासारखे वाटत नाही. काही ठिकाणी पायऱ्या चढून उंचावर वर्गखोली तर एक नुसत्या बांबूपासून बनवलेली सुंदर झोपडी. मुलांना बसण्यासाठी चौरंगासारखी आसने. शिक्षकालाही तसेच. त्याच उंचीवर फळा.  मुलांना खेळण्या-बागडण्यास खूप खूप मोकळी जागा सोडली आहे. मुळातील लहानमोठ्या झाडांच्या आधारे जुन्या टायरसारख्या वस्तूंनी झुले बनवलेले दिसतात. विटासिमेंटचे बांधकाम कमी आहे. हिरवेगार दृश्य पहिल्याच पावसाने सगळीकडे होते.

मोकळेपणा हा तेथील केवळ वर्गखोल्यांमध्ये नाही, तर एकूण सगळ्यांच्या बोलण्याचालण्यातून सहजपणे जाणवतो. आम्ही तेथे जाऊन पोचलो, तर चौथीतील एक मुलगा समीक्षाच्या मागे हळूच गेला, त्याने तिच्या पाठीवर धपाटा दिला आणि कसे चकवले म्हणून खो खो हसू लागला! एका ठिकाणी एकाच वेळी दोन वर्ग सुरू होते. काही मुले फळ्यासमोर बसलेली, तर काही मागे चित्रे काढत किंवा मातीकाम करत असलेली. काही मुले बाहेर नुसती हुंदडताना दिसत होती. खूप मुले बाहेर मातीत खेळत होती. एका मुलाला कोठे तरी लागले, तो रडत रडत आला. सगळी मुले गोळा झाली. समीक्षाने त्याला समजावले. समजावताना भाषा माडिया आणि इंग्रजी. सगळी मुले इंग्रजीतून बोलण्याचा प्रयत्न करत होती. एकूण वातावरण उत्साही आणि प्रसन्न होते. शाळेच्या कोंडवाड्यात कोंबलेपणाचे भाव एकाही मुलाच्या चेहऱ्यावर नव्हते.

लोकबिरादारी प्रकल्प हा केवळ गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींच्या आरोग्य व शिक्षण यांपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो गांधीवादी वृत्तीने सेवाभाव जपणाऱ्या महानगरी तरुण पिढीच्या आदर्शाचा भाग झाला आहे. म्हणूनच नेलगुंडाच्या ‘साधना विद्यालया’त मुलांना शिकवण्यास मुंबई-पुण्याचे हायटेक क्षेत्रातील उच्चशिक्षित तरुण सातत्याने तेथे मुक्कामाला असतात. मी गेलो तेव्हा शाळेत ठाण्याचा कल्पेश झुंजारराव आणि डोंबिवलीचा विजय चांगण वर्ग घेताना भेटले. सामाजिक बांधिलकी आणि सेवेचे व्रत यांचा एका शब्दानेही उच्चार न करता ते गुण त्यांच्या देहबोलीतून जाणवत होते.

समीक्षा आमटे 7588772861 sam.aqua18@gmail.com

– प्रमोद मुनघाटे, pramodmunghate304@gmail.com

(साधना, 30 जून 2018 वरून उद्धृत, संस्कारित, संपादित)

About Post Author

Previous articleपाण्याचा धंदा
Next articleकोकणातील गवळी-धनगर समाज
प्रमोद मुनघाटे हे नागपूरच्या 'राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठा'त मराठीचे प्राध्यापक आहेत. ते कादंबरी, आदिवासी साहित्य, लोककला व लोकनाट्य या क्षेत्रांचे संशोधक आहेत. त्यांनी पूर्वविदर्भातील लोकरंगभूमी व खडीगंमत या विषयांवर संशोधन प्रकल्प राबवले आहेत. मुनघाटे यांनी ‘१८५७: सत्य आणि कल्पित’, ‘लंकेची पार्वती’, ‘आदिवासी साहित्य: स्वरूप व समस्या’ या पुस्तकांचे लेखन केले आहे. त्यांना महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मययनिर्मिती पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी अमेरिकेतील पहिल्या 'विश्व मराठी साहित्य संमेलना'त विदर्भाचे प्रतिनिधित्व केले होते. लेखकाचा दूरध्वनी 7709012078

2 COMMENTS

  1. लेख पूर्ण वाचला आवडला . खूप…
    लेख पूर्ण वाचला आवडला . खूप छान वाटले.

Comments are closed.