अनिलकुमार भाटे
जात म्हणे जात नाही!
मुळात जात ही संकल्पना अलिकडची आहे, तरीही या संकल्पनेला इतिहास आहे. म्हणून ती चांगली असो- वाईट असो, तिच्या पाठीमागचा इतिहास पूर्णपणे पुसून टाकणे आपल्याला किंवा कोणालाही शक्य नाही. जात नाहीशी करुया असे म्हणणे, आमच्या मते, शुद्ध वेडेपणाचे आहे. इतिहास पुसला जात नसतो. एक वेळ, तो इतिहासाच्या पुस्तकांमधून काढून टाकता येईल, संगणकाच्या मेमरीमधून ‘डिलीट’ करता येईल. पण तो जित्याजागत्या माणसांच्या मेमरीमधून नाहीसा कसा करणार? विशेषत: त्या पाठीमागे जेव्हा अनेक पिढ्यांच्या भावना दडलेल्या असतात, परंपरा दडलेल्या असतात, पिढ्यानपिढ्या चालत आलेली संस्कृती दडलेली असते, ते डिलीट कसे होणार? आणि तशी जरूरी पण नाही...