Home अवांतर किस्से... किस्से... स्वरांची मोहिनी (Mesmerising Music)

स्वरांची मोहिनी (Mesmerising Music)

4

संगीताची मोहिनी अवीट आहे. प्रत्येकापाशी गाण्यांच्या आठवणी असतात. एखादं गाण पहिल्यांदा ऐकलं तेव्हाच्या किंवा एखादं गाणं ऐकत असताना घडलेल्या प्रसंगांच्या… ते गाणं आणि त्या आठवणी हातात हात घालूनच येतात. या विषयावर प्रत्येकजण स्वत:चा असा ललित लेख लिहू शकेल.

भरून आलेल्या आभाळातून कोसळणाऱ्या सरींचे धारानृत्य सुरू असताना मनाला आपसूकच हुरहुर लागते. अशा वेळी गाणं आणि गाण्यांच्या आठवणी साथ देतात. मनाला सुकून देतात. या लेखात गाण्यांच्या आठवणी सांगत आहेत, इतर वेळी गणिताविषयी लिहिणारे मुकेश थळी. त्यांच्या मते, गाण्यातही गणित आहे आणि गणितातही गाणे आहे. त्यांच्याबरोबर आठवणींच्या जगात एक फेरफटका मारून येऊ या!

‘मोगरा फुलला’ या दालनातील इतर लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

-सुनंदा भोसेकर

स्वरांची मोहिनी

संगीत आणि साहित्य या दोन भिन्न कला असल्या तरी त्यांच्या गोडव्यासंदर्भात माझे एक निरीक्षण आहे. संगीताच्या अनेक आवडत्या रचना अनेकदा ऐकल्या तरी गोडी अवीट असते. साहित्य आपण परत परत वाचले तर ते पहिल्यांदा वाचणे होते ती गोडी परतच्या वाचनात राहत नाही. संगीत थेट हृदयाला भिडते. चांगले संगीत हृदय गदगद करून सोडते. ते त्याची अमीट छबी मन:पटलावर कोरून अंगांग भेदून जाते.

आपण अगदी खुषीत असतो तेव्हा आतून कोठून तरी गाण्याची धून गुणगुणत शरीरभर स्पंदित होत आहे असे अनुभवाला येते. कधी ती सुरावट कानात मुरलेल्या लेहऱ्याची धून असू शकते वा एखाद्या बासरीच्या सुरावटीचा रागाचा आलापसुध्दा. संगीत मनुष्य जीवनात बहर, रसमयता, ओलावा व आनंदाचा पाऊस आणते. त्यासाठी कान मात्र विकसित पाहिजे.

माझ्यातील लेखकाला व कलाकाराला संगीत व गणित यांनी खूप काही दिले. संगीतात गणितही आहे. ताल अमूक मात्रांचा असतो तेव्हा गायकासाठी वा नर्तकासाठी सम दाखवणारे लयकारीचे गणितीय घड्याळ असते. समेवर येणे हे लयकारीचे गणित. मला लेख किंवा ललित निबंध ख्यालासारखा वाटतो. त्याचे उड्डाण म्हणजे ‘टेक ऑफ’ हे आलापासारखे विलंबित लयीत जाणारे. नंतर येते मध्य लय. शेवटी द्रूत लय येऊन ख्यालाचे विमान जसे लॅण्ड होते, तसाच छोटासा तराणा आळवून गायक ख्यालाची सांगता करतो. साहित्यकृतीही तशीच असावी. अगदी सुगम, सुकर, सुलभ, सोपे असे लॅण्डिंग असावे. विमान उतरताना टायर धावपट्टीला टेकून ‘घास्स’ करून धक्का बसावे तसा शेवट न होता, फुलपाखरांच्या धावपट्टीवरून फुलांचे टायर जात आहेत इतकी ही उतरण अलवार व्हावी. साहित्यकृतीचा शेवट असा अलगद असावा. 

