अनिल अवचट : एक न आवडणं

शेल्टरिंग स्काय
शेल्टरिंग स्काय

शेल्टरिंग स्काय     बर्तोलुचीच्या ‘शेल्टरिंग स्काय’ या चित्रपटाची सुरूवात मला आठवते. मोरोक्कोच्या किनार्‍यावर उतरलेले तीन अमेरिकन. त्यातली नायिका फरक सांगते –प्रवासाबद्दलच्या धारणेचा.‘मी इथे आले ती ट्रॅव्हलर म्हणून, टूरिस्ट म्हणून नाही’ – आणि मग, टूरिस्ट सहप्रवासी मित्राच्या चेहेर्‍यावरचे भाव वाचून ती पुढे म्हणते –‘टूरिस्ट म्हणजे जो नव्या देशात येताक्षणी परत जाण्याची तारीख निश्चित करतो आणि ‘ट्रॅव्हलर’ला नव्या देशात आले, की परत जाण्याची आठवणही होत नाही. प्रवास हेच त्याचे सर्वस्व!’

     पण आता असे भटके (ट्रॅव्हलर्स) राहिलेत कुठे – टूरिस्ट सारे! प्रवासी कंपन्यांच्या वेगवेगळ्या अवतारांना शरण. मला उच्चमध्यमवर्गीयांचे एक व्यवच्छेदक लक्षण ठाऊक आहे. भेटले की केलेल्या प्रवासाबद्दल किंवा खाल्लेल्या पदार्थांबद्दल बोलत राहायचे! आजारी मनाचे लक्षण आहे ते किंवा सारी कामप्रेरणा नष्ट झाल्याचे. हनिमूनचे फोटो दाखवण्याचा मूर्ख अश्लीलपणा हे पण याच वर्गाचे लक्षण! जर अनुभवाला मनापासून सामोरे जायचे तर फोटो कोण काढील? दारू पीत त्या संबंधीची वर्णने कोण सांगील? पण लग्नाच्या नात्यातला चार्म संपला, की ‘आमची युरोपची टूर’, ‘आम्ही ठेक्कडीला गेलो होतो तेव्हा’ अशा गप्पा सुरू होतात – बकार्डी पीत पीत…

     ‘आठवडाभर मी ट्विट करणार नाही’ असे जाहीर करत राजदीप सरदेसाई नाही का कर्नाटकात भटकायला गेला? आणि त्याची बायको सागरिका घोष लिहीत होती आठवडाभर जगाला ट्विट करत – नागरहोळे आणि काबिनी किती सुंदर आहे म्हणून! मनात आले, ‘अगे माझ्या बायो, जर ते इतके सुंदर आहे तर एंजॉय कर आणि गप बस की! ट्विट करून जगापाशी बोंबलतेस याचा अर्थ आतूनच काहीतरी चुकलेय!” आम्ही जगतो ती किती मज्जा असे मध्यमवर्गीय लोक जेव्हा ठासून सांगू लागतात – तेव्हा त्यांच्या कार्पेटखाली प्रचंड दांभिक कचरा साठतोय हे चाणाक्षपणे पाहता येते.

अनिल अवचट     या पब्लिकचे अजून एक व्यवच्छेदक लक्षण म्हणजे ते वाचण्यास सुरुवात करतात तेव्हा त्यांना पु.ल. देशपांडे आवडतात आणि पन्नाशीत येता येता, त्यांना अनिल अवचट थोर वाटतात! जे असुंदर आहे त्याच्या डोळ्यांत डोळा घालून पाहायचे, एकदा का भयापोटी नाकारले, की मग सर्व गोष्टिंना सरसहा चांगलं म्हणणारा पोस्टमेनॉपॉझल समाजवाद हीच काय ती बुडत्याची काडी!

अनिल अवचट लिखित – पुण्याची अपूर्वाई     ठाण्याच्या ‘मॅजेस्टिक’मध्ये पुस्तकांचे गठ्ठे पडले होते. भोचकपणे मी एक पुस्तक खेचून बाहेर काढलं – ‘पुण्याची अपूर्वाई’. बकाल पुण्यात राहणार्‍या बहुसंख्य पुणेकरांना अवचटांनी ही ‘अपूर्वाई’ सप्रेम दिली हे म्हणतानाच मला हसू फुटले.

