रिपोर्टर अवचट – सुहास कुलकर्णी

    रिपोर्टर अवचट – सुहास कुलकर्णी
    अनिल अवचट मराठीतील महत्त्वाचे लेखक आहेत. गेली चाळीसहून अधिक वर्ष ते लिहित आहेत. त्यांनी आपल्या लेखनात प्रामुख्याने सामाजिक विषय हाताळलेले दिसतात. गेल्या काही वर्षांत त्यांनी आत्मपर, अनुभवपरही लिहिलेले असले, तरी अनिल अवचट म्हटले, की त्यांनी हाताळलेले सामाजिक विषय, वंचितांच्या-उपेक्षितांच्या जगण्याची करून दिलेली ओळख आणि नानाविध सामाजिक प्रश्नांना भिडू पाहणाऱ्या धडपडया मंडळींची त्यांनी घेतलेली नोंद याचीच आपल्याला प्रामुख्याने आठवण येते.
    कोणत्याही लेखकाची सर्वच पुस्तके वाचकांना आवडतील, भावतील असे होऊ शकत नाही. प्रत्येकाच्या आवडीप्रमाण, गरजेप्रमाणे, समजेप्रमाणे आणि आवाक्याप्रमाणे वाचक लेखकाचे साहित्य आपलं मानत असतो. अवचटही त्याला अपवाद नसणार. परंतु केवळ त्यांनी लिहिले आहे म्हणून त्यांचे पुस्तक घेणारा आणि त्यांचे वाचणारा वाचक मराठीत उदंड आहे. सर्वसामान्यपणे मध्यमवर्गीय मराठी माणूस आपलं सुरक्षित आणि सुरळीत चाललेले दैनंदिन जगणे सोडून ज्या विषयांच्या भानगडीत पडणार नाही अशा विषयांच्या पोटात शिरून अवचटांनी लिहिले आहे. ते विषय आतून पाहणे आणि त्याची संगती लावून वाचकांना सांगणे हे काम एखाद्या मिशनऱ्याप्रमाणे त्यांनी केले आहे. एका अजब चिकाटीने ते हे काम करत आले आहेत. ते विषय, त्यातील प्रश्न, माणसांचे जगणे याबद्दल त्यांना जैव आस्था असल्याने ‘मी काही मुद्दामहून चिकाटीने वगैरे काही केले नाही’ असे ते म्हणतीलही; परंतु त्यांचे लेखन वाचूनच आपल्या भवतालाचे भान आलेला वाचकवर्गही महाराष्ट्रात मोठा आहे, हेही तितकेच खरे आहे.
    अनिल अवचट साधारणपणे १९६८ पासून लिहू लागले. माझ्या पिढीचा जन्म त्या्च्या आसपासचा. त्यामुळे आम्ही वयाच्या विशी-बाविशीत होतो आणि आपल्या आसपासचे जग समजून घेऊ पाहत होतो. तेव्हा अवचटांचे लेखन सर्वांत जवळचे वाटत होते. तोपर्यंत त्यांची दहा-बारा पुस्तके प्रकाशितही झालेली होती. या पुस्तकांतील लेख जेव्हा नियतकालिकांतून प्रसिद्ध होत होते तेव्हा आमच्या पिढीने ते वाचम्याची शक्यता तशी कमीच. त्यामुळे एकानंतर दुसरे, दुसऱ्यानंतर तिसरे अशी पुस्तके वाचतच आमची सामाजिक समज आकार घेत गेली. आपल्याला दिसते ते आणि तेवढेच आपले जग नाही, याउलट आपल्या मध्यमवर्गीय जगण्याच्या आणि जाणिवांच्या पलीकडे एक विशाल असे गरिबांचे, कष्टकऱ्यांचे जग आहे याची लख्ख जाणीव अवचटांच्या लेखनामुळे झाली. आपल्याला आपला भवताल, आपला समाज समजून घ्यायचा असेल तर अमानुष कष्ट आणि अंधाऱ्या वर्तमानात गुंतलेले हे जग समजून घ्यायला लागेल हेही लक्षात आले. त्या वर्गाचे जिणे सुधारणे म्हणजे समाजाचे जिणे सुधारणे आहे. ही जाणीवही या काळात खोल होत गेली. त्यामुळे माझ्या पिढीचे अनुभवविश्व आणि विचारविश्व रुंदावण्यामध्ये अनिल अवचटांच्या लेखनाचा वाटा मोठा आहे असे वाटते.
    नेहमी असे म्हटले जाते, की माहितीपर लेखनापेक्षा ललित म्हणजे कथा, कविता, आत्मचरित्र, कादंबरी या लेखनाचा वाचकावर अधिक खोल परिणाम होत असतो. पण, अनिल अवचट हा कथा-कादंबऱ्या लिहिणारा लेखक नाही. सतत फिरतीवर राहून विषयांचा माग काढणारा हा लेखक आहे. हा पत्रकारी पिंडाचा माणूस आहे. पृष्ठभागावर येणाऱ्या विषयांचा माग घेण्यापेक्षा पृष्ठभागावर न येणाऱ्या विषयांत उतरणारा हा लेखक आहे. जे विषय अन्यथा मराठी वाचकांसमोर सोपेपणाने, सुबोधपणे आलेच नसते ते विषय, ते जग अवचटांनी वाचकांसमोर आणले आहे. त्यांनी जशी वंचितांच्या जगाची अस्वस्थ करून सोडणारी ओळख करून दिली आहे, तशीच धार्मिक रूढी-परंपरा, जातिग्रस्त मानसिकता, सरंजामी व्यवस्था, जातिधिष्ठित शोषण आणि व्यसनाधीनता अशा गंभीर विषयांचेही भान त्यांनी वाचकांना दिले आहे. लेखनाचा खोल परिणाम याहून वेगळा काय असतो?कथा-कादंबरीच्या फॉर्ममध्ये न लिहिताही ते वाचकाच्या मनात उतरतात, याला कारण अर्थातच त्यांची लेखनशैली. त्यांना भेटलेल्या माणसांच्या जगण्यातूनच त्यांनी हे विषय उलगडले असल्याने त्यांचे लेखन माहितीच्या पलिकडे जाते आणि पाहता पाहता आपले बनून जाते.
