अतुल धामणकर – वन्यजीवनाचे भाष्यकार (Atul Dhamankar)

11
156

अतुल धामणकर गेली वीस वर्षें जंगलात फिरत आहे. त्याने आयुष्याची तेवीस वर्षे ‘ताडोबा अंधारी व्याघ्रजतन प्रकल्प’ या व भारतातील इतर अभयारण्यांत अभ्यासासाठी घालवली; हरीण आणि वाघ यांचे जवळून निरीक्षण केले. अतुलला त्याचे वीस वर्षांचे ताडोबातील रात्रीबेरात्रीचे खडतर, त्रासदायक वास्तव्य आणि त्याला शालेय जीवनापासून अरण्याबद्दलची असणारी आवड… या गोष्टी जपून ठेवाव्याशा वाटतात. त्याने सुरुवातीला घरच्यांचा विरोध पत्करून स्वतःच्या आवडीचा ध्यास सुरू ठेवला. आता आईबाबा, पत्नी- सगळे त्याला सहकार्य करतात. त्याचा धाकटा भाऊ आशीष हा तर जंगलातील मोहर्ली गावातच स्थायिक झाला आहे. अतुलचे आईबाबाही तेथे राहतात!

अतुल शाळेत असताना चंद्रपूरजवळील जुनोनाच्या जंगलात पक्षीनिरीक्षणासाठी जात असे. त्याची आवड इतर मुलांपेक्षा वेगळी होती. अतुलला संदर्भ म्हणून त्यावेळी पुस्तके मिळत नव्हती. नातेवाईक त्याच्यासाठी पुस्तके आणायचे, पण ती त्याच्या छंदासाठी उपयोगाची नसत. अतुलने त्याचा छंद सातत्याने जोपासला. अतुलची बारावी झाली. इतर मुले डॉक्टर वा इंजिनीयर होण्यासाठी धडपडत असताना, अतुलने मात्र करिअर म्हणून जंगल निवडले!

अतुलने भारतातील सर्व प्रमुख जंगले पिंजून काढली आहेत. पायपीट हा त्याच्या जीवनक्रमाचा भाग झाला आहे. पण तेवढ्यावर संपत नाही. अतुलचा भ्रमण, प्रबोधन आणि लेखन असा त्रिवेणी प्रवास आहे. गळ्यात कॅमेरा आणि सोबत असलीच तर त्या जंगलातील एखादी परिचित असामी. त्याने त्याच्या भ्रमंतीला बोलके व अधिक परिणामकारक करण्यासाठी विद्यालयीन-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी शिबिरे घेतली, ‘भ्रमणगाथा जंगलाची’ नावाचा कार्यक्रम सुरू केला, त्यात भौगोलिक परिस्थिती व जैविक विविधता बघण्यासोबत अनुभवण्याची संकल्पना गृहीत आहे. त्याने ती संकल्पना नवेगाव बांध, ताडोबा, नागझिरा अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्याने येथे शिबिरांचे सतत आयोजन करून राबवली. जंगलजीवनाबाबतची ओढ नव्या पिढीत रुजवण्याचा प्रयत्न केला. त्याच्या प्रयत्नांना प्रतिसादही लाभला.

अतुलचा अशा शिबिरांतून ऋतुपरत्वे बदलणारे वनवैभव आणि पशुपक्षी जीवन यांचे विलोभनीय, नाना रंग पकडण्याचा प्रयत्न असतो. तो म्हणतो, की जंगल केवळ डोळ्यांनी पाहण्यापेक्षा पंचेद्रिये एकवटून त्याचा अनुभव घ्यावा. अतुल पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक व नागपूर या मोठ्या शहरांतून नव्या पिढीला वनभ्रमण समजावून देतानाच, त्यांच्या आवडी समजावून घेण्याचा प्रयत्न करतो. त्याचा स्लाइड शो आणि त्याची व्याख्याने व निसर्ग अभ्यासशिबिरे यांतून त्या नव्या अभ्यासकांची जिज्ञासा, दृष्टिकोन समजावून घेण्याचाही प्रयत्न असतो.

अतुलने लिहिलेली ‘मृगकथा’, ‘वाघ’, ‘अरण्यवाचन’, ‘नवरंगाचं घरटं’ आणि ‘अरण्याचं अंतरंग’ ही पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यासोबत त्याने ‘ताडोबा : वाघाचं जंगल’, ‘महाराष्ट्रातील वन्य जीवन’ व ‘मॅमल्स अॅण्ड बर्ड्स’ ही फिल्ड गाइड्स वाचकांपुढे ठेवली आहेत. प्रत्ययकारी लेखन, अनुभवजन्य मांडणी आणि रंगीत वैशिष्ट्यपूर्ण चित्रे ही अतुलने लिहिलेल्या पुस्तकांची वैशिष्ट्ये! ‘पुणे आकाशवाणी केंद्राने’ अतुलच्या ‘मृगकथा’ पुस्तकावर आधारित, ‘नातं निसर्गाशी’ ही सोळा भागांची मालिका प्रसारित केली होती. अतुलच्या ‘अरण्यवाचन’ या डबल क्राउन आकाराच्या, देखण्या पुस्तकात तीनशे रेखाचित्रे आहेत. तो सारे भारतीय वन्यजीवन एकाच पुस्तकात एकत्र करण्याचा प्रयत्न आहे.