     पु.ल. म्हणजे ‘अपूर्वाई’साठी परदेशी जाणारे पहिल्या धारेचे समाजवादी कार्तिकेयस्वामी; तर अनिल अवचट म्हणजे दुसर्‍या धारेचे पुण्यालाच अपूर्व करून प्रदक्षिणेचे पुण्य मिळवणारे पुणेरी गणपती! पूर्वी वाचकांचे जग दोन भागांत विभागले गेले होते. पुलं आवडणारे आणि पुलं नावडणारे; आता, नवीन जगात एकतर तुम्हाला अनिल अवचट आवडतात किंवा त्यांचा कंटाळा येतो. ‘नाही आवडावे’ असं त्यांच्या लेखनात काही नाहीच. पण कंटाळा येण्यासारखे खूप काही आहे. त्यांचा दंभ किती मोहक आहे ? उगीच का वर्णी लागते कॉर्पोरेट आणि एन आर आय जगात त्यांची ?  अनिल अवचट मला बोअर करतात. माझा राग अनिल अवचटांच्या लेखनावर नाही. राग येईल असे ते लिहीतच नाहीत, मुळी! पण त्यांच्या बिनमिठाच्या नॅरेटिव्हजनी मला सुपरकंटाळा येतो. इयत्ता आठवीपर्यंत मुले किंवा नवीन मराठी शिकणारे परभाषिक यांनी अवचट अगत्यानं वाचावेत; मात्र नंतरही त्यांनाच कवटाळणार्‍या वाचकांचा पॅटर्न आता, मला प्रेडिक्ट करता येतो.

अभय बंग     ‘गुडी टु शूज’ माणसांना घासाघासाने संवेदनशीलता भरवणारे अवचट स्वत:च कसे कंटाळत नाहीत या प्रकाराला? असाही प्रश्न मला पडतो. पण मध्यमवर्गीय लोकेषणा भल्या भल्यांना सुटत नाही. त्यातल्या त्यात नीतिमान जगू इच्छिणारा हा वर्ग आहेच अ‍ॅडिक्टिव्ह. ‘अनिल अवचट लिहितात मध्यमवर्गासाठीच.  त्यातही पुण्यातल्याच’, या सुनील तांब्यांच्या मताशी मी सहमत आहे. पण तो लेखक माणूस संपूर्ण न मांडताच मध्यमवर्गीय जगणे रोमॅंटिक करून मांडायला जातो हाच तर माझा प्रॉब्लेम आहे. ‘अरे माझ्या मध्यमवर्गीय भांडवलशाहीत राहून मिडिऑकर झालेल्या प्रॉडक्टांनो, हे घ्या माझे सामाजिक जाणिवेचे इंजेक्शन’ अशा आविर्भावात उपदेशामृताचे घुटके पाजणारे अवचट मला जाम वात आणतात.

     माझ्या एका माजी सहकारणीला मी सांगत होते “ च्यायला, जगात साबुदाण्याची खिचडी आणि पाळीत गरम पाण्याची बादली’ या दोन गोष्टींनी अनेक पुरुषांची आयुष्ये उध्वस्त झाली आहेत महाराष्ट्रात. ही पुरोगामी बाईची पुरुषाला पान्हा फोडायची ईर्षा अवचटांनी ताडून त्यांनी ‘लग्न’ या व्यवस्थेची जी पार्शल वर्णने केलीत त्यांना मी (विनोबांच्या भाषेत) वाचाचौर्याचे लक्षण मानते. कारण तसे ‘लग्न’ वास्तवात असताना त्यात खिचडीसोबात इतर कोणकोणत्या गोष्टी आणि नावडते विनिमयदेखील असतात त्या असुंदर भागाबद्दल अवचट अवाक्षर लिहीत नाहीत.