    अवचटांचे आणखी एक वेगळेपण म्हणजे त्यांनी केलेले सर्व लेखन स्वयंप्रेरणेने आणि स्वयंप्रज्ञेने केले आहे. कोणी पैसे दिले म्हणून, कोणी ‘असाइनमेंट’ दिली म्हणून किंवा कोणत्या एनजीओने फंडिंग केले म्हणून त्यांनी ते लेखन केलेले नाही. समाजाविषयी आणि त्यातील माणसांच्या जगण्याविषयीचे कुतूहल आणि आपुलकी आहे म्हणून त्यांनी लिहिलेले आहे. त्यामुळेच हमाल, मजूर, दलित, भटके, विस्थापित, दुष्काळग्रस्त, देवदासी, वेश्या, व्यसनी येथपासून ते विविध प्रकारचे कसबी कारागीर, जुन्या बाजारातील व्यावसायिक, स्टेशनवरची बेवारस पोरे, मंडईतील भाजीवाले, तबले वगैरे वाद्य बनवणारे अशी हजार प्रकारची माणसे वाचकांना त्यांच्या लेखनातून भेटतात. त्या माणसांना त्यांच्या त्यांच्या ठिकाणी जाून वारंवार भेटणे, त्यांना बोलते करणे, त्यांचे जगणे-मरणे-कष्टणे समजून घेणे, त्यांच्या्तील कसब नेमकेपणाने हेरणे आणि त्यांच्या प्रश्नांची नेटकेपणाने मांडणी करणे हे काम खचितच सोपे नाही, पण वर्षांमागून वर्षें ते हे काम न थकता करत आले आहेत. एवढेच काय, अजूनही नव्या उत्साहाने ते नवनव्या विषयांत शिरत असतात. अमूक एखादा विषय महत्त्वाचा वाटला, की ते त्यापाठी लागत असतात. पुस्तके जमवतात, संबंधित तज्ज्ञ मंडळी हुडकतात, कार्यकर्त्यांना गाठतात, प्रत्यक्ष फिरून येतात आणि झपाटून लिहून काढतात. हा सर्व उपक्रम ते एकट्याने राबवतात. त्यांच्यामागे ना कोणती संस्था आहे, ना हाताशी दोन-चार माणसे. युरोप-अमेरिकेत अशा तऱ्हेचे काम करणारे जे लेखक-पत्रकार असतात, त्यांच्याकडे कोठली तरी फेलोशिप असते, पाठीशी एखादी संशोधनसंस्था असते, लेखनाची भली थोरली रॉयल्टी देणारी प्रकाशनसंस्था असते. सोबतीला एक-दोन सहाय्यक असतात, प्रवासखर्चाची सोय असते. अवचटांकडे असला काही प्रकार नाही. सारा कारभार एकट्याचाच. ही गोष्ट सर्वस्वी विरळा आहे. कामाची ही शैली आणि उरक कोणाचाही जीव दडपून टाकणारा आहे, पण त्यांच्या लेखनात या साऱ्या वणवणीचा आणि मेहनतीचा मागमूसही नसतो. एखादी डॉक्युमेंटरी पाहावी इतक्या सहजतेने वाचक त्यांचे लेखन वाचत जातो. त्या लेखनामागे किती कष्ट घेतले आहेत ते वाचकाला कळतही नाही. एखादी गोष्ट सांगावी तसा अवचट विषय सांगू लागतात आणि गोष्टीच्या सहजतेने विषय उलगडून दाखवतात – अगदी सहज, सोपेपणाने. आपल्या नेहमीच्या बोलण्याच्या भाषेत. कोठे जडजंबाळ शब्द नाहीत, कोठे अलंकारिता नाही. संपूर्ण समकालीन भाषा. त्यांचे लेखन वाचताना असे वाटते, की आपण असे फिरलो असतो तर अगदी असेच लिहिले असते. पण तसा प्रयत्न केला असता ते जमत मात्र नाही. तसे होण्याचे कारणही त्यांची त्यांची शैली आहे. त्यांना जसे दिसले तसे त्यांनी लिहिलेले असते. ते लिहिताना लेकाची सुरुवात अमूकच प्रकारे व्हावी, माहिती तमूकच क्रमाने द्यावी, माहितीचे विश्लेषण अमूक पद्धतीनेच असावे, वगैरे रूढ मार्ग ते सहजपणे नाकारतात. त्यांना जसे लिहावेसे वाटते तसे ते लिहीत जातात. ही बंडखोरी आणि त्यातून तयार झालेली सैली भुरळ पाडणारी आहे.
