घरे-मुले हवीतच कशासाठी?

_Ghar-Mule_Havitacha_Kashasathi_2.jpg

तरुण व बाल, दोन्ही पिढीची मानसिकता क्रान्तीकारी पद्धतीने बदलत आहे. त्या पिढीचे जगणे आणि भारतीय जीवनशैली यांमध्ये मोठा बदल जाणवू लागला आहे. ‘थिंक महाराष्ट्र’ने पुण्याच्या कार्तिकी खडकीकर हिला, तो व तिचा नवरा किरण, ही दोघे वेगळ्या पद्धतीने कशी जगू इच्छितात ते लिहिण्यास सांगितले. कार्तिकीचा लेख प्रसिद्ध होण्यापूर्वी सोशल मीडियावर सध्याच्या तरूण पिढीच्या जीवनशैली आणि त्यासंबंधीचा विचार यांबद्दलचे डॉ. हेमंत यांचे एक टिपण हाती लागले. हा विषय ‘थिंक महाराष्ट्र’च्या वाचकांसमोर ठेवावा असे वाटले. कार्तिकीचा लेख आज १६ नोव्हेंबरला तर डॉ. हेमंत यांचा लेख २० नोव्हेंबरला प्रसिद्ध करत आहोत. त्या दोन्ही लेखांवर चर्चा घडावी असे अभिप्रेत आहे.

————————————————–

मला मी आमच्या जीवनशैलीबद्दल काही लिहावे असे सुचवण्यात आले आहे. आम्ही जसे जगत आहोत तसेच का जगतो? आमच्या घरी टेलिव्हिजन नाही आणि आमच्याकडे वर्तमानपत्रदेखील येत नाही. परंतु आम्ही इंटरनेटवरून सार्‍या जगाशी जोडलेले असतो. आमच्या संसारात आम्हाला मुलांची आवश्यकता जाणवत नसली तरी आम्ही घरी दोन कुत्री पाळली आहेत. आम्ही भाड्याच्या घरात राहतो – आम्हाला मालकीचे घर नको आहे. आम्ही आमचा वेळ चित्रे काढणे, नाचणे, भटकणे, वाचणे, संगीत ऐकत बसणे असा घालवत असतो.

आम्ही आयुष्य जगतो ते जीवन म्हणजे काय हे जाणण्यासाठी. निदान आम्ही तसे जगण्याचा प्रयत्न करतो. नाही तर आम्हाला जगणे म्हणजे काय याचा अर्थच कधी कळणार नाही. आम्ही अर्थपूर्ण मौज आणि तसेच समाधान यांचा शोध सतत घेत असतो. तो जसा स्वत:चा स्वत:त चालू असतो, तसा स्वत:बाहेर, आसमंतातही चालू असतो. माझ्या वयाची चौतीस वर्षें आयुष्य असे उलगडत गेले आहे. मला त्याशिवाय वेगळे कसे जगता येऊ शकते हे ठाऊक नाही.

याचा अर्थ असा नव्हे, की मी आता जे आणि जसे जीवन जगतो ते व तसे जीवन जगण्याचे नियोजन केले होते. पण मी जगत असताना व्यक्ती व घटना या रूपांनी जे पत्ते सभोवती येत गेले, दिसत गेले ते सतत पिसत राहण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न मात्र करत होतो. त्यामधून जगण्याची ऊर्जा मिळत होती. माझी ऊर्जा तेवत राहवी – नवनवी ऊर्जा मिळत राहवी यासाठी माझ्याकडे असणार्‍या पत्त्यांमध्ये भर पडावी असेही प्रयत्न करत होतो. जी ऊर्जा विधायक असते, ती शांत असते, ती खळबळही निर्माण करू शकते. ती ऊर्जा म्हणजेच मौज असते. ती ऊर्जा व्यक्तीला जगण्याचे बळ देते. मी ही फार अपेक्षा करत आहे का? मला त्या बाबतींत कदाचित अधाशी, लोभी म्हणता येईल. कदाचित माझे जगणे निराधार आहे असेही म्हणता येईल. पण मी असा जगत आलो आहे खरा! माझी अशी मनीषाच मला जगत ठेवते. जीवन छोटे आहे, त्यामधून जास्तीत जास्त काय निर्माण करता येईल असा प्रयत्न आहे.

