सर्वांना सुलभ इंटरनॅशनल ही संस्था ठिकठिकाणच्या स्वच्छ शौचालयांसाठी माहीत असते. तिचे संस्थापक बिंदेश्वर पाठक हे उपक्रमशील गृहस्थ आहेत. त्यांनी राजस्थानमधील भंगी समाजातील दोनशे महिलांना वाराणसीच्या विश्वनाथ मंदिरात गेल्या आठवड्यात नेले व त्या महिलांचे आयुष्यभराचे स्वप्न पूर्ण केले. या महिलांनी इतर शेकडो भक्तांच्या संगतीत असताना जेव्हा ‘हर हर गंगे’ असा घोष केला तेव्हा क्रांतीच घडून आल्यागत झाले! विश्वनाथ मंदिरात दलितांना बंदी नाही, तथापी त्यांच्या मनात भीती बसलेली आहे. ती दूर केली गेल्यामुळे त्यांना स्वत:लाच स्वत:च्या ताकदीचा प्रत्यय आला. यालाच सक्षमीकरण म्हणायचे का?
– बिंदेश्वर पाठक
सर्वांना सुलभ इंटरनॅशनल ही संस्था ठिकठिकाणच्या स्वच्छ शौचालयांसाठी माहीत असते. तिचे संस्थापक बिंदेश्वर पाठक हे उपक्रमशील गृहस्थ आहेत. त्यांनी राजस्थानमधील भंगी समाजातील दोनशे महिलांना वाराणसीच्या विश्वनाथ मंदिरात गेल्या आठवड्यात नेले व त्या महिलांचे आयुष्यभराचे स्वप्न पूर्ण केले. या महिलांनी इतर शेकडो भक्तांच्या संगतीत असताना जेव्हा ‘हर हर गंगे’ असा घोष केला तेव्हा क्रांतीच घडून आल्यागत झाले! त्यांनी गंगेमध्ये आंघोळ केली व नंतर त्या मंदिरात गेल्या. त्याआधी व नंतरही त्यांनी दशाश्वमेध घाटावर वेगवेगळ्या मंत्रोच्चारांच्या घोषात अभिषेक केले. आयुष्यभर मैला उचलण्याचे काम करत आलेल्या शांती चमारियाचे उदगार फार अर्थपूर्ण आहेत. त्या म्हणाल्या, की आमच्या वाट्याला द्वेष आणि भेद आहेत असंच आम्ही समजत होतो. तेच आमचे भोग असंही समजून चाललो होतो. परंतु इथं सर्वांसोबत विश्वनाथाचं दर्शन घेताना आपणच जणू मुक्त होऊन गेलो आहोत असं वाटत आहे.
विश्वनाथ मंदिरात दलितांना बंदी नाही, तथापी त्यांच्या मनात भीती बसलेली आहे. ती दूर केली गेल्यामुळे त्यांना स्वत:लाच स्वत:च्या ताकदीचा प्रत्यय आला. यालाच सक्षमीकरण म्हणायचे का? त्यांच्या पूजापाठाचे संयोजन केले ते ब्रह्मानंद चतुर्वेदी या पुजार्याने. ते म्हणाले, की परमेश्वराच्या दरबारात जातपात काही नाही!
सुलभ इंटरनॅशनलने या महिलांना राजस्थानातून विमानाने आणले व तेथे नेऊन पोचवले. त्या गंगा व विश्वनाथ मंदिर परिसरात चार-पाच तास होत्या. ‘सुलभ’ने त्यांना सध्या मैला वाहण्याच्या कामातून दूर केले असून, शिवणकाम-भरतकाम, लोणची बनवणे असे गृहोद्योग शिकवले आहेत. त्यांची त्यामधून मासिक प्राप्ती प्रत्येकी दोन हजार रुपयांपर्यंत आहे.
बिंदेश्वर पाठक यांनी सांगितले, त्याप्रमाणे अजून भारतभर एक लाख महिला तरी हातांनी मैला उचलण्याचे काम करत असतात! (आधारित)
दिनकर गांगल हे ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या वेबपोर्टलचे मुख्य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्यांनी पुण्यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्यांनी आकारलेली ‘म.टा.’ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्यांना ‘फीचर रायटिंग’ या संबंधात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय (थॉम्सन फाउंडेशन) पाठ्यवृत्ती मिळाली आहे. त्याआधारे त्यांनी देश विदेशात प्रवास केला.
गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्यासारख्या व्यक्तींच्या साथीने ‘ग्रंथाली’ची स्थापना केली. ती पुढे महाराष्ट्रातील वाचक चळवळ म्हणून फोफावली. त्यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी ‘ग्रंथाली’च्या ‘रुची’ मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत ‘ग्रंथाली’ची चारशे पुस्तके त्यांनी संपादित केली. त्यांनी संपादित केलेल्या मासिके-साप्ताहिके यांमध्ये ‘एस.टी. समाचार’चा आवर्जून उल्लेख करावा लागेल. गांगल ‘ग्रंथाली’प्रमाणे ‘प्रभात चित्र मंडळा’चे संस्थापक सदस्य आहेत.
साहित्य, संस्कृती, समाज आणि माध्यमे हे त्यांचे आवडीचे विषय आहेत. त्यांनी त्यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि ‘स्क्रीन इज द वर्ल्ड’ अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यांना महाराष्ट्र सरकारचा ‘सर्वोत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती’चा पुरस्कार, ‘मुंबई मराठी साहित्य संघ’ व ‘मराठा साहित्य परिषद’ यांचे संपादनाचे पुरस्कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल ‘यशवंतराव चव्हाण’ पुरस्कार लाभले आहेत.