एकमेवाद्वितीय गोंधळीण

सुलभा सावंत यांनी पारंपारिक धार्मिक स्वरूपाच्या लोककलेला आधुनिक कार्यक्रमाचे स्वरूप दिले ते ‘भक्तिरंग’च्या रुपाने..

“ ९ ८…….” एकेक आकडा सावकाशपणे उच्चारत संपूर्ण मोबाइल नंबर सांगून झाला आणि समोर उपस्थित बहुतेक जणींनी तो भारावल्या अवस्थेत लिहून घेतला. महिला-मेळाव्यानिमित्त बहुसंख्येने एकत्र आलेला तो समस्त स्त्रीवर्ग आनंदून गेला होता. त्या आधीचे दोन तास सभोवतीचे सर्व जग विसरून गेल्या होत्या. काहींनी हातांनी ताल धरत, टाळ्या वाजवून आणि काहींनी रंगमंचावर जाऊन आणि रंगमंचाजवळच्या जागेत नृत्य सुरू करुन कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

हा मनोवेधक कार्यक्रम घडवून आणणा-या व्यक्तिसमूहाच्या केंद्रस्थानी होत्या सुलभा सावंत. त्या ओळखल्या जातात ‘महाराष्ट्रातील पहिली संबळवादक’ म्हणून. ‘सुलभा सावंत आणि संबळ’ हे समीकरणच झाले आहे. त्यांचा स्वभाव लहानपणापासून धाडसी. त्यात त्या पोलिसखात्यात असलेल्या त्यांच्या वडिलांबरोबर खूप फिरल्यामुळे त्यांचे डॅशिग व्यक्तिमत्त्व तयार झाले आहे. काहीतरी वेगळे जगायचे अशी त्यांची मानसिकता आहे. त्यांना गाण्याची आवड मातुल घराण्याकडून वारसा म्हणून मिळाली. ती आवड जपण्यासाठी त्या डोंबिवलीतल्या रागिणी भजन मंडळात सामील झाल्या. सुलभा त्या मंडळाच्या नलिनी जोशी ह्यांना आपल्या गुरू मानतात. भजनी मंडळात जोगवा वगैरे गाण्यासाठी संबळवादकाची गरज होती. गोंधळामध्ये गायली जाणारी गाणी संबळवादनाशिवाय अपुरी वाटतील, म्हणून नलिनी जोशी यांनी सुलभा यांना संबळवादन शिकायला सांगितले. सुलभा यांना र्‍हिदम वाद्ये वाजवल्यामुळे वाद्याची समज होती, त्याही संबळ शिकण्यास तयार झाल्या.  

त्या संबळाच्या शोधात निघाल्या. ते १९८६ साल होतं आणि इथून त्यांच्या जीवनातील नवीन पर्वाचा उदय झाला. त्या परंपरागत संबळ-वादकांकडे संबळ बघायला गेल्या तेव्हा त्यांना असे सांगितले गेले, की संबळावर स्त्रीची सावलीदेखील पडू देत नाहीत! बाईला संबळ शिकवणे ही तर अशक्य गोष्ट आहे. पण सुलभा यांनी जिद्दीने संबळ मिळवले आणि एकलव्यासारखी साधना करत त्यात प्रावीण्य कमावले. रागिणी भजनी मंडळाचे ते मोठेच आकर्षण झाले. या मंडळाचे महाराष्ट्रात आणि भारतातही खूप ठिकाणी कार्यक्रम झाले.

पण गंमत अशी, की त्याच काळात संबळ हे वाद्य त्यांच्या जीवनाचाही भाग बनून गेले आणि भजनी मंडळातील मर्यादित सहभागाबद्दल त्यांना अपुरेपण जाणवू लागले.

संबळ हे वाद्य कुलधर्म, कुलाचार, परंपरा म्हणून उपयोगात येते. गोंधळी गाताना तुणतुण्याबरोबर सोयीचे वाद्य म्हणून ते वापरतात. गोंधळ हा संबळेच्या तालावर आकार घेतो. संबळाचे जे दोन भाग एकत्र जोडलेले असतात त्यातल्या एकाला नरसंबळ आणि दुस-याला मादीसंबळ असे म्हणतात. नरसंबळ डग्ग्याचे बोल पुरवते व मादीसंबळ तबल्याचे बोल पुरवते. नरसंबळावर डग्ग्यासारखी शाई असते. संबळावर वाजवण्यासाठी खास आराटीच्या मुळीचा आकडा तयार केलेला असतो. त्यामुळे संबळाचा आवाज घुमून श्रोत्यांच्या शरीरात कंप पावत शिरतो.