मला या लेखनाची सुरुवात कशी करावी हे जसे कळत नव्हते, तसे या विषयात काय लिहावे हेही सुचत नव्हते. आमच्या जीवनशैलीबद्दल खास काही लिहिण्यासारखे आहे की नाही हेही मला समजत नाही. त्यामुळे लिहीत सुटलो. खरे सांगायचे तर, मला आमची जीवनशैली वैशिष्ट्यपूर्ण आहे, सर्वसाधारण नाही; आणि तीबाबत काही लिहावे अशी आहे असे वाटतच नाही. आमची जीवनशैली जिला भारतीय जीवनशैली असे म्हणतात त्या परंपरेतील वा रुढीतील नाही असे फार तर म्हणता येईल.

आम्ही आमची म्हणून जी जीवनशैली सध्या जगत आहोत ती बहुधा अमेरिकेत जी दोन वर्षें काढली त्या काळात घडत गेली असावी. आम्ही तेव्हा तेथे शिकत होतो. आमच्या सध्याच्या जीवनशैलीची पायाभरणी त्या विद्यार्थी जीवनात झाली, बहुधा. आमच्या खोलीत तेथे टेलिव्हिजन नव्हता. आम्ही शिकायला गेलो होतो, तो प्रदेश नवीन होता. आम्हाला अभ्यासातून मोकळीक मिळे तेव्हा आम्ही नवनव्या मित्रांबरोबर वेळ घालवत असू, त्यांच्याबरोबर भटकत असू. त्यांतून त्यांची मने, विचार कळत गेले. त्यांच्याशी स्नेहबंध तयार झाले. आमच्या गप्पा, संभाषणे आमच्या वेगवेगळ्या संस्कृती, वर्तनशैली, विचारपद्धती, जीवनोद्दिष्टे अशाही अंगाने कधी कधी होत. आमचा मुख्य खर्च शिकवणी, पुस्तके, खोलीभाडे यांवर होत असे. त्यांतून पैसे उरले तर आम्ही दूर प्रवासाला जात असू. आम्ही विद्यार्थी म्हणून गरीब वर्गातील होतो. पण तो काळ फार मजेचा गेला. टेलिव्हिजन पाहिला जात नाही हे कधी मनातही आले नाही. थोडे मोकळेपणाने म्हणायचे तर बहुतेक सारे लोक टेलिव्हिजन पाहत बसतात, तो त्यांच्या दिवसभराच्या कामातून जो मोकळा वेळ मिळतो तो घालवण्यासाठी (आम्ही तशा मोकळ्या वेळात वेगळे उद्योग करत होतो).

आम्ही भारतात परतल्यावरही घरी टेलिव्हिजन ठेवायचा नाही असे ठरवले आणि त्यामुळे आमच्या जीवनात फरक काही पडलेला नाही. आता तशी साताठ वर्षें गेली आहेत. मला टेलिव्हिजन पाहत बसण्यापेक्षा चित्रे काढणे, वाचन-लेखन, नृत्य यांमध्ये वेळ घालवणे अधिक पसंत पडते.

घर विकत घ्यायचे नाही, भाड्याच्या घरात राहायचे या विचाराचे मूळही अमेरिकेतच रुजले. घर विकत घेणे म्हणजे एका जागी स्थिरावणे. परंतु आम्ही विद्यार्थी म्हणून जगलो तसे जगणे आम्हाला आवडले होते. ‘खोलीमित्र’, ‘सतत अस्थिरता’… त्यामुळे हिंडणे-फिरणे सोपे होऊन जाई. त्यात खूप मौज होती. कंटाळा कमी होता. शिवाय, घर विकत घेणे म्हणजे केवढ्या अफाट किंमती! माझा पगार हप्त्यांत वर्षानुवर्षें जात राहणार ही कल्पनाच मला सहन होईना. त्यापेक्षा आम्ही तोच पैसा भटकण्यात, आम्हाला हवा तसा खर्च करण्यात मजा नाही का? किंवा पैसे साठवत राहण्यातही मौज असू शकते. घर विकत घेण्यापेक्षा भाड्याच्या घरात राहणे हे आर्थिक दृष्ट्या सुद्धा शहाणपणाचे ठरते.

