दीपाली काळे – बालनाट्याची एकतीस वर्ष

1
36
carasole - BAALNAATYAACHI 31 VARSHE

श्रीकला संस्कार - बालकलाकारांसाठी व्यासपीठ नाटक म्हणजे मराठी माणसाचे वेड. नाटकाचे संस्कार झाले की प्रतिभाविष्काराची अनेक दारे उघडी होतात. त्यातून मग नाट्यस्पर्धेतील सहभाग, नाट्यसंस्था ह्यांची चळवळच सुरू होते! ‘श्रीकला संस्कार’च्या दीपाली काळे यांनी गेली तीन दशके डोंबिवलीतील बालकलाकारांना याच त-हेने हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले आहे.

काळेबाईंची पदवी बी.कॉम. आणि त्यानंतर बीएड. कॉमर्समधील शिक्षण असूनही शिक्षिका होणा-या शाळेत त्या एकमेव. इंग्रजी हा त्यांचा आवडता विषय. त्या नोकरी करता करता स्वामी विवेकानंद शाळेच्या मुख्याध्यापक झाल्या.

काळेबाईंना कॉलेजपासूनच नाटकात काम करण्याची आवड होती. त्यातून फक्त मुलांसाठी असलेली नवीन संस्था तयार झाली. ‘नाटकांमधून संस्कार’ हा त्या संस्थेचा मूळ हेतू. म्हणून ती ‘श्रीकला संस्कार’. संस्था एकतीस वर्षे सलग बालनाट्य शिबिरे आणि स्पर्धा यांचे आयोजन करते. काळेबाईंनी बालनाट्य क्षेत्रात काम सुरू केले त्यावेळी डोंबिवलीत मुलांना कुठल्याही प्रकारचे व्यासपीठ उपलब्ध नव्हते. नाटकाची शिबिरे नाही की काही नाही. मुलांना तशा शिबिरात किंवा स्पर्धेत जायचे असेल तर ठाणं गाठावं लागायचे.

दीपाली काळे काळेबाईंनी तीस वर्षांपूर्वीचा काळ सांगितला :
“१९८३ चा सुमार असेल तो. माझी सुरुवात शाळेतली नाटकं बसवून झाली होती. पण मुलांसाठी त्यांचं स्वतःचं असं व्यासपीठ उपलब्ध करावं, असं आमच्या सरांनी, पांडुरंग घांग्रेकर यांनी सांगितलं. आणि मग काय, बालनाट्य चळवळीला सुरुवात झाली. त्यात मला कै.सुधाताई साठे आणि कै. मेहेंदळे ह्यांची मदत झाली.”

अनुभव हेच काळेबाईंचे नाट्यशिक्षण ठरले. कारण शाळा, घरचे करता करता नाट्यप्रशिक्षणासाठी त्यांना म्हणावा तसा वेळ मिळाला नाही. पण त्या म्हणाल्या, की “कॉलेजमध्ये असताना नाटकात कामं केलेली असल्याने नाटकाचा पाया भक्कम आहे. त्यातून स्पर्धेतली वेगवेगळी नाटकं बघून स्वतःमधलं दिग्दर्शनाचं कौशल्य वाढवलं ”.

काळेबाई त्यांचा प्रवास भरभरून उलगडत होत्या. बाई ऑगस्ट २०१३मध्ये शाळेतून निवृत्त झाल्या. त्या निवृत्त झाल्यानंतर नवीन उत्साह घेऊन पुन्हा एकदा कामाला लागल्या आहेत.

त्या मुलांसाठी वाजवी दरात शिबिरे आणि स्पर्धा घेतात. कुठल्याही मुलाला किंवा शाळेला शिबिरात, स्पर्धेत सहभागी होता आले पाहिजे हे बाईंचे मत. त्यामुळे शिबिराच्या शुल्काने अजून हजार रुपयेदेखील पार केलेले नाहीत. उन्हाळी शिबिराला असलेली संख्या दीडशेच्या घरात असते. तोच प्रकार स्पर्धेच्याही बाबतीत. दोन वयोगटांत बालनाट्य स्पर्धा घेतली जाते. पहिली ते चौथी आणि पाचवी ते दहावी. स्पर्धा डोंबिवलीच्या सावित्रीबाई फुले नाट्यगृहात होते. पनवेल, वसई, विरार, दादर, ठाणे, मुलुंड अशा ठिकठिकाणांहून शाळा त्यांनी योजलेल्या स्पर्धेत भाग घेतात. अवघे शे-दोनशे रुपये शाळांकडून प्रवेश शुल्क स्वीकारले जाते. ती डोंबिवलीतील मानाची बालनाट्य स्पर्धा समजली जाते. त्यामुळे अख्ख्या डोंबिवलीतील शाळा स्पर्धांमध्ये सहभाग घेतात. स्पर्धेत भले पहिले-दुसरे क्रमांक काढले जात असले तरी सहभागी होणा-या प्रत्येक शाळेला उत्तेजनार्थ सन्मानचिन्ह दिले जाते. शिबिरात एकेकाळी हजेरी लावलेली आणि काळेबाईंच्या हाताखाली अभिनयाचे व अभ्यासाचे धडे गिरवलेली ‘पल्लवी’ म्हणजे ‘ऐश्वर्या नारकर!’, बाईंनी बालनाट्य चळवळीच्या माध्यमातून फक्त कलाकार नाही तर अनेक चांगली व्यक्तिमत्त्वे घडवण्याचे काम केले आहे.

