ज्ञानरचनावादी साहित्यातून फुलले मुलांचे अध्ययनविश्व!

6
26
_Vanita_More_2.jpg

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून दैनंदिन अध्ययन-अध्यापनाला साहित्याची जोड दिली तर प्रत्येक मूल त्याची निश्चित केलेली किमान अध्ययनक्षमता नक्कीच गाठू शकेल हा विश्वास दृढ आहे.

माझ्याकडे पहिलीचा वर्ग सलग दोन वर्षें देण्यात आला. मी पहिल्याच वर्षी मनाशी पक्के ठरवले होते, की माझ्या पहिलीच्या वर्गात असणारे एकही मूल अप्रगत राहता कामा नये आणि त्या दृष्टीने माझ्या प्रयत्नांना सुरुवात झाली. त्याच दरम्यान, ज्ञानरचनावादाची व्याप्ती संपूर्ण महाराष्ट्रात पसरली होती. मीही मुलांची बौद्धिक क्षमता, त्यांचा कल व आवड लक्षात घेऊन ज्ञानरचनावादावर आधारित साहित्याची निर्मिती करत गेले आणि त्याचा पुरेपूर वापर पहिलीच्या वर्गासाठी केला. तयार केलेले साहित्य मुलांना जास्तीत जास्त हाताळण्यास दिले – गटपद्धतीचा वापर करून गटात साहित्य वापरण्यास दिले. मी स्वतः मुलांच्या गटात बसून, त्यांना अवघड वाटणाऱ्या संकल्पना साहित्याच्या मदतीने सोप्या करून सांगितल्या. परिणामी, पहिलीची भांबावलेली, घाबरलेली, आईपासून पहिल्यांदाच दुरावलेली मुले शाळेत रमू लागली; त्यांच्या मनात शिक्षकांविषयी असणारी भीती दूर पळाली. ती शिक्षकांशी संवाद खुल्या मनाने साधू लागली. त्यांच्या मनात शाळेविषयी आपुलकीची भावना निर्माण झाली. त्यांना शाळा आणि शिक्षक या गोष्टी त्यांच्याच वाटू लागल्या. ज्ञानरचनावादाची तीच तर गंमत आहे. त्या पद्धतीने मुले फक्त लिहिण्यास आणि वाचण्यास शिकतात असे नाही, तर त्यांच्यामध्ये त्यासोबत नैतिक मूल्यांची, संस्कारांची रुजवणूक होत जाते. शेवटी, फक्त लिहिणे-वाचणे म्हणजे शिक्षण असू शकत नाही.

बदल हा काळाचा नियम आहे; काळ बदलत आहे आणि काळाप्रमाणे शाळेत, शिकवण्याच्या पद्धतीत, शिक्षकांमध्ये, मुलांमध्ये आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे विचारांमध्ये बदल होणे अपेक्षित आहे. तरच, स्पर्धेच्या या युगात जिल्हा परिषदेच्या शाळा त्यांचे अस्तित्व वटवृक्षाप्रमाणे वर्षानुवर्षें टिकवून राहू शकतील. जेव्हा त्या विशाल वटवृक्षाच्या सावलीत शिकून बाहेर पडणारा विद्यार्थी आयुष्याच्या कसोटीवर खरा उतरेल तेव्हाच जिल्हा परिषदेच्या शाळा या ‘माणूस’ बनवण्याचे केंद्र म्हणून नावारूपाला येतील आणि या शाळेत शिकवणारा प्राथमिक शिक्षक हा त्याचा केंद्रबिंदू ठरेल.

_Vanita_More_4.jpgज्ञानरचनावादी शैक्षणिक साहित्याच्या सलग दोन वर्षें प्रभावी वापरामुळे माझा पहिलीचा वर्ग दोन्ही वर्षीं शंभर टक्के प्रगत राहिला आहे. मी मुलांची गरज लक्षात घेऊन त्यांच्याकडून जे अपेक्षित आहे ते मिळवण्यासाठी साहित्य निर्मिती करत राहते. मी त्या कामी बऱ्याच वेळा मुलांचीच मदत घेते. ज्ञानरचनावादाला तंत्रज्ञानाची जोड देऊन शाळेत राबवण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमांची, शैक्षणिक साहित्यांची माहिती सर्वांना होण्यासाठी शैक्षणिक ब्लॉग निर्मिती (उंच माझा झोका) केली आहे. स्वनिर्मित व्हिडिओ तयार केले असून ते ‘यु ट्यूब’च्या माध्यमातून पालक, विद्यार्थी, शिक्षक याच्यापर्यंत पोचवले जातात.

माझ्या शाळेतील मुलांना सोबत घेऊन नवीन वाटा, नवीन क्षितीज शोधण्याच्या माझ्या या प्रयत्नांना बऱ्याच अंशी यश मिळाले आहे. मला या चिमुकल्यांसोबत असेच पुढे पुढे जात राहायचे आहे; आता थांबायचे नाही!

– वनिता मल्हारी मोरे

About Post Author

6 COMMENTS

  1. प्रेरणादायी लेख
    प्रेरणादायी लेख

  2. अतिशय सुंदर उपक्रम शै विचार…
    अतिशय सुंदर उपक्रम शै विचार आपले अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा

  3. Khup chan v vastvvadi aani…
    Khup chan v vastvvadi aani aamchysarkhya shikshkana prernadai lekhan khup khup shubhechya

  4. व्वा,खूपच छान.असेच…
    व्वा,खूपच छान.असेच उत्तमोत्तम लिहीत जा.अभिनंदन आणि शुभेच्छा

  5. खूप छान लेख लिहिलाय.
    अभिनंदन

    खूप छान लेख लिहिलाय.
    अभिनंदन

Comments are closed.