_Ghar-Mule_Havitacha_Kashasathi_1.jpgकिरण (माझा नवरा आणि मित्र) आता तो युरोपात नोकरी घेत आहे. त्याला पाळीव कुत्रे फार प्रिय आहेत. मलाही ते काही प्रमाणात आवडू लागले आहेत. पाळीव कुत्री घरात असणे ही फार सुंदर गोष्ट आहे. त्यांचे सभोवतालावर प्रेम बिनशर्त असते. शिवाय, त्यांना त्या प्रेमाच्या बदल्यात फार काही नको असते. आम्हाला ते कुत्र्यांना घेऊन त्यांच्याबरोबर आता, तीन वर्षें राहिल्यावर कळत आहे. त्यांच्याकडून एक गोष्ट शिकण्यासारखी नक्की आहे. आमच्याकडे फक्त दोन कुत्री आहेत, कारण आमच्याकडे तेवढीच जागा आहे. आम्हाला जास्त जागा घेता येत नाही. त्यांचे करण्यासाठी जो जादा वेळ लागेल तोही आमच्याकडे नाही. केव्हातरी आमच्याकडे मोठी जागा व भरपूर वेळ असेल तेव्हा आम्ही खूप खूप कुत्री पाळू… आणि आमचे ते कुटुंब काय असेल, नाही!

आम्ही परंपरेला सोडून त्याखेरीज एक गोष्ट केली. ती म्हणजे मुले होऊ न देण्याचा निर्णय घेतला. आम्ही कुत्री मुलांऐवजी स्वीकारली आहेत असा त्याचा अर्थ नव्हे. असे नाही की आम्ही इतक्या छान जगात जगत आहोत, त्यात रमणे इतके आनंददायक आहे, की आम्ही त्यात आणखी कोणाला आणून अजून भर घालावे, सभोवतालाचे जग तसेच असावे-राहवे असे त्यात काही नाही.

माझ्या संभाव्य मुलामुलीने या जगात येऊन असाधारणपणे जगावे असे काहीच या जगात नाही. खरे तर, माझे हे लेखन पूर्णत: आशादायक होते, मग हा निराश करणारा विचार आला कोठून? पण वास्तव ते व तसेच आहे असे मला वाटते. आपण ते जग बदलण्यासाठी प्रयत्न करावे असेही कधी वाटते. पण… तसे घडत नाही हे सत्य आहे. आपण आपल्या मुलाबाळांना कितीही सारे दिले, त्यांना जपले तरी त्यांना तसेच जगवणे आजच्या या जगात शक्य होईल असे मला वाटत नाही.

आजचे आपले जगणे म्हणजे पाण्यावरील बुडबुडे आहेत. ते सत्य आहेत का? तर ते फुटून जातील, विरून जातील. की ते भासमानच आहेत? आपण नवे बुडबुडे निर्माण करत नाही, तोवर… मला आमच्या मुलाबाळांना अशा, आपण जगत आहोत त्या परिस्थितीत आणून नाही सोडायचे.

आणि मुलेबाळे आम्हाला हवीत तरी कशाला? ती आमच्या वृद्धापकाळात आमच्याकडे पाहतील, म्हणून? की आमच्या जीवनातील पोकळी भरून काढण्यासाठी? आमची करमणूक व्हावी म्हणून? की आमच्या लग्नाला सहा वर्षें झाली, मी माझी तिशी ओलांडून गेले, शेजारणीला केव्हाच मूल होऊन गेलेदेखील, अशा विचाराने? मला मूल कशासाठी हवे आहे याचे एकही कारण सापडत नाही!

Last updated on 21 Nov 2017

About Post Author

Previous articleषड्रिपू हे मित्र आहेत!
Next articleयादवकालीन कचेश्वर मंदिर
कार्तिकी खडकीकर-जोशी यांचे मुंबईतील किंग जॉर्ज हिंदू कॉलनी, दादर येथील शाळेत सातवीपर्यंत व पुणे येथे सातवी नंतर शिक्षण झाले. त्या पुण्यात सीए झाल्या. एम कॉम केले. विवाहानंतर मास्टर्स इन फायनान्स करण्यासाठी अमेरिकेतील Cleark University मध्ये प्रवेश घेतला. भारतात शिक्षण पूर्ण करून परतल्यानंतर क्रेडिट स्वीस बँकेत गेली पाच वर्षें नोकरी करत आहेत. सध्या त्या तेथे असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट ह्या पदावर आहेत. त्यांना ड्रॉइंग व पेंटिंगचा छंद आहे. त्याबाबत त्यांनी पुण्यातील प्रदर्शनात सहभाग घेतला आहे. त्यांचे शांत स्वभाव आणि विनम्रता हे दोन गुण विशेष जाणवतात. लेखकाचा दूरध्वनी 8412000886

