– प्रतिनिधी
कवी-चित्रकार षांताराम पवार यांची कारकीर्द धगधगती आहे. ते वयाचा अमृतमहोत्सव साजरा करण्याच्या टप्प्यावर आले तरी त्यांची निर्मिती-ऊर्जा शांत झालेली नाही. उलट, सभोवतालच्या परिस्थितीच्या दारूणतेबरोबर तिचा तडफडाट वाढलेला आहे. त्यांचा पूर्वीचा कलासक्त सोस आता भेदकतेने व्यक्त होतो. त्यांनी योजलेले ‘ऋतुसंहार’ हे प्रदर्शन म्हणजे त्यांच्या अस्वस्थेतेचे प्रतिक होते. प्रदर्शन महिन्यापूर्वी जे.जे. उपयोजित कला शिक्षणसंस्थेच्या दालनात भरले होते. प्रदर्शनाला निमित्त होते पवार यांच्या कवितेचे. ती कविताच मुळी अस्वस्थतेमधून जन्माला आली. माणसाने सध्या निसर्गनाश चालवला आहे आणि वर मानभावीपणे तो पर्यावरण रक्षणाच्या गोष्टी बोलत आहे! हा जो मानवी जीवनातला खोटेपणा आहे त्यामधून पवार यांच्या ‘ऋतुसंहार’ या कवितेचा जन्म झाला. ती कविता ‘थिंक महाराष्ट्र’ या आपल्या वेबसाईटवरच सार्वजनिकरीत्या प्रथम अवतरली ! त्यानंतर पवार यांना ती एक कॅम्पेनच व्हावी असे वाटले. त्याचाच एक भाग म्हणजे हे प्रदर्शन.
पवार स्वत: या कवितेबद्दल आणि त्यांच्या तडफडाटाबद्दल सतत आवेगाने अनेक लोकांशी बोलत राहिले. त्यांची भूमिका ढोबळपणे अशी मांडता येईल:
“मी गिरणगावातला माणूस. तिथं पाण्याचं दुर्भीक्ष्य. ज्या दिवशी आमच्या गावात पाणी असे तो आमचा दिवाळसण ! लोक सतत पाण्याची वाट बघत असत. एक दिवस, असाच पाण्याची वाट बघत पेपर वाचत बसलो होतो. पेपरमध्ये छोटीशी बातमी होती बिहारमध्ये महापूर आल्याची. कारण काय, तर हिमालय वितळत होता ! पण याचं मला काही विशेष वाटलं नाही, कारण त्या महापूराचं पाणी माझ्या दारापर्यंत पोचलं नव्हतं. आमच्याकडे एखादी पाईपलाईन फुटली तर महापूर यायचा, तसंही काही झालं नव्हतं. मग त्याचाही फार विचार केला नाही. नंतर मी विसरूनच गेलो. विशेष म्हणजे त्याच दरम्यान मी
पुणे-महाबळेश्वरला जाऊन आलो होतो. तिकडचं वातावरण बदलल्यासारखं वाटलं, पुण्या-महाबळेश्वरला असणा-या तापमानापेक्षा ते अधिक जाणवायला लागलं आणि मला ‘टाइम’ मॅगझीनमधल्या बातमीचं जे ओझोन वायुला भोकं पडलीत त्याबद्दल वाचलं होतं त्याची लिंक लागली, ती हिमालय पर्वत वितळू लागल्याची आणि त्यामुळे बिहारमध्ये महापूर आल्याची. मी कवी असल्यामुळे पुढचं व्हिजन इमॅजिन करू लागलो. जर हे असंच चाललं म्हणजे हे कशामुळे झालं तर पर्यावरणामुळे जसं की पृथ्वीचं कवच जो ओझान वायू, वृक्षतोडी वगैरेंसारख्या आपल्याच चुकीमुळे सूर्याची प्रखरता वाढली त्यामुळे पृथ्वीच्या कवचाला म्हणजे ओझोन वायूच्या थराला भोकं पडली. कविता सुचली नाही तर झाली! हे खूप महत्त्वाचं.
पवार यांच्या ‘ऋतुसंहार’! या कवितेचा अर्थ त्यांच्या पंचवीस विद्यार्थ्यांना जसा भावला तसा त्यांनी तो प्रगट केला. त्याचे प्रदर्शन म्हणजे ‘ऋतुसंहार’! त्यामध्ये कोणी चित्रे काढली तर कोणी मांडणीशिल्प रचले. हे वेगवेगळे आविष्कार पाहत असताना मन थक्क होऊन जात होते. अविनाश गोडबोले यांनी उभे केलेले कॉक्रिटचे जंगल, अरूण काळे यांनी साक्षात ढगावरच घातलेला कु-हाडीचा घाव, रतन गोडबोले यांनी फाशीला टांगलेला पक्षिसमूह, दिलीप शिवलकर यांनी छायाचित्र व संगणकीय प्रणाली यामधून उभे केलेले मातीचे दालन, दीपक घारे यांनी कवितेचे भीत्तिचित्र मांडून घडवलेली कारणमीमांसा, रंजन जोशी यांनी भावव्यक्त केलेली अधोगतीची कमान…, प्रत्येक नमुना निसर्ग–हासाची प्रत्ययकारी जाणीव देणारा. सर्वांत सहज कळणारे परंतु भेदक चित्र होते ते गंगाधरन यांचे, तीन फोटोफ्रेम्सचे. पहिल्या फ्रेमध्ये निर्माता ब्रम्हा, दुस-या फ्रेमध्ये पालनकर्ता विष्णू आणि तिस-या फ्रेमच्या जागी त्यांनी आरसा टांगला होता, म्हणजे संहारकर्त्या शंकराच्या जागी आपलीच छबी दिसत असे! यापेक्षा वेगळा ‘ऋतुसंहार’ तो काय असणार?
– प्रतिनिधी