आनंद नाडकर्णी     अगदी रॅश उदाहरण द्यायचे तर लोकांच्या घरची देखणी कुत्री मला आवडतात. पण मग त्या प्रत्येक कुत्रीच्या पाळीच्या काळात तिची काळजी कोण घेत असेल?  किंवा त्या कुत्रीला मेटिंगसाठी कुठे न्यायचं? ते कोण ठरवत असेल अशा प्रश्नांनी मी भानावर येते आणि माझ्या पाळीव प्राणिप्रेमाची तात्कलिक नशा उतरते. कुत्री पाळणे किती मजेशीर आहे ते लिहिणे आणि पाळलेली कुत्री निभावणे या दोन्ही गोष्टी भिन्न आहेत. त्या निभावण्याच्या प्रक्रियेतले सारे असुंदर वगळून जे जग अवचट तयार करतात, त्यामुळे त्या सद्‍गुणी लेखनाचा एडिटेड भाग मला अधिकाधिक खुणावू लागतो. अवचट आवडणा-या वाचकांचे सारे पॅकेजच नंतर उमगून येते. ते पॅकेज वाईट नाही – प्रेडिक्टेबल आहे, ‘बाय वन गेट वन फ्री’च्या हिशोबाने. मध्यमवर्गीय समाजवादावर शिवसेना-द्वेष फुकट, अभय बंगांच्या आदरासोबत गुटख्याबद्दलची तिडीक फुकट, ओरिजिनॅलिटीचा अभाव आणि त्यावर आनंद नाडकर्णीचा अल्बर्ट एलिस फुकट!

ज्ञानदा देशपांडे

भ्रमणध्वनी : 9320233467
dnyanada_d@yahoo.com

About Post Author

1 COMMENT

  1. बोंबलाच्या वासाने कुणाची भूक
    बोंबलाच्या वासाने कुणाची भूक उद्दिपित होउन तोंडात लाळ गळते तर कुणाची भूक नाहीशी होउन मळमळते. वास तोच असतो. एखाद्याचा जगण्याचा आनंद हा एखाद्याच्या तुच्छतेचा विषय असू शकतो. एखाद्याचे अन्न दुसर्‍याचे विष वा टाकावू पदार्थ असू शकते. त्यामुळे एखाद्याच्या लेखनाने एखाद्याला आनंद मिळेल तर दुसर्‍याची चिडचिड होईल. आपण सोडून सर्व जग तुच्छ आहे असे समजणारी माणस ही याच जगाचा घटक असतात. तो मान्यही आहे.आपल्याला या जगाचे जणूकाही सर्व आकलन झाले आहे व बाकी लोक हे किती अज्ञानी! बेचारे गंदी नाली के किडे! हे असेच मरणार, त्यांची लायकीच ती. असा कीव युक्त तिरस्कार उत्पन्न व्हायला लागतो. मनोविकारांचा मागोवा या डॉ श्रीकांत जोशींच्या पुस्तकात अशा मॅनियाक व्यक्तिमत्वांवर ‘दुनिया मेरी जेब मे’ असे प्रकरण आहे.इतरांना तुच्छ लेखण्यातून आपण ग्रेट असल्याची भावना त्यांना सुखावून नेते.इतरांचा उपहास करण्याची वा तुच्छ लेखण्याची संधी ते सहसा सोडत नाहीत.पहिलवानांना जशी ‘रग’ जिरवण्यासाठी ‘आखाडा’ लागतो तशा या बुद्धीदांडग्यांना आपली बौद्धिक माज/खुमखुमी जिरवण्यासाठी वैचारिक आखाडे लागतात. दगडाला टक्कर देणारा एडका ज्या जोशात वावरतो त्याच जोशात ही मंडळी वावरतात. जर अचानक या एडक्याचा दगड काढुन घेतला तर तो जसा सैरभैर होतो तशी काही अवस्था यांना ‘खाद्य’ वा ‘टार्गेट’ न मिळाल्यावर होते.मग ही मंडळी मिळेल त्याला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात.
    वैचारिक वाद प्रतिवादात या गोष्टी घडत असतात कारण भावना नावाचा फॅक्टर अस्तित्वात असतो. तो त्याला स्वस्थ बसू देत नाही.आपल्या विचारांशी सहमत नसणार्‍यांचे सहअस्तित्व त्याला खुपू लागते. तो त्यांना शत्रू मानायला लागतो. मग साम दाम दंड भेद वगैरे नीती वापरुन आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न करतो किंवा त्याला संपवण्याचा प्रयत्न करतो.

Comments are closed.