सिंगापूरच्या प्रगतीला कोविद-19 ने खीळ घातली आहे. त्याचे व्यापार उद्योगावर फारच दूरगामी-निगेटिव्ह परिणाम होणार आहेत. सिंगापूर हे आशियामधील सर्वात प्रगत आर्थिक व्यवहाराचे केंद्र मानले जाते. सेवाक्षेत्रासाठी दिल्या जाणाऱ्या सोयींसाठी जगातील सर्व राष्ट्रांमध्ये सिंगापूरचा क्रमांक सर्वांत वरचा आहे. सर्व बहुराष्ट्रीय बँका आणि कंपन्या यांनी त्यांची आशियातील मुख्य कार्यालये सिंगापूरमध्ये वसवली आहेत. सिंगापूरमध्ये साधारणपणे 20जानेवारीच्या आसपास कोविदची कुणकुणऐकण्यास मिळाली. लोक दबल्या आवाजात त्याबाबत चर्चा करू लागले. सरकारने तापमान तपासणी विमानतळ, कचेऱ्या आणि सार्वजनिक ठिकाणे येथे 1 फेब्रुवारीपासून चालू केली. सिंगापूरला सार्सच्या साथीचा अनुभव होता. त्यामुळे लोक साधा सर्दी–खोकला झाला तरीसुद्धा मास्क वापरतात. त्यामुळे कोरोनाची चाहूल लागताच लोक मास्क घालून कामावर जाऊ लागले. सिंगापूर हे आशियामधील मोठे ट्रान्झिटकेंद्र आहे. तेथे आंतरराष्ट्रीय प्रवाशांची व विमानांची ये-जा मोठ्या प्रमाणावर होत असते. तरीसुद्धा फेब्रुवारी महिना संपेपर्यंत सिंगापूरमध्ये त्याचा विशेष प्रभाव जाणवला नाही. आजूबाजूच्या देशांत जरी रुग्णसंख्या वाढत होती तरी सिंगापूरला रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवण्यात यश मिळाले. स्थानिक सरकारने सर्व सुविधा सज्ज करून ठेवल्या होत्या.
![](https://1.bp.blogspot.com/-xM8abeq_u74/XwBEeXh5fFI/AAAAAAAABC8/22kVT0FUx00GObZU8bo_LtpP-cYQDxZfgCPcBGAYYCw/s1600/_social_distance_marking.png)
रुग्णांची संख्या नंतर वाढत गेली तेव्हा, 10 मार्चनंतर सर्व कार्यालयांनी ‘वर्क फ्रॉम होम‘ सुरू केले. पाश्चिमात्य देशांतही कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत होती. त्यामुळे सिंगापूरच्या बाहेर राहणाऱ्या नागरिकांना परत आणण्यास सुरूवात झाली. त्याचा परिणाम म्हणून सिंगापूरमधील रुग्णांची संख्या आणखी झपाट्याने वाढू लागली. सरकारने ‘सर्किट ब्रेकर‘ला (साखळी तोडण्यास) 7 एप्रिलपासून सुरूवात केली. सर्व व्यवहार ठप्प झाले. फक्त अत्यावश्यक वस्तूंची दुकाने वगळून सर्व गोष्टी बंद करण्यात आल्या. मास्क बंधनकारक करण्यात आले. कुटुंबातील एकाच व्यक्तीस बाहेरून वस्तू आणण्यास सांगितले गेले. पण बस व एमआरटी मात्र दिवसभर चालू होती.
![](https://1.bp.blogspot.com/-mwgNgEdMWXY/XwBEj-iqHSI/AAAAAAAABC8/xiedqs0Lgjso8syd2fgp4OQNoQcd4zpVwCPcBGAYYCw/s1600/_temp_checking_.png)
खाण्यापिण्याची सर्व दुकानेही चालू होती मात्र, तेथे बसून खाण्या-पिण्यास मनाई होती, पदार्थ घरी घेऊन जाता येत असत. कचेऱ्यांमध्ये दहा टक्के लोकांना कामास परवानगी देण्यात आली. कचेऱ्यांमध्ये जी कामे चालू होती त्यांना सिद्ध करावे लागे, की ती कामे घरून का करता येऊ शकत नाहीत? शाळा बरेच दिवस चालू होत्या, मात्र ज्या मुलांचे आईवडील अत्यावश्यक नोकऱ्यांमध्ये आहेत त्या मुलांना फक्त शाळेत येण्यास परवानगी होती; बाकी मुलांना होम बेस्ड लर्निंग. त्यामुळे शाळांमध्ये वीस ते तीस टक्के मुले असत. शाळांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या बदलून घेण्यात आल्या. आरोग्यमंत्री, पंतप्रधान आणि अन्य सरकारी अधिकारी हे लोकांना माहिती देत.
