मुस्तफा कुवारी यांची गांधीगिरी

जव्हार येथील साप्ताहिक ‘कालतरंग’चे संपादक दयानंद मुकणे हे जव्हार-नाशिक रेल्वेमार्गाबाबत प्रयत्न करत असताना त्‍यांची भेट मुस्तफा कुवारी यांच्‍याशी झाली. त्यांच्यात झालेल्या चर्चेतून ठाणे जिल्ह्याचा अविकसित भाग जोडण्यासाठी एक नवा रेल्वेमार्ग विकसित करण्याची कल्पना पुढे आली. मुस्तफा कवारी यांनी बदलापूर-मुरबाड-वाडा-जव्हार आणि मुरबाडअहमदनगर अशा दोन रेल्वेमार्गांचे नकाशे व तसा प्रस्ताव तयार केले. मुकणे व कुवारी यांनी लालबहादूर शास्त्री रेल्वेमंत्री असताना हा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे पाठवला, त्यानंतर गेली चाळीस वर्षं मुस्तफा कुवारी या प्रस्तावाचा वेगवेगळ्या मार्गांनी, हरप्रकारे पाठपुरावा करत आहेत. आज नवे रेल्‍वेमंत्री पदावर आले असता त्‍यांनाही पत्रे पाठवून कुवारी यांनी आपली ‘गांधीगिरी’ सुरूच ठेवली आहे.

माळशेज रेल्वेचा पाठपुरावा

जव्हार येथील साप्ताहिक ‘कालतरंग’चे संपादक दयानंद मुकणे हे जव्हार-नाशिक रेल्वेमार्गाबाबत सातत्यानं प्रयत्न करत होते. जव्हारला मुस्तफा कुवारी व दयानंद मुकणे एकमेकांना भेटले आणि त्यांच्यात झालेल्या चर्चेतून ठाणे जिल्ह्याचा अविकसित भाग जोडण्यासाठी एक नवा रेल्वेमार्ग विकसित करण्याची कल्पना पुढे आली. मुस्तफा कवारी यांनी बदलापूर-मुरबाड-वाडा-जव्हार आणि मुरबाड-अहमदनगर अशा दोन रेल्वेमार्गांचे नकाशे व तसा प्रस्ताव तयार केले. या प्रस्तावात वाटेत येणा-या नद्या, छोटे नाले-त्यांवर उभारावे लागणारे मोठे पूल, छोट्या मो-या, खडीसाठी उपलब्ध असणारे डोंगर, वाटेतली टेकाडं-ती टाळण्यासाठी घ्यावी लागणारी वळणं, प्रस्तावित रेल्वेस्थानकांना कुठून पाणीपुरवठा होऊ शकतो, (मूळ प्रस्ताव कोळशाचे इंजिन नजरेसमोर ठेवून तयार केलेला होता.) रेल्वेमार्गांवरील सरकारी व खासगी जमीन किती, सरकारला किती जमीन संपादित करावी लागेल -ती कोणत्या ग्रामपंचायतींच्या हद्दीत येते, वनविभागाची जमीन किती अशा अनेक तपशिलांचा समावेश आहे.

मुकणे व कुवारी यांनी लालबहादूर शास्त्री रेल्वेमंत्री असताना हा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे पाठवला, त्यानंतर गेली चाळीस वर्षं मुस्तफा कुवारी या प्रस्तावाचा वेगवेगळ्या मार्गांनी, हरप्रकारे पाठपुरावा करत आहेत. मधू दंडवते ते नितीशकुमार यांच्यापर्यंतचे सर्व रेल्वेमंत्री जेव्हा जेव्हा मुंबईत आले तेव्हा मुस्तफा कुवारी त्यांना भेटलेले आहेत. ‘तुमचा प्रस्ताव विचाराधीन आहे, त्याची छाननी करण्यात येत आहे’ अशा त-हेची उत्तरं त्यांना नेहमी मिळत आलेली आहेत.

प्रस्तावित रेल्वेमार्ग बदलापूर येथून सुरू होतो. अंबरनाथ व बदलापूर या दोन रेल्वे स्थानकांमध्ये गार्लिक फॅक्टरी नावाचं एक रेल्वे स्टेशन गेली अनेक दशकं प्रलंबित आहे. या गार्लिक रेल्वे स्थानकापासून सुरू होऊन रेल्वेमार्ग बोराडपाड-म्हसामार्गे-मुरबाडला येतो. मुरबाड हे या दोन्ही रेल्वेमार्गांवरचं जंक्शन आहे. मुरबाडवरून एक मार्ग किन्हवली-शहापूर-भिवंडी-कुडूस-वाडा-जव्हार-विक्रमगड-त्र्यंबकेश्वर मार्गे नाशिकला जाऊन भिडेल तर दुसरा मार्ग मुरबाड-टोकावडा-सरळगाव-सावर्णेमागें माळशेजघाटातून ओतूर-बनकर फाटा-बेल्हामार्गे अहमदनगरला जाईल. याच प्रकल्पाला सध्या माळशेज रेल्वे म्हणण्यात येतं.