    आपण एखाद्या लेखकाविषयी विचार करतो तेव्हा त्या लेखकाने आपल्याला काय दिले याचा विचार आपण आपोआप करतो. हा विचार एक वाचक या नात्याने होत असतो. पण अवचटांच्या लेखनाचा आणि माझा संबंध हा केवळ एक वाचक एवढाच मर्यादित नाही. गेली वीस-बावीस वर्षें मी त्यांचे लेखन वाचत आलो आहे हे खरेच, परंतु त्यापलीकडे माझ्या गेल्या वीस-बावीस वर्षांच्या पत्रकारितेशीही त्यांचा लेखनाचा जवळचा संबंध आहे. त्यांनी लिहिलेले वाचायचे, पचवायचे, स्वत:ची समज वाढवून घ्यायची, त्यांनी ज्या रीतीने पत्रकारिता केली ती दृष्टी स्वत:च्या कामात आणायची आणि त्यांनी तयार केलेल्या रस्त्याने पुढे जाण्याच्या प्रयत्न ‘युनिक फिचर्स’ या माध्यमसंस्थेमार्फत करायचा, अशा रीतीने त्यांची-माझी पक्की गाठ बांधली गेली आहे. अवचटांनी तयार केलेल्या रस्त्याने चालण्याचा प्रयत्न म्हणजे काय?
    ‘युनिक फिचर्स’ ही माध्यमसंस्था १९९० मध्ये सुरू झाली. आम्ही चार-पाच मित्रांनी एकत्र येऊन या संस्थेमार्फत पत्रकारितेत स्वत:ची वेगळी वाट चोखाळण्याचा प्रयत्न केला. कोठल्या एका दैनिकात काम न करता एकाच वेळी अनेक दैनिकांसोबत, नियतकालिकांसोबत काम करायचे, अशी मूळची कल्पना. हेतू हा, की ‘बाहेर’ राहून
    मनाजोगते काम करता यावे. ही प्रेरणा कोठून आली असा प्रस्न विचारला तर त्याचे एकच एक उत्तर नसणार, पण कदाचित एक उत्तर ‘अवचटांकडून’ असे असू शकते. अवचटांचा आयुष्यभर स्वतंत्र राहून काम करण्याचा संदर्भ त्याला असू शकतो. दुसरे म्हणजे आम्हा मित्रांची प्रत्येकाची वाचनाची, अभ्यासाची, रमण्याची आवड वेगवेगळी असली, तरी अवचटांचे वाचणे ही ‘कॉमन’ गोष्ट होती. त्यामुळे काम कसे करायचे तर अवचटांसारखे, असे मनात चालू राहत असे. त्यांनी समाजाचा जो कोपरा वाचकांना दाखवला तो आणखी उकलून पाहण्याचा, जरा अधिक शिस्तीने, समाजशास्त्रीय अभ्यासाचा आधार घेऊन पाहण्याचा प्रयत्न आम्ही केला तो त्यामुळेच. ‘युनिक फिचर्स’च्या टीमने खूप खपून धारावी या अतिप्रचंड झोपडपट्टीवर आणि तेथील जगण्यावर, तेथील व्यवहारांवर एक शोधलेख ‘साप्ताहिक सकाळ’च्या दिवाळी अंकासाठी १९९५ साली लिहिला होता. तो लेख वाचून कोणी तरी म्हटले होते, की”साप्ताहिक सकाळ’च्या यंदाच्या दिवाळी अंकात अनिल अवचटांचे दोन लेख आहेत. एक स्वत:च्या नावाने आणि दुसरा ‘युनिक फिचर्स’च्या नावाने!’ हे जेव्हा आम्हाला कळले. तेव्हा भारी मजा वाटली होती. अवचटांचा वाटावा असा लेख आपण लिहिला याचे केवढे अप्रूप आम्हाला तेव्हा वाटत होते. त्यानंतर मुंबईतील भेंडीबाजार, आग्रीपाडा, वेश्यांच्या वस्त्या, कोळीवाडे वगैरेंवर आम्ही लेख लिहिले, तेव्हाही ‘अवचटांची छाप आहे तुमच्यावर’ असे कोणी कोणी म्हणत असेच. ज्या माणसाचे वाचून आमची पिढी तयार झाली, त्यांच्याशी वाचकांनीच अशी नाळ जोडून टाकली! त्या सर्व काळात ना कधी अवटचांशी गाठीभेटी होत, ना कधी बोलणं-चालणं. खेड्यापाड्यांतली मुले जशी कपिल किंवा सचिनच्या खेळाकडे बघून आपापले धडे गिरवतात, तसे आमचे अवचटांबद्दल चालू होते.