![](https://1.bp.blogspot.com/-w8MiNF-93nU/XwBE0cRuAaI/AAAAAAAABDE/xnulbREuGlkEaW43ZX7L4v5ajukclD-gACPcBGAYYCw/s1600/_singapore_stores_.png)
सरकारने नागरिकांना सर्किट ब्रेकरच्या काळात झालेल्या आर्थिक नुकसानासाठी भरपाई देऊ केली. त्यातून दुकानाचे भाडे, टॅक्सीचालकांचे हप्ते अशा रकमा भरण्याची सुविधा प्राप्त झाली. वयस्कर लोकांनाही आर्थिक मदत मिळाली. सरकारने वेगळी आर्थिक योजनाही बनवली. सिंगापूरची सर्व व्यवस्था ही आयात गोष्टींवर चालते. तेथे स्थानिक उत्पादन काहीच होत नाही. तरीही सरकारने कटाक्षाने पाहिले, की कोठल्याही परिस्थितीत खाण्यापिण्याच्या गोष्टींचा, औषध वा मास्क ह्यांचा तुटवडा पडणार नाही.
![](https://1.bp.blogspot.com/-pRtrTMwN6xo/XwBFJkpbGeI/AAAAAAAABDQ/PDTHCW33jP8eujl8lSTbGOxEXEaZxGDDgCPcBGAYYCw/s320/_quarantine_centre.png)
बाहेरूनआलेल्या व्यक्ती वा स्थानिक कुटुंबांमध्ये आढळलेल्या व्यक्ती व मुले यांना क्वारंटाइन करण्यासाठी सर्व सुविधा सरकारने सज्ज केल्या होत्या. कायदेपालन आणि सिंगापूर ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. सिंगापूरमध्ये नागरिक प्रचंड शिस्तप्रिय आणि कायदेपालन करणारे आहेत. ते मेहनती, हुशार आणि व्यावहारिक आहेत. सरकारने जेवढे प्रयत्न सुविधा पुरवण्यासाठी केले, नागरिकांनी तेवढेच प्रयत्न नियमांचे पालन करण्यासाठी केले. मास्क न वापरता बाहेर पडणाऱ्या व्यक्तीला तीनशे सिंगापूर डॉलरचा दंड होता.क्वारंटाइनचा आदेश मोडणाऱ्यांची रवानगी जेलमध्ये करण्यात येई.देशाबाहेर जाऊन सार्वजनिक ठिकाणी चुकीची माहिती देणारे आणि लॉकडाऊन काळात सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणारे यांचे व्हिसा नेहमीसाठी रद्द केले गेले. एका व्यक्तीला फक्त अर्धा तास आधी क्वारंटाइनमधून बाहेर पडल्याबद्दल सहा आठवड्यांची कारावासाची शिक्षा झाली हे मी पाहिले आहे. एका विदेशी नागरिकाने सरकारी कार्यालयात जाऊन चुकीची माहिती दिल्याबद्दल व्हिसा रद्द करण्यात आला. मास्क न घालता सार्वजनिक ठिकाणी सरकारी अधिकाऱ्यांशी हुज्जत घालणाऱ्या एका महिलेला कारावासाची शिक्षा देण्यात आली. मुद्दाम सांगितली पाहिजे, अशी बाब म्हणजे हे सर्व गुन्हे घडल्यापासून पंधरा दिवसांत त्यांचा निकाल लावला गेला आणि गुन्हेगारांना शिक्षादेण्यात आल्या.
