‘आदिम ते हायटेक’

0
24

जव्हार पर्यटन केंद्र केल्याने मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखले जाते. पर्यटक येथे केवळ भटकंती, निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठीच येत नाहीत तर त्यांची पहिली मागणी असते ती ‘मोहाच्या दारूची आणि तेथील आदिवासी तरुणीची’. अशा प्रकारे तेथील जीवन भ्रष्ट होत आहे. आदिवासी आपली लोककला संस्कृती नष्ट होत चाललेली पाहत आहेत. ते नागरी प्रलोभनांना बळी पडून आपल्याच समाजबांधवांवर अन्याय करण्यास कारणीभूत होत आहेत.

आदिम ते हायटेक

आधुनिक जमान्यातील स्त्रीचे शोषण

– गीतांजली राणे

ठाणे जिल्ह्यातील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेले जव्हार हे ठिकाण म्हणजे आदिवासी क्षेत्र. याच भागातील एका आदिवासी स्त्रीची गावातील तरुणांनीच ब्लु फिल्म तयार केली. ही ब्लु फिल्म प्रत्येकी शंभर रुपयांना विकण्यात आली. जेव्हा हा प्रकार गावातील लोकांना समजला तेव्हा या स्त्रीवर अन्याय झाला म्हणून गावक-यांनी आंदोलन केले. परंतु याच गावक-यांनी नंतर ‘ही स्त्री गावाला कलंक आहे’ म्हणून तिलाही गावाबाहेर काढले. गेल्या आठ महिन्यांपासून ही स्त्री गावातील पोलिस स्टेशनमध्ये राहते. ज्या मुलांनी तिच्यावर ही वेळ आणली ती मुले मात्र गावात राजरोसपणे राहतात-हिंडतात-फिरतात. त्यातील एका मुलाचे दरम्यानच्या काळात लग्नदेखील झाले. या भागातील भाजपच्या आमदाराने तर ‘ही स्त्री आरोपी आहे आणि तिला कठोर शिक्षा झाली पाहिजे’ असे प्रतिपादन केले आहे. गावातील लोक काहीही झाले तरी या पीडित स्त्रीला गावात घ्यायला तयार नाहीत!

डावीकडून ज्योती आंबेकर, प्रतिमा जोशी, खासदार सुप्रिया सुळे, आमदार निलम गो-हे, सुरेखा दळवी.मुंबई पत्रकार संघ व टेकथिंक कम्युनिकेशन्स यांच्या विद्यमाने ज्येष्ठ पत्रकार युवराज मोहिते यांच्या ‘आदिम ते हायटेक’ या माहितीपटाचे अनावरण व त्यासंबंधी परिसंवाद ४ सप्टेंबर २०१० रोजी आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी खासदार सुप्रिया सुळे, आमदार निलम गो-हे, ज्येष्ठ पत्रकार प्रतिमा जोशी, आदिवासींसाठी काम करणा-या सुरेखा दळवी उपस्थित होत्या. त्यांना ज्योती आंबेकर यांनी बोलते केले. लघुपट संपल्यावर प्रत्येकजण गंभीर जाणवत होता. मुंबई पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रसाद मोकाशी यांनी या पाच मान्यवरांचा उल्लेख ‘पंचकन्या’ म्हणून केला.

लघुपट पाहिल्यानंतर उद्विग्न होऊन हा सारा प्रकार चीड आणणारा आहे असे मत आमदार निलम गो-हे यांनी व्यक्त केले. त्या म्हणाल्या की, समाजातील इतर चांगल्या बदलांपेक्षा तांत्रिक प्रगती या दुर्गम भागातही त्वरेने पोचत आहे. कदाचित आदिवासी समाजातील स्त्री या बदलांनांच बळी पडू लागल्यात.

सुप्रिया सुळेंनी ‘मी महाराष्ट्रात राहते आणि त्या ठिकाणी असा प्रकार घडतो याची मला अत्यंत लाज वाटते’ असे मत मांडले. त्या स्त्रीला न्याय मिळवून देण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन असे त्या म्हणाल्या.

‘ आदिम ते हायटेक’ या लघुपटाच्या सीडीचे प्रकाशन करताना : डावीकडून युवराज मोहिते, ज्योती आंबेकर, प्रतिमा जोशी, खासदार सुप्रिया सुळे, आमदार निलम गो-हे, सुरेखा दळवी, प्रसाद मोकाशी.सुरेखा दळवी या आदिवासींचे प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून सोडवतात, त्यांच्या हक्कांसाठी लढा देतात. त्यांनी काही वर्षांपूर्वीची मुक्त आदिवासी स्त्री आणि आताची, आधुनिकतेच्या कचाट्यात अडकून अत्याचारांना बळी पडणारी स्त्री हा फरक स्पष्ट केला व स्त्रीचे प्रश्न उदाहरणांतून समोर आणले. सुरेखा दळवी यांचे काम जव्हार भागातही आहे. त्या म्हणाल्या, की जव्हार पर्यटन केंद्र केल्याने मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखले जाते. पर्यटक येथे केवळ भटकंती, निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठीच येत नाही तर त्यांची पहिली मागणी असते ती ‘मोहाच्या दारूची आणि तेथील आदिवासी तरुणीची’. अशा प्रकारे तेथील जीवन भ्रष्ट होत आहे. आदिवासी आपली लोककला संस्कृती नष्ट होत चाललेली पाहत आहेत. ते नागरी प्रलोभनांना बळी पडून आपल्याच समाजबांधवांवर अन्याय करण्यास कारणीभूत होत आहेत. प्रतिमा जोशींनी बायकांना अजून व्यक्तिस्वातंत्र्य मिळाले नसल्याचा मुद्दा अधोरेखित केला. पण म्हणून एक विशिष्ट अशी परंपरा जपणा-या आदिवासींनी हायटेक व्हायचेच नाही का? असा प्रश्नही या निमित्ताने समोर आला.