    आणखी एक गंमत सांगण्यासारखी आहे. अवचटांच्या ‘वेध’ या पहिल्यापैकीच्या पुस्तकाला विजय तेंडुलकरांची प्रस्तावना आहे. ही गोष्ट १९७५ ची. त्यानंतर तब्बल पंचवीस-सत्तावीस वर्षांनंतर ‘युनिक फिचर्स’चे पहिले पुस्तक ‘अर्धी मुंबई’ प्रकासित झाले, त्यालाही तेंडुलकरांचीच प्रस्तावना आहे. ‘वेध’बद्दल लिहिताना तेंडुलकरांनी अवचटांच्या ठायी असलेल्या ‘सामाजिक जाणिवे’ची नोंद केली होती. ‘अर्धी मुंबई’बद्दल लिहिताना ‘युनिक फिचर्स’च्या पत्रकारांमधील ‘सजग समाजशास्त्रीय दृष्टी’ तेंडुलकरांना भावली होती. तेंडुलकरांनी हेरलेली ही गोष्ट आम्हाला नेहमीच बळ देत आली आहे. अवचट जेव्हा लिहीत होते तेव्हा भारतात तुलनेने सामाजिक शास्त्रांचा विकास झालेला नव्हता. नंतरच्या पिढ्यांना मात्र समाजशास्त्रीय अभ्यासाची पार्श्वभूमी मिळाली. त्यामुळे त्या नव्या शस्त्रामुळे आम्हाला अवचटांच्या सामाजिक जाणिवेला अधिक धार आणता आली आणि एका लेखकाचे काम पुढे नेण्याचा आनंद मिळवता आला. अवचटांनी तयार केलेल्या रस्त्याने पुढे जाणे म्हणजे हेच!
    ‘युनिक फिचर्स’ने गेल्या दोन दशकांत जी पत्रकारिता केली त्याच्यावर अन्य काही पत्रकार, लेखक, अभ्यासक नि संपादकांप्रमाणेच अवचटांचाही प्रभाव आहे, ही गोष्ट त्यामुळे मान्यच करायला हवी. विशेषत: रिपोर्ताज, शोधलेख हे लेखनप्रकार हाताळण्याबाबत तर नक्कीच. मराठीत हा लेखनप्रकार पहिल्यांदा हाताळला तो अवचटांनी. त्यांनी एके ठिकाणी लिहिले आहे, की सुरुवातीला त्यांचे असे लेख येऊ लागले तेव्हा त्यांना कोणी अभ्यासक सांगत, की अशा लेखनाला ‘रिपोर्ताज’ म्हणतात, हा मूलचा फ्रेंच शब्द आहे वगैरे. याचा अर्थ रिपोर्ताज हा लेखनप्रकार हाताळण्यासाठी म्हणून अवचट लिहीत नव्हते; परंतु आम्ही जेव्हा लिहिते झालो तेव्हा अवचटांचे ‘रिपोर्ताज’मराठीत रूळलेले होते. त्या रिपोर्ताजचे गारूड आमच्यावरही होते. एखादा प्रश्न समजून घ्यायचा तर लोकांमध्ये जायला हवे, त्यांचे जगणे, त्यांचे म्हणणे समजून घ्यायला हवे आणि ते सारे रिपोर्ताजच्या फॉर्ममध्येच लिहायला हवे असे वाटे. कदाचित अवचटांइतके चांगले, सहज आणि मोकळेढाकळे रिपोर्ताज आम्ही लिहू शकलो नसू, पण त्यांच्या या लेखनशैलीची कास आम्ही धरून राहिलो, ‘प्रचंड मेहनत’ ही पूर्वअट असेलला हा लेखनप्रकार हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करत राहिलो. ‘अनुभव’ या (आमच्याच) मासिकासह अनेक नियतकालिकांत आणि दिवाळी अंकांत ‘युनिक फिचर्स’च्या टीमने लिहिलेले रिपोर्ताज (शोधलेख) प्रसिद्ध होत असतात. त्यातून येत्या काळात त्या लेखांचे संग्रह करून त्यांची पुस्तके वाचकांच्या भेटीला येणार आहेत. ‘अर्धी मुंबई’ हे शोधलेखांचे पुस्तक तर सर्वज्ञात आहेच. त्या प्रकारचे काम करत असताना, अनिल अवचटांनी शोधलेली वाट आपण सोडता कामा नये, अशी सुप्त जाणीव मनात असते, हे या निमित्ताने सांगावेसे वाटते.
    अवचटांकडून आणखीही काही गोष्टी ‘युनिक फिचर्स’ने घेतल्या आहेत. दिसते त्यापलिकडे असलेले वास्तव समजून घेण्याची वृत्ती, प्रश्नांप्रमाणेच त्यांची उत्तरे शोधणाऱ्या धडपड्या मंडळींचा शोध आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे लोकांमध्ये जाऊन विषय समजून घेण्याची शैली, या बाबी आम्ही आमच्या अंगी बाणवत आलो आहोत. ‘मला काय वाटते’ या ऐवजी ‘मला काय दिसते’ हे सांगणे महत्त्वाचे हा धडाही आम्ही त्यांच्याकडूनच घेतला असावा. जे दिसेल ते वस्तुनिष्ठपणे सांगणे, त्यात सांगणाऱ्याची वैचारिक भूमिका- आवडीनिवडी येऊ न देणे ही गोष्ट आम्ही कटाक्षाने पाळत असतो. अवचटांच्या लेखनातही दुराग्रह नाहीत, अभिनिवेश नाहीत. त्यांच्यात तटस्थता आहे. ते गुण आत्मसात करणे सोपे नाही, परंतु पत्रकारिता वस्तुनिष्ठपणे करायची तर ती गोष्ट करणे आलेच.