श्रवणप्रीती पक्व झाल्यावर एन. राजम यांचे व्हायोलीन गाते कसे, हे उमगू लागते. त्यांचे वादन गोव्यातील संगीत संमेलनात दोन तीनदा ऐकण्याची संधी मिळाली. ‘पायोजी मैंने राम रतन धन पायो’ हे भजन व्हायोलीन गात आहे असे वाटले. त्यांनी ‘जब जानकीनाथ सहाय करे’ हे गायकी अंगाने वाजवलेले भजन तर व्हायोलीन गायनाचा कळसच होता. ते प्रसिध्द भजन अनेक दिग्गजांनी गायले आहे. श्रीकांत बाक्रे यांच्या आवाजातील ते भजन माझे सर्वाधिक आवडीचे. ते भक्तिभावपूर्ण भजन ऐकताना झोपाळ्यावर बसून हवेतून सावकाश, संथ गतीने वर वर झोके घेत जात आहोत असा विहरण्याचा, हिंदोळ्याचा आनंदी आभास होतो.

पंजाबी भजनांची श्रवणसाधना काही न्यारीच. गुरूमहिमा गाणारी. या भजनांना झुळूझुळू वाजणारे दोनतीन हार्मोनियम व तणातण वाजणारे तीन तबला संच यांची विलोभनीय साथ असते. तो नादांचा सुसूत्र मिलाफ आनंददायी असतो. ‘मन क्यूं बैराग करेगा, सद्गुरू मेरा पूरा…’ अशा अनेक भजनांतून येणारा पंजाबी मुशीतला भक्तीरस कानांना मंजुळ लागतो, सुखावतो, शांतवतो. 

संतूरवादक शिवकुमार शर्मांची हंसध्वनी रागावरील ध्वनिफीत आहे. गोव्याच्या केरी प्रियोळ वा सत्तरीतील वाघेरी पर्वतावरून उंच उंच कपारींवरून थंड, सुशीतल पाण्याचे तुषार वा मोठ्ठाले ओघळणारे थेंब लयदार गतीत कोसळावे, तेथे अनेक चिमण्या चिवचिवाट करत उडत असाव्यात तसा भास ते संतूर वादन ऐकताना होतो. स्वर तुषार आणि शुभ्र पाण्याचे तुषार एका तालात नाचताना दिसू लागतात. तसे संगीत गाडीत दूर प्रवासात जाताना असायला हवे. मन स्वच्छ, निरभ्र होऊन आत कोठे तरी शुचिर्भूत होत विसावते. ‘श्रावणात घन निळा’ हे गाणे श्रावणात ऐकताना किती आनंद होतो ! सुधीर फडके यांची भावगीते, भक्तिगीते व गीतरामायण हा केवढा मोठा ठेवा !   

आम्ही हिंदी फिल्मी गाणी ऐकत वाढलो. लहानपणी रेडियोवर बिनाका गीतमाला ऐकली. अमीन सायानी यांचे गोड निवेदन… ते अगली पायदान पर पेश है असे लडिवाळपणे म्हणत. गीतमालेत अजरामर गाणी ऐकली. जी गाणी दशकांआधी ध्वनिमुद्रित झाली ती गाजलेली गाणी अजूनही ऐकली तरी खुषीची कारंजी हृदयात नर्तन करू लागतात. शेकडो फिल्मी गीते यमन रागावर संगीतबध्द झालेली आहेत. अजून वाव आहे, कारण यमन हे अनंत आकाश आहे असे सगळे संगीत गायक म्हणतात. यमन गाण्यांचे स्वर सर्वांग गोंजारतात. आम्ही कॉलेजात असताना विविध भारतीवर रात्री एक कार्यक्रम असे- ‘साज और आवाज’. प्रथम साज म्हणजे वाद्यावर गाण्याची धून वाजे नंतर प्रत्यक्ष कंठातील चित्रपट गीत. बासरी, व्हायोलीन, गिटार, सारंगी, सतार, माऊथ ऑर्गन अशा वेगवेगळ्या वाद्यांतून अनुभवी कलाकार साज म्हणजे प्रसिध्द गाण्याचे वाद्यसंगीत वाजवत. पियानोही असे. तथापि, कालांतराने ब्रायन सायलस या नामवंत पियानोवादकाने पियानोवर नॉस्टॅल्जिक ट्यून्स वादनाचे कार्यक्रम सुरू केले. ते कार्यक्रम गाजले. अमिताभ बच्चन व इतर कलाकारही त्याच्या कार्यक्रमात येत. ब्रायन सायलसच्या पियोनावरील हिंदी फिल्मी गीतांच्या पंधरा सीडी आल्या होत्या. मी दिल्लीत कॅनॉट प्लेसमधून त्या खरेदी करून आणल्या होत्या. त्या माझ्याकडे अजूनही आहेत. मी अधूनमधून ऐकतो. ‘लग जा गले’, ‘सावन का महिना’, ‘जो वादा किया वो निभाना पडेगा’… अनेक गाणी ब्रायन सायलसने पियानोवर वाजवली आहेत. कितीतरी ‘हिट’ गाणी. आईस्क्रीम पार्लर, रेल्वेगाडी, विमानतळ, कलादालने अशा ठिकाणी ब्रायन सायलस व इतर कलाकार यांचे हे वादन अत्यंत मृदू, मऊसूत खळखळणाऱ्या आवाजात चालू असते. डॉक्टरांच्या ओपीडी क्लिनिक्समध्ये पेशंट तासन् तास प्रतीक्षेत बसलेले असतात. तेथे छोट्याशा स्पीकरवर सॉफ्ट आवाजात हे वाद्यसंगीत लयदार झेपावणाऱ्या झऱ्यासारखं वाजवण्यास पाहिजे. प्रतिक्षा सहनशील व सुसह्य होऊन जाईल !

