शेतीची दुर्गती!

2
26
carasole

मराठा समाजाच्या मोर्च्यांमुळे महाराष्ट्रात खळबळ खूप माजली आहे. त्यासंबंधी चर्चा झडत आहेत. त्यामध्ये एक मुद्दा वारंवार येतो. तो म्हणजे शेतीला आलेली दुर्गती!

मराठा समाज महाराष्ट्रात लोकसंख्येच्या पस्तीस टक्केपर्यंत आहे. तो एकतर राजकारण तरी करायचा किंवा शेती व तिला पूरक उद्योग-व्यवसाय. शरद पवार यांनीच अनौपचारिक गप्पांत तशी विधाने केल्याचे सांगितले जाई. ‘मंडल आयोगा’च्या शिफारशींनंतर गेल्या दोन-अडीच दशकांत विविध जातिसमूह जागे झाले, त्यांचा त्यांचा हक्क मागू लागले; स्वाभाविकच, मराठा समाजाची राजकारणावरील पकड घट्ट राहिली नाही. गेल्या निवडणुकांनंतर तर ती नाहीशीच झाली.

परंतु सर्व मराठा काही राजकारण करत नव्हते. राजकारण हा हक्कदारांचा, सवलतदारांचा खेळ होता. आम मराठा समाजास त्यातून प्रत्यक्ष लाभ काहीच नव्हता. फक्त ‘आपली माणसे’ सत्तेवर आहेत ही गुर्मी काय ती त्यांच्या मनाशी होती. जुन्या समाजव्यवस्थेत मूठभर ब्राह्मणांची सद्दी असे, परंतु त्यांचे प्रत्यक्षाप्रत्यक्ष लाभ समस्त ब्राह्मण समाजास झाले. त्याच प्रकारे, मूठभर मराठा लोक राज्यसत्तेच्या व सहकाराच्या केंद्रस्थानी होते, परंतु ती ‘ऐट’ सर्व मराठा समाजास लाभे.

मराठ्यांचा चरितार्थ-व्यवसाय मुख्यत: शेतीवर आधारित होता. शेतीत नगदी पिकांचे भाव वाढत गेले, तसतसा मराठ्यांतील मोठा गट धनवान व सुखासीन होऊन गेला. पण मराठा समाजाच्या शेतीची एक गंमत होती. त्यांच्यापैकी खूप कमी माणसे स्वत: शेती कसणारी होती. त्यांना मजुरांची मदत लागे. देशभरात वेगवेगळ्या कामांच्या व प्रगतीच्या नवनव्या वाटा खुल्या होत गेल्या तसतशी शेतमजुरांची उपलब्धता मराठा समाजास कमी कमी होऊ लागली आणि शेतीच्या दुरवस्थेला ते एक मोठे कारण ठरले.

देशभर विविध क्षेत्रांत प्रगती होत आहे. तशी ती शेतीतदेखील होताना दिसते. अनेक सुशिक्षित शेतकरी नवनवे प्रयोग करून शेतीमध्ये स्वावलंबी होण्याच्या प्रयत्नांत असतात. लक्षाधीश आणि कोट्यधीश शेतकरी झाल्याच्या मोजक्या कहाण्यादेखील ऐकू येतात. ते शेतकरी कालानुरूप पुढे जात असतात. नवनवे तंत्रज्ञान उपयोगात आणतात. कोल्हापूर-सांगली पट्ट्यांत काही शेतकऱ्यांनी एकत्र येऊन स्वत:ची हवामान केंद्रे निर्माण केली आहेत. काही गावांनी सर्व शेतीला एकत्रित जोडून ठिबक सिंचनाचे सामूहिक प्रयोग चालवले आहेत. ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’च्या ‘सोलापूर जिल्हा संस्कृतिवेध’मधील अजनाळे गावच्या कोट्यधीश शेतकऱ्यांची कहाणी सर्वश्रुत आहे. ती ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’वर देखील प्रसिद्ध केली आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नरच्या सुमारे एक हजार शेतकऱ्यांनी एकत्र येऊन स्वयंपूर्णतेचा प्रयोग चालवला आहे. त्यां नी ‘देवनदी व्हॅशली अॅग्रीकल्चऊरल प्रोड्युसर कंपनी’ स्थापपन केली आहे. ते सर्व एकत्रितपणे रेड (धोकादायक) केमिकल्स‍चा वापर टाळून शेती करतात. सिन्नर हा दुष्कातळी प्रदेश. मात्र तेथील शेतकऱ्यांनी शेतीत चालवलेले विविध प्रयोग अचंबित करतात. ते प्रयोग पाहण्यासाठी पंजाब-हरियाणातून शेतकरी येत असतात.