    अवचटांकडून एवढे सारे घेतले असे म्हणताना एक गोष्ट नमूद करावीशी वाटते. हल्ली हल्ली अनेकदा गुंतागुंतीच्या सामाजिक व अर्थराजकीय विषयांवर अवचट भाबडी किंवा स्वप्नाळू वाटेल अशी भूमिका घेताना दिसतात. त्यामुळेच त्यांची शहरांबद्दलची, चंगळवादाबद्दलची, पर्यावरणाबद्दलची मते अनेकदा पटणारी नसतात. राजकीय प्रक्रियापासून फटकून राहण्यासारख्या काही भूमिकाही आम्हाला पटणाऱ्या नसतात. त्यांच्या या भूमिकांबद्दल त्यांच्यावर कोणी कोणी टीकाही करते, तेव्हा मात्र असे वाटते, की आपल्याला एवढे काही दिलेल्या माणसाला त्याचा स्वत:चा विचारव्यूह बाळगण्याचे स्वातंत्र्य आहेच की!
    तर असे हे आमचे गुरुजी!
    या गुरुजींचे ‘रिपोर्टिंगचे दिवस’हे नवे पुस्तक ‘समकालीन प्रकाशन’ या आमच्या संस्थेतर्फे प्रकाशित झाले आहे याचा आनंद त्यामुळे मनात आहेच. याआधी ‘मुक्तांगणची गोष्ट’ हे त्यांचे पुस्तक ‘समकालीन’ने प्रकाशित केले आहे. ते पुस्तक दोन कारणांसाठी महत्त्वाचे आहे. पहिली गोष्ट म्हणजे पत्नी सुनंदा यांच्या सोबतीने स्थापन केलेल्या आणि वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने पंचवीस वर्षें चालवलेल्या एकमेवाद्वितीय संस्थेची ती कहाणी आहे, त्यामुळे ती महत्त्वाची आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अवचटांनी एकसलग पद्धतीने लिहिलेले ते पहिले पुस्तक आहे. त्यांची अन्य पुस्तके ही एक तर लेखमालिकेतून तयार झाली आहेत किंवा सुट्या सुट्या लेकांचा संग्रह करून. ‘मुक्तांगणची गोष्ट’चे तसे नाही. ते ठरवून लिहिलेले पुस्तक आहे. त्या पुस्तकातील अवचटांची कथनशैली, निवेदनशैली, गोष्ट सांगण्याची शैली अन्यत्र वाचायला न मिळणारी आहे. एरवी ‘दिसले ते सांगितले’ ही शैली या पुस्तकात हलकेच ‘घडले ते सांगितले’ असे रूप घेते आणि पंचवीस वर्षांची एक गोष्ट सुरसपणे सांगून जाते. असो. तूर्त आपण ‘रिपोर्टिंगचे दिवस’ या पुस्तकाबद्दल बोलू. हे पुस्तक आकाराला कसे आले ते आधी सांगतो. यापूर्वी कोणत्याही पुस्तकात प्रकाशित न झालेले (परंतु नियतकालिकांत प्रकाशित झालेले) काही लेख अवचटांनी गंमत म्हणून मला वाचायला पाठवले. मीही ते गंमत म्हणून वाचले. हे लेख १९७० च्या दशकात ‘मनोहर’आणि ‘साधना’ या साप्ताहिकांत प्रसिद्ध झाले तेव्हा मी शाळकरी मुलगा असणार, त्यामुळे ते वाचले असण्याची शक्यता शून्यच. त्यामुळे अधाशीपणे ते लेख वाचत गेलो. त्यांनी आणखी लेख पाठवले. तेही वाचले. आणि मग वाचता वाचता लक्षात आले, की अरे, हा काळ आपल्याला कोणी असा सांगितला नव्हता. याचे पुस्तक व्हायला पाहिजे. इतरानांही हा काळ ‘अवचट शैली’तून वाचता यायला पाहिजे. मग गप्पांतून पुस्तक आकार घेत गेले. अवचट ज्या काळी रिपोर्टिंग करत होते, कोठले कार्यक्रम कव्हर करत होते, मंत्रिमंडळांच्या बैठकांना हजर राहत होते, मुख्यमंत्र्यांच्या ‘प्रेस कॉन्फरन्सेस’ अटेंड करत होते, कोणा कोणासोबत दौऱ्यांमध्ये सहभागी होत होते, एखाद्या प्रकरणाचा माग काढत होते, अशा काळात लिहिलेल्या लेखांचे पुस्तक करावे असे ठरत गेले. असे पुस्तक वैशिष्ट्यपूर्ण ठरेल, कारण त्यातून ‘रिपोर्टर अवचट’ समोर येतील असे वाटले. आपल्याकडे नाही म्हटले तरी रिपोर्टिंगची एक बंदिस्त व्याख्या आहे. त्या चौकटीत राहून पत्रकार मंडळी लिहीत असतात. अवचटांनी मात्र ही चौकट मोडून काढलेली दिसते. त्यांच्या या शैलीचा परिचय या पुस्तकामुळे होईल हाही हे पुस्तक प्रकाशित करण्यामागे हेतू आहे.
