कवी सतीश काळसेकर ‘वाचणा-याची रोजनिशी’ नावाचे सदर ‘आपले वाङ्मयवृत्त’ या मासिकात लिहीत असतात. त्यामध्ये पुस्तकांची, लेखनाची ताजी वाचनीय उदाहरणे मिळतात. त्यातून मल्टिमीडियाच्या सध्याच्या युगात वाचन कसे असावे – त्यात किती रमावे यासाठी मार्गदर्शक सूचनाही जमा होत जातात. काळसेकर यांची त्यामध्ये एक टिप्पणी दर महिन्याला नक्की असते, ती विकल सद्यकाळाबाबत. काळ बिकट आला आहे आणि माणूस सर्व बाजूंनी, आतून-बाहेरून घेरला जात आहे याची जाणीव काळसेकर यांचे सदर वाचताना भेदक रीतीने होत असते. सध्या, भावना सर्वत्र तशीच व्यक्त होत असते. कोठे त्याचे राजकीय अंग ठळकपणे मांडले जाते, तर कोठे सामाजिक – जसे जातीय उग्रपणा. त्या सर्व मुद्यांना तंत्रज्ञानातून आलेला अनिश्चिततेचा मुद्दा असतोच! काळसेकरांपुरते बोलायचे तर ते चांगल्या वाचनाचे संदर्भ देत जातात आणि तो दिलासा मोठा वाटतो.
आम्ही ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल २०१० साली सुरू केले, तेव्हा फक्त दिलाशाच्या, सकारात्मक गोष्टींचा विचार करण्याचे आणि त्या प्रसृत करण्याचे तर योजले होते. कारण माणसे भली अधिक असतात, बुरी कमी असतात हा सार्वत्रिक आणि सार्वकालिक अनुभव आहे. आमचा त्यावर पक्का विश्वास आहे. पण मीडियाने आम्हाला शिकवले, की कुत्रा माणसाला चावला तर ती बातमी नव्हे, परंतु माणूस कुत्र्याला चावला तर ती बातमी होय! कारण त्यात सनसनाटी आहे. आम्ही विचार असा केला, की ज्या मीडियाने मानवी मनाची दुर्बलता अचूक पकडली तोच मीडिया मानवी मनाचे केवळ सामर्थ्य प्रकट करण्यासाठी नव्हे तर ते वाढवण्यासाठीदेखील उपयोगात आणता येऊ शकेल! स्वातंत्र्यलढ्याच्या काळातील दैनिके, साप्ताहिके व्रतस्थ होती; पण आमच्यासमोर प्रिंट मीडियाच्या बहराच्या काळातील ‘माणूस’ साप्ताहिकाचे उदाहरण होते. ‘माणूस’चे संपादक श्री.ग. माजगावकर यांनी तो अस्वस्थ‘तेचा काळ वस्तुनिष्ठ रीत्या नोंदला; तेवढेच नव्हे, तर त्या काळातील चळवळी-आंदोलनांना, विधायकतेला बळ दिले. मग त्याहूनही अधिक सूक्ष्म व तरल गुंतागुंतींनी धुमसणारी सध्यांची अस्वस्थता सद्यकाळाला अनुरूप अशा प्रकारे का बरे व्यक्त होऊ शकणार नाही?
