कसेही बोला; कसेही !

0
33
picture1

सध्या शुद्ध आणि अशुद्ध या संकल्पना बादच झाल्या आहेत. भाषा अशुद्ध नसतेच, पण हे तत्त्व फक्त मराठी भाषे च्या बाबतीत मोठ्या आदराने पाळले जात आहे. बोलणे, समजणे, संज्ञापन महत्त्वाचे. सुमारे पन्नास वर्षांपूर्वी बहुजन समाजासाठी ‘जसे बोलायचे तसे लिहायचे’ असे उदार धोरण अवलंबले गेले. शुद्धलेखनाचे साधे-सोपे नियम आले. आता काहीच नियम नाहीत. कसेही बोला-कसेही लिहा. शंभरातल्या एकशेपाच जणांना प्रमाण मराठीत बोलता येत नाही! शिकवणार्‍यांनाही नाही. ठीक आहे. कोणती प्रमाण मराठी? कोणाची प्रमाण मराठी? आम्हाला ती बोलायचीच नाही. आम्ही आमच्या भाषेत बोलणार. आमच्या भाषेत शिकवणार. तुम्ही ज्या ‘शुद्ध’ मराठीची गोष्ट सांगताय, ती मुळी आम्ही नाकारतच आहोत. ‘शुद्ध’ ‘शुद्ध’ म्हणतात ती मराठी आहे कुठे? काही वर्तमानपत्रवाले ती वापरतात. आम्ही ती वाचतो, म्हणजे तिच्यावरून नजर फिरवतो. अर्थबोध झाला की झाले! आता, भाषा ही मुळी लिहिण्यासाठी नाही. ती एकाचे बोलणे दुसर्‍याला कळणे एवढ्यापुरती शिल्लक आहे आणि तेवढे पुरे आहे. शिवाय इथे लिहायचे आहे कोणाला? आणि मराठी? ते तर नाहीच नाही.

प्रभा गणोरकर (दैनिक सकाळ, 31-05-09)

ठार मारणे – एक अनुचित वापर

 

दूरचित्रवाणी वर आणि वृत्तपत्रांत आपण ‘अपघातात अमुक इतकी माणसे ठार झाली’ अशी बातमी बघतो. माझ्या मते, ‘ठार मारणे’ हा शब्दप्रयोग युद्धात करतात. युद्धाच्या वेळी शत्रुपक्षातील सैनिक मेले तर ‘हे सैनिक ठार झाले’ असे म्हणणे योग्य होईल. अपघाताच्या वेळी जर माणसे मेली तर ‘अमुक इतकी माणसे दगावली’ असे म्हणावयास हवे. अपघातात कोणी कोणाला ठार मारत नाही. स्कूटरच्या अपघातात एखादा मेला तर लगेच आपण ‘स्कूटर अपघातात ठार झाला’ असे म्हणतो. ते मला अनुचित वाटते.

 

प्र.चिं,शेजवलकर – एसएम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट एज्युकेशन 47/16 एरंडवणे, कर्वे रस्ता, पुणे 411 004.

दूरध्वनी (022) 2544 9743/2543 0327 (‘भाषा आणि जीवन’मधून)

 

मराठी भाषेसंबंधातील प्रभा गणोरकर यांचे सर्वसाधारण स्वरूपाचे आणि प्र.चिं.शेजवलकर यांचे विशिष्ट शब्दप्रयोगाबाबतचे अशी पत्रे येथे पुन:प्रसिद्ध केली आहेत. भाषेच्या वापराबाबतची अशी पत्रे अधूनमधून प्रसिद्ध होत असतात. त्यांमधून सर्व संवेदनाशील मराठी भाषिक मंडळींना मराठी भाषेच्या वापरामधील अराजक गेल्या काही वर्षांत अधिकच जाणवत गेले आहे.

दुसर्‍या बाजूला काही विधायक घटनाही घडत आहेत. ‘भाषा आणि जीवन’ या मराठी अभ्यास परिषदेच्या नियतकालिकात शब्दांची व्युत्पत्ती, शब्दांचा वापर यासंबंधात चर्चा घडत असतात. ‘सकाळ’ दैनिकाच्या साप्ताहिक आवृत्तीत यु.म.पठाण एकेक शब्दप्रयोग घेऊन त्याचे विकसन कसे झाले याची चर्चा झकासपणे मांडत असतात. प्रा. ब्रम्हानंद देशपांडे यांचे शब्दांच्या व्युत्पत्ती व त्यांचा वापर याबाबतचे पुस्तक प्रकाशनाच्या मार्गावर आहे.

या सर्व परिस्थितीत मराठी भाषेच्या उपयोगासंदर्भातील काही मजकूर दर बुधवारी ‘थिंकमहाराष्ट्र डॉट कॉम’ या वेबपोर्टलवर अपलोड केला जाईल त्याबाबत वाचकांकडून खुली चर्चा व्हावी अशी अपेक्षा आहे.

दिनकर गांगल- संपादक, ‘थिंकमहाराष्ट्र डॉट कॉमइमेल : thinkm2010@gmail.com 

Last Updated On – 16th Nov 2016

About Post Author

Previous articleऋजुता दिवेकर – तू आहेस तुझ्या अंतरंगात!
Next articleछोटी राज्ये हितकर
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.