    दुसरी गोष्ट म्हणजे हे लेखन ज्या सत्तरच्या दशकातील आहे तो काळ भारताच्या दृष्टीने मोठा उलथापालथीचा होता. राजकीय-सामाजिक घुसळण जोरात सुरू होती. इंदीरा गांधींकडे एकहाती सत्ता असणे आणि जयप्रकाश नारयणांनी त्यांना व्यापक आव्हान देणे अशा दोन्ही टोकांच्या गोष्टी या दशकात घडत होत्या. याच काळात युवकांच्या, तरुणांच्या, दलितांच्या चळवळी सुरू झाल्या होत्या. अन्य मागास जातींना आत्मभान येऊ पाहत होते. सनातनी, रूढीवादी विचारांना ‘रॅशनल’ लोकांकडून आव्हान दिले जाऊ लागले होते. असे बरेच काही त्या काळात घडत होते. त्या अस्वस्थ दशकात अवचट चळवळींमध्ये वगैरे सहभागी होत होते. त्यामुळे सामाजिक-राजकीय घडामोडी ते अगदी जवळून बघत होते, लिहून काढत होते. त्यांच्या त्या लेखनातून हा काळ आपल्याला ‘फर्स्ट हँड’ वाचायला मिळतो. तिसरी गोष्ट म्हणजे एरवी अवचटांचे लेखन प्रामुख्याने सामाजिक विषयांभोवती फिरते. या पुस्तकातील लेक मात्र चक्क राजकीय संदर्भ असलेले आहेत. १९७४ साली इंदिरा गांधी पंतप्रधान असताना पुण्यात आल्या होत्या. त्यांच्यासोबत अख्खा दिवस राहून दौऱ्याभोवती घडलेल्या घडामोडी अवचटांनी या पुस्तकातील एका लेखात रेकाटल्या आहेत. राजकीयदृष्ट्या अस्वस्थ काळात देशाचा पंतप्रधान एखाद्या शहरात येतो तेव्हा त्या शहराच्या पोटात काय काय घडते याचे सखोल वर्णन या लेखात वाचायला मिळते. दुसरा एक लेख ‘दलित पँथर’मधील अस्वस्थतेचा शोध घेणारा आहे. त्याकाळी दलित तरुणांची ‘दलित पँथर’ ही बरीच बोलबाला असलेली संघटना फुटीच्या उंबरठ्यावर उभी होती. त्या फुटीचे, नेत्यांमधील मतभेदांचे नि मारामाऱ्यांचे धागेदोरे अवचटांनी या लेखात उलगडले आहेत. त्यासाठी नामदेव ढसाळ, राजा ढाले, ज.वि. पवार, अविनाश महातेकर वगैरे नेत्यांना जाऊन भेटले आहेत. आरोप-प्रत्यारोपांचे खुलासे त्यांच्याकडून घेतले आहेत, त्यांच्या बैठकांना उपस्थित राहिले आहेत आणि या साऱ्यांचे तपशीलवार वर्णन त्यांनी वाचकांपर्यंत पोचवले आहे. रिपब्लिकन पक्ष आणि अँग्री पँथर्स यांच्यातील सुप्त संघर्ष, तरुणांना हवे असलेले ऐक्य, प्रमुख पक्षांतील लोक या युवकशक्तीला आपल्याकडे वळवण्यासाठी करत असलेले प्रयत्न, असा सारा माहोल अवचटांनी समोर आणला आहे. हा लेख तेव्हा बराच गाजला होता आणि त्या लेखामुळेच पँथर्समध्ये फूट पडली असा ठपकाही ठेवला गेला होता. तिसरा लेख पुण्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीच्या अनुषंगाने आहे. वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना पुण्यात मंत्रिमंडळाची बैठक होत असे. त्यामुळे मंत्र्यांना निवेदने देण्यासाठी आणि आपापल्या मागण्या नोंदवण्यासाठी संबंधित लोक मोर्चाने कौन्सिल हॉलवर जात असत. त्या मोर्च्यांचे, त्यांच्या नेत्या-कार्यकर्त्यांचे, मंत्र्यांच्या कार्यशैलीचे आणि एकूणच जनतेच्या तोंडाला पाने पुसण्याच्या कौशल्याचे वर्णन अवचटांनी या लेखात केले आहे.
    थेट राजकीय म्हणता येईल असा आणखी एक लेख अवचटांनी केलेल्या बिहार दौऱ्यावरचा आहे. १९७५ मध्ये आणीबाणीच्या आधी जयप्रकाश नारायणांनी जे ‘जन आंदोलन’ सुरू केले होते, ते ‘कव्हर’ करण्यासाठी अवचट जेपींच्या बिहारमधील दौऱ्यात सामील झाले होते. देशात काही तरी प्रचंड बदल होत आहेत आणि व्यापक जनचळवळ आकाराला येत आहे, असा समज होऊन बिहारमध्ये पोचलेल्या अवचटांनी स्वत:चा झालेला भ्रमनिरास मोकळेपणाने मांडला आहे. बिहारमधील जमीनदारी, नवनिर्माणाच्या चळवळीला असलेला जमीनदारांचा नि प्रस्थापितांचा आधार, जातीपातींमधील चढाओढ, त्याचा जेपींच्या आंदोलनाशी असणारा संबंध, स्वत: जेपींचे व्यत्तिमत्व वगैरे अनेक महत्त्वाच्या गोष्टी अवचटांनी सविस्तरपणे लिहिल्या आहेत. हा लेख राजकीय दस्तावेज म्हणून महत्त्वाचा आहे. एखाद्या