माझे आजोबा म्हणत, ’अमृत्या खाशी, त्याची कीर्ती वीस कोशी’. दरवर्षी त्याला खूप फणस लागतात. हा लाल मातीचा गुण असावा. कशेळी गाव तिन्ही बाजूंनी पसरलेल्या अथांग अरबी समुद्राच्या कुशीत उतरत्या डोंगरात शांत वसलेले आहे. त्या गावात 1661 मध्ये शिवाजी महाराजांचे आगमन झाले होते ! गावात कऱ्हाडे ब्राह्मणांची वस्ती जास्त आहे. आमच्या आगरातील बरक्या फणसाचे वैशिष्टय असे, की त्याचे गरे रसाळ व चवीला अमृतासारखे गोड लागत. म्हणून आमच्या पूर्वजांनी त्याला ’अमृत्या’ असे योग्य नाव दिले होते...