‘गरिबाची बायको आणि शेतकऱ्याचा बैल आजारी पडू नये’ अशी एक ग्रामीण म्हण आहे. आणि यंदातर दुष्काळाच्या माराने शेतकरीच आजारी पडला आहे. याचे पडसाद उमटलेले दिसताहेत ते बैलपोळ्याच्या सणावर. राज्यातील तीव्र दुष्काळामुळे बैलपोळ्याच्या आनंदावर विरजण पडले आहे. दरवर्षी खेड्यापाड्यातून मोठ्या उत्साहाने साजरा होणा-या बैलपोळ्यांला यंदा रंगच चढला नसल्याचे चित्र राज्यात दिसून आले.
भयावह दुष्काळामुळे चारा व पाणी टंचाईने ग्रासलेल्या शेतकऱ्यांनी जनावरे जगविण्यासाठी दुष्काळी भागांसाठी काही ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या चारा छावण्यांमध्ये जनावरे दाखल केली. स्वतः शेतकरीही छावणीतच आश्रयाला होते . त्यामुळे बळीराजाला यंदाचा बैलपोळा चारा छावण्यांमध्येच साजरा करण्याची वेळ आली. तर काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे बैलपोळा केवळ बैलपूजेपुरताच मर्यादीत राहिला. यावर्षी अतिवृष्टीने बैल सतत पाण्यातच आहेत. शेतात पाण्याचे डोह साचले असल्याने शेतातील कामे बंद आहेत. या कारणांमुळे बैलपोळ्याच्या मिरवणुका, बैलांच्या शर्यती आणि बैलपोळ्याशी निगडीत प्रथा पार पाडण्यात शेतक-यांचा फारसा उत्साह दिसून आला नाही.
अतिरिक्त पावसाने हातातोंडाशी आलेली पिके वाया गेल्याने यंदाचा बैलपोळा चिंतेच्या सावटाखाली साजरा झाला. या वर्षी सुरुवातीस झालेल्या पावसाने पिकांनी चांगला जोर धरला होता. यामुळे व्यापाऱ्यांनी एक-दीड महिन्यापूर्वीच पोळ्यासाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी केली. मात्र पावसाचा जोर कायम राहिल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली सर्व पिके वाया गेली. याचा परिणाम यंदाच्या पोळ्याच्या बाजारावरही झाला. बाजारपेठेतील या साहित्याकडे बहुतांश शेतकरी फिरकलेही नाहीत. बैलांच्या सजावटीसाठी नवे साहित्य खरेदी करण्याऐवजी शेतकऱ्यांनी यंदा गेल्या वर्षीच्या मटाटय़ा, गळमाळा, चौरे, शेंब्या, घाटी, चंगाळ्या, रेशीममाळा, कमरपट्टा, बाशिंग स्वच्छ आणि दुरुस्त करून वापरले. ज्या शेतक-यांना जोडधंदा किंवा नोकरीचा आधार आहे त्यांनी बैलपोळा उत्सांहात साजरा केला. इतर शेतक-यांना मात्र हाती पैसा नसताना आणि डोक्यावर आभाळ फाटलेले असताना बैलपोळा कसा साजरा करायचा ही चिंता भेडसावत राहिली.
परिस्थिती बिकट असली तरी वर्षातून एकदा येणारा हा सण रिकामा जाऊ द्यायचा नाही, या उद्देशाने शेतक-यांनी उसने अवसान आणत पुढील वर्षी सर्व मनाप्रमाणे होईल या आशेवर बैलपोळा साजरा केला. चांगली वृष्टी झालेले भाग वगळले तर राज्यात इतर ठिकाणी बैलपोळ्याचा दरवर्षीप्रमाणे रंग दिसून आला नाही. बळीराजाच्या घरी वर्षातून एकदा होणा-या कोडकौतुकाला यंदा बैल पारखाच राहिला.
दिनकर गांगल हे ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या वेबपोर्टलचे मुख्य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्यांनी पुण्यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्यांनी आकारलेली ‘म.टा.’ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्यांना ‘फीचर रायटिंग’ या संबंधात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय (थॉम्सन फाउंडेशन) पाठ्यवृत्ती मिळाली आहे. त्याआधारे त्यांनी देश विदेशात प्रवास केला.
गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्यासारख्या व्यक्तींच्या साथीने ‘ग्रंथाली’ची स्थापना केली. ती पुढे महाराष्ट्रातील वाचक चळवळ म्हणून फोफावली. त्यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी ‘ग्रंथाली’च्या ‘रुची’ मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत ‘ग्रंथाली’ची चारशे पुस्तके त्यांनी संपादित केली. त्यांनी संपादित केलेल्या मासिके-साप्ताहिके यांमध्ये ‘एस.टी. समाचार’चा आवर्जून उल्लेख करावा लागेल. गांगल ‘ग्रंथाली’प्रमाणे ‘प्रभात चित्र मंडळा’चे संस्थापक सदस्य आहेत.
साहित्य, संस्कृती, समाज आणि माध्यमे हे त्यांचे आवडीचे विषय आहेत. त्यांनी त्यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि ‘स्क्रीन इज द वर्ल्ड’ अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यांना महाराष्ट्र सरकारचा ‘सर्वोत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती’चा पुरस्कार, ‘मुंबई मराठी साहित्य संघ’ व ‘मराठा साहित्य परिषद’ यांचे संपादनाचे पुरस्कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल ‘यशवंतराव चव्हाण’ पुरस्कार लाभले आहेत.