शेतकऱ्यांच्या दुर्दशेचे वर्णनही खरेच असणार. कारण त्या शिवाय का शेतकरी आत्महत्या करतील? आणि मराठा समाज मोर्च्यांसाठी पेटून उठेल? शेतीच्या दुर्दशेचे एक प्रमुख कारण असे सांगितले जाते, की शेतकऱ्याला योग्य वेळी शेतीत गुंतवण्यासाठी निधी उपलब्ध होत नाही (वास्तवात तो अडीच लाख कोटी रुपये दिला गेला असल्याचे मुख्यमंत्री सांगतात). अन्य व्यवसायात तो सुरू करण्यापूर्वी जसे अर्थव्यवहाराचे नियोजन साधले जाते तसे शेतीत घडत नाही. ती परंपरेने परमेश्वराधीन म्हणजे निसर्गाधीन सोडली जाते. नवे शेतकरी त्याबाबत काळजी घेतात. पण त्याहून खोल गेल्यास ध्यानात येईल, की शेतकऱ्याला वेगवेगळ्या संकटांतून सावरण्यासाठी सरकार व सरकार पुरस्कृत संस्था वेगवेगळ्या तऱ्हेने मदत करत असतात. पण ती पश्चात ! मदत योग्य वेळी मिळाली तर माणसातील शक्ती उभरून उठते व तो वेगवेगळी आव्हाने स्वीकारण्यास सिद्ध होतो. तीच मदत नंतर मिळाली तर ‘बैल गेला आणि झोपा केला’ अशी अवस्था होते आणि शेतकरी अधिकच हवालदिल होतो. तो राजकारण्यांवर अधिकाधिक अवलंबून राहू लागतो. राजकारण्यांना तेच हवे असते.

मराठा समाजाच्या बाबतीत ती स्थिती आता संपली आहे. मराठा समाजाचे आत्मभान जागे होत आहे, हे सुचिन्ह आहे. त्यांनी नवजागृत सामर्थ्य विधायकरीत्या, त्यांचा व्यक्तिविकास होईल अशा तऱ्हेने उपयोगात आणावे. त्यामुळे त्यांची संपत्ती वाढेलच, पण देशाच्या वैभवातही भर पडेल.

– दिनकर गांगल

About Post Author

Previous articleमराठ्यांचे मोर्चे आणि मराठा समाज
Next articleलोकशाही ‘दीन’!
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.

