भारताचा वारसा

    0
    60

       उर्दू ही मुसलमानांची भाषा हा समज ब्रिटिशांनी पक्का करून टाकला. युनायटेड प्रॉव्हिन्सेसचे (आजचा उत्तर  प्रदेश) गव्हर्नर अँथनी मॅक्डोनाल्ड यांनी 1900 साली असा आदेश काढला, की अधिकृत पत्रव्यवहारात उर्दू ही भाषा चालणार नाही. तेव्हापासून उर्दू भाषेचा सतत र्‍हासच होत आलेला आहे. ब्रिटिश लोक येण्याअगोदर उर्दूला भारतीय भाषा व्यवहारात महत्त्वाचे स्थान होते. मुसलमान लोक अकराव्या शतकापासून भारतात येऊ लागले. ते अरेबिक, पर्शियन, तुर्की आणि हिंदी अशा वेगवेगळ्या भाषा बोलणारे होते. ते सारे भारतात येऊन भारतीय बनून गेले; इथेच कायमचे स्थिरावले.


         उर्दू ही मुसलमानांची भाषा हा समज ब्रिटिशांनी पक्का करून टाकला. युनायटेड प्रॉव्हिन्सेसचे (आजचा उत्तर  प्रदेश) गव्हर्नर अँथनी मॅक्डोनाल्ड यांनी 1900 साली असा आदेश काढला, की अधिकृत पत्रव्यवहारात उर्दू ही भाषा चालणार नाही. तेव्हापासून उर्दू भाषेचा सतत र्‍हासच होत आलेला आहे. ब्रिटिश लोक येण्याअगोदर उर्दूला भारतीय भाषा व्यवहारात महत्त्वाचे स्थान होते. मुसलमान लोक अकराव्या शतकापासून भारतात येऊ लागले. ते अरेबिक, पर्शियन, तुर्की आणि हिंदी अशा वेगवेगळ्या भाषा बोलणारे होते. ते सारे भारतात येऊन भारतीय बनून गेले; इथेच कायमचे स्थिरावले. मग भारतातील स्थानिक लोकांशी, तसेच आपापसात ते कोणत्या भाषेत बोलणार? म्हणून उर्दू निर्माण करण्यात आली. परंतु ब्रिटिशांनी उर्दूचे हे स्थान खोडून काढले. त्यांनी 1901 साली जेव्हा शिरगणती केली तेव्हा उर्दूचा उल्लेख मुसलमानांची भाषा आणि हिंदीचा उल्लेख हिंदूंची भाषा असा केला. त्याआधी भाषाभेद आणि धर्मभेद असे प्रगटपणे नोंदले गेले नव्हते. वास्तवात, ब्रिजनारायण ‘चकबस’, गोपीचंद ‘अमन’ आणि पंडित हरिचांद ‘अख्तर’ यांनी उर्दूमध्ये काव्यरचना केली.

         ‘अवध’ प्रांताचा शेवटचा राजा वजिदअली शहा हा उत्तम कवी होता. त्याची प्रेषितासंबंधीची कवने आजही लखनौ आणि महमदाबाद येथे गायली जातात, परंतु त्याचे नाव इतिहासात घेतले जाते ते रंगेल राजा म्हणून. त्याची ती प्रतिमा इंग्रजांनी प्रसृत केली व गडदही केली. कवी म्हणून त्याचा उल्लेख क्वचित होतो.

         राजस्थान, मध्यप्रदेश, गुजराथ आणि कर्नाटक यांनी त्यांची परंपरा जपण्याचा मोठा कार्यक्रम घेतला आहे आणि त्यामुळे ती राज्ये पर्यटकांचे आकर्षण बनली आहेत. दुर्देवाने, अवधची अशी मांडणी होत नाही; व त्यामुळे तेथील वारसा जपला-संवर्धन केला जात नाही. तेथील ऐतिहासिक वास्तू उपेक्षेने दुर्लक्षल्या जात आहेत; तसेच तेथील कलाकुसर मारली जात आहे. अजूनही अवधला जुन्या ढंगाच्या गाण्याच्या मैफली चालतात, पण त्यांना राजाश्रय व लोकाश्रय, दोन्ही लाभत नाही. महमदाबादच्या राजाचा किल्ला हा वर्ल्ड मॉन्युमेंट फंडाने वारसावास्तू म्हणून निवडला आहे. किल्ल्यात अजूनही बर्‍याच जुन्या परंपरा सांभाळल्या जातात. त्यामुळे त्या वास्तूमध्ये चैतन्य आढळते; तो इतिहास नाही!

         इमाम हुसेन यांचा चौदाशे वर्षांपूर्वी मृत्यू झाला. त्यांच्या स्मृतीनिमित्त महमदाबादमध्ये मोहरमच्या दरम्यान मिरवणूक काढून प्रार्थना केल्या जातात. भारतात अशा वेगवेगळ्या धर्मपंथांच्या परंपरा मुरून गेल्या आहेत आणि तेच या देशाचे वैभव आहे. या धर्मपंथांच्या अनुयायांमध्ये वादविवाद-संघर्ष होतातही; परंतु ते या भूमीचा भाग झाले आहेत हे मान्य करून त्यांच्यातील सर्वसमान सूत्रे शोधली पाहिजेत. त्यांचा पाठपुरावा केला तर मतभिन्नता आपोआप लोपली जाईल. उर्दूने अकराव्या शतकानंतर भारतात हेच काम केले. तो वेगवेगळ्या समाजांमधला दुवा ठरला. आजही, आपला जो सर्वसमान इतिहास आहे, त्यामधील उत्तम गुण आपण टिपले पाहिजेत, त्यामधून भारतात संवादी वातावरण तयार होईल. भारताचा वारसा तो आहे; आणि तो टिकायला हवा (संकलित)

    (अली खान महंमद यांच्या ‘हिंदुस्थान टाइम्स’मधील लेखाधारे. अली खान केंब्रिज विद्यापीठात ‘भारतीय इतिहास’ या विषयामध्ये पीएच. डी.चा अभ्यास करत आहेत)

    {jcomments on}

    About Post Author

    Previous articleस्नेहातून सेवा आणि सेवेतून मानवता
    Next articleमुस्तफा कुवारी यांची गांधीगिरी
    दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.