संबळवादनात प्रावीण्य मिळाल्यावर, सुलभा यांचे लक्ष गोंधळाकडे गेले. पण गोंधळ घालणे शिकवणार कोण? त्या व्यवसायातले धर्मांध लोक विरूद्ध होते. त्यांच्यापैकी कुणालाही ही गोष्ट रूचणारी नव्हती. जातीबाहेरच्या स्त्रीने हे धाडसच करू नये हाच विचार प्रबळ होता. पण सगळ्या अडथळ्यांवर मात करत, संघर्ष करून सुलभा संबळ गळ्यात अडकावून ‘गोंधळ’ घालण्यासाठी उभ्या राहिल्या आणि जिंकल्याही!

गोंधळ काय असतो तर मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र ह्या भागात घरी मुंज, लग्न असे काही शुभकार्य पार पडले की कुलाचार म्हणून देवीची स्तुतिपूजा आणि त्याचबरोबर मनोरंजन, श्रमपरिहार होईल असा कार्यक्रम, ज्यात आख्यान, गायन-वादन आणि जागरण असते. कुलाचाराबराबेर कथागीत, विधिगीत, उपासनानृत्व, विधिनाट्य आणि लोकधर्मी नाट्य यांचा सुंदर मिलाफ म्हणजे ‘गोंधळ’ आणि हा ‘गोंधळ’ घालणे हाच परंपरेने, पिढ्यानपिढ्या व्यवसाय करणारे गोंधळी ही जात लावतात. त्यांच्यात पोटजाती आहेत, घराणी आहेत. तुळजाभवानी आणि रेणुकाआई ह्या त्यांच्या स्तुतिदेवता, ज्यांची स्तुती करत, गोंधळी घरोघर, गावोगावी हिंडत असतात. त्यांची, वर्षांनुवर्षे गायली जाणारी गाणी आजकालच्या सिनेसंगीतातल्या देवादिकांच्या गाण्याचे मूळ स्त्रोत आहेत. काही काही लोकप्रिय गाणी जशीच्या तशी उचलली जातात.

सुलभा यांनी संबळवाद स्वत: आत्मसात केले, पण गोंधळ कसा शिकणार हा प्रश्न होता. प्रकाश खांडगे ह्यांचा पाठिंबा, लोकगीत, लोककथा, लोककला आणि लोकउपासक यांच्याशी बालपणापासूनचे ऋणानुबंध आणि ज्या संस्कृतीत जन्म झाला त्या लोकसंस्कृतीच्या आभाळांतील चंद्र-चांदण्या शोधणारे गणेश हाके ह्यांचा स्नेह व त्यांचे पुस्तक त्यांच्या मदतीला आले. ‘गोंधळ’ अर्थात ‘जांभूळ आख्यान एक शोध’ ह्या पुस्तकाने त्यांना खूप काही शिकवले. त्यांनी अभ्यासाने आणि परिश्रमाने गोंधळ घालण्याची कला, क्षमता आणि पध्दत मिळवली.

वजनदार संबळाची जोडी गळ्यात अडकावून लय, ताल आणि तोल सांभाळून, तडफदार गायन करत दोन-तीन तास खूप आत्मविश्वासाने आपली कला सादर करण्याचे आव्हान सुलभायांनी यशस्वीपणे पेलले ; सगळ्या समाजाला आपली कदर करायला लावणे भाग पाडले.

ज्या समाजाने त्यांना संबळ शिकवणे नाकारले होते त्या समाजाकडून त्यांना सन्मानपूर्वक आमंत्रणे येऊ लागली. अखिल भारतीय गोंधळी समाजाचे अधिवेशन १९८८ साली पुण्यामध्ये भरले होते. त्यात सुलभा यांचा पहिली स्त्री संबळवादक म्हणून सत्कार झाला. पार्श्वभूमी नसताना एका बाईमाणसाने ह्या क्षेत्रात एवढे पुढे जाणे हे कौतुकास्पदच! कदाचित कुठल्याही पुरूष गोंधळ्यालाही आजवर मिळाले नसतील एवढे सन्मान आणि पुरस्कार त्यांना लाभले. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीकडून २००५ साली लाभलेला ‘हिरकणी पुरस्कार’ हा त्यांना सर्वोच्च गौरवाचा वाटतो. त्यांना खेडोपाडी आणि घरीदारी मिळणारे प्रेम, कौतुक आणि आपुलकी मोलाची वाटते. त्यांनी खूप उपेक्षा आणि निंदाही झेलली आहे. त्यांचे म्हणणे असे आहे की “मी कौतुकाच्या फुलांनी बहरून जात नाही आणि निंदेच्या दगडांनी ठेचकाळून निघत नाही.”