स्त्रीवरील अत्याचाराच्या कहाण्या नवीन नाहीत. कोणत्या ना कोणत्या प्रकारे समाजातील कोणत्याही स्तरातील स्त्री ही अत्याचारांना बळी पडत असते. मग ती गरीब असो वा श्रीमंत, सवर्ण असो वा दलित. स्त्रीवर अत्याचार हा ठरलेलाच. फक्त काळानुरूप या अत्याचारांच्या पध्दती मात्र बदलल्या. अशीच आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अत्याचारित झाली एक आदिवासी स्त्री. गेली आठ महिने ही पीडित महिला न्यायाच्या प्रतीक्षेत आहे!

तिच्यावरील अन्यायाला वेगळ्या माध्यमातून वाचा फोडली ती युवराज मोहिते यांनी. त्यांनी या स्त्रीचे दैन्यावस्था दाखवणारा माहितीपट ‘आदिम ते हायटेक’ या शीर्षकाखाली तयार करून, तिची दुरवस्था समाजासमोर आणली आहे.

‘घोटुल’सारखी अनोखी, स्वातंत्र्य जपणारी पध्दत जगणारे आदिवासी या स्त्रीच्या बाबतीत इतके कठोर कसे झाले? हा आधुनिकतेचा परिणाम म्हणायचा का?

युवराज मोहिते यांचे मनोगत

लघुपट निर्मितीचे कारण सांगताना युवराज मोहिते म्हणाले, की मी खूप ‘डेस्परेट’ झालो होतो. त्यामुळे अशा प्रश्नांना भिडण्यासाठी, समाजासमोर त्याचा लेखाजोखा प्रखरपणे, वास्तवादी पद्धतीने मांडावा यासाठी माझा हा प्रयत्न आहे. मी माझे काम केले आहे. आता समाजाने, येथे बसलेल्या पत्रकारांनी प्रेरणा घेऊन पुढील वाटचालीस आरंभ केला तर मला आनंद होईल.

पूर्वीचे गुन्हे(क्राईम) हे इंडियन पिनल कोड (आयपीसी) याआधारे अधोरेखित होत व त्यांना त्याप्रमाणे योग्य ती शिक्षा मिळण्याची तरतूद असे. परंतु जमाना झपाट्याने बदलत गेला. आधुनिक तंत्रज्ञानाने विस्मयकारक गोष्टी निर्माण होऊ लागल्या आहेत आणि अशा या ‘हाय-टेक’च्या जमान्यात गुन्हेगारीचे स्वरूपही बदलत आहे. त्याप्रमाणे कायद्यातही काय काय बदल करण्यात आले ते जाणून घेण्यासाठी मी या विषयात ओढला गेलो आणि त्या सुमारासच ही कथित घटना जव्हारमध्ये घडली होती. त्यासाठी मी जव्हारला अभ्यासासाठी गेलो. तिकडचे ते सर्व वातावरण पाहून मी सर्दच झालो. ‘हाय-टेक’च्या गुन्हेगारीने आपल्यापुढे मोठे आव्हान उभे केले आहे. याची जाणीव झाली. मोबाईल, तोही कॅमेरावाला आज बहुतेकांच्या हातात खेळत आहे. पुढे तर तो सर्वव्यापी सर्वांच्याच हाती येईल. गंमती-गंमतीत लोक त्याचा वापर करतात पण त्यापुढे असणारे धोके अधिकाधिक वाढणार आहेत. त्याची जाण यावी म्हणून लोकांना सजग करणं, कायदा कसा लागू होतो त्याचं ज्ञान देणं फायद्यांच ठरणार आहे.

बलात्कारित स्त्रीकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन हा पूर्वीच्या काळी विधवा झालेल्या बाईला जसं तिचं सर्वस्व गेल्यावर समाज वागवत होता तसा समाज तिच्याकडे बघत आहे. हा दृष्टिकोन बदलणे जरूरीचे आहे. राममनोहर लोहिया यांचे विचार या कामी महत्त्वाचे कार्य घडवतील असे वाटते. त्यांनी त्यांच्या ‘नर-नारी’ या पुस्तकात समाजाने स्त्रीच्या ‘योनि-शुचिते’ला दिलेले महत्त्व हे कसे तकलादू आहे यावर प्रकाश टाकला आहे.

बलात्कारित स्त्री, त्यातील शारीरिक अत्याचार, लैंगिक अत्याचार, यावर अभ्यास करता-करता मी याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी मी त्या शोषित महिलेच्या नातेवाईकांना, गावक-यांना, राजकारण्यांना, पोलिसांना आणि समाजसेवक असलेल्यांना, दस्तुरखुद्द त्या महिलेला सुद्धा भेटलो. त्यामुळे माझ्यासमोर उभ राहिलेले चित्र पाहून मी खूपच हवालदिल झालो. हिटलरचा ‘नरसंहार’ पाहून होते तसे मला झाले होते. दोन दिवस अन्नावरची वासनाच उडाली होती. मी फार कासावीस झालो होतो आणि समाजाचा हा विद्रुप असा चेहरा दाखवण्यासाठी मी ‘समाज आरसा’ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हे शोषण म्हणजे हिमनगाचे केवळ वरचे टोक आहे.

– गीतांजली राणे

भ्रमणध्वनी : 8976077747

ईमेल : rane.geet@gmail.com

About Post Author

Previous articleमहाराष्ट्र देशी असावे
Next articleठणकतं दुःख
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.