सुवर्ण महोत्सवी मराठी साहित्यसंमेलनाच्या (इचलकरंजी, 1974) अध्यक्षपदाचा मान महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांना मिळाला होता. ते त्यांच्या आद्याक्षरांवरून पु. ल. म्हणूनच ओळखले जातात. त्यांचा जन्म मुंबई येथे 8 नोव्हेंबर 1919 रोजी झाला.
पुल यांनी महाराष्ट्राला खळखळून हसण्यास शिकवले. त्या काळात स्टॅण्डअप कॉमेडी नावाचा प्रकार फार प्रसृत नव्हता. पु.ल. देशपांडे हे महाराष्ट्रापुरते त्या प्रकाराचे प्रवर्तक म्हणता येईल. ते ग्रेट एंटरटेनर होते. मात्र, त्यांची ओळख तेवढ्यापुरती मर्यादित नाही. ते शिक्षक, विनोदी लेखक, नट, नकलाकार, गायक, पटकथालेखक, नाटककार, कवी, पेटीवादक, संगीत दिग्दर्शक, वक्ते होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला असे जे काही पैलू होते, त्या सगळ्या पैलूंना सार्वजनिक जीवनात लाभलेल्या चकाकीमुळे पुल नावाचा हिरा मराठी साहित्य-संस्कृतीमध्ये चमकताना दिसला.
पुल यांचे शिक्षण मुंबई आणि पुणे येथे एम ए, एलएल बी पर्यंत झाले. त्यांचे आजोबा ऋग्वेदी उर्फ वामन मंगेश दुभाषी हे कवी आणि लेखक होते. त्यांनी रवींद्रनाथ टागोर यांची नोबेलप्राप्त साहित्यकृती ‘गीतांजली’ हिचा ‘अभंग गीतांजली’ (मूळ बंगालीतील) हा मराठी पद्यानुवाद केला. आजोबांच्या साहित्यप्रेमाचे, सहृदय विनोदबुद्धीचे संस्कार पुलंवर बालपणापासून झाले. पुलं नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर (ललितकुंज नाट्यसंस्था) आणि प्रसिद्ध हार्मोनियमपटू दत्तोपंत राजोपाध्ये यांच्या सहवासातून अनुकमे नाट्य आणि संगीत ह्या क्षेत्रांकडे ओढले गेले. पुलंचे बालपण मुंबई येथील विलेपार्ले या उपनगरात गेले. तेथील टिळकमंदिरात साहित्य-संगीत कलाविषयक कार्यक्रम हे आस्थापूर्वक घडवून आणले जात.
पु.ल. यांचे वडील ते वीस वर्षांचे असताना वारले. त्यानंतर त्यांनी कारकून, शिक्षक, प्राध्यापक अशा नोकऱ्या केल्या. त्यांनी मुंबई आकाशवाणीच्या केंद्रावर मराठी नाट्यविभागप्रमुख, दिल्लीच्या दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमाचे पहिले निर्माते व आकाशवाणीवरील अखिल भारतीय नाट्यविभागाचे प्रमुख निर्माते अशा विविध जबाबादाऱ्या सांभाळल्या. त्यांनी ‘पुढचे पाऊल’ ह्या महाराष्ट्रात गाजलेल्या तमाशाकम चित्रपटात नायकाची यशस्वी भूमिका केली. त्यांचा सबकुछ पु.ल. असलेला चित्रपट म्हणजे ‘गुळाचा गणपती’- कथा, पटकथा, संवाद, गीते, संगीत आणि दिग्दर्शन, एवढेच नव्हे तर नायकाची भूमिकासुद्धा ! तो चित्रपट गाजला.
‘तुका म्हणे आता’ (1948) हे त्यांचे पहिले नाटक रंगभूमीवर अयशस्वी ठरले. त्यानंतर रशियन नाटककार निकोलाय गोगोल यांच्या ‘द इन्स्पेक्टर जनरल’ या नाट्यकृतीचे केलेले ‘अंमलदार’ (1952) हे मराठी रूपांतर लोकप्रिय झाले. त्यांचे स्थान ‘तुझे आहे तुजपाशी’ (1957) ह्या नाटकाने यशस्वी नाटककार म्हणून निश्चित झाले. ‘भाग्यवान’ (1953), ‘सुंदर मी होणार’ (1958) आणि ‘ती फुलराणी’ ही त्यांची अन्य नाटके. ती तिन्ही नाटके मूळ इंग्रजी नाटकांची मराठी रूपांतरे आहेत. त्यांनी ‘सारं कसं शांत शांत’, ‘छोटे मासे मोठे मासे’, ‘विठ्ठल तो आला आला’, ‘आम्ही लटिके ना बोलू’ यांसारख्या एकांकिकांही लिहिल्या. त्यांनी लहान मुलांसाठी लिहिलेली ‘वयम् मोठम् खोटम्’ आणि ‘नवे गोकुळ’ ही नाटके. त्यांचे ‘पुढारी पाहिजे’ हे लोकनाट्यही प्रभावी ठरले.