काळाच्या ओघात ‘गोंधळा’चे स्वरूप बदलत आहे. आख्यान, कथा वगैरेला फाटा देऊन फक्त पूजा आणि गाणी एवढे मर्यादित स्वरूप त्याला प्राप्त होऊ लागले आहे. शहरात कोणतीही गोष्ट आता Celebration म्हणून होते. लग्नानंतर गोंधळाचे Celebration एक तास चालते.

सुलभा गोंधळी समाजाच्या नाहीत आणि ज्यांच्या घरात गोंधळ घातला जातो त्या घराचाही तो कुलाचार असेल-नसेल, पण सुलभा यांचे म्हणणे असे, की गोंधळ कोणीही आपल्या कुलदैवताची स्तुती करण्यासाठी घालू शकतो. तर बदललेल्या गोंधळाचे छान आयोजन त्या ‘भक्तिरंग’ ह्या त्यांच्या संस्थेकडून करतात. तबला, ढोलक, नृत्यनिपुण कलाकार, पेटी, झांज आणि त्यांचे संबळ ह्या सर्वांचा एकत्रित प्रयोग छान सजतो. त्यांनी आतापर्यंत घातलेले गोंधळ आणि भक्तिरंगाचे कार्यक्रम ह्यांची संख्या आहे एक हजार सातशेत्र्याहत्तर !

त्यांनी संबळवादन शिकवण्यासाठी वर्ग काढले पण उल्लेखनीय शिष्य तयार झाले नाहीत, ही त्यांची खंत आहे आणि तबल्या-डग्ग्याचे महत्त्व संबळच्या जोडीला नाही ह्याचाही त्यांना विषाद वाटतो. या कलाप्रकारात फार आस्था राहिलेली नाही असा अनुभव त्यांना आला.

वैयक्तिक पातळीवर, त्या स्त्रियांच्या सन्मानासाठी, अन्यायग्रस्त महिलांना मदत करण्यासाठी नेहमी सजग असतात. कोणीही माझी मदत रात्री-अपरात्री मागावी असे त्या जाहीरपणे सांगतात. गोंधळात किंवा ‘भक्तिरंगा’च्या कार्यक्रमात, देवासमोर जसे दानपात्र असते तशी एक ‘परडी’ असते, त्यात सढळ हस्ते दान करण्याचे आवाहन त्या जनतेला करतात. जनताही त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद देते. ह्या दानाचा ‘विनियोग’ त्या विधवा, परित्यक्ता आणि त्यांची मुले ह्यांच्यासाठी करतात, कुठेही दुर्लक्षल्या जाणा-या विधवा, परित्यक्ता किंवा काही कारणाने भेदभाव वाट्याला आलेल्या स्त्रियांना त्या आवर्जून पूजा करायला बोलावतात. हळदकुंकू न करता तिळगूळ समारंभ करा, मला आणि ह्या सगळ्यांना बोलावा असा आग्रह धरतात.

पुरुषांच्या क्षेत्रात पाय घट्ट उभारून राहिलेल्या, आपली पुरोगामी धाडसी मते आग्रहाने सांगणा-या सुलभा सावंत परखड, त्वेषाने बोलणा-या, जोशात गाणा-या! त्यांच्या गाण्याने आणि संबळवादनाने श्रोते आनंदी, उत्साही आणि चकितही होतात. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून आणि संबळातून प्रवर्तित होणारे चैतन्य सभोवतालचे वातावरण भारून टाकते. अशाच भारावून गेलेल्या, सुरूवातीला उल्लेख केलेल्या स्त्रियांनी फोननंबर फक्त टिपून घेतला नाही तर, ” आम्ही खूप खूष झालो. दोन तास अगदी छान गेले” असे त्या कार्यक्रमानंतर आवर्जून फोन करुन सुलभा यांना कळवले. दोन भगिनींनी त्यांची मदतही मागितली आणि उत्साही सुलभा यांनी त्यांनाही प्रतिसाद दिला!

– ज्योती शेट्ये

About Post Author