अतुल धामणकर हा व्यावसायिक कलाकार आहे. त्याने डिझायनिंग व पेंटिंग यांची अनेक कामे केली आहेत. तो जाहिरातींसाठी आकर्षक मजकूर तयार करण्यात वाकबगार आहे. त्याच्या त्या गुणांचे प्रतिबिंब ‘अरण्यवाचन’मधून दिसते.

अतुलचा भाऊ आशीष ताडोबात राहतो. औष्णिक वीज केंद्रासाठी इरई डॅमचे पाणी वापरले जाते. ते पाणी त्या जंगलातील झर्यांचे आहे. वाघ आहे म्हणून ते जंगल आहे, जंगल आहे म्हणून झरा आहे, झरा आहे म्हणून इरई डॅमचे पाणी आहे! आणि ते पाणी आहे म्हणून औष्णिक वीज केंद्र आहे. अशा चक्रामुळे वाघ आहे… आणि म्हणून मुंबईची वीज आहे असा संबंध जोडता येतो!

पुण्यातील ‘पुलोत्सवा’त सहभागासाठी वेगवेगळ्या क्षेत्रांत महत्त्वपूर्ण काम करणा-या व्यक्तींची मतदानाने निवड झाली. त्यात जनतेने लेखक म्हणून अतुल धामणकर यांची निवड केली. विशेष म्हणजे इतर आठजण पुणे वा मुंबईत काम करणारे होते, तर अतुल फक्त त्या शहराबाहेरील एकमेव असा होता! त्याच्या तीन पुस्तकांचा ‘बेस्ट बुक’ म्हणून गौरव झाला आहे. त्याची फोटोग्राफी तर सर्वोच्च, इतर छायाचित्रकारांना हेवा वाटावा अशी! World Wide या संस्थेच्या कॅलेंडरसाठी अतुलने टिपलेले वाघांचे तब्बल बारा फोटो निवडले जातात!

– श्रीकांत पेटकर/ मदन धनकर

About Post Author

Previous article‘विश्वेश्वर’ची चौफेर नजर!
Next articleआलोक राजवाडे – प्रायोगिक नाटकातील नवा तारा!
श्रीकांत बापुराव पेटकर हे महापारेषण (MSEB) कंपनीत पडघे (तालुका भिवंडी) येथे कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत आहेत. पेटकर यांच्या प्रयत्नांमुळे त्यांच्या वीज केंद्रास सलग तीन वर्षे उत्कृष्ट वीज केंद्राचा पुरस्कार मिळाला. त्यांना लेखनाची आवड असून त्यांची ‘आणि मी बौद्ध झालो‘ या अनुवादित पुस्तकासोबत कल्याण, शांबरीक खरोलिका, चांगुलपणा अवतीभोवती, बेहोशीतच जगणं असतं, गजल अशी आठ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. पेटकर यांनी चित्रकलेचा छंद जोपासला असून त्यांच्या चित्रांची दोन प्रदर्शने भरली होती. त्यांना ‘कल्याण रत्न’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

11 COMMENTS

  1. अतुल धामणकर

    अतुल धामणकर
    पटेल हायस्कुल जवळ
    शिवाजी चौक
    चंद्रपूर422 402

    mobile.. 9423619933

  2. अतुल यांच्या ज्ञानाचा,
    अतुल यांच्या ज्ञानाचा, अनुभवांचा फायदा त्यांच्याबरोबर भ्रमंती करणार्या सर्वांनाच अनुभवायला मिळतो.

    त्यांची वन्य प्राणीजिवांरील पुस्तके व त्यातील अनुभवकथन एखाद्या आद्भुत व थरारक कादंबरीचाच अनुभव देतात त्यांचे नुभवकथन कधीही उत्कंठा वाढवणारेच असते.

    अतुल हे उत्कृष्ठ छायाचित्रकारही आहेत.

  3. Excellent ,but enrichment of
    Excellent ,but enrichment of moharli and nearby villages require to be describe in this article.

  4. Great sir. Rare are
    Great sir. Rare are interested your study will set e.g. inst in getting books where to purchase,l. Am from Pune thanks.

  5. from book “Deer Tales” by
    from book “Deer Tales” by Atul Damankar..
    I spent more than my life observing these animals in the jungle.So definitely they are close to my heart.I love these animals,but never mixed my emotions with them or in their natural behaviour. Itried to hide somewhere near them, so they were free to do all their natural things which they wanted…

Comments are closed.