काळा पैसा आणि दारू

0
44

दिनकर गांगल

     काळा पैसा आणि दारू या दोन प्रश्नांभोवती जनतेला फिरवले जात आहे. हे प्रश्न सर्वसामान्य दैनंदिन जीवनात किती महत्त्वाचे आहेत? सार्वजनिक कार्यालयात कामानिमित्त जाण्याची वेळ येते तेव्हा सर्वसामान्य माणूस ‘चिरीमिरी’ द्यावी लागणार हे गृहित धरून असतो – मग ते लग्नाचे सर्टिफिकेट असो वा जन्म–मृत्यूचा दाखला. कोपर्‍यावरच्या पानवाल्याचे, भेळवाल्याचे, पाणीपुरीवाल्याचे, ……


दिनकर गांगल

     काळा पैसा आणि दारू या दोन प्रश्नांभोवती जनतेला फिरवले जात आहे. हे प्रश्न सर्वसामान्य दैनंदिन जीवनात किती महत्त्वाचे आहेत? सार्वजनिक कार्यालयात कामानिमित्त जाण्याची वेळ येते तेव्हा सर्वसामान्य माणूस ‘चिरीमिरी’ द्यावी लागणार हे गृहित धरून असतो – मग ते लग्नाचे सर्टिफिकेट असो वा जन्म–मृत्यूचा दाखला. कोपर्‍यावरच्या पानवाल्याचे, भेळवाल्याचे, पाणीपुरीवाल्याचे, छोट्या गॅरेजवाल्याचे सर्व उत्पन्न काळ्या पैशांत जमा होत असणार, कारण आयकरखाते तेथपर्यंत पोचणार नाही आणि कोणीही त्यांच्या व्यवहाराचे अर्धा-एक तास निरीक्षण केले तर त्यांची मासिक प्राप्ती दशहजार-लाखांत असू शकते हे ध्यानी येईल. त्या मुळे सर्वसामान्यांचा काळा पैसा आणि राजकारण्यांचा, उद्योगपतींचा, तारेतारकांचा काळा पैसा यांत फरक आहे. दुसर्‍या प्रकारचा काळा पैसा जगभर सर्व देशांत आहे. पहिल्या प्रकारचा काळा पैसा हा सर्वसामान्यांना सरकारी यंत्रणेकडून मिळणार्‍या सेवेशी निगडित असतो. हा ‘सेवा’उद्योग भारतात देश स्वतंत्र झाल्यापासून अस्तित्वात आहे. आता, पोलिसाचा, अभियंत्याचा, कारकुनाचा, सचिवाचा काळा पैसा हा त्याच्या पगाराचा भाग होऊन गेला आहे. शेजारी राहणारा सेल्सटॅक्सवाला, इन्कमटॅक्सवाला, नगरपालिकावाला, पोलिस हवालदार, तलाठी-तहसीलदार रोज संध्याकाळी चैनीच्या वस्तू जास्त का आणू शकतात हे सगळ्या जगाला ठाऊक झाले आहे.

     हजारे-रामदेवबाबा यांचा हल्ला कनिमोळी-राजा-कलमाडी यांच्यावर आहे. आता, ते आरोपित आहेत म्हणून, अन्यथा जनता राजकारण्यांचा, उद्योगपतींचा, तारेतारकांचा रुबाब-राहणी आदर्श मानत असते. त्यामुळे सर्वसामान्यांच्या गैरसोयीचा, त्रासाचा प्रश्न व काळा पैसा नष्ट कसा करायचा हा चाणक्यापासून चालू असलेला सैध्दांतिक प्रश्न. यांत पेपर वाचताना, टीव्ही पाहताना फरक केला जायला हवा, सध्या, सर्वसामान्य लोक त्याकडे करमणूक म्हणून वाचत-पाहत असतातच. ते सुजाणपणे घडावे एवढीच अपेक्षा.

     दारू तशीच पुरातन काळापासून अस्तित्वात आहे. ती मर्यादित प्रमाणात औषधी आहे असेही डॉक्टर सांगतात. त्यामुळे मूलत: ती व्‍यक्त्तिगत गोष्ट आहे- धर्माप्रमाणे. सरकारला त्यात हस्तक्षेप करावा लागतो, ती गोष्ट आजार बनून समोर येते तेव्हा. दारूमुळे कुटुंबे उध्वस्त झाली आहेत, पण तशी पक्षाघातापासून कॅन्सरपर्यंतच्या अनेक आजारांनी अनेकानेक कुटुंबे पकडीत सापडली गेली आहेत. दारूचा विचार सामाजिक आजार म्हणून न करता अनेक कुटुंबांमध्ये शिरकाव केलेला त्या त्या कुटुंबाचा व्‍यक्त्तिगत आजार असा करावा लागेल आणि मग सार्वजनिक व्यवस्थेने त्या कुटुंबांचे स्वास्थ्य बिघडू नये; तसेच ते आजार पसरू नयेत यासाठी काम करावे; तेवढ्यापुरताच तो विचार असावा. सरकारचे धोरणही तसे असावे. सध्या, सरकारला दारूमधून खूप पैसा मिळतो, त्यामुळे सरकारी धोरण दारूउत्पादनात ‘ढील’ आणि तिच्या सेवनावर कृत्रिम बंधने असे आहे. त्यामुळेच माजी मुख्य सचीव म.द.सुकथनकर यांनी नमूद केले आहे त्याप्रमाणे दारू पिण्याचा परवाना वयाच्या पंचविशीनंतर दिला काय आणि तिशीनंतर दिला काय? त्यामधून कोणालाच काही फरक पडणार नाही. हे सरकार असेच अनागोंदी चालत राहील, जोपर्यंत लोक सजग होत नाहीत. लोकांना जाणीवजागृत करण्याची जबाबदारी समाजातील सुशिक्षित-सुजाण-सुसंस्कृत-विचारी नागरिकांची आहे. हे नागरिक त्यासाठी एकेकाळी माध्यमे वापरत; आता, माध्यमे व्यावसायिकांच्या हातात आहेत. तो धंदा झाला आहे. सुबुध्द नागरिकांना अन्य माध्यमांचा, कृतिकार्यक्रमांचा विचार करावा लागेल.

दिनकर गांगल
ज्‍येष्‍ठ पत्रकार
संपर्क – 9867118577

thinkm2010@gmail.com  

About Post Author

Previous articleफक्त कवितांचे ग्रंथालय!
Next articleफ्लायओव्हरवर बसची संख्या वाढणे गरजेचे
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.