तंत्रज्ञानाने नागरिकांचे बंध तुटतील!
– नंदन निलकेणी
कॉम्रेड यशवंत चव्हाण नव्वद वर्षांचे झाले. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा मुलगा, माधव चव्हाण यांनी त्यांना अपूर्व भेट दिली. भारतातले तीन महत्त्वाचे बुद्धिवंत त्यांनी एकत्र आणले आणि ‘इंडिया: यस्टरडे, टुडे, टुमारो’ या विषयावर तीन व्याख्याने घडवली. ते तीन विचारवंत म्हणजे इतिहासलेखक रामचंद्र गुहा, संपादक कुमार केतकर आणि तंत्रज्ञ नंदन निलकेणी.
कार्यक्रमाचे संयोजक माधव चव्हाण हे बहुढंगी व्यक्तिमत्त्व आहे. ते ‘प्रथम’ या संस्थेचे प्रवर्तक-संचालक. त्यांनी या संस्थेच्या माध्यमातून प्राथमिक शिक्षणाचा मसुदा घेऊन देश ढवळून काढला आहे. त्यासाठी त्यांच्यासोबत त्यांनी कार्यकर्त्यांची मोठी फौज गोळा केली आहे. त्यांच्या कामातील नमुनेदारपणा लक्षात घेऊन जगभरातील दात्यांनी त्यांना कोट्यवधी रूपये दिले आहेत, त्यांना अलिकडेच अमेरिकेतील प्रतिष्ठेचा मानला जाणारा दोन कोटी रुपयांचा पुरस्कार मिळाला. ते सोनिया गांधी यांच्या सल्लागार समितीचे सदस्य आहेत.
कार्यक्रम निमंत्रितांसाठी होता तरीसुद्धा तीन आघाडीचे विचारवंत, माधव चव्हाणांसारखा संयोजक आणि ज्यांच्या सन्मानार्थ हा कार्यक्रम योजला गेला होता त्या कॉम्रेड यशवंत चव्हाण यांचे त्यागमय आयुष्य… या पार्श्वभूमीवर कार्यक्रमास यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात तोबा गर्दी उसळली यात आश्चर्य नव्हते.
माधवने आरंभी वडिलांविषयी खरोखरीच चार कृतज्ञतेचे शब्द उच्चारले व व्याख्यात्यांचा मनमोकळा, हसतखेळत परिचय करून दिला. ते म्हणाले, की कॉम्रेड यशवंत चव्हाण यांचे सारे जीवन मुंबई-महाराष्ट्रात व्यतीत झाले. येथे जमलेला जनसमुदाय बहुसंख्येने मराठी आहे. हे पाहता कार्यक्रम मराठीतून व्हायला हवा. तथापि त्या परिस्थितीत रामचंद्र गुहा व नंदन निलकेणी काहीच बोलू शकणार नाहीत, म्हणून कार्यक्रम इंग्रजी भाषेत होत आहे !
प्रसंग असे नाट्यपूर्ण मांडणीने खुलवत पी. बाळू आणि त्यांचा भाऊ विठ्ठल पानवलकर यांचे चरित्र व सभोवतालची सामाजिक परिस्थिती, जातीयता त्यांनी उलगडून सांगितली. त्यामुळे स्वातंत्र्य चळवळ जोमात येत होती तरी येथील सामाजिक-सांस्कृतिक जीवन कसे निकृष्ट होत गेले याचे दर्शन घडले.
त्यांनी कर्नाटकातल्या डॉ. शिवराम कारंथ यांचा अशा त-हेचे आदर्श, विविध गुणसंपन्न जीवन प्रदीर्घ जगलेली व्यक्ती म्हणून उल्लेख केला व म्हणाले, की त्यांचा नव्वदावा वाढदिवस तीन वर्षे साजरा होत होता! रामचंद्र गुहा यांनी सांगितले, की यशवंत चव्हाण जगले तो काळ अशा नाना त-हेच्या व्यक्तींनी समृद्ध केलेला आहे. त्यांतल्या आघाडीच्या, नेतेसमान असलेल्या व्यक्तींचा आपल्याला परिचय असतो, परंतु सार्वजनिक जीवन घडवतात अशा विविध क्षेत्रांतील संपन्न व्यक्तिमत्त्वे. कॉम्रेड यशवंत चव्हाण हे एक तसेच व्यक्तिमत्त्व आहे. त्यांचे त्यागमय आणि कष्टमय जीवन हे आपल्याला सतत प्रेरणा देत राहील.