लक्ष्यवेधी मीडियाचा सकारात्मक प्रभावदेखील विलक्षण असू शकतो याचे आणखी एक उदाहरण. कुसुमाग्रज-पु.ल. यांना महाराष्ट्रातील तत्कालिन सात-आठ कोटी सर्व लोकांनी काही वाचले-पाहिले नव्हते; ‘सत्यकथा’ मासिकाचा खप तर दोन-तीन हजार. पण त्या सर्वांचा दबदबा केवढा! तो निकोप, गुणवत्तापूर्ण सांस्कृतिक प्रभाव सध्याच्या मनोरंजनाने-करमणुकीने भरलेल्या जगात, युगात अशक्य का असावा? ‘मौजे’चे अध्वर्यू, साहित्यिक ‘गुरू’ श्री.पु. भागवत यांची तर तीच मनीषा होती. ते त्यालाच सांस्कृतिक अग्रक्रमाचा सिद्धांत म्हणत. आता तर संवादाची साधने अधिक परिणामकारक आहेत. इंटरनेटच्या माध्यंमातून प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचणे, विचारी-संवेदनशील व्यक्तींचे ‘नेटवर्क’ बांधणे शक्य आहे. प्रत्येक व्यक्तीच्या फक्त गुणांची, ‘पॉझिटिव्ह साईड’ची बेरीज करत जायचे. उणिवा, निगेटिव्ह साईड तर प्रत्येकात असतात – त्याकडे दुर्लक्ष करायचे. यशवंतराव चव्हाण बेरजेचे राजकारण नावाची संज्ञा वापरत. आपण संस्कृतिकारण करू पाहत आहोत. त्यात विचारांची आणि भावनांची बेरीजच बेरीज अभिप्रेत आहे. भावना थोडी ताणून बोलायचे, तर मुंबईवरील अतिरेकी हल्लेखोर कसाब कोठडीत होता, पोलिस त्याचे त-हत-हेने ‘इंटरॉगेशन’ करत होते. पोलिस अधिका-यांचे नोकरीत भरती होताना जसे ‘ट्रेनिंग’ झाले होते, तसे कसाबचेही ‘ब्रेनवॉशिंग’ झाले होते, हे आपण जाणतो. कसाबची पोलिसी चौकशी करणा-या एका वरिष्ठ अधिका-याला एकदा विचारले गेले, की तो तुम्हा लोकांना बधत नाही, तो खरेखोटे काय सांगतो ते तुम्हाला कळत नाही. त्याच्यांशी बोलायला एखाद्या ‘आई’ला पाठवा. तो तिच्या मायेने कदाचित बोलता होईल, निदान तो हळवा तर होईल! पण सध्याच्या व्यवसाय प्रशिक्षणाच्या काळात डॉक्टरला जसे रोग्याचा फक्त रोग दिसतो- त्याचे दुःख कळत नाही. तसे पोलिसाला गुन्हेगाराचा गुन्हा दिसतो, त्याचे मन कळत नाही. त्यामुळे ते मन विकारी कशामुळे झाले असेल हेही पोलिसांना जाणवत नाही.
‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’च्या ‘‘ या मोहिमेची तयारी सुरू होती. निफाडच्या एका छोट्या गावात राहणा-या अशोक सुरवडे या प्रयोगशील शेतक-याचा फोननंबर हाती लागला. माझ्या त्याच्याशी त्याची भेटण्याची वेळ ठरवण्याकरता गप्पा सुरू झाल्या. सुरवडे यांनी पुण्याला जाऊन पदवी मिळवली. मात्र त्यांनी शेतीच्या ओढीपायी नोकरीऐवजी शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी गावी परतल्यानंतर शेतीत प्रयोगदेखील केले. सुरवडे बोलण्याच्या ओघात म्हणाले, “मी काही वर्षांपूर्वी अंटार्टिकाला जाऊन आलो!” तो आश्चर्याचा धक्का होता. मी विचारले, “कशासाठी?” तर ते म्हणाले, “पेंग्वीनचा अभ्यास करण्याकरता.” मला आश्चर्याचा दुसरा धक्का! असे सुखद धक्के बसत जावेत असे ज्ञानोत्सुक वातावरण महाराष्ट्रात आहे. मात्र प्रस्थापित समाजास त्यांची जाणीव नाही. आम्हाला ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या प्रकल्पाच्या कामातून महाराष्ट्राबद्दलचा असा अनुभव येत असतो.
महाराष्ट्र ज्ञानप्राप्तीसाठी असा तुकड्या तुकड्यांतून प्रयत्नशील दिसतो, मात्र त्याची केवळ नोंद पुरेशी आहे का? परंपरेतून मिळालेले ज्ञान जतन करण्यासाठी, त्याच्या प्रसारासाठी आणि नवे ज्ञान निर्माण करण्यासाठी स्वयंप्रेरणेने कार्यरत असलेली मंडळी प्रत्येक तालुक्यात दहा ते पंधराच्या संख्येने आढळतात. राज्यभरात तशी साडेतीन-चार हजार मंडळी सहज आढळतील. मात्र ती सारी विखुरलेली आहेत. त्यांचा परस्परांशी संबंध नाही. ती मंडळी आणि त्यांची धडपड … ते सारे प्रयत्न एकाकी ठरतात. ती सारी माणसे आपापसांतील ‘ओळखी’अभावी ‘चांगुलपणाची बेटे’ होऊन गेली आहेत. त्यामुळे त्यांच्या कामाचा परिणाम मर्यादित आहे. जर त्या मंडळींमध्ये नेटवर्क निर्माण करता आले तर त्यांच्या कार्याच्या परिणामाचा परीघदेखील वाढवता येऊ शकेल. नेटवर्किंग हा ‘थिंक महाराष्ट्र’च्या कामाचा पुढील अपेक्षित टप्पा आहे. मात्र ते काम कोणा एकट्या व्यक्तीचे अथवा संस्थेचे नाही. त्याकरता समविचारी व्यक्ती-संघटनांनी पुढाकार घ्यावा लागेल.