16 COMMENTS

  1. खूप छान आणि वेगळा विचार…
    खूप छान आणि वेगळा विचार केलेला आहे।मनसोक्त जगले पाहिजे।

  2. kartiki , mast lihile ahes …
    kartiki , mast lihile ahes … tuzha tuzya life baddal cha view khup clear ahe .. he saglyana nahi jamat … so keep it up …

  3. Lekh far changla ahe. Vichar…
    Lekh far changla ahe. Vichar thode hatke ahet. Pan that gair kahihi nahi. Shevti Jeevan anandane jagnyasathi aste.

  4. लेख छान आहे …
    लेख छान आहे .
    बदलत्या जीवनशैलीत वेगवेगळे मतप्रवाह असू शकतात . आणि सर्वानीच मळलेल्या वाटेवरुन जावं असं नाही ना . काहीना मातृत्व /पितृत्व याची आस किंवा गरज कमी वाटू शकते . आपल्या समाजात कुटुंबसंस्थेच एक आदर्श चित्र आधीच रंगवून ठेवलय . त्याच्या बाहेर जावून जगण्याचा काही जणांचा हक्क आणि कोणाचही वेगळेपण समाजाने स्विकारायला हवं .

  5. विषय वेगळा पण आजच्या…
    विषय वेगळा पण आजच्या जीवनशैलीत विचार करायला लावणारा आहे. अजून विस्ताराने लिहिलेले वाचायला आवडले असते. पण विचार करायला लावणारा आहे हे नक्की.

  6. मुलाखत स्वरूपात हा विषय…
    मुलाखत स्वरूपात हा विषय वाचायला आणखी छान वाटला असता

  7. खूप छान लिहीलय. कार्तिकी इतक…
    खूप छान लिहीलय. कार्तिकी इतक छान व्यक्त होऊ शकते हे कौतुकास्पद आहे.
    आता लेखातील मतांबद्दल, सर्वप्रथम दोघांची हटके मत असूनही एकमत किंवा पुरक मतं आहेत हे भाग्य. त्यांची जीवनशैली, विशेषत: TV/ newspaper शिवाय आयुष्य इतर भरीव छंदांनी मनसोक्त उपभोगण, अनुकरणीय आहे. स्वत:च घर न घेता भाड्याच्या घरात राहण्याचा निर्णय ते घेऊ शकले कारण दोन्ही बाजूने वडीलार्जीत घराचे पाठबळ आहे. पण अजून तरी भारतात long lease वर घरे मिळत नाहीत आणि दर ३ वर्षांनी घर बदलणे फारसे practicable नाही.
    संसारात मुलांची आवश्यकता हा फारच वैयक्तिक निर्णय आहे पण मी दोघांना विशेषत: किरणला तर लहानपणापासून खूप छान ओळखते. दोघांनाही मुलांबद्दल प्रेम आहे. ओमच सुद्धा किती प्रेमाने करतात. जबाबदारी टाळण्याचा त्यांचा स्वभाव नाही. इतके सृजनशील couple खूप छान पालक होऊ शकतात. फक्त पालकत्व वेळेवर घेतलं तर नीट निभावलं जात, दोघांवरील प्रेमाने मी एकच सांगू इच्छीते की हा निर्णय चुकला असं वाटण्याची वेळ न येवो आणि बहुअंगानी जीवन उपभोगणाऱ्या या दोघांना पालकत्वाची मजा अनुभवण्याचीही ईच्छा होवो.
    -मेधा पळसुले