रामचंद्र गुहा यांच्या भाषणातील क्रिकेटचा उल्लेख कुमार केतकर यांनी अचूक उचलला आणि ते म्हणाले, की भारतातील परिस्थिती बिघडत गेली ती मुख्यत: जातीयतेमुळे. हा रोग पी.बाळू यांच्या काळात जसा होता तसाच किंबहुना अधिक तीव्र स्वरूपात आजही आहे. कुमार केतकर यांच्याकडे विषय होता ‘टुडे’. त्यांनी स्वातंत्र्योत्तर आतापर्यंतची त्रेसष्ठ वर्षे ‘टुडे’मध्ये समाविष्ट केली. ते म्हणाले, की या काळातील वर्तमान अगदी वेगवेगळ्या स्वरूपाचे आहे. ते १९४७ साली जसे होते तसे १९५० साली, भारत प्रजासत्ताक झाला तेव्हा नव्हते. त्यानंतर इंदिरा गांधी यांनी १९७५ साली, देशात अराजक माजले म्हणून आणीबाणी पुकारली. त्यावेळी तेव्हा वेगळीच परिस्थिती होती आणि १९८९ मध्ये रशिया विघटित झाला, त्यानंतरची परिस्थिती अगदीच भिन्न होती. नरसिंहराव १९९१ साली पंतप्रधान झाले. त्यांनी उदारीकरण आणले. तो जगातिकीकरणाचा आरंभ मानला जातो. त्यानंतरचा वीस वर्षांचा झपाटा तर विलक्षणच आहे. वर्तमानातल्या या घटनांना आता ऐतिहासिक महत्त्व आले आहे आणि आपल्या असे ध्यानात येते, की केवळ भविष्य नव्हे तर इतिहास सुध्दा बदलत आहे! कारण या सर्व घटना ऐतिहासिकदृष्टया आणि राजकीयदृष्ट्या वेगवेगळ्या त-हेने मांडल्या जातात. अशी अतिशय अस्थिर म्हणून बेभरवशाची समाजास्थिती सद्यकाळात आहे.
नंदन निलकेणी हे तंत्रवैज्ञानिक. त्यांनी त्यांच्या ओळखपत्रिकेची खुलासेवार माहिती दिली. त्यामुळे भारतातील प्रत्येक नागरिकाला बारा अंकी ओळख लाभणार आहे आणि या सर्व ओळखी संगणकांनी गुंफल्या जाणार असल्यामुळे, प्रत्येक व्यकीला ती भारतात कोठेही गेली तरी ओळखीचे स्थान लाभणार आहे. त्यामुळे छत्तीसगडचा तरूण दिल्ली किंवा मुंबईत आला तरी तो ‘परका’ राहणार नाही. त्याला त्याची ओळख नव्या ठिकाणी पटवता येईल आणि त्याची पत सिद्ध करता येईल.
निलकेणी यांनी या योजनेमुळे जे सामाजिक उत्थापन घडणार आहे त्याची झलक अर्थव्यवहारातील उदाहरण घेऊन विशद केली. ते म्हणाले, की रोजगार हमी योजनेतील कामगारांचे वेतन सध्या बॅंकेत जमा होते. ते मिळवण्यासाठी कामगाराला आठ किलोमीटरपासून चाळीस किलोमीटरपर्यंत कितीही प्रवास करावा लागतो. एकदा का त्या कामगाराला (निलकेणी यांच्या) या योजनेमुळे ‘ओळख’ मिळाली की त्याचे पैसे त्याला त्याच्या खेड्याच्या किराणा मालाच्या व्यापा-यामार्फतही देण्याची व्यवस्था करता येईल. बॅंका किंवा कोणतीही अर्थसंस्था भारतातील खेड्यापर्यंत पोचेल हे संभवनीय नाही, तथापि किराणा मालाचा व्यापारी हे प्रत्येक खेड्यातील अर्थव्यवहाराचे केंद्र ठरू शकेल. निलकेणी यांनी उभा केलेला भविष्यकाळ(टुमारो) रोमांचकारक होता. ते अखेरीस म्हणाले, की कॉम्रेड चव्हाण गेल्या शतकात कष्टक-याला न्याय मिळावा म्हणून लढले. आमचेही प्रयत्न वंचितांना न्याय मिळावा यासाठीच आहेत. भारतातील दु:खी, कष्टी, मुख्य प्रवाहाबाहेर फेकली गेलेली सर्व जनता मुख्य प्रवाहात यावी, या देशाचे नागरिक म्हणून त्यांनी सन्मानाने जगावे यासाठी इलेक्ट्रॉनिक्सच्या माध्यमातून चालवलेला हा प्रयास आहे. त्यातून इष्ट गोष्टी घडतील, कारण हे माध्यम जवळ जवळ बिनखर्चाचे आहे.
निलकेणी यांनी ‘युनिक आयडेंटिटी’मुळे नागरिक ‘अनलीश’ होतील असा शब्द प्रयोग केला. लीश म्हणजे साखळी. साखळीचा बंध तुटून जाईल असा निलकेणी यांचा अभिप्राय होता. मार्क्स ने देखील म्हटले होते, की क्रांतीनतर कामगारांच्या पायांतील बेड्या तुटून पडतील!
जगातील अण्वस्त्रे नष्ट होतील, भारतातील जातीयता संपून जाईल आणि सर्व मनुष्यमात्र सुखासमाधानाने नांदतील अशी आशा व्यक्त करून त्यांनी आपले भाषण संपवले.
मुंबई–महाराष्ट्रात सभा-समारंभ बरेच होत असतात. अनेक सत्कार साजरे केले जातात. परंतु कॉम्रेड यशवंत चव्हाण यांच्या नव्वदाव्या वाढदिवससमारंभाला जशी वैशिष्ट्यपूर्णता लाभली तशी क्वचित कुठच्या कार्यक्रमास मिळाली असेल, महाराष्ट्रातील बौद्धिकता जवळजवळ लोप पावत असताना अशी व्याख्याने घडवण्यातील माधव चव्हाण यांचे औचित्य अनुकरणीय होय.
– प्रतिनिधी