विषयाचे आडवे-उभे धागे शोधून प्रश्नाचे आकलन करून देणे ही खास अवचट शैली. त्या शैलीचा उत्तम नमुना असलेला एक लेख त्या पुस्तकात आहे. १९७३ साली पुण्यात भरलेेले नाभिक समाजाचे पहिले संमेलन अवचटांनी ‘कव्हर’ केले होते. एकादा समाज जातीच्या व व्यवसायाच्या नावाने एकवटतो तेव्हा काय काय घडते याचे अनेकपदरी वर्मन अवचटांनी त्या लेखात केले आहे. एखादा समाज एकत्र येऊन काही मागण्या करू लागतो तेव्हा आपोआपच लोकसाही प्रक्रिया सुरू होते. गट तयार होतात, ते एकमेकांशी संघर्ष करू लागतात. त्या संमेलनाच्या वेळी जातीमधील वर्गभेद कसा पुढे आला, कामगार-मालक, शहरी-ग्रामीण हे भेद कसे उग्र बनले, एकाच जातीच्या पोटात उच्चनीच भाव कसा असतो आणि प्रसंग आल्यास तो कसा व्यक्त होतो, जातीतील उतरंड जातीमध्ये कशी फूट पाडते वगैरे अनेक बारकावे त्यांनी त्या लेखातून टिपले आहेत. गेल्या दोन दशकांत महाराष्ट्राच्या (आणि देशाच्याही) राजकारमात जातिगटांना खूपच महत्त्व आले आहे. त्याची सुरुवात कशी, कोठून झाली असेल त्याचा पत्ता हा लोक वाचतान लागतो. जातीचे संघटन करण्यात कोणते आंतर्विरोध असतात त्याचेही भान हा लेख वाचताना आपल्याला येते. गेल्या काही वर्षांत आपल्याकडे बहुतेक सर्व जातींची संमेलने, अधिवेशने होताना दिसतात, परंतु इतक्या विचक्षणपणे त्याचे रिपोर्टिंग कोणी केल्याचे स्मरत नाही. कदाचित हल्ली जातीच्या अस्मिता फार टोकदार बनलेल्या असल्याने असा प्रयत्न करायला कोणी धजत नसेल. परंतु त्यामुळे आपल्या समाजाबद्दलची आपली समज ढोबळ बनत चालली आहे हे नक्की.
    ‘सत्यशोधकांचं सत्यशोधन’ या लेकात राजकीय मंडळी सामाजिक प्रबोदन आणि सुधारणेकडे किती मतलबीपणे पाहतात याचे वर्मन अवचटांनी केले आहे. ‘राजकीय’सत्यशोधक आणि ‘सामाजिक’ सत्यशोधक यांच्या भूमिकांतील फरक त्यांनी अगदी स्वच्छपणे दाखवून दिला आहे. ‘राजकीय’ सत्यशोधकांकडून दलित प्रश्नावर बोटचेपी आणि सोयीस्कर भूमिका कशी घेतली जाते हे त्यांनी निर्भयपणे सांगितले आहे. त्या पुस्तकात १९७७ सालच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पु.भा. भावे यांची अवचटांनी घेतलेली मुलाखतही आहे. जातिभेद, हिंदु-मुस्लिम प्रश्न, वंशश्रेष्ठत्व, चातुर्वर्ण्य, हिंदुराष्ट्रवाद, पुनर्जन्म अशा अनेक विषयांवर भावे यांनी बेधडक आक्षेपार्ह मुलाखत दिली आहे. ती मुलाखत स्फोटक आहे. ती प्रसिद्ध झाल्यानंतर मोठाच गहजब झाला होता आणि संमेलन उधळून लावण्याचा प्रयत्नही झाला होता. ही मुलाखत आज वाचली, की त्या काळचे भावे यांच्यासारखे ज्येष्ठ लेखक किती सनातनी विचार बाळगून होते आणि किती थेटपणे (खरे तर बेमुर्वतखोरपणे) आपले विचार बोलत होते ते कळते. त्या बाबतींत गेल्या तीस-चाळीस वर्षांत आपम बरेच पुढे आलो आहोत आणि असे विचार बाळगण्याची, किमान बोलण्याची कोणाची प्राज्ञा राहिलेली नाही. कदाचित तेव्हाही असा विचार करणारे लोक कमीच असतील. परंतु संमेलनाध्यक्षपदीच अशी व्यक्ती बसलेली आहे हे पाहून अवचटांनी प्रश्न विचारले आमि त्यातून ही मुलाखत आकाराला आली. ही मुलाखत खळबळ निर्माण करणारी ठरलीच, शिवाय या खळबळीमुळे सनातनी विचारांचे लोक उघडे पडले आणि समाजाचे एक पाऊल पुढे पडायला मदत झाली. आपल्याकडे हल्ली बहुतेक लेखक सामाजिक-राजकीय घडामोडींपासून अलिप्त राहताना दिसतात. मोकळेपणाने भाष्य करण्याचेही ते टाळतात. त्यातून एक प्रकारची कुंठितावस्था येते. खरे पाहता लोकशाही देशात विचारांच्या अभिव्यक्तीतूनच समाज पुढे जात असतो. वैचारिक कलह झाले तरच नवी वाट सापडत असते. लेखकांवर याबाबत मोठीच जबाबदारी असते. ती जबाबदारी तेव्हा पत्रकार या नात्याने अवचटांनी पार पाडली आहे. आज लेखकही बोलत नाहीत आणि पत्रकारही विचारत नाहीत अशी परिस्थिती आहे. या पुस्तकातील लेख वाचल्यानंतर