डॉर्मेटरीमध्ये राहणारे कामगार ही सिंगापूरमध्ये वेगळीच समस्या आहे. त्यामुळे सर्वात कमी रुग्ण असणाऱ्या सिंगापूरचा आकडा ASEAN देशांमध्ये सर्वात जास्त रुग्ण असणाऱ्या देशामध्ये परिवर्तित झाला. बाहेरच्या देशांतून बांधकाम क्षेत्रात काम करण्यासाठी सिंगापूरमध्ये बरेच कामगार येत असतात. ते सर्व कामगार पैसे कमावून परत जाण्याच्या उद्देशाने येतात. त्यामुळे ते स्वस्त डॉर्मेटरींमध्ये राहतात. त्यांची तेथे दाट लोकवस्ती असते. त्यामुळे तेथे कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड झाला आणि पसरलादेखील. सरकारने पंचवीस हजार मजुरांसाठी क्वारंटाइन सेंटर बांधले आणि तेथे दररोज आठ हजार चाचण्या घेणे सुरू केले. रोजच्या वाढवलेल्या चाचण्यांमुळे एकूण रुग्णांचा आकडा प्रचंड प्रमाणात वाढला. मे महिन्यामध्ये रुग्णसंख्या त्रेचाळीस हजारवर गेली. पण यश असे, की त्यापैकी छत्तीस हजार लोकांवर कोरोना उपचार होऊन ते बरे होऊ शकले. मृत व्यक्तींचा आकडा फक्त सव्वीस आहे. त्यातही बऱ्याचशा व्यक्ती ह्या वयस्कर किंवा दुसऱ्या आजाराने पीडित होत्या.
सरकारने 1 जूनपासून येथील लॉकडाऊन शिथिल केला. सर्व व्यवहार 19 जूनपासून नियम घालून चालू करण्याची परवानगी दिली. सर्व ठिकाणी एक मीटरचे मार्किंग करण्यात आले. लोक ते काटेकोरपणे पाळत आहेत. अजूनही बऱ्याचशा कचेऱ्या ‘वर्क फ्रॉम होम‘ करत आहेत. शाळांमध्येपन्नास टक्के मुले शाळेत हजर असतात आणि पन्नास टक्के मुले होम बेस्डलर्निंग करत आहेत. पाचपर्यंत लोकांना खेळणे, जेवण करणे यासाठी एकत्रयेण्याची परवानगी आहे. या गोष्टी हळुहळू पूर्वपदावर येतील असा विश्वास वाटतो.
![]() |
श्रीकांत गांगल परिवारासोबत |
मी आणि माझे कुटुंब सिंगापूरला 2018साली नोकरीच्या निमित्ताने आलो. सिंगापूर मुंबईपासून पाच तासांच्या हवाई अंतरावर, विषुववृत्ताजवळ वसलेले आहे. सिंगापूरला उतरल्यावर उमटलेला पहिला ठसा म्हणजे तेथील स्वच्छता, कार्यक्षम विमानतळ आणि तेथील दक्ष व्यवस्थापण.
![](https://1.bp.blogspot.com/-7fAyK2LHU2Q/XwBFlpv-QII/AAAAAAAABDg/TTPllpOrxIE0mNc8_-5iueploZo7VYr6gCPcBGAYYCw/s320/_singapore_1.png)
सिंगापूर हे मलेशियापासून वेगळे होऊन 9 ऑगस्ट 1965 साली स्वतंत्र राष्ट्र म्हणून स्थापन झाले. त्यावेळी तो मागासलेला व गरीब देश होता. पण गेल्या पंचावन्न वर्षांत सिंगापूरने प्रचंड प्रगती केली आहे. ते आज वैभवसंपन्न राष्ट्र म्हणून गणले जाते. सिंगापूरची प्रगती आणि त्याचे यश याचे श्रेय ली कुआन येव या राष्ट्रप्रमुखास दिले जाते. सिंगापूरचे क्षेत्रफळ फक्त सातशेचौऱ्याण्णव चौरस किलोमीटर आहे, म्हणजे मुंबईपेक्षा थोडे जास्त आणि तेथील लोकसंख्या फक्त पंचावन्न लाख. तेथे ना मोठया कंपन्या आहेत ना कारखाने, तरीही ASEAN देशांची सर्व कारभार सूत्रे सिंगापूरमधून चालतात. सिंगापूरच्या यशाचे कारण सरकारची दृढ इच्छाशक्ती, दूरदृष्टी आणि नियोजन या तीन मंत्रांमध्ये आहे असे सांगितले जाते.