काकाळेबाईंच्या नाटकातील बालकलाकार ळेबाई ‘हाडाच्या शिक्षक’ आहेत. समोर येणा-या माणसाला आपल्याकडून काही ना काही गोष्ट देत राहायचे हे  त्यांचे व्यक्तिमत्त्व. त्यामुळे त्यांच्याकडे सल्ला किंवा आणखी कुठलीही मदत मागायला जा, काळे बाई निराश करणार नाहीत ह्याची विद्यार्थ्यांना खात्री असते. त्यांना देवाने ‘आई’ होण्याचे नशीब दिले नाही. तरी त्याबाबतची तक्रार मात्र त्यांच्याकडे दिसून येत नाही. त्यांनी मुलांवर आईपेक्षाही जास्त प्रेम केले. त्यामुळे मानसपुत्र आणि मानसकन्या ह्यांची संख्या भरपूर. मध्यंतरी त्यांना मोठ्या आजारातून जावे लागले होते असे कळले. त्याबाबतीत मात्र त्या उल्लेख टाळतात इतकी प्रखर त्यांची कार्यनिष्ठा आहे. कठीण काळातून सावरून त्या समर्थपणे उभ्या राहिल्या. कुटुंबात ती दोघेच. त्या आणि त्यांचे यजमान. श्रीयुत काळे यांनाही बाईंचा खूप अभिमान आणि कौतुक आहे. त्यांच्याकडून काळेबाईंना संपूर्ण पाठिंबा मिळतो. काळेबाई तशा जुन्या हाडाच्या पण आधुनिक विचारांच्या आहेत. कारण आताच्या मुलांचे विचार समजून घेऊन त्याप्रमाणे त्या पालकांना मार्गदर्शन करत असतात.

बाई निवृत्त मुख्याध्यापक असल्या तरी विद्यार्थ्यांना त्यांची आठवण ‘बाईंनी आमची खूप छान नाटकं बसवली होती’ अशीच येते. बाईंची विद्यार्थ्यांबरोबर, त्यांच्या पालकांबरोबर असलेली नात्यांची घट्ट वीण उसवली गेलेली नाही. ‘नाटकाच्या या कलेनं मला जास्त समृद्ध केलं’ असे त्या म्हणतात. त्यांना ऐश्वर्या नारकरचा एक प्रसंग हमखास आठवतो. त्यांनी शाळेतील मुलांचे ‘हुतात्मा’ हे नाटक बसवले होते. त्यात ऐश्वर्या नारकरची प्रमुख भूमिका होती. नाटकाचा शेवट भावनाशील होता. “ ऐश्वर्या नारकर तो प्रसंग छान करायची आणि त्यावरच आम्ही बाजी मारायचो. ती दुःखाच्या आवेगाने कोसळते आणि रडायला लागते असे ते दृश्य आणि त्यावरच पडदा पडतो. नाटक संपल्यावरही ती रडतच असायची. आणि तिला त्या भूमिकेतुन बाहेर काढण्याची जबाबदारी माझी असायची. नाटक संपले, की मी तिला कुशीत घ्यायला तयारच असायचे. पण तिचे रडणे मला सहन होईना. शेवटी, मी स्वतः ते नाटक बंद केले.” ऐश्वर्या मोठी अभिनेत्री होऊनही बाईंशी नाटकामुळे जुळला गेलेला तिचा जिव्हाळा कमी झालेला नाही. बाईंच्या संस्कारांची, त्यांच्या प्रती असलेल्या ओढीची कल्पना अशी येते.

काळेबाईंच्या नाटकातील बालकलाकार बाईंना नाटक करत असताना ब-याच चढउतारांना तोंड द्यावे लागले. एका आठवणीने त्या हळव्या होतात. त्यांच्या हाताखाली शिकलेला, नाटकात उत्तम काम करणारा सुमंत. तो बाईंच्या नाटकात काम करायला सदैव तत्पर असायचा. त्याला फक्त अभिनय नाही तर दिग्दर्शनातही गती होती. दहावीच्या सेन्डॉफच्या दिवशी ‘बाई, तुम्ही मला नट कराच’ असे त्याने खूप रडून बाईंना सांगितले होते. “बालनाट्याचे संस्कार घेऊन, त्याने स्वतःचे नाटकही बसवले होते. पण ते नाटक सादर होण्याच्या आत त्याचा अपघात झाला आणि तो जागीच गेला! मला खूप वाटत होते, की सुमंत नक्की स्वतःचे नाव काढणार. पण त्याचे जाणे… ती घटना मला खूप चटका लावून गेली.”  बाईंचे ओले झालेले डोळे सगळे काही सांगून जातात.

त्यांच्या बोलण्यात, कामात ऊर्जा दिसत राहते. काळेबाईंच्या कार्याचे तेच गमक असावे. त्यांच्या संस्थेला आणि कामाला धंदेवाईकपणाचा गंध नसल्याने ती मुलांना, पालकांना आपली संस्था वाटते.
त्यांना ‘नाट्यदर्पण’ पुरस्काराने व ‘आदर्श डोंबिवलीकर’ म्हणून गौरवण्यात आले आहे.

मुलांकडून प्रेमळतेने ‘काळेबाई’ अशी मारली जाणारी हाक हेच त्यांच्या कार्याचे खरे गमक आहे असे त्या मानतात.

श्रीकला संस्कार, डोंबिवली
दीपाली काळे
९८७०४०२१९४

मधुरा आपटे
९८२०२२५९५४
madhuraapte92@gmail.com

About Post Author

1 COMMENT

Comments are closed.