कोणाच्याही लक्षात येईल, की हे पुस्तक आजच्या आणि उद्याच्या पत्रकारांच्या दृष्टीने उपयुक्त आहेत. त्या पुस्तकातील सर्वच लेख वाचकांना जवळचे वाटणारे असले तरी नव्या पत्रकारांना त्यातून सिकण्यासारखे बरेच काही आहे. ‘रिपोर्टिंगचे दिवस’ या पुस्तकातील एकेक लेख वाचताना असे वाटत राहते, की त्या लेखांत दिसणारी चित्रमय लेखनशैली अवचटांनी पुढे स्वत:च्या लेखनात नीट विकसित केली, परंतु अगदी मोजकेच अपवाद वगळता मराठीत हा प्रवाह रूजू शकला नाही. त्याचे एक कारण कदाचित मराठी पत्रकारितेचा कल अधिककरून मते मांडम्याकेडच राहिला यात असू शकते. बारकाईने, तपशीलवार चित्रम करणे आणि निरीक्षण मांडणे असा प्रयत्न आपल्याकडे तुलनेने कमी दिसतो. अमूक एखादी घटना, प्रसंग, घडामोड किंवा प्रक्रिया कशी घडते, त्याच्याशी संबंधित माणसे कोण, कशी आहेत, त्यांचे म्हणणे काय आहे, त्यांचे वागणे बोलणे कसे आहे, त्यांच्या बोलण्यात-वागण्यात अंतर आहे काय, येथपासून ते अमूक एका घडामोडीचा ज्यांच्यावर परिणाम होणार आहे त्यांच्याबद्दल म्हणणे काय आहे वगैरे सर्व बाजू समोर आणाव्यात आणि त्यावर विचार करून मत बनवण्याचे स्वातंत्र्य वाचकाला द्यावे. ही गोष्ट मराठी पत्रकारितेत म्हणावी तशी मूळ धरू शकलेली नाही. जे काही घडत आहे त्यावर माझे मत काय आहे हेच प्रामुख्याने सांगितले गेले आहे, जात आहे. त्यात ‘माझे’ आणि ‘मत’ या दोन गोष्टींना विनाकारण महत्त्व प्राप्त होते. शिवाय जो तो आपापल्या वकुबाप्रमाणे आपले मत मांडत असल्यामुळे ते मत पुरेसे वस्तुनिष्ठ किंवा वास्तवास धरून असेलच असेही नाही. त्यामुळे खरे तर वाचकाला वास्तव काय आहे हे सांगणे गरजेचे. त्यासाठी वास्तवाचे चित्रण, वर्णन केले पाहिजे, आपल्याला कळलेले कंगोरे सांगितले पाहिजेत आणि मगच (हवे असेल तर) आपले मत दिले पाहिजे. परंतु आपल्याकडे दैनिक-साप्ताहिकांमध्येजे छापून येते ते पाहिले, की त्या दृष्टीचा संपूर्ण अभाव असल्याचे जाणवते. पत्रकारितेचे शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्येही ही दृष्टी कितपत गंभीरपणे दिली जाते ते माहीत नाही. त्यामुळे ज्यांना आपला समाज नीटपणे समजून घ्यायचा आहे आणि पत्रकारितेमार्फत, लेखनामार्फत वाचकांपर्यंत पोचवायचा आहे अशांना हे पुस्तक बरेच उपयुक्त ठरू शकते.
    अवचटांनी हे लेख लिहिले तेव्हा साप्ताहिके-मासिकांमधून विस्ताराने लिहिण्याची सोय होती, आज ती उरलेली नाही, त्यामुळे ही लवेखनशैली मागे पडली असण्याची शक्यता नाकरता येत नाही. परंतु आजही जागेची अडचण नसलेली मासिके प्रकाशित होत आहेत, दिवाळी अंकांची संस्कृती विस्तारते आहे, पुस्तके प्रकाशित करणे पूर्वीसारखे अवघड राहिलेले नाही, नवे तंत्रज्ञान वापरून इंटरनेटवर ब्लॉग्ज वगैरे लिहिणेही सहज शक्य झाले आहे. टीव्हीवरील वृत्तवाहिन्यांमध्येही रिपोर्ताज प्रकार हाताळता येऊ शकतो व काही मंडळी हा प्रयत्न करतही आहेत. मात्र टीव्हीवरील रिपोर्ताज पाहताना मेंदू प्रामुख्याने दिसणारी चित्रे पाहण्यात गुंततो आणि आशय मात्र सुटून जातो. त्यामुळे छापील रिपोर्ताजची जागा दृकश्राव्य रिपोर्ताज घेऊ शकतील असे वाटत नाही. त्यामुळे या नव्या, बदललेल्या परिस्थितीत अवचट शैलीच्या रिपोर्ताजची परंपरा चालू राहणे आणि बळकट बनणे आवश्यक बनते. ‘युनिक फीचर्स’च्या वतीने आम्ही तो प्रयत्न करत आहोतच, परंतु संपूर्ण पत्रकारितेनेच ही दृष्टी स्वीकारण्याची गरज आहे.
    या पुस्तकाने ती गरज अधोरेखित झाली तर अवचटांच्या लेकनाचे वाचक म्हणून त्यांच्या प्रवाहाचे संवाहक म्हणून आणि त्यांचे प्रकाशक म्हणून आम्हाला आनंदच होईल.
    – सुहास कुलकर्णी
    suhas.kulkarni@uniquefeatures.in
    (महा अनुभव मार्च २०१३ वरून उद्धृत)
     
             

    About Post Author