![](https://1.bp.blogspot.com/-RTd6fvEcMRo/XwBFvYDO9bI/AAAAAAAABDo/0d-CJIyo9Kkwg-VEgYOUm-1Vq4XSuGroQCPcBGAYYCw/s1600/_hotels_.png)
सिंगापूरमधील बरेच लोक जहाज आणि कच्च्या मालाच्या व्यवसायात आहेत. तेथे ट्रान्झीट पॉईंट आणि पर्यटन यावर अधिक भर आहे. सिंगापूरमध्ये काही बाबी प्रकर्षाने जाणवतात. येथे सर्वाना खाण्यापिण्याची प्रचंड आवड आहे आणि बरीचशी कुटुंबे तिन्ही वेळचे जेवण बाहेरच करतात. खाण्याची लोकप्रिय जागा म्हणजे ‘फूडकोर्ट‘. सिंगापूरची लोकसंख्या चीन, मलेशिया आणि भारत येथून मूळ आलेली आहे. त्यामुळे जनसंख्येमध्ये बरीच विविधता आहे. सिंगापूरमध्ये पुरुषांना दोन वर्ष राष्ट्रसेवा बंधनकारक आहे. त्यांना वयाच्या पस्तीसाव्या वर्षापर्यंत वर्षातील पंधरा दिवस कधीही राष्ट्रसेवेसाठी बोलावले जाते – मग ते डॉक्टर, वकील, नोकरी करणारे कोणीही असोत.
सिंगापूरचे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे तेथे राजकीय नेत्यांना सर्वात जास्त पगार दिला जातो. म्हणूनच सरकारमध्ये सर्वजण उच्चशिक्षित आहेत. राष्ट्र म्हणून त्यांचा जपानसारखा होण्याचा प्रयत्न आहे असे मला वाटते. देशाला ज्या प्रकारच्या तज्ज्ञतेची गरज आहे, ती लक्षात घेऊन सरकार मुलांनी काय प्रकारचे शिक्षण घ्यावे हे ठरवते; जरूर तर बाहेर देशातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या व शिक्षण देऊन आकृष्ट केले जाते.
![](https://1.bp.blogspot.com/-IPUPwdHKdjU/XwBF9kZNKzI/AAAAAAAABD4/PWDJCL99wN4bE31pZ3Km3_OrIPMiik48gCPcBGAYYCw/s1600/_shreekant_gangal_with_family.png)
– श्रीकांत गांगल shrikantg@gmail.com
श्रीकांत गांगल ब्लूमबर्ग सिंगापूर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत बारा वर्षांपासून काम करत आहेत. ते 2018मध्ये सिंगापूरला गेले. त्यांनी नाशिकमध्ये इंजिनीयरींगचे, पुणे विद्यापीठातून एमबीए आणि इंग्लंडमधून वित्त पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. ते अठरा वर्षे मुंबईत वास्तव्यास होते. त्यांची पत्नी प्राची यांनी बीए आणि एलएलबीचे शिक्षण घेतले आहे. त्यांना अनुष्का ही बारा वर्षांची मुलगी आणि अंश हा पाच वर्षांचा मुलगा आहे.
——————————————————————————————————————-
![](https://1.bp.blogspot.com/-9z7QzrwHjkQ/XwBGGQmb3fI/AAAAAAAABD8/3UuhCNUto0EPP-_Ijk3FATvgZ0Y3YyCaQCPcBGAYYCw/s1600/_singa_pore_1.png)
![](https://1.bp.blogspot.com/-mOuCbpyNwWU/XwBGGNeS77I/AAAAAAAABEA/G_rDhOEW_QINcT_H9bpE47z70mQpWaEEQCPcBGAYYCw/s1600/Untitled.png)
![](https://1.bp.blogspot.com/-oeDDTu_fIks/XwBGGrVMoQI/AAAAAAAABEA/OtDvjeyoKdQwcM9rzh28M9nQPCnlX801QCPcBGAYYCw/s320/_singapore_2.png)
————————————————————————————————–
Beautiful narration
Nicely written by a person in financial field.congrats for Good write up.Shrikant ji
श्रीकांत, उत्तम लिखाण
Well written, Shrikant!!
छान माहिती व करोनाशी लढण्याचा आत्मविश्वास आला
लेख आवडला.
माहितीपूर्ण लेख ��
आतिशय छान लेख देश मोठा का होतो कोरोनावर नियम पाळून मात करता येते
खूप छान आणि नेमकी माहिती . छान लेख !