2 COMMENTS

  1. गांगल साहेब , आपले अनुमान
    गांगल साहेब , आपले अनुमान बरोबर आहे , आपण शेती क्षेत्रातील तज्ञ आहात , म्हणून आपल्या परवाणगीने माझ्या अल्पमतीला / अज्ञानीला आलेले काही निरीक्षण देऊ इच्छितो.१९७२ साली शिक्षणासाठी म्हणून खेड्यातून बाहेर पडल्यानंतर जगाची कल्पना यायला लागली. रु १ मध्ये पूण्यात एक वेलेचे पोटभर जेवलो आहे.५० पैसे किलो प्रमाणे कांद्याची हातविक्री केली आहे.कॉलेजची फी , होस्टेलची फी , इंजिनिअरींग डिप्लोमाच आख्ख वर्ष ,ST भाडं , वर्षाचे कपडे , वर्कशॉपची डांगरी , आणि कधीकधी इंग्रजी वाँर पिक्चर इ.धरुन
    (जेवणाचा डबा घरुन STने यायचा) मी रु.१३३५ वर्षाला लागले आहेत.(हा हिशोब वडिलांनी लिहीलेला आहे). रू.,४००ते५०० या दराने १वर्षाला सालगडी मिलायचे.
    त्यावेलेच्या तुलनेत मजूरीचे दर , जवल जवल ३०० पट वाढले , शेतीला लागणारी खतेऔषधे अशीच वाढली , मात्र धान्न्याचे भाव अंदाजे १० पटी पेक्षा जास्त वाढलेले दिसत नाहीत.शासनाने/राज्यकर्त्यांनी कायदे , कानून , नियम , शासनपद्धी अशी केली , वर्षानूवर्षे आलटूनपालटून तेच नेते अधिकारात राहीले. मी शेतकरी म्हणून माझी व्यथा मांडतोय.मी गरीबांच्या , मागासवर्गीयांच्या ,परधर्मियांच्या , शिक्षकांच्या ,आयाबहिणींच्या किंवा ऊसबागायतदारांच्या विरोधात नाही , परंतू , मतपेटी डोल्यासमोर ठेऊन , मनुष्यबलाच्या उपयुक्तता आणि त्यांच्या कार्यक्षमतेवर काय परिणाम होऊ शकतो याचा विचार न करता रू.२/३प्रती किँलोने धान्य वाटप , अट्रासीटीकायद्याच्या तरतुदीचे मानसशास्रीय विश्लेनाची , किंवा चांगल्या/वाईट परिणामांची शहानिशा करण्याची गरज न भासने ,एकीकडे जातीयवाद वाढू नये म्हणून कायदे करायचे आणि दुसरीकडे जाती जातीचे संघटन करायचे , आणि कडी म्हणजे नोकर्यामधे रिझर्वेशन वाढवत रहायच , , एकीकडे धर्मनिरपेक्ष म्हणायचं आणि दुसरीकडे वेगवेगल्या धर्मिंयांना वेगवेगले कायदे , एकीकडे ७ पर्यंत नापास करायचं नाही , म्हणजे ज्ञानदानाच आणि ज्ञान ग्रहणाचं मुल्ल्यमापन करायच नाही आणि
    त्यावर कडेलोट म्हणजे ज्ञान”न”दानासाठी वेतनवाढीचा कलस (नुकसान कोणाचं झाल , ब्राम्हणाचं , व्यापारी समगजाचं , भाजपचं , RSS चं , कुठल्या धार्मिक संघटनांचं , शहरातील मुलांचं , नुकसान झालं फक्त खेड्यातील मराठा आणि मागासवर्गिय मुलांच , ही मुलं ZP च्या शालेत शिकतात.हे नुकसान कोनी केल?)गाठला आहे ,एकीकडे हुंडा देने कायद्यान बंधनकारक करायच , आणि नंतर भाऊ बहिनींना कोर्टात भेटायला भाग पाडायचं , राज्यकर्त्यांत्यांनो वारसाहक्कापायी शेतकरी तुम्ही अस्वस्थ करून टाकला आहेच , त्याचबरोबर काल्यापैशाचं व्यवस्थीत पुनरजीवनाचा राजमार्ग तयार केला आहे.H P वर शेती पंपाच्या वीज बिलाचा नियम करुन , भरमसाठ पाणी आणि वीज वापरा , आणि दुसरीकडे , ट्यांकरने पाणी पुरवा आणि १८-२० तास वीज कपात करा.
    मतदारांनो आपली चुक सुधारुन भानावर या.

Comments are closed.