फक्त रड म्हण!

0
111

रेश्‍मा देसाई

   जर माझ्या माथ्‍यावर असे बथ्‍थड मराठी चित्रपट मारण्‍यात येणार असतील तर मी माझा पैसा आणि वेळ का म्‍हणून वाया घालवावा? आज कित्‍येक मराठी वृत्‍तपत्रांनी ‘फक्‍त लढ म्‍हणा’ या चित्रपटाला अनेक स्‍टार्स देउन गौरवले आहे. त्‍यामागे त्‍यांची काय आर्थिक गणिते असतील मला ठाउक नाही. मात्र आम्‍ही वाचक या वृत्‍तपत्रांवर विश्‍वास ठेऊन चित्रपट पाहायला जातो. पण हा तर सरळसरळ वाचकांचा विश्‍वासघात आहे. जर मराठी चित्रपटकर्ते सगळी संसाधने हाती असताना चांगले चित्रपट देऊ शकत नसतील आणि वृत्‍तपत्रेही अशा वाईट चित्रपटांचा उदोउदो करणार असतील, तर मी का म्‍हणून मराठी चित्रपट पाहावा?


रेश्‍मा देसाई

     संजय जाधव दिग्‍दर्शीत आणि महेश मांजरेकर लिखीत ‘फक्‍त लढ म्‍हणा’ हा चित्रपट पाहिला. पडद्यावरचे आणि पडद्यामागचे चेहरे प्रसिद्ध असल्‍याने आणि मांजरेकरांनी यापूर्वी दोन मराठी व्‍यावसायिक चित्रपट चांगल्‍या पद्धतीने लिहील्‍याने, चांगली निर्मितीमूल्‍य असणारा एक व्‍यावसायिक चित्रपट पाहण्‍यास मिळेल, अशी आशा मनात धरून चित्रपट पाहण्‍यास गेले.

     आत जाताच संपूर्ण चित्रपटगृह रिकामी असल्‍याचे दिसले. आम्‍ही एकूण केवळ दहा प्रेक्षक हजर होतो. ‘मराठी चित्रपटांची अवस्‍था किती वाईट झाली बरे! प्रेक्षकांनी चित्रपट पाहण्‍यास आले पाहिजे…’ वगैरे विचार मनात तरळून गेले. त्‍यानंतर जे पडद्यावर घडले ते नक्‍की काय होते याचा उलगडा मला आतापर्यंत झालेला नाही. लहान मुलांनी लिहीलेली एखादी आटपाट नगराची कथाही चांगली असू शकेल एवढी भिकार कथा पड्यावर मांडली होती. अॅक्‍शन सीन, नाचगाणी, असं जे काही तिथे चाललं होतं त्‍यापैकी कशाचाच कशाला मागमूस नव्‍हता. हिंदीवाल्‍यांच्‍या तोडीचा सिनेमा काढण्‍याच्‍या उद्देशाने या चित्रपटाने प्रथमपासूनच ‘हिंदी चित्रपट’ नावाची मर्यादा स्‍वतःभोवती आखून घेतल्‍यासारखी वाटली. चांगले कलाकार, पैसा, प्रसिद्धीची माध्‍यमे ही सारी साधने उपलब्‍ध असताना आपल्‍याला उत्‍तम आशयघन सिनेमे सोडाच, पण साधे व्‍यावसायिक सिनेमेही आपल्‍याला बनवता येऊ नयेत?

     काही आठवड्यांपूर्वी बालगंधर्व हा चित्रपट पाहिला. मग त्‍यावरील एक चर्चासत्र ऐकले. त्‍यानंतर यापुढे नेमाने मराठी सिनेमे पाहण्‍याचा मनोमन विचार पक्‍का केला होता. पण हा चित्रपट पाहिल्‍यानंतर तो विचार डळमळीत होऊ लागला आहे. जर माझ्या माथ्‍यावर असे बथ्‍थड मराठी चित्रपट मारण्‍यात येणार असतील तर मी माझा पैसा आणि वेळ का म्‍हणून वाया घालवावा? आज कित्‍येक मराठी वृत्‍तपत्रांनी या चित्रपटाला अनेक स्‍टार्स देउन गौरवले आहे. त्‍यामागे त्‍यांची काय आर्थिक गणिते असतील मला ठाउक नाही. मात्र आम्‍ही वाचक या वृत्‍तपत्रांवर विश्‍वास ठेऊन चित्रपट पाहायला जातो. पण हा तर सरळसरळ वाचकांचा विश्‍वासघात आहे. जर मराठी चित्रपटकर्ते सगळी संसाधने हाती असताना चांगले चित्रपट देऊ शकत नसतील आणि वृत्‍तपत्रेही अशा वाईट चित्रपटांचा उदोउदो करणार असतील, तर मी का म्‍हणून मराठी चित्रपट पाहावा? हा चित्रपट पाहणारे माझ्यासारखे प्रेक्षक हाच विचार करून पुन्‍हा मराठी चित्रपटांच्‍या वाट्याला जाणार नाहीत. मराठी चित्रपटांचा खेळ दाखवणारी चित्रपटगृहे ओस पडलेली असतील आणि त्‍याच वेळी कुठेतरी सुरू असलेल्‍या एखाद्या चर्चासत्रात ही निर्माता-दिग्‍दर्शक मंडळी ‘हा प्रेक्षकच मराठी चित्रपटांकडे पाठ फिरवतो’ अशी मुक्‍ताफळे उधळत असतील.

रेश्‍मा देसाई, 9870423057, rreshmadesai@rediffmail.com

संबंधीत लेख

फिल्म सोसायटींचे काम संपलेले नाही

‘बालगंधर्व’ आणि ‘नटरंग’

नितीन देसाईंनी सेट उभारावे!

‘अवतार’ – तंत्रबंबाळ चित्रपटसृष्टीची नांदी!

{jcomments on}

About Post Author

Previous articleसुभाष शहा यांची परमार्थाची सुरावट
Next articleसंसदीय पद्धतीत बदल हवा
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.