त्यांनी ‘भय्या नागपूरकर’ नावाचे एक लहानसे व्यक्तिचित्र ‘अभिरुची’त 1944 साली लिहिले. त्यानंतर त्यांनी लिहिलेली अनेक व्यक्तिचित्रे ‘व्यक्ती आणि वल्ली’ नावाच्या पुस्तकात प्रसिद्ध झाली. त्या पुस्तकास 1965 मध्ये साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले. त्यांचे आप्त, स्नेही यांची; तसेच, विविध क्षेत्रांत त्यांना भेटलेल्या नामवंतांची त्यांनी काढलेली हृद्य शब्दचित्रे ‘गणगोत’ (1966) आणि ‘गुण गाईन आवडी’ (1975) मध्ये आहेत. खोगीरभरती (1946), नस्ती उठाठेव (1952), बटाट्याची चाळ (1958), गोळाबेरीज (1960), असा मी असामी (1964) आणि हसवणूक (1968) हे त्यांच्या विनोदी लेखनाचे संग्रह. पुल यांनी मराठीत श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांच्यापासून प्रल्हाद केशव अत्रे यांच्यापर्यंत चालत आलेली विनोदाची परंपरा पुढे नेली. त्यांच्या लेखनाचे वैशिष्टय मार्मिक, सूक्ष्म, चोखंदळ आणि प्रसन्न विनोद हे होते. त्यांची विनोदी लेखनाची शैलीही चतुरस्र अशी बहुढंगी आहे. ते गुण त्यांच्या वक्तृत्वातही आढळून येतात. पुलं उपहास-उपरोध, विसंगती, वक्रोक्ती, श्लेष आदींचा उपयोग सारख्याच कौशल्याने करत. पुलंनी केलेल्या परदेशपर्यटनातूनही ‘अपूर्वाई’ (1960), ‘पूर्वरंग’ (1965), ‘जावे त्यांच्या देशा’ (1974) यांसारखी प्रवासवर्णने लिहिली. ‘शांतिनिकेतना’त बंगालीच्या अभ्यासासाठी जाऊन आल्यानंतर लिहिलेली ‘वंगचित्रे’ (1974) देखील त्याच प्रकारात मोडतात.
त्यांनी 1961 नंतर नोकरीपेशा कायमचा सोडला आणि ते नाट्यात्म कार्यक्रम करू लागले. ‘बटाट्याची चाळ’ आणि ‘असा मी असामी’ ह्या दोन पुस्तकांवर आधारलेले त्यांचे एकपात्री प्रयोग विशेष उल्लेखनीय ठरले. पु.ल. देशपांडे यांनी अनेक संस्थांना आर्थिक सहाय्य केले आहे. त्यांचा भारत सरकारने ‘पद्मश्री’ (1966) व पद्मभूषण (1990) देऊन गौरव केला. त्यांना ‘संगीत नाटक अकादमी’चे पारितोषिक 1967 मध्ये देण्यात आले. त्यांना पहिल्या ‘महाराष्ट्र भूषण’ने गौरवले गेले (1996). ते 1967 मध्ये नांदेड येथे भरलेल्या मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष होते. पुल यांचे साहित्य संमेलनातील भाषण हा एक ‘परफॉर्मन्स’च झाला. त्यांनी ते साहित्याचे अभ्यासक म्हणून नाही तर जाणकार रसिक म्हणून भाषण केले. त्यांची भाषणातील साहित्यविषयक भूमिका मुद्यांकडे लक्ष वेधण्याची आहे, भाष्यकाराची नाही. ते म्हणतात, की “ज्या मराठी ललित साहित्याच्या प्रदेशात मी हिंडलो- फिरलो, जिथं मीही चार रोपटी लावण्याचा प्रयत्न केला त्या प्रदेशाचे हे एक प्रवासवर्णन आहे.” पु.ल. देशपांडे यांचे पुणे येथे पार्किन्सन्स आजाराच्या गुंतागुंतीमुळे वयाच्या ऐंशीव्या वर्षी, 12 जून 2000 रोजी निधन झाले.
संकलन – टीम थिंक महाराष्ट्र
जीवन प्रवासाचे सुरेख वर्णन!
सुवर्ण महोत्सवी समारंभात केलेलं भाषण पोस्ट करा