यू ट्यूब हे इंटरनेटने आणलेले मोठे वरदान आहे. मी आणि माझा मित्र एकदा रसिकलाल अंधारियांचा गोरख कल्याण गाडीत ऐकत होतो. जसराजजी यांच्या रागेश्रीची आठवण झाली. मी मित्राला म्हटले – महनीय व्यक्ती आल्यावर त्याला पाहण्यास लोकांची गर्दी उसळते. त्यांची पांगापांग करण्यास एक सेवक डाव्या बाजूने व एक उजव्या बाजूने हातवारे करत लोकांना दुतर्फा उभे राहण्याची सूचना देतो, नेमके तसेच गोरख कल्याण हा राग, रागेश्री व बागेश्री यांना बाजूला सारत पुढे आल्याचा भास होतो. मित्राला ती उपमा फार आवडली. त्याचेही संगीत वेड व संगीत चिंतन खूप. मी म्हटले, ‘हा गोरख कल्याण आकाशाची निळाई, सागराची खोली आणि मनाचा ठाव घेत स्पर्श करतो’. त्याने टाळीच वाजवली. त्या मित्राचे जीवनच संगीताने व्यापलेले. त्याने त्याच्या मुलाचे नावच ‘गंधार’ ठेवलं.

माझा हा मित्र एकदा मालिनी राजूरकर या त्याच्या आवडीच्या गायिकेला भेटण्यास गोव्याहून खास हैदराबादला गेला. तो मालिनीचा एकंदर साधेपणा पाहून हरखून गेला. मालिनीताईंच्या गणितप्रेमाविषयी व अध्यापनाविषयीही मला सांगू लागला. गाण्यात कोठे कोठे गणितीय सौंदर्यशास्त्राची समीकरणे दिसतात ते मला स्पष्ट करू लागला. माझेही स्पेशलायझेशन गणित विषयात आहे. हे मित्राला माहीत आहे. नंतर आम्ही तबल्यातील लय, ताल, ठेका आणि गणितातील Permutations and Combinations यांवर बोललो. गणितात अचूकतेचे शास्त्र आहे. संगीतात अचूकतेची कला आहे. निझामुद्दीन खानची तबल्याची लग्गी किती गोड त्यावर तो भान हरपून बोलतो. माझा मित्र पाकिजा चित्रपटातील गाण्यांना जी विलक्षण वजनदार तबलासाथ आहे, त्यातील ठेहरावातील न गवसलेले सौंदर्य उलगडून दाखवतो.

संगीत हे त्याच्या कला व कलात्मकता, सौंदर्य, काव्यात्मकता, भाव, भक्तिरस या सर्वांगांनी हृदयाला हात घालण्याची किमया करते. शास्त्र पाहिजेच पण शास्त्रापेक्षा कला सरस असली पाहिजे. कला एकरेषीय नसते. कलेच्या सर्व रेषा सादरीकरणात उठून दिसल्या पाहिजेत. सावनी शेंडे यांची गायन मैफल फोंड्यात काही महिन्यांपूर्वी ऐकली. अविस्मरणीय असे गाणे झाले. ती मैफल कानांत रेंगाळत राहिली आहे. 