  8. खूप वेगळ्या धाटणीच आयुष्य…
    खूप वेगळ्या धाटणीच आयुष्य तुम्ही जगू पाहत आहात अन त्याच मुळात तुम्हाला फार कौतुक काही वाटत हे सारच विशेष आहे. आपलं आयुष्य EXPLORE करत जगावं ही तशी बहुतेकांच्या मनातील सुप्त इच्छा असते. ती तुम्ही प्रत्यक्षात जगात आहात. घर न घेण हे मला स्तुत्य वाटलं तरीही आपली एक हक्काची जागा असवि जिथून कोणीही आपल्याला हुसकवणार नाही याचीसुद्धा मला गरज वाटते. दुसरा मुद्दा मुल. मुल का जन्माला घातली जातात यावर तुम्ही साधारण शेवटच्या परिच्छेदात नमूद केल आहे. अर्थात या कारणांसाठी मुल खरच जन्माला घालू नयेत. ती मुळातच स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असतात. त्यांची ती जगणारी असतात आपला त्यावर मालकी हक्क असण्याच कारण नाहीच पण तुम्ही हे जग फार काही असाधारण नाही कि ते पाहण्यासाठी मुल जन्मायला हवे हे काहीसे न पटणारे आहे. सध्या वाढत चाललेल्या प्रदूषणापासून ते असुरक्षितेपर्यंत अनेक मुद्दे आहेत हे वास्तव आहे. परंतु PERFECT असं काहीच नसते. असाधारण असही. तो दृष्टिकोनाचा भाग आहे अन हे जग इतकही टाकाऊ नाही. हा निसर्ग इतकाही जीवावर उठलेला नाही, माणसे इतकीही जीवघेणी नाहीत. सार काही जस चांगले नाही तसे वाईट ही नाही. असो
    अर्थात तुमचा निर्णय स्वगातर्ह आहे. सगळ्यांनी ठरलेल्या साच्यातून जाव अस काही नाही. परंतु तुम्ही माडलेला तो मुद्दा खटकला. तुम्हाला मुल जन्माला याव याच कारण सापडलं नाही म्हणाला ते तर अगदी पटल. शुभेच्छा !

  9. अतिशय वेगळे विचार. चूक का…
    अतिशय वेगळे विचार. चूक का बरोबर नाही सांगता येत. पण जे वाटते ते आचरणात आणण्याचा प्रामाणिकपणा उल्लेखनीय! विचार व्यक्त करण्याची शैली मात्र अतिशय सुंदर !

  10. The different view showed by…
    The different view showed by you is good no bad . At last it is everyone’s point of thinking how to leave thier life . It takes courage to go beyond the boundaries set by the society and leave your life as you want especially in India.

  11. खूप वेगळा विचार मांडलाय…
    खूप वेगळा विचार मांडलाय त्याच्याशी प्रामाणिक असल्याचे विवेचनावरून जाणवते, आपले मत मांडणे, ते निभावून नेण्याचे सामर्थ्य दाखविने हे निश्चितच कौतुकास्पद आहे, त्याबद्दल अभिनंदन!!!

  12. वेगळे विचार…परंतु मुले…
    वेगळे विचार…परंतु मुले फक्त म्हातारपणाची काठी…एवढाच हेतू नाही…तर मुले सद्धा त्यांच्या बालपणात पालकांना अवर्णनीय आनंद देतात. आपल्या क्षमतेप्रमाणे त्यांना सर्वोतपरीने उत्तम वाढविता येते…दासबोधाचे वाचन फार उपयुक्त आहे……अजून लिहावे असे खूप आहे….असो….तुम्हाला दोघंना शुभेच्छा….

  13. मुळात हे काही खूप…
    मुळात हे काही खूप क्रांतिकारक आणि नवीन नाही आहे तसेच कौतूक करावे किंवा निंदा करावी असं देखील यात काही नाही.
    उलटपक्षी यांना समाजासाठी जगात येणार का हे यांनी पाहील पाहीजे तरच ते विधायक होत मौज मज्जा च्या पलीकडे जाणार.
    100 वर्षा पूर्वी रा.धों. कर्वे दाम्पत्य यांनी मूल न होऊ देण्याचा निर्णय घेतला होता त्या मागे विचार आणि पुढे कार्य होते त्यामुळे हे सगळे वाचले तेव्हा यात खोली कमी आणि उथळपणा जास्त दिसत आहे.

  14. With all due respect to your…
    With all due respect to your thoughts and choice to live life your own way, for your decision on not having kids I think you are not ‘feeling’ it.

    I would say,
    लुफ्त तुमसे क्या कहू गालिब,

    हाय कंबक्त तूने पी ही नही!!

Comments are closed.