या दोन्ही रेल्वेमार्गांमुळे ठाणे जिल्ह्याचा दुर्गम भाग आधुनिकीकरणाच्या कक्षेत येईल. या भागात उद्योगधंदे उभारले जातील. स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण होईल. ग्रामीण भागातील तरुणांना रोजगारासाठी शहराकडे धाव घ्यावी लागणार नाही. ठाणे व नाशिक जिल्ह्यांतील आदिवासी समाजाला त्याचा विशेष लाभ होईल. त्यांच्या वनोत्पादनांना बाजारपेठ मिळेल. मुरबाड येथील सहाशे एकर परिसरातील औद्योगिक वसाहत या रेल्वेमार्गामुळे बाहेरच्या जगाशी जोडली जाईल. पुणे व नगर जिल्ह्यांतील ग्रामीण भागाचाही विकास होईल. मुंबईला होणारा दूध व भाजीपाला पुरवठा सध्या माळशेज घाटातून ट्रक्सनं होतो. रेल्वेची सोय झाल्यास तो जलद व कमी खर्चात होऊ शकेल. छोट्या दूध व भाजीपाला विक्रेत्यांना, शेतक-यांना मध्यस्थांवर अवलंबून न राहता थेट बाजारपेठेत माल विकणं शक्य होईल. छोटे उत्पादक सहकारी संघ निर्माण करून थेट बाजारपेठेत शिरकाव करू शकतील. दोन्ही प्रस्तावित रेल्वेमार्गांच्या परिसरात ( माळशेज घाट व विक्रमगड-घोटी-त्र्यंबकेश्वर पट्टा वगळता)  जमीन सपाट आहे. घाटद-या फारशा नाहीत.

शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना 1975 साली एकदा जव्हार भेटीला आले होते. तेव्हा त्यांनी या गोष्टीला तत्त्वत: मंजुरी दिली होती. या परिसरात माळशेज, सिद्धगड, मच्छिंद्रगड, माहुली, अजापर्वत, भंडारदरा, तानसा-वैतरणा, जव्हार ही पर्यटन केंद्रं आहेत. त्यांचा विकास झाल्यास पर्यटनाच्या माध्यमातूनही रोजगारनिर्मिती होईल.

धारावीचे खासदार एकनाथ गायकवाड यांनी पुढाकार घेऊन रेल्वे राज्यमंत्री आर. वेलू व मुस्तफा कुवारी यांची भेट घडवून आणली. त्यानंतर रेल्वे राज्यमंत्र्यांनी 28-8-2007 रोजी पाठवलेल्या पत्रात या प्रकल्पाला तीनशेतीस कोटी रु. खर्च असल्याने सध्या तो हातात घेणं शक्य नाही असं उत्तर दिलं आहे. मुस्तफा कुवारी यांच्याकडे त्यावरही तोडगा आहे. ते म्हणतात, पुणे प्रकल्पाचं सहा टप्प्यांत विभाजन करून ते टप्प्या-टप्प्यानं अमलात आणणंही शक्य आहे. तसा प्रस्ताव त्यांनी रेल्वे मंत्रालयाला पाठवलेला आहे.

मुस्तफा कुवारी हे जागरूक, दक्ष नागरिक आहेत. सरकारदरबारी अर्ज-विनंती करून प्रशासनात सुधारणा करण्याचं त्यांचं कार्य सतत चालू असतं. त्यांनी सुचवलेल्या सुधारणा प्रशासनानं स्वीकारल्या व अमलात आणल्या. बदलापूर शहरात अनधिकृत हातगाड्यांमुळे मोठी वाहतूक कोंडी होत असे. कुवारी यांनी त्याविरुद्ध आवाज उठवून नगरपालिकेला या हातगाड्या हटवण्यास भाग पाडलं होतं. त्यांच्याच प्रयत्नांनी रमेशवाडी येथे नव्या पोलिस स्टेशनची निर्मिती झाली. तुंबलेली गटारं, उखडलेले रस्ते, सार्वजनिक हिताच्या गोष्टींविरुद्ध माहितीच्या अधिकाराचा वापर करून ते नेहमी आवाज उठवत असतात. त्यांच्या विशेष आवडीचा विषय आहे, महसूल विभाग! ते या विभागाशी संबंधित शासकीय अध्यादेशांतल्या त्रुटी शासनाच्या निदर्शनास वारंवार आणून देत असतात. त्यांनी 2004 च्या मालमत्ता बाजारभाव निर्धांकन आदेशाबाबत केलेल्या सूचना शासनानं स्वीकारल्या. खाजगी वनं संपादन अधिनियम, यूटू झोनमध्ये बिगरशेती परवाना मिळवण्यासाठी तीनशे मीटरपर्यंतची किमान पात्रता मर्यादा रद्द करणं. महसूल प्राधिकरण रद्द केल्यानं निर्माण झालेल्या समस्या, मुद्रांक शुल्क निर्धारणाच्या बाबतीत ग्रामीण क्षेत्रावर होणारा अन्याय; तसंच मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियमातील कलम 43(क) रद्द करण्याबाबत त्यांनी केलेल्या सूचना शासनानं मान्य केल्या आहेत.

मुस्तफा कुवारी ह्यांच्या पेन्शनचा बराचसा भाग निवेदनं टाईप करण्यात व सरकारदरबारी पाठवून देण्यात खर्च होतो. मुस्तफा कुवारी यांची ‘गांधीगिरी’ अजूनही चालू आहे.
 

गुलाम मुस्तफा कुवारी- muba.gmk@rediffmail.com

About Post Author