सावनीताईंनी रसिक प्रेक्षकांना सुरांची सैर करून आणताना चारूकेशीच्या होडीत अलवारपणे बसवले. ती यात्रा अलौकिक होती. स्वर-तुषार सहजी उधळून आले. सावनीताईंचे ‘मन हो राम रंगी रंगले’ हे भजन मुळातच लोकप्रिय आहे. गोवेकरांना हृदयप्रिय आहे. मी आरंभीच त्यांना फर्माईश पाठवली होती. त्यांनी ती पूर्ण केली. त्यांनी ‘राम रंगी रंगले’ हे मन रंगवून टाकणारे भजन भक्तीभावरसपूर्ण आवाजात सादर केले. रसिक त्या अनुभूतीत डुलत चिंब भिजून गेले. आम्ही अशा किती तरी अद्वितीय मैफिली गोव्यात अनेक दशके अनुभवतो. मल्लिकार्जुन मन्सूर, किशोरीताई, जसराज, जितेन्द्र अभिषेकी, अजय चक्रवर्ती, राजन व साजन मिश्रा, प्रभा अत्रे… अनेक मैफिली कानांची फुले करून ऐकल्या आहेत. त्यांच्या आठवणी अवीट गोडीने भरलेल्या व भारलेल्या आहेत.

जितेन्द्र अभिषेकी हे आमच्या गळ्यातील ताईत. माझे बालपण म्हार्दोळला गेले. त्यांचे गाव जवळचे मंगेशी. ते घरी आल्यावर मंगेशीहून चालत संध्याकाळी म्हार्दोळला महालसा मंदिरापर्यंत येत. त्यांच्याबरोबर स्थानिक हार्मोनियम वादक दामजीमामा मंगेशकर असायचे. बुवांचा तो शुभ्र पेहराव डोळ्यांसमोर आहे. मंगेशीला हायस्कूलजवळ एकदा मराठी साहित्य संमेलन झाले होते. मंगेश मंदिराजवळच, मैदानावर. तेव्हा अभिषेकी बुवा आणि गायक संचाने ‘मत्स्यगंधा ते महानंदा’ हा सुंदर कार्यक्रम सादर केला होता. अप्रतिम नाट्यगीतांचा वर्षाव झाला. अभिषेकींनी नाट्यगीतांच्या सुवर्णकाळात ज्या रचना दिल्या त्या अद्वितीय. त्यांनी मराठी नाट्यसंगीताला महाकाय नजराणा दिला – ‘कट्यार काळजात घुसली’ ते नाटक कायम पाहावेसे वाटते ते बुवांच्या आनंददायक रचनांमुळे. त्यांनी काही कोंकणी गीतांना सुरेख चाली लावल्या. त्यात बाकीबाब बोरकर यांचे, ‘त्या दिसा वडा कडेन गडद तिनसनां’, हे गीत तर त्यांच्याच आवाजात आहे. ‘ते निळे निळेशे धुंवरेपेल्यान’ हे गीतकार पद्मश्री वामन सरदेसाई यांचे गीत त्यांनी इतकी उत्तम चाल देऊन गायले आहे की ते माझे आवडते गीत. ‘कृपया तुम्ही कुणी गाऊ नका हो’ असे सांगावेसे वाटते. त्यांच्या आवाजातील कोंकणी गीते आकाशवाणीवरून श्रोत्यांच्या ओठात घोळू लागली. अभिषेकी यांचे मंचावर ऋषीमुनी, योगीयांच्यासारखे, आत्मविश्वासपूर्वक भारदस्तपणे आसनस्थ होणे हाच एक प्रेक्षणीय सोहळा असे.   

आमच्या जीवनात अनेक मराठी, हिंदी भजनांनी समृध्दी आणली. ‘हे गोविंद हे गोपाल, हे दयाल नाथ…’. जगजीतसिंग यांच्या आवाजातील ते भजन ऐकताना एका वेगळ्याच विश्वात अलगद विहरल्यासारखे वाटते. जीव हलका हलका होतो. उगाच शांत शांत वाटते. ‘विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे’ हे अभिषेकी यांनी गायलेले गोव्याचे संत कृष्णंभट्ट बांदकरांचे भजनही असेच मधुर आहे. गोव्याचे आणखी एक संत सोहिरोबा आंबिये रचित ‘हरी भजनाविण काळ घालवू नको रे’ हे अभिषेकी यांच्या आवाजातील भक्तीगीतसुध्दा गोड आहे. 