महाराष्ट्रात पाणी, शिक्षण, आरोग्य, ग्रामस्वराज्य, स्वच्छता, शेती, कला, साहित्य अशा अनेकानेक विषयांसंबंधात सुरू असलेले कल्पक आणि अथक प्रयत्न जर जाणले, त्याकरता झटणारी शरीरे-गुंतलेली मने आणि त्यांचा लोकमानसावर होणारा परिणाम पाहिला, की त्या सा-या घडामोडीला महाराष्ट्रातील ‘रेनेसान्स’ असेच म्हणावे लागते. ‘रेनेसान्स’ म्हणजे ज्ञानप्रकाश. ‘थिंक महाराष्ट्र’चा खटाटोप महाराष्ट्राचे ते विधायक चित्र नोंदवून समाजासमोर मांडण्याचा आहे.
उपक्रमशील माणसांची आम्ही नमूद केलेली संख्या साडेतीन-चार हजार ही अल्प भासत असली, तरी ते हिमनगाचे टोक आहे. ती मंडळी पूर्णवेळ एकचित्ताने ध्येयप्रेरित काम करत असतात आणि म्हणून ती शोधक नजरेत भरतात. मात्र त्याच त-हेचे प्रयत्न कमीअधिक प्रमाणात करणारी माणसे त्या त्या परिसरात असतातच. ती साडेतीन-चार हजार मंडळी तशा चाळीस हजार व्यक्तींचे प्रतिनिधीत्व करत असतात असे समजले, तर त्या चाळीस हजारांच्या खाली तसा तुरळक प्रयत्न करणारी चार लाख माणसे आहेत असे सहज गृहित धरता येते. समाजाची ती रचना आणि तसे अंतस्थ प्रवाह हेच त्या ‘रेनेसान्स’चे लक्षण. युरोपमध्ये रेनेसान्स घडला तेव्हाचे वातावरण आणि महाराष्ट्रातील रेनेसान्सचे सध्याचे वातावरण यांत फरक आहे. युरोपमध्ये औद्योगिक क्रांती होऊन छपाईचे यंत्र, वाफेचे इंजिन यांसारखे शोध लागले. ते ‘रेनेसान्स’ला पूरक ठरले. युरोपातील ‘रेनेसान्स’ला दिशा लाभली ती तत्पूर्वीच्या काळात झालेल्या तत्त्वचिंतनामुळे आणि विचारक्रांतीमुळे. त्यातूनच लोकशाही ही समाजव्यवस्थेची कल्पना विकसित झाली; स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही तत्त्वे निर्माण झाली. तो आधुनिक जीवनाचा आधार ठरला. तशा तात्त्विक मांडणीचा अभाव विद्यमान ‘रेनेसान्स’च्या वातावरणात जाणवतो. ती जबाबदारी विद्वतजनांची आहे. समाजाला दिशा देण्याकरता, त्याचे व्यवस्थापन करण्याकरता धर्मस्तरावर आधी मांडणी केली गेली. ती कालौघात, नव्या मूल्यव्यवस्थेने कालबाह्य ठरवली. त्यानंतर आलेले लोकशाहीचे तत्त्व सा-या जगाने मान्य केले, मात्र त्याकरता निर्माण झालेल्या व्यवस्थेच्या मर्यादा कालौघात स्पष्ट होत गेल्या आहेत. एकीकडे ज्ञानोत्सुक वातावरण आणि दुसरीकडे त्याकरताच्या व्यवस्थेचा अभाव अशी ही विद्यमान परिस्थिती आहे. काळसेकर, विकल परिस्थितीचे निदान आम्हाला कळले ते असे आहे. या काळात समाजासाठी नव्या तत्त्वांवर आधारित समाजव्यवस्थेच्या विचारचर्चेची आवश्यकता आहे. त्याआधारेच नवी व्यवस्था उभी राहू शकेल. तो ‘ज्ञानप्रकाश’ सध्याच्या ग्लोबल वातावरणात जगाच्या कोणत्याही कोप-यातून पसरू शकेल, त्यासाठी स्थानिक संस्कृती व स्थानिक विचार महत्त्वाचा. ‘थिंक महाराष्ट्र’चे उद्दिष्ट जगभर पसरलेल्या महाराष्ट्र समाजाचा तसा वेध घेण्याचा आहे…
– किरण क्षीरसागर
info@thinkmaharashtra.com