– वसुमती धुरू
कथोराणी वज्रादपि
– वसुमती धुरू
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दादरच्या नरेपार्क मैदानावर सभा भरली होती. अखिल भारतीय काँग्रेसमधे तेव्हा उजवे व डावे असे दोन तट होते. सर्व बुजूर्ग नेते ‘उजवे’ होते व तरुण मंडळी – लोहिया, अशोक मेहता, एसेम जोशी वगैरे – डाव्या विचारसरणीची होती. त्यांना समाजवादी पक्ष असे म्हणत. तर तेव्हा कोणत्या तरी कारणावरून डाव्या-उजव्यांत मतभेद झाला होता- तो विकोपास जाऊ नये म्हणून साने गुरुजींनी समाजवादी पक्षातर्फे वल्लभभाई पटेल यांना पत्र लिहीले होते. त्यांत देशाला स्वातंत्र्य मिळण्यात समाजवादी पक्षाचाही काही वाटा आहे अशा अर्थाचे विधान होते. त्याला वल्लभभाईंनी दिलेले उत्तर साने गुरुजींनी त्या सभेला वाचून दाखवले. मी त्यावेळी कॉलेजमधे इंटरसायन्सच्या वर्गात होते. मीही इतर कित्येकांप्रमाणे अभ्यास सोडून त्या सभेला गेले होते. वल्लभभाई पटेलांनी समाजवादी पक्षाला उत्तर दिले होते. ते अशा आशयाचे-
एक मोठा रथ रस्त्यावरून दिमाखाने वेगात दौडत असतो. त्याचा दौडताना मोठा आवाज होतो. तो आवाज ऐकून रस्त्यावरची काही कुत्रीसुध्दा रथाबरोबर जोरात पळू लागतात व आनंदाने भुंकू लागतात. त्यांना वाटते, की आपल्या पळण्यामुळेच हा रथ पुढे जात आहे. नेमकी हीच परिस्थिती अखिल भारतीय काँग्रेसचा रथ व तुमचा समाजवादी पक्ष यांची आहे!
हे वाचून साने गुरुजी क्रोधाने लाल झाले नसते तरच नवल! त्यांनी त्या प्रचंड मोठ्या सभेत ते पत्रोत्तर वाचून दाखवले व रागाने थरथरत म्हणाले, “अखिल भारतीय काँग्रेसच्या मोठ्या पुढार्यांना सामान्य कार्यकर्त्यांची हीच किंमत वाटते काय? ठीक आहे, तर मग या पत्राला वेगळे उत्तर देण्याची गरज नाही. उत्तर मी येथेच सर्वांसमक्ष देतो.” असे म्हणून त्यांनी त्या पत्राच्या फाडून चिंध्या चिंध्या केल्या व वार्यावर फेकून दिल्या!
सदा अत्यंत सौम्यप्रकृती, विनयशील साने गुरुजींचा तो रुद्रावतार व प्रत्यक्ष सरदार पटेलांना उत्तर देण्याची ती हिंमत पाहून आम्हां नवतरूणांच्या संवेदनाक्षम् मनावर काय परिणाम झाला असेल!
“वज्रादपि कठोराणि मृदुनि कुसुमादपि ।
लोकोत्तराणां चेतांसि को हि विक्षातुमर्हति ॥“
आज माझ्या वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी गुरुजींच्या तत्त्वज्ञानाचा प्रभाव माझ्या मनावर आहे.
वसुमती धुरू – (022) 24222124.
{jcomments on}