संतकवींच्या रचनांमध्ये इंद्रियतीत अनुभूतीचा समावेश शब्दबध्द असतो. प्रार्थना असते. ईश्वरी गुणगान असते. अद्वैताच्या अऩुभूतीने भारलेली शरणागत, नम्र भावना असते. गोमंतकीय गायक स्व. बाळकृष्ण केळकर यांचे ‘का रे नाठविसी कृपाळू देवासी, पोषितो जगाला तो एकलाचि’ हे तुकारामांचे भजन फोंड्यात एका मैफिलीत ऐकले होते. ते स्मरणपटलावर कायमचा ठसा उमटवून गेले. संजीव अभ्यंकर यांची दत्त भजने व इतर भजने हृदयाला शूचिर्भूततेचा व स्वच्छतेचा अनुभव देतात. माणिक वर्मा यांनी गायलेले ‘अमृताहूनी गोड नाम तुझे देवा’ हे अजरामर भजन हा भक्तिरसाचा परिपाक होय. संत कबिरांची अनेक भजने आहेत. ‘माटी कहे कुम्हारसे तू क्या रोंधे मोहे एक दिन ऐसा आयेगा मैं रोंधूंगी तोहे…’ हे लक्ष्मी शंकर यांचे रेडियोवर ऐकलेले गोड कबीर भजन आठवणींच्या कप्प्यात आहे.

आम्हाला आधुनिक तंत्रज्ञानाने संगीत ऐकण्याची चांगली साधने दिली आहेत. अत्याधुनिक स्पीकर यंत्रणा आली आहे. इवल्याशा एमपीथ्री प्लेयरमध्ये शेकडो गाणी रेकॉर्ड करून विमानतळावर प्रतिक्षा करताना वा गाडीच्या प्रवासात ऐकू शकतो. संगीतात मनुष्याला आनंद देण्याची पराकोटीची शक्ती आहे. संगीतीय व्याकरण न कळले तरी हृदयाला नाचवून रिफ्रेश करण्याची ताकद त्यात आहे. तंत्रज्ञानाने संगीत सर्वदूर पोचवले. श्रवणभक्तिची अनेक कवाडे, दालने आणि आवारे खुली केली. महान संगीतकार बिथोवनचे एक वचन आहे – ‘सर्व शहाणपण आणि तत्त्वचिंतन यांच्या पल्याड संगीत हा एक साक्षात्कारी अनुभव आहे’. खरंच !

About Post Author

Previous articleकिल्ले सुतोंडा (Sutonda Fort)
Next articleशेखबाईंच्या सहवासात (In the Company of Sheikh Madam)
मुकेश थळी हे बहुभाषी साहित्यिक, अनुवादक आहेत. त्यांना गणित आणि शास्त्रीय संगीत या विषयांत रूची आहे. ते गोवा विद्याप्रसारक मंडळाच्या शाळांत शालेय स्तरावर गणित विषयाचे अध्यापन करत. गोवा विद्यापीठाच्या कोंकणी विश्वकोश विभागात संशोधन सहायक, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागात वृत्तनिवेदक आणि भाषांतरकार म्हणून काम केले. त्यांचे कोंकणी भाषेत चार ललित लेख संग्रह आणि एक नाटक प्रकाशित आहे. कोकणी-इंग्रजी शब्दकोशाकरता सहसंपादक, कोकणी कथांचे इंग्रजी अनुवाद जे साहित्य अकादमी व फ्रंटलाईन अशा राष्ट्रीय स्तरावरच्या नियतकालिकांत प्रसिध्द आहेत. कथा, कविता, गीते आणि नाटकांचे लेखन तसेच कोकणी, इंग्रजी, मराठी नियतकालिकांसाठी स्तंभलेखक, सूत्रसंचालक, मुलाखतकार म्हणून काम केले आहे.

4 COMMENTS

  1. फार फार सुंदर लेख. वाचताना ती माझी सर्व आवडती गाणी मनात वाजून गेली.काश कोई महफिल सजाएं इन गानोसें और सामने बैठकर सुनना नसीबमें हो.

Leave a Reply to Sudha Pedharkar Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version