डॉल्बीचा दणदणाट

0
61

– किसनराव भोसले

  लग्नसराईत लग्नघरी ब्राह्मण, वाजंत्री, मांडववाले, शुटींग-फोटो, मंगल कार्यालय; यांबरोबरच डी.जे. डॉल्बी सिस्टिम यावरही वारेमाप पैसा खर्च केला जात आहे. दोन्ही पक्षांची मंडळी कर्ज काढून अशा चैनीवर भरमसाठ पैसा खर्च करताना दिसतात. या डी. जे. तालावर नाचण्‍याची तरुणाईला भुरळ पडल्‍याचे दिसते. मात्र या आवाजाने आजूबाजूची जनता हैराण होत असते. लग्‍नाला येणा-या लोकांचे वधुवरांच्‍या डोक्‍यावर अक्षता पडाव्‍यात एवढेच धेय असते. धावपळीत या झगमटाकडे पाहत बसायला अनेकांना वेळ नसतो. याचे भान ठेउन जर लग्‍नावरील अनावश्‍यक पैसा वाचवला तर तोच पैसा भावी काळाची स्वप्ने पाहणार्‍या वधुवरांना उपयोगी पडल्याशिवाय राहणार नाही.


– किसनराव भोसले

     लग्नसराईत लग्नघरी ब्राह्मण, वाजंत्री, स्वयंपाकी, मांडववाले, शुटींग-फोटो, मंगल कार्यालय; यांबरोबरच नव्याने उदयास आलेली डी.जे. डॉल्बी सिस्टिम या सर्वावर वारेमाप पैसा खर्च केला जात आहे. लग्न मुलीकडचे असो अथवा नवरदेवाकडे, दोन्ही पक्षांची मंडळी कर्ज काढून चैनीवर भरमसाठ पैसा खर्च करताना दिसतात.

     यामध्ये सहभागी होणार्‍या सर्व व्यावसायिकांची चंगळ होते. भरगच्च लग्ने लागली. यांमधील काही जोडपी सुखी तर काही दु:खी झाली. परंतु अलिकडच्या तरूणाईला डॉल्बी सिस्टिमने भुरळ पाडल्याने ज्याने-त्याने डी.जे.सिस्टिमच्या तालावर नाचण्याचा आग्रह धरला. या कार्यक्रमात हौसे-गवशे यांनी मद्याची धुलाई करून नाचण्याची हौसही भागवली. डॉल्बीच्या आवाजाने जनता हैराण झाली. विशेषत: ज्या ठिकाणी लग्नसमारंभ पार पडले त्या ठिकाणी नाचगाण्याचा आवाज लोकांना सहन न झाल्याने काहींनी आपल्या घरांची दारे-खिडव्या बंद केल्या तर काहींनी पोलिसांत तक्रारी केल्या. लक्षात धरले पाहिजे, की लग्नसमारंभादी शुभ कार्यात संबंधितांना लोकांच्या शुभेच्छा हव्या असतात. पण लोकांना त्रासदायक कृती केल्याने त्यांच्या लग्नास शुभेच्छा मिळण्याऐवजी ते मनोमन लग्नादी कार्यांचा धिक्कार करू लागतात.

     अलिकडे मनाला भावणारे संगीत दुर्मीळ होत आहे. परंतु वातावरण हादरुन सोडणारे संगीत लोकांना का आवडते हेच कोणाला कळत नाही. त्यासाठी अमाप खर्च केला जातो. एका लग्नात वरातीवर नुसता खर्च दोन लाख रुपये झाला. यामध्ये गरिबांची दोन लग्ने झाली असती. फटाक्यांची आतषबाजी तर बघायलाच नको इतकी केली जाते.

     बिचारा नवरदेव नुसता घोड्यावर बसून बसून थकून जातो. त्याला वरातीत पुढे काय चालले आहे हे कळतही नाही. यामध्ये नाचता नाचता काही मंडळी हमरीतुमरीवर येतात. याचा परिणाम एका वरातीत नवरदेव घोड्यावरून खाली पडल्याने घोड्याच्या मालकालाच चोप दिला गेला, याचे भान कोणालाच नव्हते. इकडे घोड्याने धूम ठोकली. रात्रीची वेळ असल्याने अंधारात घोडा वाट दिसेल तिकडे पळू लागला. वाजंत्र्यांनी बिनाघोड्याच्या नगरदेवाची वरात घरापर्यंत पोचवली. दुसर्‍या दिवशी घोडा एका शेतातल्या विहिरीत मृतावस्थेत सापडला. याची भरपाई म्हणजे वराकडील मंडळींना घोड्याची किंमत मोजावी लागली. हौसेला मोल नसते म्हणतात ना ते असे!

     लग्नाला येणारे येत असतात. वधुवरांच्या अंगावर चार अक्षता पडाव्यात एवढेच सर्वांचे ध्येय असते . बाकीच्या गोष्टींकडे लक्ष देण्यास फारसा कोणाला वेळ नसतो. धावपळीच्या काळात कोणाला थांबायला वेळ नसतो, याचे भान ठेवून अनावश्यक गोष्टींवर अनावश्यक पैसा वाया का घालवायचा याचा विचार केला तर खूप काही चांगले घडेल, ही मानसिकता ठेवून समाजाने विचार केला तर वरातींना येणारे उधाण थांबवून तोच पैसा भावी काळाची स्वप्ने पाहणार्‍या वधुवरांना उपयोगी पडल्याशिवाय राहणार नाही.

सौजन्‍यः- ‘मनोमन’ मासिक

किसनराव भोसले, साखरवाडी, ता. फलटण, जि. सातारा

{jcomments on}

About Post Author

Previous articleकाळी-गोरी, सुंदर-कुरूप…
Next articleधूर्त आणि क्रूर
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.